Monday, 8 November 2021

देर से आया फल पर...

सुमारे दीडेक वर्ष ज्या चित्रपटाची आतूरतेने वाट पाहिली, तो शेट्टी पोलीस फॅक्टरीतला "सूर्यवंशी" पाहण्याची अखेर संधी मिळाली...

कथा गुंतागुंतीची, पण तरीही सरळसोट. एका प्रचंड मोठ्या अतिरेकी हल्ल्याचा पडदाफाश करण्यासाठी डी.सी.पी. वीर सूर्यवंशी (अक्षय कुमार) कंबर कसतो. सगळे धागेदोरे खणून काढत सूर्यवंशी अखेर तो हल्ला नाकाम करतो...

शेट्टी पोलीस फॅक्टरीच्या आधीच्या चित्रपटांत, नायिका नायकांना पाठिंबा देताना, त्याची हिम्मत वाढवताना दिसतात. पण या चित्रपटात मात्र नायिका अनेक प्रसंगात नायकाच्या कामात अडथळे आणताना दिसते. चित्रपटातली गाणी फार काही श्रवणीय नाहीत, पण त्यातल्या त्यात 'हम हिंदुस्तानी...' हे गाणं थोडं प्रभावशाली वाटतं. अर्थात, गाणं न वापरताही प्रसंग अधिक खुलवता आला असता असं मला वाटतं...

शेट्टी पोलीस फॅक्टरीच्या दोन नेहमीच्या गोष्टी याही चित्रपटात दिसल्या. पहिली गोष्ट म्हणजे नायकाला दिलेली एखादी विशिष्ठ खूण. "सिंघम"मध्ये, "आता माझी सटकली..." हा संवाद होता, तर "सिम्बा"मध्ये, "जे मला माहित नाही ते सांगा..." हा संवाद होता. या वेळी नायकाला ठेवणीतला संवाद न देता, नावात बदल करून ती नावं उच्चारण्याची लकब दिली गेली होती. यामुळेच चित्रपटाच्या गंभीर स्वरूपाला विनोदी टच मिळत गेला...

या चित्रपटातली शेट्टी स्पेशल दुसरी गोष्ट म्हणजे, पुढे येणाऱ्या चित्रपटाची नांदी. "सिम्बा"मध्ये "सूर्यवंशी" या चित्रपटाची छोटीशी झलक पहायला मिळाली होती. तसंच याही वेळी ओमर हाफिज़ (जॅकी श्रॉफ) आणि सिंघम (अजय देवगण) यांच्यात चित्रपटाच्या अगदी शेवटी होणाऱ्या एका संवादामुळे, शेट्टी पोलीस फक्टरीचा पुढचा चित्रपट काय असू शकेल याचा अंदाज येतो...

चित्रपटातल्या पाहुण्या कलावंतांबद्दल काय बोलणार... कटाचा मुख्य सूत्रधार म्हणून जॅकी श्रॉफला दाखवलं गेलं. त्या ऐवजी चेहेरा न दाखवता फक्त संवाद ऐकवले असते किंवा हालचाली दाखवल्या असत्या, तर एक छान गूढ निर्माण झालं असतं ज्याचा वापर पुढच्या चित्रपटात करता आला असता. रणबीर सिंहची एंट्री कथेच्या दृष्टीने ठिक होती, पण अजय देवगणच्या एंट्रीचं कारण स्पष्ट केलेलं दिसत नाही...

चित्रपटाच्या तीन जमेच्या बाजू आहेत. पहिली म्हणजे तब्बल सोळा वर्षांनी अक्षय कुमार आणि अजय देवगण या दोन ऍक्शन हिरोंना पडद्यावर एकत्र पाहणे. २००५ साली प्रदर्शित झालेल्या "इंसान" या चित्रपटात दोघं शेवटचे दिसले होते. त्यानंतर आज "सूर्यवंशी"च्या निमित्ताने पुन्हा हे दोघं एकत्र पहायला मिळाले. चित्रपटाची दुसरी जमेची बाजू म्हणजे चित्रपटाचं पार्श्व संगीत. वेगवान साहसकथेला न्याय देणारं तितकंच दमदार पार्श्वसंगीत ऐकताना छान वाटतं...

चित्रपटाची तिसरी आणि सर्वात महत्वाची जमेची बाजू म्हणजे चित्रपटातली हाणामारी व साहसदृश्य. वेगवान हाणामारी आणि जबरदस्त साहसदृश्य पाहताना डोळ्यांचं पारणं फिटतं अगदी. चित्रपटाच्या शेवटी येणारी हाणामारी तर कमाल रंगली आहे. या चित्रपटामुळे बऱ्याच काळानंतर जुना अक्षय कुमार पहायला मिळाला. त्या किक्स, ते पंचेस, "सबसे बड़ा खिलाड़ी", "खिलाड़ियों का खिलाड़ी", अशा काही चित्रपटांमधून तुकड्या तुकड्याने घेतलेली ती भन्नाट साहसदृष्ये पडद्यावर पाहताना मजा आली...

एकंदरीत, सब्र का फल हमेशा मीठा होता है असं नाही. कधीकधी ते फळ बाहेरून मस्त आणि आतून नीरसही असू शकतं याचं उदाहरण म्हणजे हा चित्रपट. पण तर्कशास्त्र म्हणजे मराठीत लॉजिक, या गोष्टीला बगल देऊन चित्रपट पहायचा असेल तर शेट्टी पोलीस फॅक्टरीचा रोहित शेट्टी दिग्दर्शित, "सूर्यवंशी" नक्की पहावा...

@ अनिकेत परशुराम आपटे.

No comments:

Post a Comment