Friday, 29 April 2022

भव्यदिव्य तरीही कमकुवत...

एक व्हिलन असतो, आणि एक असतो हिरो. व्हिलन शक्कल लढवून हिरोच्या जवळच्या व्यक्तीला मारतो तरी किंवा त्या व्यक्तीचं नुकसान तरी करतो. हिरो चवताळतो आणि एक टोळकं तयार करतो. त्या टोळक्यात मुख्यत्वे साईड हिरो-हिरोईन असतात. त्या टोळक्यानिशी हिरो व्हिलनवर हल्ला करतो. कधी हिरो जिंकतो तर कधी व्हिलन. शेवटी टोळक्याच्या मदतीने हिरो व्हिलनला जेरीस आणतो. हे सरधोपट कथानक अनेक मसालापटांत आपण पाहिलं. त्यातलाच एक म्हणजे २००५ साली प्रदर्शित झालेला, विक्रम भट दिग्दर्शित "एलान..."


कथा तीच, जी आत्ता सांगितली. पण ती मांडण्याची पद्धत पूर्ण वेगळी. वेगळी म्हणजे भव्यदिव्य. बर्फाच्छादित डोंगर, दऱ्या, बंगले, मोठाले रस्ते अशा exotic locations वापरल्या गेल्या. मुख्य हिरो ज्याने ते टोळकं तयार केलं, ज्याचं हे मिशन असतं, तो मागे राहून साईड हिरोनेच मेन लीड घेतली. चित्रपटातली गाणी यथातथाच आहेत. वास्तविक अन्नू मलिक यांनी आधीच्या चित्रपटांत दिलेलं संगीत आपण ऐकलंच आहे. त्या तुलनेत या चित्रपटातलं संगीत जरा मार खातं. पण चित्रपटाचं पार्श्वसंगीत मात्र दमदार आहे. लोकेशन्स, दृष्य आणि कलावंत यांना लक्षात ठेऊन पार्श्वसंगीताची जबरदस्त रचना केलेली दिसते...

चित्रपटातली हाणामारीची आणि साहसदृष्य कमाल रंगली आहेत. स्लो मोशन तंत्र, विविध कॅमेरा एँगल्स, ड्रोन आणि हेलिकॉप्टर शॉट्स यांमुळे ती ती साहसदृष्य अजूनच उत्कंठावर्धक बनतात. साहस किंवा हाणामारीच्या दृष्यांना उभारी देण्यासाठी पार्श्वसंगीतही मोलाची मदत करतं. जिथे धिम्या गतीची दृष्य आहेत तिथे मंद पार्श्वसंगीत वापरलं गेलं आणि प्रसंगी पार्श्वसंगीताचा टेम्पो वाढवत नेला आहे. शेवटच्या हाणामारीच्या दृष्यात ऐकू येणारं पार्श्वसंगीत, बहुतांशी "मॅट्रिक्स रीलोडेड" या चित्रपटातल्या पार्श्वसंगीताशी मेळ खातं. मिथूनदांच्या प्रत्येक एंट्रीच्या वेळी ऐकू येणारं पार्श्वसंगीत, त्यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखेची ताकद दर्शवतं. चित्रपटात अनेक साहस व हाणामारीची दृष्य आहेत. पण त्यातही, मध्यंतरापूर्वी धावत्या रस्त्यावर रंगलेलं साहसदृष्य कमाल आहे...

चित्रपटातील कलावंतांचं म्हणाल, तर दोनच कलाकारांचा अभिनय बघण्यासारखा आहे. एक आहेत चंकी पांडे. आणि त्यांच्याहूनही सरस ठरलेत मिथूनदा, अर्थात मिथून चक्रवर्थी. एका दशकाहून अधिक काळ बी ग्रेड चित्रपटांच्या विश्वात राहिलेल्या मिथूनदांसाठी हा चित्रपट म्हणजे मेन स्ट्रीम सिनेमात पुनरागमन करण्याची एक नामी संधीच होती. चित्रपटाच्या मुख्य खलनायकाची प्रमुख भूमिका मिथूनदांच्या वाट्याला आली. देहबोली, दमदार संवादफेक, मिळालेले जबरदस्त संवाद आणि अदाकारी, यांच्या जोरावर मिथूनदांनी त्यांना मिळालेली व्यक्तिरेखा चोख वठवली आहे. मित्राच्या जाण्याचं दु:ख, एका क्षणासाठी का होईना पण चित्रपटाच्या शेवटी वाटणारी भिती, थंड वृत्तीने नायकाचं केलेलं सांत्वन, हे भाव मिथूनदांनी अप्रतीम साकारलेत. वेळप्रसंगी दहा दहा गुंडांशी एकहाती लढणारा, नाच-गाणी करणारा, कधी कधी वरच्या पट्टीत बोलणारा हिरो साकारणाऱ्या मिथूनदांनी या चित्रपटात शांत, धीर-गंभीर पात्र साकारलेलं जास्त भावलं...

मिथून चक्रवर्थी यांचा अभिनय इतका दमदार होता, की जॉन एब्राहम, अमीषा पटेल, लारा दत्ता, अर्जून रामपाल, राहुल खन्ना, मिलिंद गुणाजी यांची अदाकारी पार झाकोळली गेली. मिलिंद गुणाजी यांना इतक्या छोट्या भूमिकेसाठी घेतलेलं काही पटत नाही. एखाद-दुसरा संवाद आणि एक-दोन सीन इतकंच काय ते त्यांच्या वाट्याला आलं. त्यातही त्यांनी चांगला अभिनय केला. अर्जून रामपाल आणि राहुल खन्ना यांच्या चेहेऱ्यावर मात्र, कुठलंही दृष्य असलं तरी एकच भाव दिसतात. ग्लॅमरसाठी अमीषा पटेल आणि थोडासा मेलोड्रामा दाखवण्यासाठी लारा दत्ता असंच समीकरण चित्रपटात दिसतं. त्यातल्या त्यात जॉन एब्राहमने मुंबईचा टपोरी बरा साकारला आहे...

पात्र, लोकेशन्स, गाणी याहीपेक्षा चित्रपटाची कथा जास्त महत्वाची असते. त्या कथेला पडद्यावर सादर करताना पटकथा मोलाची साथ देते. या चित्रपटाची कथा साधी-सरळ आहे. मांडणी एकदम भव्यदिव्य आहे. पण चित्रपटात बऱ्याच ठिकाणी पटकथा मार खाते. उदाहरणार्थ, चित्रपटात मोबाईल ट्रॅक करण्यासाठी एक वेबसाईट वापरलेली दिसते, जिचा वापर करून हिरोईन आधी हिरोला आणि शेवटी व्हिलनला शोधून काढते. हिरोला शोधणं समजलं, पण व्हिलन ज्या स्तराचा दाखवला गेला आहे, तो इतक्या बाळबोध पद्धतीने स्वत:ला शोधून देईल का... जे प्रगत तंत्रज्ञान हिरोकडे आहे, ते व्हिलनकडे नाही असं दाखवण्यापेक्षा, इथे मिलिंद गुणाजीचा वापर करून तेच तंत्रज्ञान फिरवून हिरो व त्याच्या टोळक्याचा शोध दाखवला असता, तर कथेत अजून रंगत आली असती...

एकंदरीत, उत्तम भव्यता दाखवणारा, दमदार पार्श्वसंगीत आणि जबरदस्त साहसदृष्य लाभलेला, पण पटकथेत सपाटून मार खाणारा चित्रपट म्हणजे, रॉबिन भट आणि विक्रम भट लिखीत "एलान..." पहावा, तर फक्त मिथून चक्रवर्थीसाठीच...

@ अनिकेत परशुराम आपटे.

Saturday, 23 April 2022

स्वारी अफज़ल ख़ान...

दिग्पाल लांजेकरांच्या महत्वाकांक्षी अष्टकातलं चौथं पुष्प, अर्थातच, दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित "शेर शिवराज है..."


छत्रपती शिवाजी महाराजांनी हुशारीने क्रूरकर्मा अफज़ल ख़ानाला प्रतापगडाच्या पायथ्याशी आणून त्याचा कोथळा बाहेर काढला, हे तर आपल्या सर्वांनाच ज्ञात आहे. इतिहासातली हीच घटना या चित्रपटात आपल्याला दिसते. छत्रपती शिवाजी महाराज, यसाजी कंक, तान्हाजी मालुसरे, जिवाजी महाले, नेताजी पालकर, कान्होजी जेधे, हे सर्व वीर larger than life होते. ते सर्व वीर मोठ्या पडद्यावर पाहताना एक वेगळाच जोश होता...

चित्रपटाचं चित्रीकरण उत्तम झालं आहे. साधाराण ३५-४० दिवसात संपूर्ण चित्रपट पूर्ण झाला असं ऐकीवात आहे. चित्रपटात घेतलेले लाँग शॉट्स, क्लोझ शॉट्स तर कमाल आहेतच, पण ड्रोन कॅमेऱ्याने टिपलेले खोऱ्यांचे, किल्ल्यांचे आणि अफाट फौजेचे शॉट्स निव्वळ अप्रतीम आहेत. शिवाजी महाराज शामियान्याकडे चालत जाताना आणि लढायांच्या वेळी वापरलेले स्लो मोशन शॉट्स आणि कॅमेरा एँगल्स अतिशय रोमहर्षक झाले आहेत...

तसा तर संपूर्ण चित्रपटच पाहण्यासारखा आहे. पण; व्ही.एफ.एक्सच्या सहाय्याने उभे केलेले भवानी मातेचे स्वप्नवत दृश्य, शंभू बाळ राजेंच्या काळजीने व्याकूळ झालेल्या सईबाईंना सोयराबाई शंभू बाळ राजेंच्या संगोपनाची हमी देतात आणि सईबाई डोळ मिटतात ते दृश्य, सईबाई निवर्तल्याची बातमी कळताच काही क्षण महाराज कोलमडतात ते दृश्य, आणि शिवाजी महाराज वाघनखांच्या मदतीने ख़ानाचा कोथळा बाहेर काढतात, अशी काही दृष्य विशेष लक्षात राहतात...

चित्रपटाला दमदार संगीत आणि पार्श्वसंगीत लाभलं आहे. ख़ानाच्या वधाच्या वेळी आणि नंतर होणाऱ्या लढायांच्या वेळी ऐकू येणाऱ्या पोवाड्याने तर या दृश्यांची ऊंची अजून वाढते. चित्रपटात वापरलेलं पार्श्वसंगीत काही अंशी "फत्तेशिकस्त" या चित्रपटाची आठवण करून देतं. चित्रपटात दिसणाऱ्या हत्तींचे चित्कार आणि सिंहाची गर्जना समयोचित असल्याने एक वेगळाच माहौल तयार होतो. शिवाजी महाराजांसाठी चित्रपटात दोन वेळा सिंहाची गर्जना वापरली गेली आहे. ती गर्जना आणि त्या व्यक्तिरेखेची एंट्री एकदम चपखल बसली आहे...

मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, अजय पूरकर, आस्तीद काळे, समीर धर्माधिकारी, स्वत: दिग्पाल लांजेकर, विक्रम गायकवाड, ऋषभ शुक्ल या नेहमीच्या तगड्या कलावंतांखेरीज, मुकेश ऋषी, वर्षा उसगावकर, रविंद्र मंकणी, वैभव मांगले आणि मृणमयी देशपांडे या मातब्बर कलाकारांनीदेखील चित्रपटात हजेरी लावली आहे. सर्वांनीच आपापल्या भूमिका छान साकारल्या आहेत. पण दुसरा मराठी चित्रपट करणाऱ्या मुकेश ऋषी यांनी ख़ानाच्या भूमिकेला चार चाँद लावले आहेत...

बड़ी बेग़मच्या भूमिकेत वर्षा उसगावकर छान दिसल्या, पण त्यांची संवादफेक तितकीशी जमली नाही. आदिलशाही असो किंवा मुग़लशाही, त्यांच्या बोलण्यात उर्दूची झाक असणारी हिंदी असते. पण वर्षा उसगावकर यांच्या संवादफेकीत मराठीची झाक असलेली हिंदी जाणवते. मृण्मयी देशपांडे आणि आस्ताद काळे यांनी मात्र काही दृष्यांमधून विनोदांची छान फवारणी केली. समीर धर्माधिकारी या वेळी सकारात्मक भूमिकेत दिसले, ही गोष्ट चांगली घडली. तरीही, हरीश दुधाडे आणि अंकित मोहन यांची कमतरता मात्र जाणवली...

एकंदरीत, गनिमी काव्याचा वापर करून अफज़ल ख़ानासारख्या बलवान शत्रूचा खात्मा झाल्याची शिवकालीन इतिहासातली ही घटना दाखवणारा, आणि तांत्रिक दृष्ट्या सक्षम असलेला दिग्पाल लांजेकर लिखीत "शेर शिवराज है" हा चित्रपट मोठ्या पडद्यावरच पहावा असाच आहे...

@ अनिकेत परशुराम आपटे.

Thursday, 14 April 2022

सूपर सोल्जर...

एक माथेफिरू अतिरेकी त्याच्या साथिदारांच्या मदतीने काही नागरिकांना ओलीस ठेवतो आणि त्यांच्या सुटकेसाठी काही मागण्या करून सरकारवर दबाव आणतो. सरकार मागण्या मान्य करतं आणि अतिरेकी खुश होतात. संरक्षक दल मात्र counter attackचा छुपा प्लॅन बनवतात. नागरिक तर सुटतातंच, पण अतिरेकीही मारले जातात. हे कथानक वेगवेळ्या पद्धतीने आपण अनेक हिंदी, इंग्रजी चित्रपटांमध्ये पाहिलं. "White House Down", "True Lies", "Speed", "ज़मीन", "मैं हूँ ना", "बेल बॉटम असे अनेक चित्रपट या कथानकाने सजले. लक्ष्य राज आनंद दिग्दर्शित "अटॅक" हा चित्रपटही त्या पठडीतला, पण जरासा वेगळा...


"अटॅक"ची कथा आहे अर्जून शेरगिल (जॉन एब्राहम) या सैन्यातल्या एका जवानाची. एका अतिरेकी हल्ल्यात अर्जूनची मैत्रिण आयेशा (जॅक्वेलिन फरनँडीस) जिवानिशी जाते आणि स्वत: अर्जून पूर्ण अपंग होतो. अर्जून एका बाजूला स्वत:शीच लढत असतो, त्याच वेळी दुसरीकडे डॉ. सबाह क़ुरेशी (रकुल प्रीत सिंह) इरा नावाची एक अत्याधुनिक चिप प्रणाली तयार करते जिच्या वापराने सामान्य माणसाचं एका सूपर ह्यूमनमध्ये रूपांतर होईल. या प्रणालीच्या चाचणीसाठी अर्जूनची निवड होते. चिप अर्जूनच्या मेंदूमध्ये बसवली जाते. चिप आणि अर्जूनच्या मेंदूची एकरूपता होण्याची प्रक्रिया सुरू होते. अर्जून ठणठणीत तर होतोच, पण त्या अतुलनीय तांत्रिक शक्तीसुद्धा मिळते. एकरूपतेची प्रक्रिया पूर्णतेकडे जात असतानाच एक घातक अतिरेकी हल्ला होतो आणि इराच्या मदतीने अर्जून लढायला सज्ज होतो...

चित्रपटाचं कथानक सरधोपट आहे. गाणी उगाच नको तेव्हा येऊन कथानकात अडतळे निर्माण करतात. किरण कुमार, रत्ना पाठक शाह, रजत कपूर असे ताकदीचे कलावंत, असतानाही अदाकारी सुमार झाली आहे. जॉन एब्राहम पुन्हा त्याच एकसूरी भूमिकेत आल्याने, ते त्यांच्या मगच्याच चित्रपटातलं एखादं पात्र साकारत आहेत असं वाटत राहतं. प्रकाश राज आणि रकुल प्रीत सिंह यांनी चांगलं काम केलं आहे. चित्रपटातली गणी यथातथाच आहेत. वारंवार गुणगुणत रहावं असं कुठलंही गाणं नाही. पार्श्वसंगीत म्हणाल तर दमदार आहे. पण बऱ्याच अंशी "परमाणू" या चित्रपटाच्या वेळी ऐकू येणाऱ्या पार्श्वसंगीताची आठवण होते...

चित्रपटाची पटकथा वेगवान आहे. गाणी आणि जॉन-जॅक्वेलीनची सुरुवातीची दृष्य सोडली, तर कथा कुठेही आपली गती सोडत नाही. चित्रपटातलं एक दृष्य आणि पटकथेचा काही भाग न पटण्यासारखा आहे. अर्जून अपंग असताना दोन गुंड त्याच्या आईची अंगठी चोरतात. सूपर सोल्जर झालेल्या अर्जूनला त्यातला एक चोर अचानक त्याला दिसतो आणि ती अंगठीही त्याच्या जवळच असते. जणू त्याला माहित होतं अर्जून येणार आहे. "क्रिश" चित्रपटातल्या एका दृष्यासारखं वाटणारं हे दृष्य रंगतदार आहे खरं, पण बिनबुडाचं वाटतं. कथेतल्या एका भागात अतिरेकी अत्यंत शिताफीने एका इमारतीवर ताबा मिळवतात. मुख्य अतिरेकी जेव्हा आपल्या मागण्या पूर्ण करवून घेतो, तेव्हा हेच करायचं होतं तर अतिरेक्याने त्याच इमारतीची निवड का करावी, असा प्रश्न पडतो...

जॉन-जॅक्वेलीनमधली दृष्य छोडी जास्त वाटली. सुरुवातीच्या दृष्यांमध्ये काट-छाट केली असती तरी चाललं असतं. आयेशा गेल्यानंतर अर्जून-आयेशामधली दृष्य येणं हा कथेचा भाग होता. पण त्यांची ही लांबी जरा जास्त वाटली. चित्रपटातले दोन मुद्दे मला भावले. एक म्हणजे ओढून ताणून विनोद निर्मिती केलेली दिसत नाही. दुसरं म्हणजे हिरोईन मेल्यावर हिरो फुकट जाऊ नये म्हणून दुसऱ्या हिरोईनला आणून हिरो-हिरोईनमध्ये पुन्हा प्रेम निर्माण झालेलं दाखवलं जातं. या चित्रपटात मात्र रकुल प्रीत सिंह आणि जॉन एब्राहम यांच्या व्यक्तिरेखांमधलं नातं पूर्ण व्यावसायिक दाखवलं गेलं. त्यांच्यात कुठेही भावनिक गुंतागुंतं वगैरे दाखवली गेली नाही...

चित्रपटातले दोन महत्वाचे आधारस्तंभ म्हणजे टेक्नॉलॉजीचा वापर आणि चित्रपटातली हाणामारीची व साहसदृष्य. व्हि.एफ.एक्स.चा अत्यंत सुरेख वापर चित्रपटात दिसतो. अम्रितपाल सिंह आणि फ्रँझ स्पिहॉस यांनी दिग्दर्शित केलेली हाणामारीची व साहसदृष्य पडद्यावर पाहताना छानच वाटतात, पण ती दृष्य बऱ्याच अंशी "मेट्रीक्स", "टर्मिनेटर", ट्रू लाईज" या इंग्रजी चित्रपटांची आठवण करून देतात...

एकंदरीत, स्वत: जॉन एब्राहम यांनी लिहिलेल्या कथेला पडद्यावर आणण्याचा लक्ष्य राज आनंद यांचा प्रयत्न स्तुत्य आहे. पण पटकथा थोडीशी मार खाते. तरीही, एका वेगळ्या प्रयत्नाला दाद म्हणून "अटॅक" हा चित्रपट एकदातरी पहावाच. या मालिकेत येणारा पुढचा भाग कथेनुरूप आणि सादरीकरणानुसार सरस ठरावा...

@ अनिकेत परशुराम आपटे.

Sunday, 10 April 2022

एक कथानक दोन पैलू...

अमिताभचा "अग्निपथ" आणि हृतिकचा "अग्निपथ", धर्मेंद्रचा "ग़जब" आणि सचिनचा "भुताचा भाऊ", किशोर कुमारचा "चलती का नाम गाड़ी" आणि भरत जाधवचा "साडे माडे तीन", असे अनेक रिमेक आपण पाहिले. यात दाक्षिणात्य चित्रपटांचे रिमेक पण आले. चित्रपटाच्या प्रत्येक जोडीमध्ये कथानक एकच होतं, पण सादरीकरण आणि कलावंत वेगळे होते. दोन चित्रपट असे होते, ज्यात मुख्य कथानक एकच होतं, पण दृष्टीकोन वेगळे होते. ते चित्रपट म्हणजे १९९८चा "तू तिथं मी" आणि २००३चा "बाग़बान..."


एकमेकांवर आतोनात प्रेम करणारं एक वयस्कर जोडपं, त्यांच्या मुलांमुळे वेगळं होतं. नवरा एका मुलाकडे जातो तर बायको दुसऱ्या मुलाकडे जाते. एकमेकांच्या भेटीसाठी व्याकूळ झालेलं हे जोडपं कालांतराने एकत्र येतं आणि मुलांपासून लांब आपल्याच विश्वात रमतं... हे मुख्य कथानक आहे "तू तिथं मी" आणि "बाग़बान" या दोन्ही चित्रपटांचं. पण दोन्ही चित्रपटात हे कथानक पूर्ण वेगळ्या पद्धतीने वापरलं गेलं आहे...

प्रमुख व्यक्तिरेखा...


"तू तिथं मी"मध्ये मोहन जोशी आणि सुहास जोशी ही जोडी प्रमुख व्यक्तिरेखेत होती, तर "बाग़बान"मध्ये अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनी यांनी प्रमुख भूमिका निभावल्या होत्या. "तू तिथं मी"मध्ये दोन्हीही कलावंतांना समान वेटेज दिलेलं दिसत होतं. ते अनुभवणाऱ्या सुखांची, त्यांच्या वाट्याला येणाऱ्या व्याकूळतेची समान वाटणी दिसली. "बाग़बान"मध्ये मात्र अमिताभ बच्चन यांच्या भूमिकेवर अधिक भर दिसला. अमिताभ बच्चन यांच्यासह हेमा मालिनीही मुख्य भूमिकेत असूनही त्यांची व्यक्तिरेखा सहनायिका म्हणून जास्त भासली...

अपत्य...


अपत्य म्हणजे मुलं. "बाग़बान"मध्ये चार मुलं दाखवली गेली. अर्थात राजा दशरथ आणि राणी कौसल्या यांना नव्याने समोर आणण्याचा तो प्रयत्न असावा, पण दोनच मुलांचा वापर जास्त दिसला. राहिलेल्या दोन मुलांचा उपयोगच दिसला नाही चित्रपटात. दोनच मुलं दाखवली असती, तरी चित्रपट पूर्ण झाला असता. मुलांचा पालकांकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा होता. एक ओझं म्हणून ती मुलं पालकांकडे पाहताना दाखवली गेली. "तू तिथं मी"मध्ये फक्त दोनच मुलं दाखवली गेली, ज्यांचा पुरेपूर वापर चित्रपटात दिसला. या चित्रपटात मात्र मुलांच्या मनात पालकांबद्दल प्रेम आणि आदर दाखवला गेला...

मदतनीस...


वेळोवेळी मदत करणारा, पाठीशी उभा राहून आधार देणारा म्हणजे मदतनीस. दोन्हीही चित्रपटांमध्ये मदतनीसाची व्यक्तिरेखा वडिलांसोबत दाखवली गेली. "तू तिथं मी"मध्ये ती भूमिका स्मिता तळवलकर यांनी केली, तर "बाग़बान"मध्ये परेश रावल यांनी ती व्यक्तिरेखा साकारली. स्मिता तळवलकर यांची व्यक्तिरेखा नाती जपणारी होती. हळुवारपणे प्रेमाचा अर्थ उलगडून समजावणारी होती. परेश रावल यांची व्यक्तिरेखा रोखठोक आणि एक घाव दोन तुकडे करणारी होती. अर्थात कथानकातल्या वळणामुळे ती गरजेची होती...

विशेष भूमिका...


दोन्हीही चित्रपटात मुख्य नायक-नायिकेच्या जोडी व्यतिरिक्त, दोन कलावंत विशेष भूमिकेत दिसले. "तू तिथं मी"मध्ये प्रशांत दामले आणि कविता मेढेकर या दोघांकडे त्या भूमिका होत्या. तर "बाग़बान"मध्ये सलमान ख़ान आणि महिमा चौधरी विशेष भूमिकेत दिसले. दोन्हीही चित्रपटात विशेष भूमिकेत असलेले प्रशांत दामले व सलमान ख़ान अनाथ आणि स्वकष्टाच्या कमाईवर जगणारे दाखवले गेले. प्रशांत दामले यांची भूमिका थोडी परावलंबी व मुख्य कथानकाच्या चाकोरी बाहेरची होती. सलमान ख़ान यांची भूमिका मात्र मुख्य कथानकात वेगळं वळण आणणारी ठरली...

गाणी...

दोन्हीही चित्रपटात बऱ्यापैकी गाणी होती. "तू तिथं मी" मधली गाणी थोडी संथ चालींची होती,  तर "बाग़बान" मधली अर्ध्याहून अधिक गाणी, ही उडत्या चालींची होती. वयस्करांमध्ये रंगलेला भेंड्यांचा खेळ, "तू तिथं मी" या चित्रपटाचं हायलाईट गाणं होतं असं मला वाटतं. "बाग़बान"मध्ये मात्र ती कमाल केली अमिताभ बच्चन यांनी गायलेल्या, "चली चली फिर चली चली..." या गाण्याने...

शीर्षक आणि अंत...

दोन्हीही चित्रपटांच्या शीर्षकावरूनच मुख्य कथानक कसं वळण घेईल याचा अंदाज बांधता येतो. "तू तिथं मी" ही एक सुंदर प्रम कहाणी होती आणि संपूर्ण चित्रपट, त्याच प्रेम कहाणीच्या आधाराने पुढे जात राहिला. बाग़बान म्हणजे माळी. 'मी बाग फुलवली. तिथे आता फुलं आली. त्यांचा गंध मला मिळावा...' हाच विचार माळी बाग फुलवताना करतो. तीच फुलं माळ्याच्याच उपयोगाला आली नाहीत तर  त्या माळ्याचं दु:ख काय असेल, हेच "बाग़बान"मध्ये प्रामुख्याने दाखवलं गेलं. दोन्हीही चित्रपटांमध्ये सुखांतच दाखवला आहे. "बाग़बान"मध्ये एकीकडे ढीग तर दुसऱ्या बाजूला खड्डा, असा अमिताभ बच्चन, हेमा मालिनी, सलमान ख़ान आणि महिमा चौधरी यांच्याच बाजूने सुखांत होता. "तू तिथं मी"मध्ये मात्र एक सकारात्मक आणि कथानकाच्या सर्व बाजूने समाधानकारक शेवट दाखवला गेला...


दोन्हीही चित्रपटांत एकच कथानक होतं, पण ते मांडण्याचे दृष्टीकोन मात्र वेगळे होते. तरीही, १९९८ सालचा "तू तिथं मी" आणि २००३चा "बाग़बान" हे दोन्हीही चित्रपट पाहण्यासारखे आहेत हे मात्र नक्की...

@ अनिकेत परशुराम आपटे.

Friday, 8 April 2022

अभिनयप्रधान गुड्डी...

#HBD_Jaya...

"चक्कू छुरियाँ तेज करा लो..." आशाताई भोसले यांचे हे स्वर कानी पडताच डोळ्यांसमोर येते अल्लड, भाबडी, चाकूंना धार काढून देणारी एक मुलगी. "ज़ंजीर" या चित्रपटातली ही भूमिका, अभिनेत्री जया भादुरी म्हणजेच जया बच्चन यांनी उत्तम वठवली होती...


सशक्त अभिनय आणि सुरेख संवादफेक, या बलस्थानांमुळे जया भादुरी त्यांच्या काळातल्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये गणल्या गेल्या. साज-श्रृंगार, नटणं-मुरडणं, तोकडे कपडे घालणं, यापेक्षाही परिपक्व अभिनय करणं, हीच गोष्ट जया भादुरी यांना अग्रस्थानी घेऊन गेली. सत्यजीत रे दिग्दर्शित "महासागर" या चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर पहिलं पाऊल ठेवणाऱ्या जया भादुरी यांचा पहिला हिंदी चित्रपट होता, हृषिकेश मुखर्जी दिग्दर्शित "गुड्डी..."

"गुड्डी"ला घवघवीत यश मिळालं आणि जया भादुरी यशाच्या दिशेने वाटचाल करू लागल्या. "अनामिका", "कोरा कागज़", "नया दिन नयी रात", "कोशिश", "पिया का घर", "परिचय", "बावर्ची", अशा एकाहून एक यशस्वी चित्रपटांत आपल्या सहज सुंदर अभिनयाने जया भादुरी यांनी वाह वाह मिळवली. Glamorous भूमिकांपेक्षा performance based भूमिकांमध्ये जया भादुरी जास्त रंगल्या आणि आघाडीच्या नायिकांमध्ये गणल्या गेल्या...

१९७३ साली प्रदर्शित झालेल्या "ज़ंजीर" हा चित्रपट अमिताभ बच्चन यांच्यासाठी मैलाचा खडक ठरला. असं म्हणतात, की अत्यंत यशस्वी झालेल्या "ज़ंजीर"ने अमिताभ बच्चन यांना रातोरात स्टार बनवलं ते जया भादुरी यांच्या पायगुणांनी. एकामागून एक अयशस्वी चित्रपट देणाऱ्या अमिताभ बच्चन यांची कारकिर्द जवळ जवळ संपत आली होती. कुठलीही आघाडीची नायिका त्यांच्यासोबत काम करायला तयार नव्हती. अशा वेळी जया भादुरी यांनी ती दुय्यम म्हणावी अशी भूमिका स्वीकारली होती...


"ज़ंजीर" तूफान गाजला आणि अमिताभ बच्चन यांच्या 'Angry young man' या उपाधीसोबत, जया-अमिताभ ही जोडीसुद्धा हिट झाली. "मिली", "अभिमान", "चुपके चुपके", "शोले", हे चित्रपट अफाट चालले आणि अमिताभ-जया या जोडीला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. अमिताभ बच्चन यांच्याशी विवाहबद्ध झाल्यावर संसार एके संसार करण्यासाठी जया बच्चन यांनी "शोले"नंतर बराच काळ चित्रपटांपासून स्वत:ला दूर ठेवलं. १९८१ साली प्रदर्शित झालेला "सिलसिला", नायिका म्हणून जया बच्चन यांचा शेवटचा चित्रपट ठरला...

"सिलसिला"नंतर जवळ जवळ सतरा वर्षांनी जया बच्चन पुन्हा अभिनयाकडे वळल्या. पण यावेळी चरित्र भूमिकांवर त्यांनी जास्त भर दिला. "हज़ार चौरासी की माँ", "कल हो ना हो", "लागा चुनरी में दाग़" असे काही चित्रपट जया बच्चन यांच्या चरित्र भूमिकांनी सजले. चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस फारसे उतरले नाहीत, पण जया बच्चन यांच्या अदाकारीला चांगली दाद मिळाली. अभिनयासोबतच जया बच्चन यांनी समाजवादी पार्टीकडून उत्तर प्रदेशचं प्रतिनिधित्व करत राजकारणातही बऱ्यापैकी नाव मिळवलं...


आज ९ एप्रिल. 'पद्मश्री' जया बच्चन यांचा वाढदिवस. चित्रपटसृष्टीच्या या संवेदनशील, अभिनयप्रधान "गुड्डी"ला आजच्या दिवसाच्या मनापासून शुभेच्छा...

@ अनिकेत परशुराम आपटे.

Wednesday, 6 April 2022

All Time Favorite 'Jumping Jack...'

#HBD_Jeetendra...

हिंदी चित्रपटसृष्टीत ज्यांना ‘Jumping Jack’ या टोपणनावाने ओळखले जाते, ती व्यक्ती म्हणजे रवी अमरनाथ कपूर ऊर्फ प्रसिद्ध अभिनेते जीतेंद्र...


आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत २००हून अधिक चित्रपटांमधून नायक आणि सहनायकाच्या भूमिकेत जीतेंद्र प्रेक्षकांसमोर आले. १९६४ साली प्रदर्शित झालेल्या व्ही. शांताराम दिग्दर्शित “गीत गाया पत्थरों ने” या चित्रपटातून एक नायक म्हणून जीतेंद्र यांचे रुपेरी पडद्यावर पहिले पाऊल पडले. त्याआधी १९५९ साली प्रदर्शित झालेल्या “नवरंग” या चित्रपटात, अभिनेत्री संध्या यांचा duplicate म्हणून त्यांना संधी मिळाली होती...

यशासाठी झगडत असलेल्या जीतेंद्र यांना प्रसिद्धी मिळाली, १९६७ साली प्रदर्शित झालेल्या “फर्ज” या चित्रपटामुळे. “फर्ज”मध्ये त्यांनी परिधान केलेले पांढरे बूट आणि टी-शर्ट पुढे अनेक वर्ष ‘Fashion Symbol’ म्हणून ओळखले गेले. अभिनेते जीतेंद्र यांच्या सुरुवातीच्या काही चित्रपटांत जसे “कारवाँ”, “हमजोली”, “परिवार”, “सुहाग रात”, अनेक उडत्या चालींवरची गाणी होती. जेव्हा त्यांना ‘Jumping Jack’ हे टोपण नाव मिळाले...

त्या काळातल्या अनेक यशस्वी दाक्षिणात्य चित्रपटांच्या हिंदी आवृत्तींमध्ये जीतेंद्र नायक म्हणून प्रेक्षकांसोर आले. “औलाद”, “कठपुतली”, “रूप तेरा मस्ताना”, “बिदाई”, “हिम्मतवाला”, “तोहफा”, “उधार का सिंदूर”, “संजोग”, “जुदाई”, “मांग भरो सजना” अशा अनेक दाक्षिणात्य चित्रपटांच्या हिंदी आवृत्त्यांमध्ये जीतेंद्र दिसले. अभिनेत्री जयाप्रदा, रेखा आणि श्रीदेवी यांच्यासोबत जीतेंद्रची पडद्यावरची जोडी प्रेक्षकांनी खूप पसंत केली...


दाक्षिणात्य चित्रपटांशिवाय, “परिचय”, “खुशबू”, “किनारा”, “दिलदार” अशा वेगळ्या कथानक असलेल्या चित्रपटांमधूनही अभिनय करत जीतेंद्र लोकप्रिय होत गेले. एक नायक म्हणून यश संपादन करत असताना, "नागिन", "जानी दुश्मन", "कर्मयोगी", "खिलौना", "द बर्निंग ट्रेन" अशा चित्रपटांमधून सहनायक किंवा सहअभिनेता म्हणूनही जीतेंद्र झळकले. "बदले की आग", "पापी देवता", "दोस्ती दुश्मनी", "शेशनाग", "भूकंप", "सोने पे सुहागा" अशा मसाला चित्रपटांत प्रेक्षकांसमोर येत असताना मात्र जीतेंद्र यांची लोकप्रियता कमी होत गेली...

१९९०च्या काळात मग जीतेंद्र यांनी चरित्र भूमिकांकडे मोर्चा वळवला. “यह रात फिर ना आएगी”, “दिल आशना है”, “प्रतीक्षा”, “खलनायिका”, “उधार की जिंदगी”, “महानता”, “चुप”, “ख़ुदगर्ज़” अशा चित्रपटांमधून चरित्र भूमिका करत जीतेंद्र पुन्हा लोकप्रियतेच्या मार्गाला लागले. रुपेरी पडद्यावर प्रचंड यशस्वी होत असताना, जीतेंद्र यांनी त्यांच्या मुलीच्या म्हणजे एकता कपूर यांच्या काही मालिकांमधून विशेष भूमिका करून छोट्या पडद्यावर तर हात आजमावलाच, पण आणि सध्या ते OTTवरही दोन वेब सीरिजमध्ये दिसत आहेत...

जीतेंद्र आणि शोभा कपूर यांची प्रेम कहाणीसुद्धा एखाद्या चित्रपटासारखीच होती. जीतेंद्र आणि शोभा कपूर यांची भेट झाली तेव्हा शोभा कपूर १४ वर्षांच्या होत्या. काळ पुढे जात राहिला तसं त्याचं प्रेमही बहरत गेलं. १९७४ साली “बिदाई” या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर या प्रेमी युगुलाने विवाह बंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. त्यांच्याबद्दल एक किस्सा खूप लोकप्रिय आहे. जीतेंद्र यांना शूटिंगसाठी जायचं होतं. फ्लाईट रद्द झाल्याने ते घरी परतले. शोभा कपूर यांनी त्यांना त्या दिवशी परत जाऊ दिलं नाही. ती फ्लाईट क्रॅश झाली होती आणि शोभा कपूर यांच्या प्रेमानेच जीतेंद्र यांना वाचवलं असं म्हणतात...


आज जन्म ७ एप्रिल. अभिनेते जीतेंद्र यांचा वाढदिवस. चित्रपटसृष्टीच्या या 'Jumping Jack'ला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा...

बार बार दिन यह आये... बार बार दिल यह गाये...
तू जिये हज़ारों साल यह हम सब की है आरज़ू...
Happy birthday to you...
Happy birthday to you...
Happy birthday to ओ जीतू...
Happy birthday to you...

@ अनिकेत परशुराम आपटे.