काही चित्रपट कापरासारखे उडून जातात. काही चित्रपट थोडेफार लक्षात राहतात. पण काही चित्रपट असेही असतात, जे मनात कायमचं स्थान मिळवतात. त्यातलाच एक आहे महेश वामन मांजरेकर कृत "काकस्पर्श - एक विलक्षण प्रेमकहाणी..."
हरीदादा (सचिन खेडेकर) त्यांच्या भावाचे, महादेवचे (अभिजीत केळकर) दुर्गेशी (केतकी माटेगावकर) लग्न लावून देतात. लग्नानंतर नाव बदललेल्या उमेचे घरात स्वागत होते. तिच्या शृंगाराच्या पहिल्याच रात्री उमेवर मानसिक आघात होतो आणि दीर्घ आजाराने ग्रासलेला तिचा नवरा महादेव शय्येवरच प्राण सोडतो. महादेवच्या पिंडाला कावळा शिवावा म्हणून हरीदादा एक प्रतिज्ञा करतात...
त्या प्रतिज्ञेमुळे उमेचं आयुष्य उध्वस्त होतं. परपुरूषाचा स्पर्श न लाभलेली, शृंगाररस न अनुभवलेली उमा (प्रिया बापट) तिचं आयुष्य खरडत राहते. या दर्म्यान हरीदादाबद्दल तिच्या मनात प्रेमाची पालवी फुटते. प्रतिज्ञाबद्ध हरीदादा उमेच्या प्रेमाचा अखेर स्वीकार करतात आणि उमा प्राण सोडते. महाभारतकालीन संदर्भ द्यायचा झाला, तर गंगापुत्र भीष्मासारखं प्रतिज्ञाबद्ध आयुष्य जगत असताना, हस्तिनापूररूपी उमाचं उध्वस्त होत असलेलं जीवन निमूटपणे पाहत राहणं हेच हरीदादाचं नशीब असतं...
एक शोकांतिका असूनही चित्रपट कुठेही कंटाळवाणा होत नाही. ह्याचं श्रेयं जातं कथानकाला धरून ठेवणाऱ्या गिरीश जोशी यांच्या पटकथेला. पटकथेसोबतच चित्रपटात असलेली मोजकीच पण चपखल बसवलेली गाणी आणि सर्व कलावंतांचा तोडीस तोड अभिनय यांमुळे चित्रपट पराकोटीची ऊंची गाठतो. सचिन खेडेकर व प्रिया बापट या मुख्य कलाकारांसोबत, मेधा मांजरेकर, वैभव मांगले, सविता मालपेकर, संजय खापरे, सक्षम कुलकर्णी, मनवा नाईक या कलावंतांनीही आपापल्या भूमिका चोख वठवल्या आहेत. संपूर्ण चित्रपटाचं चित्रिकरण अतिशय उत्तम झालं आहे. १९३० ते १९५०चा तो काळ, ते सारवलेलं जुनाट घर, सर्व कलाकारांचे कपडेपट व रंगभूषा, या सर्वांचं वास्तववादी चित्रण झालं आहे...
चित्रपटातली सर्वच दृश्य छान आहेत, पण मृख्यत्वे; १. आपला पुतण्या संकर्षण (सक्षम कुलकर्णी) आणि त्याची पत्नी खोलीत असताना, बंद दाराबाहेर येणारे आवाज ऐकून आनंद घेणारी उमा आणि त्याचक्षणी हरीला समोर पाहून बावरलेली उमा... २. विहिरीवर आपल्या पुतणीला, शांतीला (मनवा नाईक) नवरा गेल्याच्या दु:खापेक्षाही मोठं असं काहीतरी आपण गमावलं हे जिवाच्या आकांताने सांगणारी उमा... आणि ३. उमाच्या शेवटच्या काही क्षणात आपल्या प्रतिज्ञेबद्दल आणि उमावरच्या प्रेमाबद्दल तिच्याजवळ कबूली देणारा हरी... ही तीन दृश्य खूपच सुंदर झाली आहेत...
बहिणाबाईंच्या, "अरे संसार संसार..." या ओवीच्या पहिल्या दोन ओळींचा संपूर्ण चित्रपटभर प्रभावीपणे वापर केला गेलेला दिसतो. चित्रपटाच्या शेवटी सचिन खेडेकर यांच्या धीर-गंभीर आवाजात त्याच दोन ओळी ऐकताना अंगावर काटा येतो. एकंदरीत, सर्वच बाबतीत उच्चयोत्तम कळस घाठणारी शोकांतिका म्हणजेच महेश वामन मांजरेकर दिग्दर्शित, "काकस्पर्श - एक विलक्षण प्रेम कहाणी..."
"अरे संसार संसार...
जसा तवा चुल्ह्यावर...
आधी हाताला चटके...
तेव्हा मिळते भाकर..."
@ अनिकेत परशुराम आपटे.

No comments:
Post a Comment