Saturday, 20 November 2021

स्पर्धा, भावनांची संपत्तीशी...

भावना श्रेष्ठ की पैसा, या विषयावर हळुवार भाष्य करणारं कौटुंबिक नाटक म्हणजे, सुधीर जोशी दिग्दर्शित, "घर श्रीमंताचं..."


वसंत कुलकर्णी (सुधीर जोशी), नीला कुलकर्णी (आशा काळे), सीमा कुलकर्णी (नीलम शिर्के), प्रशांत कुलकर्णी (शेखर फडके), हे एक मध्यवर्गीय चौकोनी कुटुंब आणि मनोहर बापट (अतुल परचुरे), हा त्या चौकोनी कुटुंबात नव्याने प्रविष्ट होणारा त्या कुटुंबाचा जावई. ते चौकोनी कुटुंब आणि मनोहर यांचं एक रेष पकडून छानपैकी आयुष्य सुरू असताना, पूर्वज व दैवामुळे या कुटुंबाकडे एका मार्गाने पुष्कळ पैसा येतो...

नवं घर, नवी गाडी, हे सगळं झाल्यावर ज्या मार्गाने आधीचे पैसे मिळाले, त्याच मार्गाने अजून पैसे मिळवावेत, हा विचार वसंत आणि प्रशांतच्या मनात डोकावतो. त्याच मार्गावर, नीलाच्या भावना गुंतल्या असल्याने पैसा विरुद्ध भावना, असा कलह निर्माण होतो. पैसा श्रेष्ठ की भावना, अशी एक स्पर्धा त्या घरात जन्म घेते आणि पैशाला श्रेष्ठ मानणारे वसंत, सीमा आणि प्रशांत एका बाजूला होतात तर भावनांना वरचढ मानणारी नीला दुसऱ्या बाजूला जाते...

पैसा हा महत्वाचा असतोच. पण पैशापेक्षाही, मनात जतन केलेल्या लाखमोलाच्या भावनाच श्रेष्ठ असतात हे आपोआप सिद्ध होतं आणि कुलकर्णींच्या घरात घडणारं हे नाट्य, सुखांतावर संपतं...

नाटकातले काही प्रसंग फार सुंदर लिहिले गेले आहेत...

आईने उघड केलेलं गुपित...

आपल्याला एक मुलगा आवडतो हे मुलीने घरी सांगणं जितकं अवघड असतं, तितकंच अवघड असतं या गोष्टीला आई-वडिलांचा होकार मिळवणं. मनोहर निघून गेल्यावर सीमाशी बोलता बोलताच तो मनोहरच आहे, हे अलगदपणे नीला उघड करते तो प्रसंग सुंदर रेखाटलाय...

वडिल-मुलीचा संवाद...

प्रेम विवाहातलं सर्वात धोक्याचं वळण म्हणजे वडिलांची परवानगी. इतक्या नाजूक विषयाला मजेशीर आणि फिल्मी पद्धतीने मांडताना, लेखकाने त्या प्रसंगातल्या विषयाचं गांभीर्यही छान जपलं आहे. परवानगी दिल्यावर सीमाच्या लहानपणापासून ते आत्तापर्यंतचा धावता वृत्तांत जेव्हा वसंत सांगतात, तेव्हा डोळ्यात पाणी येतं...

प्रेमाची कबूली...

जुलूम जबरदस्ती न करता आपण प्रेमानेही आपल्या व्यक्तीला बदलू शकतो, हे दाखवणारा एक सुंदर प्रसंग नाटकात आला आहे. मनोहर कविता ऐकवून पूर्ण करतो. कविता ऐकताना सीमाच्या मनाची द्विधा मन:स्थिती होते. सरतेशेवटी मनोहरने कवितेतून मारलेल्या हाकेला सीमा कवितेनेच उत्तर देते आणि पैशाची बंधनं तोडून भावनेकडे जाते. समजवा-समजवीवर भर न देता, लेखकाने हा प्रसंग रेखीव शब्दात सुरेख रेखाटला आहे...

पैशाची नशा...

संपूर्ण नाटकात वेगळ्या विचारात वावरणारं, थोड्या ग्रे शेड दाखवणारं पात्र जर कोणी असेल तर तो आहे प्रशांत. त्याच्या बोलण्यातून, वावरातून पैशाची नशा, पैशाचा बडेजाव सतत दिसून येतो. प्रशांतसोबत रंगवलेले दोन प्रसंग मला जरा खटकले. आपले १०-१२ रुपये गेले तरी आपला जीव कासावीस होतो. नाटकात एक संदर्भ आला आहे की प्रशांतचा पार्टनर प्रशांतचे एक लाख रुपये बुडवतो. पण त्याबद्दलची अस्वस्थता कुठे जाणवली नाही. आपल्या हाती असलेला पैसा आपल्याला वाढवायचा असतो तेव्हा त्या पैशाला कामाला लावण्यासाठी आपण मार्ग शोधतो. पण प्रशांतच्या वागण्या-बोलण्यात ती अधीरता दिसत नाही. वास्तविक प्रशांतच्या पात्राला थोडं खुलवता आलं असतं असं मला वाटतं...

नवरा-बायकोचे अबोल संवाद...

वसंत दारूच्या अमलाखाली काहीतरी बरळत असताना, ते दारू प्यायलेले नाहीत असं नीलाने सांगणं, घरात लुटुपुटूचं विभाजन असूनसुद्धा खोबऱ्याच्या वड्या आणि गजऱ्याची देवाणघेवाण होणं, या दोन प्रसंगातून वसंत आणि नीला एकमेकांना किती छान समजतात, हे दिसतं. शाळिग्राम आणि कलश कसे मिळाले हे सांगत असताना एका क्षणासाठी नीला थांबते आणि सीमाला वसंतच्या हातात असलेला कलश धरायला मदत कर असं सांगते. या प्रसंगातून वसंत आणि नीला यांच्यातले अबोल संवाद प्रकर्षाने जाणवतात. हा प्रसंग संपूर्ण नाटकाचा हाय पॉईंट आहे असं मला वाटतं...

नाटकाच्या विनोदी प्रसंगांचं म्हणाल, तर सुधीर जोशी, अतुल परचुरे आणि शेखर फडके या तगड्या खेळाडूंनी ते प्रसंग सुरेख हाताळले आहेत. माझ्या मते आशा काळे आणि नीलम शिर्के या बाबतीत जरा कमी पडल्या...

थोडक्यात, पैसा आणि भावना दोन्हीही जरी समान असले, तरीही पैशापेक्षा भावना अधिक मौल्यवान, हे दाखवणारं हेमंत ऐदलाबादकर लिखित, "घर श्रीमंताचं" हे नाटक आवर्जून पहावं असंच आहे...

नाटकाची लिंक - https://youtube.com/watch?v=N-VOMqZcqyk&feature=share

@ अनिकेत परशुराम आपटे.

No comments:

Post a Comment