Tuesday, 21 September 2021

आगळा वेगळा खेळ...

गलिच्छ राजकारण, समाजकंटकांशी असलेले राजकारण्यांचे लागेबांधे, त्यातून होणारी कटकारस्थानं, या सर्वांवर भाष्य करणारा चित्रपट म्हणजेच, १९९९ साली प्रदर्शित झालेला गुलज़ार साहेबांचा "हुतुतु..."

भूतकाळ आणि वर्तमानकाळाची सांगड घालत चित्रपटाची कथा पुढे सरकत जाते. वर्तमानकाळात घडणारं कथानक एका अपहरणनाट्यापासून सुरू होतं. आपल्या एका माणसाला सोडवण्यासाठी बंडखोरांचा एक समुह, मुख्यमंत्री मालती बर्वे (सुहासिनी मूळ्ये) यांच्या मुलीचं म्हणजेच पन्ना बर्वेचं (तब्बू) अपहरण करतो. हे अपहरणनाट्य सफल होतं आणि बंडखोरांच्या माणसाला सोडलं जातं, पण ते ही अर्धमेल्या अवस्थेत. त्या माणसाच्या या अवस्थेला व एकूणच परिस्थितीला मालती बर्वेच जबाबदार आहे हे समजल्यामुळे बंडखोरांचा तो समुह, भर सभेत स्फोट घडवून आणत पन्नाच्या मदतीनेच मालती बर्वेचा वध करतो...

वर्तमानकाळात घडत असलेलं हे मुख्य कथानक, भूतकाळातल्या सहकथानकाच्या प्रवाहात अधून मधून डोकं वर काढत राहतं. भूतकाळात दाखवल्या जाणाऱ्या घटनांमधून वर्तमानकाळाच्या कथानकाचा पाया रचलेला आपल्याला दिसतो. कथानकासोबतच मातब्बर कलावंतांच्या फौजेने चित्रपटाला चार चाँद लावलेत. डॉ. मोहन आघाशे, कुलभूषण खरबंदा, शिवाजी साटम, राज झुत्शी, अजीत वाच्छानी, ग्रेसी सिंह या मंडळींनी आपापल्या अदाकारीने भूमिकांना न्याय दिलेला दिसतो. पण याखेरीज, सर्वात हटके भूमिका जर कोणाची असेल, तर ती आहे सुनील शेट्टी यांची...

आदित्य पटेल या मुलाची व्यक्तिरेखा सुनील शेट्टी यांनी छानच रंगवली आहे. व्यावसायिक पातळीवर गाजणाऱ्या त्यांच्या इतर एकसूरी भूमिकांना बगल देत सुनील शेट्टी यांनी आदित्यची व्यक्तिरेखा साकारली आहे. गलिच्छ राजकारणामुळे, कट कारस्थानांमुळे होणारी चिडचीड किंवा येणारा संताप म्हणा आणि सगळं जाणूनही काहीही करू न शकल्यामुळे होणारी घुसमट सुनील शेट्टी यांनी अप्रतीम दाखवली आहे. चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा नावावरून आणि एक नायिका-दोन नायक या समिकरणावरून असं वाटलं, की प्रेम त्रिकोण आणि कुरघोड्या असं काही असेल, पण भिन्न व्यक्तिरेखा आणि एकच विचारधारा असलेल्या  आदित्य व भाऊसोबत (नाना पाटेकर) बंडखोर विचारांची पन्ना, यांनी वेगळेच रंग भरले...

अभिनेत्री तब्बूने बेफिकीर, बिन्धास्त, अशी टॉम बॉय छटेतली पन्ना छान रंगवली आहे. चित्रपट गंभीर स्वरूपाचा आहे, तरी पन्नाला मिळालेल्या काही संवादांमुळे व सीन्समुळे थोडीफार विनोद निर्मिती होते. तब्बूवर चित्रित झालेली दोन दृष्य विशेष लक्षात राहतात. पन्नाचं बाळ दगावतं त्या वेळी बेडवरूनच पन्ना विचारते, "आई, मुलगा होता की मुलगी..." या प्रश्नाच्या वेळी शारिरिक वेदनेपेक्षा बाळ गेल्याचं दु:ख पन्नाच्या चेहेऱ्यावर अधिक दिसलं. दुसरा सीन जो लक्षात राहिला, तो होता सुहासिनी मूळ्ये आणि तब्बू यांच्यातला चित्रपटातील शेवटचा सीन. गर्दीतून वाट काढत पन्ना मालतीबाईंपर्यंत पोहोचते आणि, "कशी आहे आई..??" हा प्रश्न विचारते. त्यावेळी आईबद्दलची काळजी आणि मालती बर्वेबद्दलचा राग, या दोन्ही भावना एकाच वेळी तब्बूने सुरेख दाखवल्या आहेत...

इतर सर्व कलावंत मंडळींसोबत, चित्रपटात वेगळ्या भूमिकेत दिसले ते अभिनेते नाना पाटेकर. सगळं हसत हसत सांगणारा, टोमणे मारणारा, हजरजबाबी भाऊ, कथेच्या गंभीर स्वरूपाला अधून मधून हलकं बनवत राहतो.  गाव-खेड्यात राहणारा भाऊ, वेळेप्रसंगी इंग्रजी बोलून समोरच्या व्यक्तीला निरुत्तर करतो हे एका प्रसंगात छानच दाखवलं आहे. "थोड़ासा रुमानी हो जाएँ" आणि "राजू बन गया जंटलमॅन" या दोन्ही चित्रपटातली खुशमस्कऱ्या समाज प्रबोधक ही नानांची भूमिका याही चित्रपटात आपल्याला पहायला मिळते. "हुतुतु"मधली त्यांची व्यक्तिरेखा थोडी वेगळी आहे कारण या चित्रपटात त्यांच्या शाब्दिक वारांना तितक्याच धारदार गाण्यांचीही साथ मिळाली आहे...

पार्श्वसंगीतासोबतच विशाल भारद्वाज यांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्यांचाही कथेवर चांगलाच परिणाम दिसतो. "जय हिन्द हिन्द...", "जागो जागो जागते रहो हे...", "बन्दोबस्त है जबरदस्त है..." ही गाणी एकदम जोशपूर्ण तर आहेतच, पण बऱ्यापैकी वेगवानही आहेत. सर्वात जास्त लक्षात राहतं, "घपला है घपला..." ताकदीच्या शब्दांसोबतच गाण्यांचं चित्रिकरणही तितकंच सुंदर झालंय. यातली जवळ जवळ सर्व गाणी नाना पाटेकर यांच्यावर चित्रीत झाली आहेत. चित्रपटातली, "छई छप्पा छई छप्पा के छई..." आणि "इतना लंबा कश लो यारों..." ही गाणी थोड्या धीम्या गतीची आहेत. चित्रपटाची रोमँटिक बाजू या दोन गाण्यांनी सांभाळलेली आहे. अर्थात, "छई छप्पा छई..." हे गाणी चित्रपटात नसतं तर विशेष फरक पडला नसता असं मला वाटतं...

गुलज़ार रचित, राजकारणावरचा हा आगळा वेगळा खेळ काही प्रेक्षकांना आवडला तर, काहींनी त्याला नापसंत केलं. पण तरीही, १९९९ सालचा "हुतुतु" हा चित्रपट पाहण्यासारखा आहे हे नक्की...

@ अनिकेत परशुराम आपटे.

No comments:

Post a Comment