Friday, 24 September 2021

पाणावलेला संवाद...

दोन माणसात संवाद झाला, तर मन हलकं होतं असं म्हणतात. संवाद जसा दोन माणसात होतो तसा दोन मनातही होत असतो. एका माय-लेकाच्या मनातला हाच संवाद आपल्याला दिसतो, "रंग दे बसंती" या चित्रपटातल्या, "लुका छुप्पी बहुत हुई..." या गाण्यामधून...

फ्लाईट लेफ्टनंट अजय राठोडला (आर. माधवन) वीरमरण येतं. त्याचं शव चितेवर ठेवलं जातं आणि शव गुंडाळलेला तिरंगा त्याच्या आईला म्हणजेच श्रीमती राठोड (वहीदा रहमान) यांना दिला जातो. श्रीमती राठोड यांना माहित आहे की आपला मुलगा आता या जगात नाही. पण तरीही त्या माऊलीचं मन सांगत राहतं...

लुका छुपी बहुत हुई... सामने आ जा ना...
कहाँ कहाँ ढूँढ़ा... तुझे थक गई है अब तेरी माँ...
आज शाम हुई... मुझे तेरी फिकर...
धुँधला गई देख मेरी नजर... आ जा ना...


तिला वाटत असतं आपला मुलगा कुठेतरी लपलाय. त्याला बाहेर येण्यासाठी ती माऊली परोपरीने विनवण्या करत आहे. मनापासून त्याला बोलवत आहे. त्या आईची कळवळ अजयपर्यंत पोहोचते. अग्नी पेटतो, आणि या जगापासून दुरावलेला अजय आपल्या आईला सांगतो...

क्या बताऊँ माँ कहाँ हूँ मैं...
यहँ उड़ने को मेरे खुला आसमान है...
तेरे किस्सों जैसा भोला...
सलोना जहाँ है यह सपनोंवाला...
मेरी पतंग हो बेफिकर उड़ रही है माँ...
डोर कोई लूटे नहीं बींच से काटे ना...


अजय म्हणतो, "आई, अगं तुला काय सांगू मी कुठे आहे... एक सुंदर आणि नवीन जग आज माझ्या पुढे आहे. मी स्वच्छंद आकाशात मनमुराद उडत जातोय. मला कोणीही थांबवणारं नाही की माझा मार्ग अडवणारंही कोणी नाही. या स्वप्नांच्या अवकाशात आता मी मुक्त विहार करत आहे..."

चिता जळते आहे. उघड्या डोळ्यांनी आपल्या मुलाला दूर जाताना ती आई पाहते आहे. पण तरीही तिचं मन तिला सांगत आहे, "काळजी करू नकोस. तो इथेच कुठेतरी आहे. येईल परत..." मनातले हे विचार डोळ्यात साठवत आई म्हणते...

तेरी राह तके अखियाँ...
जाने कैसे कैसे होये जिया...
धीरे धीरे आँगन उतरे अँधेरा...
मेरा दीप कहाँ...
ढलके सूरज करे इशारा...
चँदा तू है कहाँ...
मेरे चँदा तू है कहाँ...


डोळ्यात प्राण आणून ती माऊली आपल्या मुलाला हाक मारताना म्हणते, "माझ्या राजा, अरे सांज होत चालली. अंधारही वाढत चाललाय. ये ना आता पटकन..." इथे अंधार म्हणजे प्रकाशाचा आभाव नसून काळजाचा तुकडा काळाच्या पडद्याआड गेल्याने आईच्या मनात निर्माण झालेली पोकळी, असा होतो. त्या पोकळीत आईला तिचं बाळ दिसत नसल्यामुळे तिचा जीव कासावीस होतोय...


आपल्या मुलाचं परत आलेलं सामान पाहून आई कोलमडते. त्यातल्या गोष्टी पाहताना तिला क्षणाक्षणाला आपल्या मुलाची आठवण होते. तिथे नव्या जगात मोकळं आयुष्य जगणारा तो मुलगा खूप आनंदात आहे. त्याच आनंदाच्या भरात तो आईला सांगतो...

कैसे तुझको दिखाऊँ यहाँ है क्या...
मैने झरने से पानी माँ तोड़ के पिया है...
गुच्छा गुच्छा कई ख्वाबों का...
उछल के छुआ है...
छाया लिये भली धूप यहाँ है...
नया नया सा रूप यहाँ...
यहाँ सबकुछ है माँ फिर भी...
लगे बिन तेरे मुझे अकेला...

सगळे पाश सोडून आलेल्या त्याला या नव्या जगात सगळंच खूप सुंदर वाटतंय. आपल्याला हवं ते मिळालं याचा त्याला मनापासून आनंद होतोय. पण या आनंदालाही एक दु:खाची किनार आहे. तो स्वर्गात आहे. सगळ्या सुखसोयी त्याच्या चरणांशी आहेत. तरीही हा आनंद तो पूर्ण उपभोगू शकत नाही. तो म्हणतो, "आई, इथे सगळं काही आहे. पण तू माझ्या जवळ नाहीस. त्यामुळे मला खूपच एकटेपणा आलाय...

आई व मुलाचा हा अप्रतीम संवाद दाखवताना प्रसून जोशी यांनी सुरेख शब्द गुंफले आहेत. ए.आर.रहमान यांच्या सुमधूर संगीताने प्रसून जोशींच्या शब्दांची ऊंची अधिक वाढते. विशेष म्हणजे गाण्यात तबला आणि बासरीचा अप्रतीम वापर झालेला दिसतो...

लतादीदी आणि खुद्द ए.आर.रहमानने आपल्या स्वरांनी या गाण्याला सजवलं आहे. दोघांमधील सरगम ऐकतच रहावी अशीच आहे. दीदींनी वापरलेली खालची पट्टी, एका आईची व्यथा व काळजी दर्शवते तर ए.आर.रहमान यांचे वरच्या पट्टीतले स्वर एका मोकळ्या झालेल्या श्वासाचा आनंद व्यक्त करतात...

गाणं सुरू असताना आपल्याला चित्रपटातले बरेच कलावंत पडद्यावर दिसतात. त्यातही, एकही शब्द न उच्चारता फक्त डोळे आणि चेहेऱ्यावरचे हावभाव यांच्या साथीने वहीदाजींनी जी अदाकारी सादर केली, ती पाहून अंगावर काटा येतो. वयात आलेला आपला मुलगा आपल्या डोळ्यांदेखत... हे पाहताना काळीज किती पिळवटून निघालं असेल त्या आईचं...

इतक्या वेळा "रंग दे बसंती" पाहिला. काही वेळा हे गाणं पुढेही केलं. पण डोळे बंद करून फक्त हे गाणंच नुसतं ऐकलं आणि बंद डोळ्यातूनही पाण्याचे थेंब बाहेर येताना दिसले. खरंच, शब्दांची ताकद, संगीताची जादू आणि स्वरांचा गोडवा, या त्रयींमुळे, "लुका छुपी बहुत हुई..." हे गाणं अजरामर झालं आहे...

@ अनिकेत परशुराम आपटे.

Tuesday, 21 September 2021

आगळा वेगळा खेळ...

गलिच्छ राजकारण, समाजकंटकांशी असलेले राजकारण्यांचे लागेबांधे, त्यातून होणारी कटकारस्थानं, या सर्वांवर भाष्य करणारा चित्रपट म्हणजेच, १९९९ साली प्रदर्शित झालेला गुलज़ार साहेबांचा "हुतुतु..."

भूतकाळ आणि वर्तमानकाळाची सांगड घालत चित्रपटाची कथा पुढे सरकत जाते. वर्तमानकाळात घडणारं कथानक एका अपहरणनाट्यापासून सुरू होतं. आपल्या एका माणसाला सोडवण्यासाठी बंडखोरांचा एक समुह, मुख्यमंत्री मालती बर्वे (सुहासिनी मूळ्ये) यांच्या मुलीचं म्हणजेच पन्ना बर्वेचं (तब्बू) अपहरण करतो. हे अपहरणनाट्य सफल होतं आणि बंडखोरांच्या माणसाला सोडलं जातं, पण ते ही अर्धमेल्या अवस्थेत. त्या माणसाच्या या अवस्थेला व एकूणच परिस्थितीला मालती बर्वेच जबाबदार आहे हे समजल्यामुळे बंडखोरांचा तो समुह, भर सभेत स्फोट घडवून आणत पन्नाच्या मदतीनेच मालती बर्वेचा वध करतो...

वर्तमानकाळात घडत असलेलं हे मुख्य कथानक, भूतकाळातल्या सहकथानकाच्या प्रवाहात अधून मधून डोकं वर काढत राहतं. भूतकाळात दाखवल्या जाणाऱ्या घटनांमधून वर्तमानकाळाच्या कथानकाचा पाया रचलेला आपल्याला दिसतो. कथानकासोबतच मातब्बर कलावंतांच्या फौजेने चित्रपटाला चार चाँद लावलेत. डॉ. मोहन आघाशे, कुलभूषण खरबंदा, शिवाजी साटम, राज झुत्शी, अजीत वाच्छानी, ग्रेसी सिंह या मंडळींनी आपापल्या अदाकारीने भूमिकांना न्याय दिलेला दिसतो. पण याखेरीज, सर्वात हटके भूमिका जर कोणाची असेल, तर ती आहे सुनील शेट्टी यांची...

आदित्य पटेल या मुलाची व्यक्तिरेखा सुनील शेट्टी यांनी छानच रंगवली आहे. व्यावसायिक पातळीवर गाजणाऱ्या त्यांच्या इतर एकसूरी भूमिकांना बगल देत सुनील शेट्टी यांनी आदित्यची व्यक्तिरेखा साकारली आहे. गलिच्छ राजकारणामुळे, कट कारस्थानांमुळे होणारी चिडचीड किंवा येणारा संताप म्हणा आणि सगळं जाणूनही काहीही करू न शकल्यामुळे होणारी घुसमट सुनील शेट्टी यांनी अप्रतीम दाखवली आहे. चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा नावावरून आणि एक नायिका-दोन नायक या समिकरणावरून असं वाटलं, की प्रेम त्रिकोण आणि कुरघोड्या असं काही असेल, पण भिन्न व्यक्तिरेखा आणि एकच विचारधारा असलेल्या  आदित्य व भाऊसोबत (नाना पाटेकर) बंडखोर विचारांची पन्ना, यांनी वेगळेच रंग भरले...

अभिनेत्री तब्बूने बेफिकीर, बिन्धास्त, अशी टॉम बॉय छटेतली पन्ना छान रंगवली आहे. चित्रपट गंभीर स्वरूपाचा आहे, तरी पन्नाला मिळालेल्या काही संवादांमुळे व सीन्समुळे थोडीफार विनोद निर्मिती होते. तब्बूवर चित्रित झालेली दोन दृष्य विशेष लक्षात राहतात. पन्नाचं बाळ दगावतं त्या वेळी बेडवरूनच पन्ना विचारते, "आई, मुलगा होता की मुलगी..." या प्रश्नाच्या वेळी शारिरिक वेदनेपेक्षा बाळ गेल्याचं दु:ख पन्नाच्या चेहेऱ्यावर अधिक दिसलं. दुसरा सीन जो लक्षात राहिला, तो होता सुहासिनी मूळ्ये आणि तब्बू यांच्यातला चित्रपटातील शेवटचा सीन. गर्दीतून वाट काढत पन्ना मालतीबाईंपर्यंत पोहोचते आणि, "कशी आहे आई..??" हा प्रश्न विचारते. त्यावेळी आईबद्दलची काळजी आणि मालती बर्वेबद्दलचा राग, या दोन्ही भावना एकाच वेळी तब्बूने सुरेख दाखवल्या आहेत...

इतर सर्व कलावंत मंडळींसोबत, चित्रपटात वेगळ्या भूमिकेत दिसले ते अभिनेते नाना पाटेकर. सगळं हसत हसत सांगणारा, टोमणे मारणारा, हजरजबाबी भाऊ, कथेच्या गंभीर स्वरूपाला अधून मधून हलकं बनवत राहतो.  गाव-खेड्यात राहणारा भाऊ, वेळेप्रसंगी इंग्रजी बोलून समोरच्या व्यक्तीला निरुत्तर करतो हे एका प्रसंगात छानच दाखवलं आहे. "थोड़ासा रुमानी हो जाएँ" आणि "राजू बन गया जंटलमॅन" या दोन्ही चित्रपटातली खुशमस्कऱ्या समाज प्रबोधक ही नानांची भूमिका याही चित्रपटात आपल्याला पहायला मिळते. "हुतुतु"मधली त्यांची व्यक्तिरेखा थोडी वेगळी आहे कारण या चित्रपटात त्यांच्या शाब्दिक वारांना तितक्याच धारदार गाण्यांचीही साथ मिळाली आहे...

पार्श्वसंगीतासोबतच विशाल भारद्वाज यांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्यांचाही कथेवर चांगलाच परिणाम दिसतो. "जय हिन्द हिन्द...", "जागो जागो जागते रहो हे...", "बन्दोबस्त है जबरदस्त है..." ही गाणी एकदम जोशपूर्ण तर आहेतच, पण बऱ्यापैकी वेगवानही आहेत. सर्वात जास्त लक्षात राहतं, "घपला है घपला..." ताकदीच्या शब्दांसोबतच गाण्यांचं चित्रिकरणही तितकंच सुंदर झालंय. यातली जवळ जवळ सर्व गाणी नाना पाटेकर यांच्यावर चित्रीत झाली आहेत. चित्रपटातली, "छई छप्पा छई छप्पा के छई..." आणि "इतना लंबा कश लो यारों..." ही गाणी थोड्या धीम्या गतीची आहेत. चित्रपटाची रोमँटिक बाजू या दोन गाण्यांनी सांभाळलेली आहे. अर्थात, "छई छप्पा छई..." हे गाणी चित्रपटात नसतं तर विशेष फरक पडला नसता असं मला वाटतं...

गुलज़ार रचित, राजकारणावरचा हा आगळा वेगळा खेळ काही प्रेक्षकांना आवडला तर, काहींनी त्याला नापसंत केलं. पण तरीही, १९९९ सालचा "हुतुतु" हा चित्रपट पाहण्यासारखा आहे हे नक्की...

@ अनिकेत परशुराम आपटे.

Friday, 17 September 2021

कोड नेम - बेल बॉटम...

विमानाचं अपहरण, गुन्हेगारांच्या मागण्या आणि मागण्या पूर्ण झाल्यावर विमानाची सुटका... ८०च्या दशकात सर्रास होणाऱ्या या प्रकारावर आधारीत आहे, असीम अरोरा व परवेज़ शेख़ लिखीत, "बेल बॉटम..."

चित्रपटाचं कथानक सरळसोट आहे. दिल्लीवरून निघालेल्या IC 691 या विमानाचं अपहरण होतं. ते विमान अमृतसर व लाहौरमार्गे दुबईला उतरवण्यात येतं. या गोष्टीला पाकिस्तानचा छुपा पाठिंबा व सहाय्य असतं. सततच्या या त्रासाला त्या वेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधी (लारा दत्ता) कंटाळलेल्या असतात...

भरमसाठ पैसे आणि आपल्या साथिदारांची सुटका, या मागण्यांवर अपहरणकर्त्यांशी चर्चा करायला इंदिराजी आपल्या दोन मंत्र्यांना पाठवण्याचं ठरवतात. पण दुसरीकडे कोड नेम 'बेल बॉटम' म्हणजेच रॉ एजंट अंशुल मल्होत्रा (अक्षय कुमार), हा कट हाणून पाडण्याचा मनसूबा रचतो. 'बेल बॉटम' आपल्या इराद्यात सफल होईल का... की अपहरणकर्त्यांचा कट तडीस जाईल... हे चित्रपट पाहिल्यावरच समजेल...

चित्रपटाचं कथानक ८० ते ९० या दशकात घडत असल्याने त्या काळातला कपडेपट, वाहनं छान जमून आली आहेत. त्या काळातला देखावा, सेट्स छान उभारलेले आहेत. चित्रपटातली दुसरी जमेची बाजू म्हणजे कलावंतांची रंगभूषा. भरघोस मिशा असलेला अक्षय कुमार छान दिसतो. "रावडी राठोड़"मध्येही अक्षय कुमार यांनी मिशीवाला नायक रंगवला होता, पण "बेल बॉटम" चित्रपटातला नायक अधिक जबाबदार व विचारवंत वाटतो...

अक्षय कुमार आणि इतर कलावंतांच्या रंगभूषेशिवाय लारा दत्ता, चित्रपटातला सर्वात मोठा धक्का आहे. लारा दत्ता यांची रंगभूषा कमाल झाली आहे. इंदिरा गांधी यांच्या व्यक्तिरेखेत लारा दत्ता आहेत, हे पटकन ओळखू नाही. आपल्या संवादफेकीत आणि देहबोलीत, लारा दत्ता यांनी कमालीचा बदल दाखवला आहे. त्या बदलामुळेच लारा दत्ता यांनी साकारलेली इंदिरा गांधी अधिक प्रभावशाली वाटते...

चित्रपटाच्या कथेला बऱ्यापैकी वेग आहे. चित्रपटात दोन कथानकं आहेत. पहिल्या कथानकात अक्षय कुमारचा अन्शुल ते बेल बॉटम बनण्याचा प्रवास दाखवला आहे, जो काही काही ठिकाणी थोडासा रटाळ वाटतो पण तरीही बऱ्यापैकी वेग राखतो. विमान अपहरणाचं दुसरं कथानक मात्र चांगलंच वेगवान आहे. त्यात कुठेही दिखाऊपणा जाणवत नाही. साहसदृष्यही वास्तविक वाटतात. अक्षय कुमार असूनही हाणामारी दाखवताना काळाचा आणि भूमिकेचा तोल सांभाळलेला दिसतो. विमानतळावर वादळाच्या सानिध्यात रंगणाऱ्या पाठलागाच्या दृश्याच्या वेळी येणाऱ्या पार्श्वसंगीतामुळे, "परमाणू" या चित्रपटाची आठवण होते...

चित्रपटातली गाणी यथातथाच आहेत. अर्थात गाणी कथेसोबतच चालत असली, तरी एखाद-दुसरं गाणं वगळता आलं असतं. चित्रपटात वाणी कपूरची भूमिका थोडी खटकते. अक्षय कुमारसारखा नायक एकटा राहू नये म्हणून वाणी कपूरची वर्णी लागली असं म्हटलं तरी चालू शकेल. चित्रपटाच्या एकदम शेवटी वाणी कपूरने साकारलेली व्यक्तिरेखा चित्रपटात का होती हे सांगण्याचा जो प्रयत्न झाला, तो पटत नाही...

एकंदरीत, वेगवान कथानक, उत्तम रंगभूषा आणि सुरेख अभिनय या त्रयींची सांगड घातलेला व सत्य घटनेच्या पार्श्वभूमीवर बेतलेला रणजीत तिवारी दिग्दर्शित, "बेल बॉटम" नक्कीच पहावा असाच आहे...

@ अनिकेत परशुराम आपटे.

Monday, 13 September 2021

अन(रियलिस्टिक) मसाला सॅगा...

तूफानी मारधाड़, आयटम साँग, भ्रष्ट मंत्री या पुलीस, इस तरह की कहानियाँ दिखानेवाली अनेक मसाला फिल्मों में से एक है, रॉबिन भट एवं संजय गुप्ताद्वारा लिखीत, "मुंबई सॅगा..."

गँगस्टर अमर नाईक के एन्काऊंटर की घटनापर आधारीत, "मुंबई सॅगा" यह फिल्म, मिल से लेकर मॉल तक होनेवाले मुंबई के बदलाव पर रौशनी डालती है | फिल्म की कहानी आम कहानियों की तरह ही है | अन्याय के खिलाफ खड़ा रहनेवाला हिरो अमरत्य राव (जॉन एब्राहम), भाऊ (महेश मांजरेकर) नाम के बड़े राजनितिज्ञ की मदद से कुछ दिन में ही बड़ा गँगस्टर बनता है | अमरत्य राव जब काबू से बाहर होने लगता है, तब उसे रोकने का जिम्मा इंस्पेक्टर विजय सावरकर (इम्रान हाश्मी) अपने सिर पर लेता है और अखिर एन्काऊंटर में विजय अमरत्य को मार गिराता है |

फिल्म के सभी पात्र अगर देखें, तो ८० एवं ९० के दशक के मशहूर व्यक्तियों की, अर्थात अमर नाईक, छोटा राजन, हाजी मस्तान, एन्काऊंटर स्पेशालिस्ट विजय साळसकर और बाळासाहेब ठाकरे की याद आती है | पूरी फिल्म अगर देखी जाए, तो कहानी दो भागों में बटी हुई है | पहला भाग, मेकिंग और राईज ऑफ अमरत्य राव दर्शाता है, तो दूसरे भाग में राईज ऑफ विजय सावरकर के साथ विजय आणि अमरत्य के बीच के चूहे-बिल्लीवाला खेल देखने को मिलता है |

गुलशन ग्रोव्हर, महेश मांजरेकर, समीर सोनी, रोनीत रॉय इन कलाकारों ने उनके हिस्से की भूमिकाएँ बखूबी निभाईं हैं | प्रतीक बब्बर अपने किरदार को निभाने में थोड़े से कमजोर दिखे | उनकी डायलॉग डिलिवरी, एक्सप्रेशन्स, बाकी कलाकारों की तुलना में उतने उभरकर नहीं आये | Standout performance की अगर बात करें, तो काजल अगरवाल ने अच्छा काम किया है | सीमा राव के किरदार में उन्होंने जैसे जान फूँक दी है | सीमा राव का किरदार, "सिंघम" फिल्म के 'काव्या' की याद दिलाता है | फिल्म की दूसरी अच्छी बात थी, इम्रान हाश्मी का performance...

"चॉकलेट" और "बादशाहो" जैसी फिल्मों के कई अरसे बाद इम्रान हाश्मी के पास ऐसा कोई डॅशिंग रोल आया है | हाला कि उनका रोल इंटरवल के बाद ही शुरू हुआ, लेकिन उन्हें जितने सीन मिले थे, इम्रान हाश्मी ने उन्हें अच्छे से निभाया है | फिल्म में एक सीन है जहाँ विजय और अमरत्य के बीच फाईट होती है | वह सीन थोड़ा अटपटासा लगा | जॉन एब्राहम जैसे शारिरीक तौरपर सुदृढ़ इंसान के साथ इम्रान हाश्मी फाईट करे, यह बात कुछ जमी नहीं | यह सीन अगर ना होता तो शायद उन दोनों के बीच की लड़ाई और realistic लगती | उनके बीच जो आखरी action sequence फिल्माया गया, वह कुछ हद तक ठिक था |

फिल्म के नायक की बात करें, तो जॉन एब्राहम ने अपने किरदार को ठिक से निभाया है | क्या यह उनका outstanding performance था... तो मैं कहूँगा नहीं | इससे पहले भी "ऐतबार", "शूट आऊट अॅट वडाला", "सत्यमेव जयते", ऐसी फिल्मों में जॉन एब्राहमने इस किस्म के किरदार निभाएँ थे, फर्क था तो सिर्फ कहानी, जगह और नाम का | "ऐतबार" में हाला कि उनका निगेटिव्ह किरदार था, लेकिन बाकी दोनों फिल्मों में जॉन एब्राहम की भूमिकाएँ अमरत्य राव के किरदार से करीब करीब मिलती-जुलती थी |

फिल्म का बॅकग्राऊंड स्कोर अमर मोहिलेजी ने दिया है, जो कहानी को रोमहर्षक बनाने में काफी हद तक मदद करता है | फिल्म में दो ही गाने हैं, 'डंका बजा...' और 'शोर मचेगा...' | दोनों गानों के बीट्स अच्छे हैं और दोनों ही कहानी के साथ चलते हैं | पर यह गाने ऐसे नहीं, जो हम हर वक्त गुनगुनाएँ | फिल्म के संवाद काफी जोश भरे हैं किरदारों को उभारने में उनकी बड़ी मदद होती है | संक्षेप में कहा जाए, तो मुंबई में घटी एक-दो घटनाओं का आधार लेकर एक फिल्म बनी, जो आम मसाला फिल्मों की तरह पेश की गई | इसमें सच कितना और मसाला कितना, यह तो वहीं बता सकते हैं जो उस वक्त मौजूद थे | लेकिन, जॉन एब्राहम के फॅन्स के लिये संजय गुप्ता निर्देशित "मुंबई सॅगा", दोन घंटों का सुहाना सफर है यह कहना गलत नहीं होगा |

@ अनिकेत परशुराम आपटे.

Tuesday, 7 September 2021

खिलाड़ी कुमार...

राजीव हरी ओम भाटिया हे नाव ऐकल्यावर कदाचित काहीच समजणार नाही. पण 'खिलाड़ी' हा शब्द ऐकताच एकाच कलावंताचं नाव समोर येतं. तो कलावंत म्हणजे बोलक्या ओठांचा, उंचपुरा, Martial Arts या कलेत पारंगत असलेला एक देखणा अभिनेता, अक्षय कुमार...

अक्षय कुमार प्रथम दिसले, ते १९८७ साली प्रदर्शित झालेल्या “आज” या चित्रपटात. यात ते त्यांच्या खऱ्या नावानिशी, म्हणजेच राजीव भाटिया या नावाने झळकले. चित्रपटाचे नायक होते कुमार गौरव आणि त्यांचं चित्रपटातलं नाव होतं अक्षय. त्याच नावावरून राजीव भाटिया यांनी अक्षय कुमार हे नाव धारण केलं. त्या चित्रपटात त्यांना फारसा वाव नसला तरी त्यांच्या Martial Arts या कलेचं कौतुक झालं. १९९१ साली नायक म्हणून “सौगंध” या चित्रपटातून अक्षय कुमार प्रथमच प्रेक्षकांसमोर आले. चित्रपटाला फारसे यश नाही मिळाले पण अक्षय कुमार यांच्या अभिनयाचे मात्र कौतुक झाले...

आपल्या सुरुवातीच्या काळात, अक्षय कुमार हाणामारी चित्रपटांसाठी जास्त जाणले जायचे. “Mr. Bond”, “अशांत”, "कायदा कानून”, “वक़्त हमारा है”, “सैनिक”, “ऐलान”, “जय किशन”, “मोहरा”, "लहू के दो रंग",  अशा अनेक चित्रपटांमधून अक्षय कुमार त्यांच्या हाणामारीसाठी चर्चेत राहिले. थोडीशी हाणामारी आणि थोडं रहस्य असं मिश्रण असलेला त्यांचा “खिलाड़ी" हा चित्रपट तुफान गाजला आणि अक्षय कुमार यांच्या बहुचर्चित खिलाड़ी मालिका सुरू झाली. पुढे “मैं खिलाड़ी तू अनारी”, "सबसे बड़ा खिलाड़ी", “खिलाड़ी ४२०”, “खिलाड़ियो का खिलाड़ी”, “Mr. & Mrs खिलाड़ी”, “International खिलाड़ी”, “खिलाड़ी ७८६” अशी एका मागून एक यशस्वी चित्रपटांची रांग लागली...

अक्षय कुमार यांच्या नृत्यकलेबद्दल आणि हाणामारी दृश्यांबद्दल अनेक चित्रपट चर्चेत होतेच, पण काही चित्रपट विशेष लक्षात राहिले, अक्षय कुमार यांच्या साहस दृश्ये स्वत:च करण्याच्या आवडीमुळे. अनेक चित्रपटांमधून त्यांच्यावर चित्रित झालेली चित्तथरारक साहसदृश्य बहुतकरून त्यांनी स्वत:च केली. काही वेळा त्यांना दुखापतही झाली होती. पण तरीही डमी हा प्रकार न वापरता अक्षय कुमार स्वत:च या साहसदृश्यांची जबाबदारी घ्यायचे. हवेत असणाऱ्या विमानावर उभं राहणे, चालत्या हेलिकॉप्टरच्या पायाला लटकणे, काही फूट ऊंच अशा कड्यावरून किंवा भिंतीवरून उडी घेणे, अशी साहसदृश्य अक्षय कुमार यांच्या सहभागाने सजली आणि गाजलीदेखील...

एक नायक म्हणून अक्षय कुमार जितके प्रसिद्ध होते, तितकेच विनोदी अभिनेते व खलनायक म्हणूनही त्यांनी यश संपादन केले. "हेरा फेरी", "फिर हेरा फेरी", "भूलभुलैय्या", "दे दना दन", "भागम् भाग", "हाऊसफूल" मालिका, "हे बेबी", "दिवाने हुए पागल" अशा चित्रपटांमधून त्यांच्या विनोदी अभिनयाची झलक आपल्याला पहायला मिळाली, तर “अजनबी”, “अफलातून”, “Blue”, "२.०" अशा काही चित्रपटांमधून अक्षय कुमार यांनी रंगवलेल्या खलनायकी व्यक्तिरेखाही प्रेक्षकांच्या मनात घर करून बसल्या...

विनोद, हाणामारी, नृत्य, याखेरीज अक्षय कुमार यांच्या अभिनयाच्या वेगळ्या छटा दिसल्या, त्या "धड़कन", "वक्त - रेस अगेंस्ट टाईम", "स्पेशल २६", "यह दिल्लगी", "जानवर", "संघर्ष", "बेबी", "मिशन मंगल" अशा चित्रपटांमधून. शिवाय, "पॅडमॅन", "टॉयलेट - एक प्रेमकथा" अशा वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांमधून अक्षय कुमार यांनी समाज प्रबोधनही घडवून आणलं. अक्षय कुमार जसे अनुभवाने प्रगल्भ होत गेले तसे त्यांनी त्यांच्या देहबोलीत, आवाजात आणि चित्रपट निवडीत कमालीचे बदल घडवून आणले. याचाच परिणाम म्हणून विविध चित्रपटांमधून अक्षय कुमार यांनी साकारलेल्या भूमिकांना प्रेक्षकांची दाद मिळाली...

चित्रपटसृष्टीत उल्लेखनीय कामगिरीसोबतच अक्षय कुमार यांनी जाहिरात क्षेत्रातही चांगलं योगदान दिलं आहे. कोणे एकाकाळी मद्यपानाची जाहिरात करणाऱ्या अक्षय कुमार यांनी गृहपयोगी वस्तूंसोबत सामाज कार्यांची जाणीव करून देणाऱ्या आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या जाहिरातींमध्येही कामं केली. याशिवाय आपल्या प्रसिद्धीचा वापर करून भारत व कॅनडा यांच्यातले संबंध अधिक सुदृढ करण्यात अक्षय कुमार यांनी मोलाचा वाटा उचलला होता. याच मोलाच्या योगदानाबद्दल कॅनडा सरकारने अक्षय कुमार यांना एका विशेष नियमांतर्गत कॅनडाचं नागरिकत्वही बहाल केलं...

आज ९ सप्टेंबर. या हरहुन्नरी अभिनेत्याचा जन्मदिवस. सर्वांच्या लाडक्या या खिलाड़ी कुमारला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा...

"हर दिल मैं है रब बसता...
हर दिल में है रब बसता...
सबसे बड़ा खिलाड़ी तू है...
सबके दिलों पर राज है करता..."

@ अनिकेत परशुराम आपटे.

Thursday, 2 September 2021

फसलेल्या कथेचा थरारक खेळ...

"जिस्म चले जाएँगे... पर ज़िंदा रहेंगे, चेहेरे..." अमिताभ बच्चन यांच्या भारदस्त आवाजातलं हे वाक्य आहे, रुमी जाफरी दिग्दर्शित, "चेहेरे" या चित्रपटातलं...

हिम वर्षाव होत असताना पुढे जाऊ न शकल्याने समीर (इम्रान हाश्मी) एका घरात आसरा घेतो. ते घर असतं निवृत्त जज आचार्य (दृतिमान चॅटर्जी) यांचं. तिथे जस्टीस आचार्यसोबत, लतीफ ज़ाइदी (अमिताभ बच्चन), परमजीतसिंह भुल्लर (अन्नू कपूर), आणि हरिया खटाव (रघुवीर यादव) असे त्यांचे तीन मित्रही असतात. विरंगुळा म्हणून ते चौघंही एक खेळ खेळतात आणि मजा म्हणून समीरही त्यात सामील होतो. जसा खेळ पुढे सरकतो तसं समीरला त्या खेळातलं गांभीर्य जाणवायला लागतं. खेळ पूर्ण होतो का... त्या खेळात समीर जिंकतो की हारतो... या प्रश्नांची उत्तरं म्हणजे "चेहेरे" हा चित्रपट...

१९५६ साली प्रकाशित झालेल्या, "अ डेंजरस गेम" या कादंबरीवर आधारित, "चेहेरे" या चित्रपटाची सुरुवात आणि पहिला अर्धा तास खूप उत्कंठावर्धक आहे. विशेष म्हणजे अमिताभ बच्चन यांच्या आवाजातली त्यांच्यावर चित्रीत झालेली कविता तर कमाल आहे. अमितजींचा जो काही आवाज लागला आहे त्या कवितेदर्म्यान, त्याला तोडच नाही. चित्रपटातली अजून एक जमेची बाजू म्हणजे चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी. बिनोद प्रधान यांनी घेतलेल्या अप्रतीम कॅमेरा एँगल्समुळे चित्रपट पाहताना वेगळीच मजा येते. शिवाय, चित्रपटाचं पार्श्वसंगीतही रहस्य टिकवून ठेवण्यात आणि उत्कंठा वाढवण्यात बऱ्यापैकी हातभार लावतं...

काही ठिकाणी चित्रपटाची कथा थोडी मार खाते असं वाटतं. चित्रपटातला खेळ सुरू होतो आणि काही वेळातच पुढे काय होऊ शकेल हे आपल्याला कळायला लागतं. रिया चक्रवर्तीने साकारलेली व्यक्तिरेखा चित्रपटात नसती, तरी चाललं असतं. शब्दातून आणि घराच्या मांडणीतून ही व्यक्तिरेखा साकारता आली असती. रघुवीर यादव यांनी साकारलेली व्यक्तिरेखा फक्त एका प्रसंगासाठी समोर येते. बाकी, एका बाजूला बासरी वाजवत बसणे, याशिवाय त्यांना चित्रपटात काहीच वाव मिळालेला नाही. इम्रान हाश्मी आणि अमिताभ बच्चनवर जास्त फोकस दिला गेला आहे. विशेषत: खेळाच्या अंताला आलेले अमितजींचे संवाद जरा जास्तच लांबले आहेत...

एक व्यक्ती बेधुंद अवस्थेत एक गुन्हा करते. पण बेधुंद असल्याने ज्या व्यक्तिबाबत तो गुन्हा घडला, त्या व्यक्तीचा चेहेरा या गुन्हेगाराला लक्षात राहत नाही. अशा प्रकारचा काही प्लॉट रेखाटला असता किंवा खेळामार्फत समीर आणि अॅना (रिया चक्रवर्ती) यांच्यातला भूतकाळ दाखवला असता, तर त्या खेळाला एक वेगळाच रंग चढला असता. अमिताभ बच्चन यांची संवादफेक, अदाकारी आणि वेशभूषा नेहमीप्रमाणेच लाजवाब. त्यांनी या आधी "वज़ीर" व "बदला" या थ्रिलर्समध्ये काम केल्याने या चित्रपटाकडून वेगळ्या अपेक्षा होत्या, पण कथेमुळे व पटकथेमुळे त्या पूर्ण होऊ शकल्या नाहीत...

चित्रपट पाहताना अधून-मधून, "मी शिवाजी पार्क" या चित्रपटाची आणि "समांतर २" या वेबसिरीजची आठवण होते. एकंदरीत, त्या घरात खेळला जाणारा तो खेळ चांगलाच रोमहर्षक आहे खरा, पण कथा व पटकथा त्या खेळाला तितकंसं परिणामकारक बनवू शकल्या नाहीत. अर्थात, हे चित्रपट पाहिल्यावर समजेलच की. पण त्यासाठी पहायला हवा रंजीत कपूर लिखीत, "चेहेरे..."

@ अनिकेत परशुराम आपटे.

Wednesday, 1 September 2021

धमाल चौकडीचा विनोदी त्रिकार...

मराठी-हिंदी चित्रपटांत आपण अनेक जोड्या पाहतो. नायक-नायिकेची जोडी, दोन नायकांची जोडी, संगीतकार किंवा गीतकार जोडी. एखाद्या जोडीचा चित्रपट यशस्वी झाला, तर त्याच जोडीला घेऊन अजूनही चित्रपट तयार होतात...

जशा जोड्या असतात तसंच त्रिकूटही असतं. पण चौकडीबद्दल कधी ऐकलं आहे का... हिंदी चित्रपटसृष्टी अशीच एक धमाल चौकडी आहे ज्यांनी दिलेले तीन चित्रपट, अपार नाही पण बऱ्यापैकी यशस्वी झाले...

हसीना मान जायेगी (१९९९)...

सोनू-मोनू हे अमीर बापचे बिगड़े हुए नाही, पण नटखट शहज़ादे. त्यांच्या उपद्रवाला कंटाळून त्यांचा बाप त्यांना वेगळं करतो. पुन्हा एकत्र येऊन वेगळ्या भूमिकेत दोघंही एका घरात शिरकाव करतात...

जोड़ी नं. १ (२००१)...

जय-वीरू हे दोन भुरटे चोर. वेषांतरं करून चोऱ्या करणे आणि मजा मारणे हे त्यांचं काम. अशीच मजा करत असताना ते अडकतात आणि त्यांना शहर सोडावं लागतं. वेगळी भूमिका घेऊन दोघंही एका घरात शिरकाव करतात...

एक और एक ग्यारह (२००३)...

तारा-सितारा हे दोन चोर. वेगवेगळ्या आयडिया वापरून चोऱ्या करताना एका लफड्यात ते अडकतात. सीमा पार करण्याच्या उद्देशाने एका वेगळ्या भूमिकेत दोघंही एका घरात शिरकाव करतात...

या तीनही चित्रपटांतली धमाल जोडी म्हणजे अभिनेते संजय दत्त आणि अभिनेते गोविंदा. चित्रपटांतली हाणामारीची दृष्य जर पाहिली, तर अभिनेते संजय दत्त यांच्यावर जास्त फोकस दिसतो. नृत्य आणि गाणी यांकडे पाहिलं, तर अभिनेते गोविंदा यांना जास्त वेटेज मिळालेलं दिसतं. पण तीनही चित्रपटांच्या शीर्षक गीतात मात्र दोन्ही नायकांना आणि त्यांच्या नायिकांना समान वाव दिलेला दिसतो...

या जोडीला लाभलेली तिसरी बाजू म्हणजेच अभिनेते आशिष विद्यार्थी. त्यांनी तीनही चित्रपटांत साकारलेल्या खलनायकी व्यक्तिरेखा, चित्रपटांच्या विनोदी कथानकाला छान वळणदार बनवतात. तीनही चित्रपटांमधल्या त्यांच्या भूमिका वैविध्यपूर्ण होत्या. विनोदी बाज असलेला भाई, सर जॉन नावाचा पूर्ण गंभीर असा डॉन आणि विनोदाकडे थोडा कल असलेला आतंकवादी कोब्रा, या तीनही व्यक्तिरेखा आशिष विद्यार्थी यांनी छान साकारल्या...

या त्रिकुटाला एकत्र बांधणारा, तीनही चित्रपटांतील चौथा कोन म्हणजेच या तीनही चित्रपटांना लाभलेला एकच दिग्दर्शक, अर्थात डेविड धवन. आधी संकलक (एडिटर), मग दिग्दर्शक बनलेल्या डेविड धवनने या तीनही चित्रपटांत विनोद, संवेदनशीलता, हाणामारी आणि संवाद यांची सुरेख सांगड घातली आहे...

एकंदरीत, संजाय दत्त, गोविंदा, आशिष विद्यार्थी व डेविड धवन या धमाल चौकडीचा, "हसीना मान जायेगी", "जोड़ी नं. १" आणि "एक और एक ग्यारह", हे एकसूरी कथानक लाभलेले तीन चित्रपट, निखळ मनोरंजनाचा छोटासा नजराणाच म्हणावे लागतील... नाही का...

@ अनिकेत परशुराम आपटे.