विमानाचं अपहरण, गुन्हेगारांच्या मागण्या आणि मागण्या पूर्ण झाल्यावर विमानाची सुटका... ८०च्या दशकात सर्रास होणाऱ्या या प्रकारावर आधारीत आहे, असीम अरोरा व परवेज़ शेख़ लिखीत, "बेल बॉटम..."
चित्रपटाचं कथानक सरळसोट आहे. दिल्लीवरून निघालेल्या IC 691 या विमानाचं अपहरण होतं. ते विमान अमृतसर व लाहौरमार्गे दुबईला उतरवण्यात येतं. या गोष्टीला पाकिस्तानचा छुपा पाठिंबा व सहाय्य असतं. सततच्या या त्रासाला त्या वेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधी (लारा दत्ता) कंटाळलेल्या असतात...
भरमसाठ पैसे आणि आपल्या साथिदारांची सुटका, या मागण्यांवर अपहरणकर्त्यांशी चर्चा करायला इंदिराजी आपल्या दोन मंत्र्यांना पाठवण्याचं ठरवतात. पण दुसरीकडे कोड नेम 'बेल बॉटम' म्हणजेच रॉ एजंट अंशुल मल्होत्रा (अक्षय कुमार), हा कट हाणून पाडण्याचा मनसूबा रचतो. 'बेल बॉटम' आपल्या इराद्यात सफल होईल का... की अपहरणकर्त्यांचा कट तडीस जाईल... हे चित्रपट पाहिल्यावरच समजेल...
चित्रपटाचं कथानक ८० ते ९० या दशकात घडत असल्याने त्या काळातला कपडेपट, वाहनं छान जमून आली आहेत. त्या काळातला देखावा, सेट्स छान उभारलेले आहेत. चित्रपटातली दुसरी जमेची बाजू म्हणजे कलावंतांची रंगभूषा. भरघोस मिशा असलेला अक्षय कुमार छान दिसतो. "रावडी राठोड़"मध्येही अक्षय कुमार यांनी मिशीवाला नायक रंगवला होता, पण "बेल बॉटम" चित्रपटातला नायक अधिक जबाबदार व विचारवंत वाटतो...
अक्षय कुमार आणि इतर कलावंतांच्या रंगभूषेशिवाय लारा दत्ता, चित्रपटातला सर्वात मोठा धक्का आहे. लारा दत्ता यांची रंगभूषा कमाल झाली आहे. इंदिरा गांधी यांच्या व्यक्तिरेखेत लारा दत्ता आहेत, हे पटकन ओळखू नाही. आपल्या संवादफेकीत आणि देहबोलीत, लारा दत्ता यांनी कमालीचा बदल दाखवला आहे. त्या बदलामुळेच लारा दत्ता यांनी साकारलेली इंदिरा गांधी अधिक प्रभावशाली वाटते...
चित्रपटाच्या कथेला बऱ्यापैकी वेग आहे. चित्रपटात दोन कथानकं आहेत. पहिल्या कथानकात अक्षय कुमारचा अन्शुल ते बेल बॉटम बनण्याचा प्रवास दाखवला आहे, जो काही काही ठिकाणी थोडासा रटाळ वाटतो पण तरीही बऱ्यापैकी वेग राखतो. विमान अपहरणाचं दुसरं कथानक मात्र चांगलंच वेगवान आहे. त्यात कुठेही दिखाऊपणा जाणवत नाही. साहसदृष्यही वास्तविक वाटतात. अक्षय कुमार असूनही हाणामारी दाखवताना काळाचा आणि भूमिकेचा तोल सांभाळलेला दिसतो. विमानतळावर वादळाच्या सानिध्यात रंगणाऱ्या पाठलागाच्या दृश्याच्या वेळी येणाऱ्या पार्श्वसंगीतामुळे, "परमाणू" या चित्रपटाची आठवण होते...
चित्रपटातली गाणी यथातथाच आहेत. अर्थात गाणी कथेसोबतच चालत असली, तरी एखाद-दुसरं गाणं वगळता आलं असतं. चित्रपटात वाणी कपूरची भूमिका थोडी खटकते. अक्षय कुमारसारखा नायक एकटा राहू नये म्हणून वाणी कपूरची वर्णी लागली असं म्हटलं तरी चालू शकेल. चित्रपटाच्या एकदम शेवटी वाणी कपूरने साकारलेली व्यक्तिरेखा चित्रपटात का होती हे सांगण्याचा जो प्रयत्न झाला, तो पटत नाही...
एकंदरीत, वेगवान कथानक, उत्तम रंगभूषा आणि सुरेख अभिनय या त्रयींची सांगड घातलेला व सत्य घटनेच्या पार्श्वभूमीवर बेतलेला रणजीत तिवारी दिग्दर्शित, "बेल बॉटम" नक्कीच पहावा असाच आहे...
@ अनिकेत परशुराम आपटे.

No comments:
Post a Comment