Some crazy tourists, one handsome tour manager, a tour filled with exotic locations and some beautiful moments; हीच थीम आहे हेमंत ढोमे दिग्दर्शित, "झिम्मा" या चित्रपटाची...
आपापल्या व्यक्तिमत्वात अडकलेल्या आणि स्वत:लाच हरवलेल्या अशा वेगवेगळ्या वयोगटातल्या बायका एकत्र येतात आणि ट्रिप सुरू होते. एकीकडे टूर चालत राहते, तर दुसरीकडे व्यक्तिमत्वांची जुळवाजुळव होऊन जोड्या जमत जातात. काही वेळा दृष्यांतून तर काही वेळा संवादांमधून, कथानक त्या त्या व्यक्तिरेखांच्या भूतकाळात डोकावत राहतं आणि त्या सर्व व्यक्तिरेखांची व्यक्तिमत्व समोर येतात...
व्यक्तिरेखांमध्ये असलेले शाब्दीक आणि वैचारीक मतभेद, त्यातून होणारे वादविवाद, समुहात पडलेली फूट, समेट आणि अखेर सुखांत, असा प्रवास करत चित्रपट एका refreshing endवर संपतो. कथानक नवीन नसावं. कारण "दिल चाहता है" आणि "ज़िंदगी ना मिलेगी दोबारा" या दोन चित्रपटांची पदोपदी आठवण होते. निदान मला तरी होते. पण मराठीत हा नवीन विषयींपैकी एक आहे हे नक्की...
चित्रपटात तीन गाणी आहेत. तीनही गाणी कथानकासोबत जात असल्याने, कथेला कुठेही ब्रेक लागला असं वाटत नाही. चित्रपटाचं शीर्षक गीत जिथे कथेतल्या पात्रांची ओळख करून चित्रपटाची सुरुवात करतं, तिथेच कथेच्या अगदी शेवटी येणारं, "अलविदा..." हे गाणं, त्या सर्व पात्रात झालेल्या सकारात्मक बदलांचं दर्शन घडवतं...
चित्रपटातले दोन सीन्स मला विशेष आवडले. पहिल्या सीनमध्ये मीता मागेच राहिल्याने एकटी पडते. अनोळखी वातावरणाने बावरलेली मीता, तिच्या मुलीने शिकवल्याप्रमाणे गूगल मॅप्सचा आधार घेऊन हव्या असलेल्या ठिकाणी पोहोचते. त्यावेळी, "येस... आपण करून दाखवलं..." असं सांगणारे जे विजयी भाव तिच्या चेहेऱ्यावर आलेत ना, ते अप्रतीम आहेत. दुसरा सीन आहे इंदू आणि वैशाली यांच्यात झालेल्या समेटचा. दोघीत पुन्हा मैत्री होते आणि त्याच वेळी बाजूला एक सफेद पक्षी उडत जातो. हा निव्वळ योगायोगही असू शकेल, पण त्या पक्षाचं उडणं आणि दोघींचं एकदम स्मितहास्य फुलवणं, हे टायमिंग छान जमून गेलं...
माझ्या मते काही गोष्टी मात्र गुलदस्त्यातच राहिल्या...
कृतिका, इतकी वर्ष जतन करून ठेवलेली आणि कोणालाही वाचायला न दिलेली डायरी समुद्रात फेकून देते. त्यामागचं नेमकं कारण नाही समजलं...
हा नायिकाप्रधान चित्रपट आहे. पण तरीही थोडाफार का होईना, पण कबीर या चित्रपटाचा नायक आहे. जेव्हा समुहात फूट पडते, तेव्हा टूर मॅनेजर म्हणून नाही, तर एक माणूस म्हणून कबीर भांडण मिटवण्याचा प्रयत्न करताना दिसत नाही. कदाचित अशी काही युक्ती दाखवली गेली असती, तर त्या सर्वांच्या नात्यात आणि चित्रपटात अजून मजा आली असती...
या कथानकात प्रत्येक व्यक्तिरेखेला एक स्वतंत्र भूतकाळ दिल्याचं दिसतं. पण रमाला स्वतंत्र असं वेगळं कथानक दिलं गेलं नाही. रमा फक्त फोटो काढण्यापुर्ती आणि ट्रिपमधली एक सदस्य आहे इतकंच दाखवण्यापेक्षा तिला मिळालेल्या हॅटच्या पार्श्वभूमीवर एखादा संवाद किंवा प्रसंग फुलवता आला असता...
एक मुलगी समुहातून नाहीशी होते. पण एक सीन सोडल्यास या प्रसंगाचं गांभीर्य कोणामध्येही दिसलं नाही. टूर मॅनेजर काही प्रयत्न करतोय किंवा इतर सदस्य काही फोनाफोनी करत आहेत असंही जाणवलं नाही...
तरीही, सुंदर लोकेशन्स, मराठीत घेतलेला एक नवा विषय, अप्रतीम कॅमेरा शॉट्स, तगड्या कलावंतांच्या फळीने केलेली सहज सुंदर अदाकारी आणि मैत्री या नात्याची नवी पालवी फुटलेल्या मित्र-मैत्रिणींच्या संवादावर होत असलेला सुंदर शेवट, यांसाठी इरावती कर्णिक लिखीत, "झिम्मा" हा चित्रपट नक्कीच पहावा असाच आहे...
@ अनिकेत परशुराम आपटे.