Saturday, 27 November 2021

हवाहवासा "झिम्मा..."

Some crazy tourists, one handsome tour manager, a tour filled with exotic locations and some beautiful moments; हीच थीम आहे हेमंत ढोमे दिग्दर्शित, "झिम्मा" या चित्रपटाची...

आपापल्या व्यक्तिमत्वात अडकलेल्या आणि स्वत:लाच हरवलेल्या अशा वेगवेगळ्या वयोगटातल्या बायका एकत्र येतात आणि ट्रिप सुरू होते. एकीकडे टूर चालत राहते, तर दुसरीकडे व्यक्तिमत्वांची जुळवाजुळव होऊन जोड्या जमत जातात. काही वेळा दृष्यांतून तर काही वेळा संवादांमधून, कथानक त्या त्या व्यक्तिरेखांच्या भूतकाळात डोकावत राहतं आणि त्या सर्व व्यक्तिरेखांची व्यक्तिमत्व समोर येतात...

व्यक्तिरेखांमध्ये असलेले शाब्दीक आणि वैचारीक मतभेद, त्यातून होणारे वादविवाद, समुहात पडलेली फूट, समेट आणि अखेर सुखांत, असा प्रवास करत चित्रपट एका refreshing endवर संपतो. कथानक नवीन नसावं. कारण "दिल चाहता है" आणि "ज़िंदगी ना मिलेगी दोबारा" या दोन चित्रपटांची पदोपदी आठवण होते. निदान मला तरी होते. पण मराठीत हा नवीन विषयींपैकी एक आहे हे नक्की...

चित्रपटात तीन गाणी आहेत. तीनही गाणी कथानकासोबत जात असल्याने, कथेला कुठेही ब्रेक लागला असं वाटत नाही. चित्रपटाचं शीर्षक गीत जिथे कथेतल्या पात्रांची ओळख करून चित्रपटाची सुरुवात करतं, तिथेच कथेच्या अगदी शेवटी येणारं, "अलविदा..." हे गाणं, त्या सर्व पात्रात झालेल्या सकारात्मक बदलांचं दर्शन घडवतं...

चित्रपटातले दोन सीन्स मला विशेष आवडले. पहिल्या सीनमध्ये मीता मागेच राहिल्याने एकटी पडते. अनोळखी वातावरणाने बावरलेली मीता, तिच्या मुलीने शिकवल्याप्रमाणे गूगल मॅप्सचा आधार घेऊन हव्या असलेल्या ठिकाणी पोहोचते. त्यावेळी, "येस... आपण करून दाखवलं..." असं सांगणारे जे विजयी भाव तिच्या चेहेऱ्यावर आलेत ना, ते अप्रतीम आहेत. दुसरा सीन आहे इंदू आणि वैशाली यांच्यात झालेल्या समेटचा. दोघीत पुन्हा मैत्री होते आणि त्याच वेळी बाजूला एक सफेद पक्षी उडत जातो. हा निव्वळ योगायोगही असू शकेल, पण त्या पक्षाचं उडणं आणि दोघींचं एकदम स्मितहास्य फुलवणं, हे टायमिंग छान जमून गेलं...

माझ्या मते काही गोष्टी मात्र गुलदस्त्यातच राहिल्या...

कृतिका, इतकी वर्ष जतन करून ठेवलेली आणि कोणालाही वाचायला न दिलेली डायरी समुद्रात फेकून देते. त्यामागचं नेमकं कारण नाही समजलं...

हा नायिकाप्रधान चित्रपट आहे. पण तरीही थोडाफार का होईना, पण कबीर या चित्रपटाचा नायक आहे. जेव्हा समुहात फूट पडते, तेव्हा टूर मॅनेजर म्हणून नाही, तर एक माणूस म्हणून कबीर भांडण मिटवण्याचा प्रयत्न करताना दिसत नाही. कदाचित अशी काही युक्ती दाखवली गेली असती, तर त्या सर्वांच्या नात्यात आणि चित्रपटात अजून मजा आली असती...

या कथानकात प्रत्येक व्यक्तिरेखेला एक स्वतंत्र भूतकाळ दिल्याचं दिसतं. पण रमाला स्वतंत्र असं वेगळं कथानक दिलं गेलं नाही. रमा फक्त फोटो काढण्यापुर्ती आणि ट्रिपमधली एक सदस्य आहे इतकंच दाखवण्यापेक्षा तिला मिळालेल्या हॅटच्या पार्श्वभूमीवर एखादा संवाद किंवा प्रसंग फुलवता आला असता...

एक मुलगी समुहातून नाहीशी होते. पण एक सीन सोडल्यास या प्रसंगाचं गांभीर्य कोणामध्येही दिसलं नाही. टूर मॅनेजर काही प्रयत्न करतोय किंवा इतर सदस्य काही फोनाफोनी करत आहेत असंही जाणवलं नाही...

तरीही, सुंदर लोकेशन्स, मराठीत घेतलेला एक नवा विषय, अप्रतीम कॅमेरा शॉट्स, तगड्या कलावंतांच्या फळीने केलेली सहज सुंदर अदाकारी आणि मैत्री या नात्याची नवी पालवी फुटलेल्या मित्र-मैत्रिणींच्या संवादावर होत असलेला सुंदर शेवट, यांसाठी इरावती कर्णिक लिखीत, "झिम्मा" हा चित्रपट नक्कीच पहावा असाच आहे...

@ अनिकेत परशुराम आपटे.

Tuesday, 23 November 2021

सवताच आटपलेला भयपट...

मंदी येक आसा शिणुमा पायला म्हनून सांगू... पायलास का आसं विचारल्यावर का पायला... आसं जालं ओ माजं... तर, डॉकॅलिटी बाजूला टिऊनश्यानी पिक्टुरे बगायचा आसंल तर "जानी दुश्मन - एक अनोखी कहानी" हा शिणुमा हायेच की...

तर, कपिल ("कहर" कोहली किंवा अरमान कोहली बी चालंल) आनी वसुंधरा ("बॉम्बे" कोयराला) ह्ये नाग-नागिनीचं जोडपं येकम्येकांवर पिरेम करत आसतं. कपिलने संभरी वलांडली आसती म्हनून तेला यक्श्ट्रो पावर गावली आसती. वसुंधरा आजून ल्हान आसती म्हनून ती काय यवडी पावरबाज नसती. कपिल आनी वसुंधरा नाच-गानं करत असत्यात तवाच येका गोसावड्याचा तपोभंग व्हतो आनी त्यो वसुंधराला मारून टाकतो. कपिल लईच गळ घालतो तवा त्ये गोसावडं कपिलला झाडमंदी कोंडून ठ्येऊन यकवीसाव्या सतकात भाईर याया सांगतं...

ह्यो जाला मागला जनम... आता कट टू यकवीसावं सतक...

वसुंधरा व्हर्जन टू म्हन्जी दिव्या, यका कालिजात शिकत आसती. थितं, शाना अतुल ("सूर्यवंशी" कुमार), बॉक्सर विजय ("बलवान" शेट्टी), शिरमंत अशोक ("सैलाब" पांचोली), रोमांचिक प्रेम ("मस्त" शिवदासानी), विनोद्या अब्दुल ('सर्किट' वारसी), फोटुग्राफर विक्टर ("जोश" कपूर) आनी कच्चा लिंबू विवेक ('सुरेल' निगम) अशी हांडसम फंटर लोकांची फौज दिव्यासोबत आसताना बी दिव्याला ढाई किलो के हाथवाला करणच ("गदर" देओल) आवडतू. यवडी ताकदीची मानसं आसताना बी, चालू राजेश ("२००१" बेदी) आनी येडा मदन (सिद्धार्थ किंवा "वंश" रे) हे दोगं दिव्यासोबत... आरारारारा...

दिव्या आतमहत्या करती आनी तवाच कपिल थितं येतू. हितून होते बदला-बदली श्टारट. त्या फंटर लोकांपैकी काहींना कपिल नाग्या मारतू तर काहींना दिव्या भुतीण मारती. कालिजचा परोफेसर जोसेफ ("ऐतबार" बब्बर) तेच्या परीनं या पोरांला वाचिवन्याचा परयतन करतू पन पावरबाज दिव्या आनी कपिलम्होरं कोनाचं काय बी चालत न्हाय. कोने येके काली तेंडुलकरांचा सचिन आऊट जाल्यावर कसे बाकीचे तेची ब्याट धरून पुन्ना प्याविलियनकडं परतायचे, तसंच हितं बी येका मागून येक समदे फंटर लोक्स टपकत्यात. मंग येतू आपला ओरड्या-आरड्या करण. परोफेर जोसेफने दिलेल्या अचाट पावरनं करण त्या नाग्या कपिलला धोपटतो आनी मारून टाकतो...

हानामारी म्हनाल तर "टर्मिनेटर", "मॅट्रिक्स", "ट्रू लाईज" हे फारिनचे शिणुमे आठिवतात. गानी तर... काय बरं गानी ती, "ग्यारह बजे या बारा बजे...", "जावेद भाय सो रे ले..." आता गं बया... काय बोलनार यावर. कलाकार तर लय दमदार घेतल्यानीत. सोनू निगम, आफताब शिवदासानी चालून गेले, पर आदित्य पांचोली, सुनील शेट्टी, अक्षय कुमार, अरशद वारसी, मनीषा कोयरालासारखी मंडली कालिजात... हाय रे माज्या कर्मा...

काई शीण तर काय च्या काय आंगावर आले बगा...

कपिल ज्या झाडामंदी कदीच्या काली जाऊन बसतो, यवडं वरीस निगुन गेलं तरी त्या झाडाच्या आसपासचं काय बी बदललं न्हाय, कमालच की...

भर कालिजात अतुल दंबूक घेऊन येतो आनी वर चालवतो बी. तरी तेला कोनी काय बी बोलत न्हाय. ह्ये कस्स्काय...

येक दंबूक सापडली तवा त्या संजूबाबाला जेलामंदी जावं लागलं. हितं तर अतुलकडं आक्का बाम्बर (म्होट्टा पाईप ओ जेच्यातून बाम्बचे गोले सुटतात...) आसतुय. तरी पन त्यो शेप कसा...

नाग नाचतू काय, आफताब आदित्यला हानतो काय, नरसिंह अवतारावानी करण त्या नाग्याला फाडून काढतो काय, समदंच डोस्क्यावरून आणि डोस्क्यात जानारं व्हतं. पर येक हाय... समद्या फंटर लोक्सना हिरवीनी दिल्या. तेंची कापडं जवडी कमी व्हते, तेंची याक्टिंग पन कमीच व्हती. जवा ते समदे लोक्स टपकले तवा या हिरवीनी फुकाट गेल्या ना राव...

त्या लंबू अरमान कोहलीचं पुन्यांदा बारसं करून, मोहनीश कोहली बनवून त्यासनी म्होट्या पडद्यावर आनाया राजकुमार कोहलीने "जानी दुश्मन - एक अनोखी कहानी" ह्यो शिणुमा बनिवला खरा. पर त्यो परयतनाचा टराय फसला आणि शिणुमाने सवताच सवताला हानून आपटवला...

@ अनिकेत परशुराम आपटे.

Sunday, 21 November 2021

बंडखोर कथा की सूडकथा...

हाणामारी व जाळपोळीच्या दृष्यांनी सजलेली कथा, असं ज्याचं सार्थ वर्णन करता येईल तो चित्रपट म्हणजे, "सत्यमेव जयते..."

पोलीस गोटातल्या काही भ्रष्ट अधिकाऱ्यांना संपवण्याचा विडा उचललेला एक तरूण (जॉन एब्राहम) आणि त्याच्या विरुद्ध उभा ठाकलेला कर्तव्यदक्ष व इमानदार पोलीस अधिकारी (मनोज बाजपायी) यांच्यामधल्या संघर्षाची ही कथा. असंख्य हाणामारीची दृष्य, जाळपोळ, गाड्यांचे स्फोट, आयटम साँग, नायकाचं एकाच वेळी चार-पाच जणांना मारणं, नायिकेसोबत प्रणय-द्वंद्वगीत गात फिरणं अशा एकेकाळच्या मसाला चित्रपटांच्या लोकप्रिय घटकांचा यात भरणा केला गेला आहे...

कमकुवत कथेला तितक्याच कमकुवत पटकथेची व संगीताची जोड मिळाल्याने चित्रपट पकड घेत नाही. नवतारका आयेशा शर्मा यांचा वावर आणि कपडेपट चांगले आहेत पण अदाकारी व संवादफेक यांमध्ये मात्र त्यांनी निराश केलं. अमृता खानविलकर यांनी त्यांच्या छोट्याशा भूमिकेत छान रंग भरलेत. हिंदी-मराठी मालिकांमधून अत्यंत लोकप्रिय झालेल्या काही कलाकारांनीही या चित्रपटात आपलं कसब दाखवलं आहे. पण चित्रपट ज्यामुळे लक्षात राहू शकेल अशा फक्त दोनच गोष्टी आहेत. एक म्हणजे जॉन एब्राहम व मनोज बाजपायी यांच्यातली शाब्दीक द्वंद्व दृष्य आणि दुसरं म्हणजे या दोघांची अदाकारी...

चित्रपटातले दोन प्रसंग जरासे खटकले. तीन खून होतात. त्या ठिकाणच्या नावांची पहिली अक्षरं एकमेकांशी जुळवून, तो अज्ञात खूनी कुठल्या मार्गाने चाललाय आणि पुढचा खून कुठे होणार हे इंस्पेक्टर सहज शोधून काढतो. मिळालेल्या पहिल्या तीन अक्षरांच्या आधारे पोलीस यंत्रणेशी जोडलेले अनेक शब्द बनू शकतात. पण इंस्पेक्टर मात्र ते दोन शब्द धरूनच तपास पुढे नेतो. दुसरा प्रसंग म्हणजे खुन्यापासून वाचावं म्हणून काही पोलीस अधिकारी एकाच जाग एकत्र येऊन राहतात. हे दृष्य पोलीस खात्याला बदनाम करणारं आहे असं मला वाटतं...

मुख्य नायक असल्याने जॉन एब्राहमला चित्रपटात भरपूर वाव मिळालाय. पण सहनायक मनोज बाजपाईला एखाद-दुसरी गोळी झाडणे आणि संवाद, याखेरीज अजून काहीच काम दिलेलं दिसत नाही. कार्यप्रणाली आणि भ्रष्ट पोलीस अधिकारी यांच्यावर चिडलेला सामान्य माणूस पेटून उठतो आणि त्यांचे खून करतो हा कथाभाग शेवटी शेवटी सूडनाट्यात बदलत जातो. सूडकथे ऐवजी जर बंडखोरकथाच ठेवली असती तर कदाचित परिणा वेगळा झाला असता...

बराच काळ मसाला चित्रपटांनी हजेरी न लावल्याने या चित्रपटाचा घाट घातला असावा, असं चित्रपट पाहताना वाटतं. एकंदरीत one time watch या पठडीत मोडणारा, "सत्यमेव जयते", मसाला चित्रपटांच्या शौकीनांसाठी परवणीच आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. आता "सत्यमेव जयते २" येऊ घातला आहे. येणारा हा चित्रपट, "सत्यमेव जयतेचा सीक्वल आहे, की यात नवीन काही असेल, हे तर चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच समजेल...

@ अनिकेत परशुराम आपटे.

Saturday, 20 November 2021

स्पर्धा, भावनांची संपत्तीशी...

भावना श्रेष्ठ की पैसा, या विषयावर हळुवार भाष्य करणारं कौटुंबिक नाटक म्हणजे, सुधीर जोशी दिग्दर्शित, "घर श्रीमंताचं..."


वसंत कुलकर्णी (सुधीर जोशी), नीला कुलकर्णी (आशा काळे), सीमा कुलकर्णी (नीलम शिर्के), प्रशांत कुलकर्णी (शेखर फडके), हे एक मध्यवर्गीय चौकोनी कुटुंब आणि मनोहर बापट (अतुल परचुरे), हा त्या चौकोनी कुटुंबात नव्याने प्रविष्ट होणारा त्या कुटुंबाचा जावई. ते चौकोनी कुटुंब आणि मनोहर यांचं एक रेष पकडून छानपैकी आयुष्य सुरू असताना, पूर्वज व दैवामुळे या कुटुंबाकडे एका मार्गाने पुष्कळ पैसा येतो...

नवं घर, नवी गाडी, हे सगळं झाल्यावर ज्या मार्गाने आधीचे पैसे मिळाले, त्याच मार्गाने अजून पैसे मिळवावेत, हा विचार वसंत आणि प्रशांतच्या मनात डोकावतो. त्याच मार्गावर, नीलाच्या भावना गुंतल्या असल्याने पैसा विरुद्ध भावना, असा कलह निर्माण होतो. पैसा श्रेष्ठ की भावना, अशी एक स्पर्धा त्या घरात जन्म घेते आणि पैशाला श्रेष्ठ मानणारे वसंत, सीमा आणि प्रशांत एका बाजूला होतात तर भावनांना वरचढ मानणारी नीला दुसऱ्या बाजूला जाते...

पैसा हा महत्वाचा असतोच. पण पैशापेक्षाही, मनात जतन केलेल्या लाखमोलाच्या भावनाच श्रेष्ठ असतात हे आपोआप सिद्ध होतं आणि कुलकर्णींच्या घरात घडणारं हे नाट्य, सुखांतावर संपतं...

नाटकातले काही प्रसंग फार सुंदर लिहिले गेले आहेत...

आईने उघड केलेलं गुपित...

आपल्याला एक मुलगा आवडतो हे मुलीने घरी सांगणं जितकं अवघड असतं, तितकंच अवघड असतं या गोष्टीला आई-वडिलांचा होकार मिळवणं. मनोहर निघून गेल्यावर सीमाशी बोलता बोलताच तो मनोहरच आहे, हे अलगदपणे नीला उघड करते तो प्रसंग सुंदर रेखाटलाय...

वडिल-मुलीचा संवाद...

प्रेम विवाहातलं सर्वात धोक्याचं वळण म्हणजे वडिलांची परवानगी. इतक्या नाजूक विषयाला मजेशीर आणि फिल्मी पद्धतीने मांडताना, लेखकाने त्या प्रसंगातल्या विषयाचं गांभीर्यही छान जपलं आहे. परवानगी दिल्यावर सीमाच्या लहानपणापासून ते आत्तापर्यंतचा धावता वृत्तांत जेव्हा वसंत सांगतात, तेव्हा डोळ्यात पाणी येतं...

प्रेमाची कबूली...

जुलूम जबरदस्ती न करता आपण प्रेमानेही आपल्या व्यक्तीला बदलू शकतो, हे दाखवणारा एक सुंदर प्रसंग नाटकात आला आहे. मनोहर कविता ऐकवून पूर्ण करतो. कविता ऐकताना सीमाच्या मनाची द्विधा मन:स्थिती होते. सरतेशेवटी मनोहरने कवितेतून मारलेल्या हाकेला सीमा कवितेनेच उत्तर देते आणि पैशाची बंधनं तोडून भावनेकडे जाते. समजवा-समजवीवर भर न देता, लेखकाने हा प्रसंग रेखीव शब्दात सुरेख रेखाटला आहे...

पैशाची नशा...

संपूर्ण नाटकात वेगळ्या विचारात वावरणारं, थोड्या ग्रे शेड दाखवणारं पात्र जर कोणी असेल तर तो आहे प्रशांत. त्याच्या बोलण्यातून, वावरातून पैशाची नशा, पैशाचा बडेजाव सतत दिसून येतो. प्रशांतसोबत रंगवलेले दोन प्रसंग मला जरा खटकले. आपले १०-१२ रुपये गेले तरी आपला जीव कासावीस होतो. नाटकात एक संदर्भ आला आहे की प्रशांतचा पार्टनर प्रशांतचे एक लाख रुपये बुडवतो. पण त्याबद्दलची अस्वस्थता कुठे जाणवली नाही. आपल्या हाती असलेला पैसा आपल्याला वाढवायचा असतो तेव्हा त्या पैशाला कामाला लावण्यासाठी आपण मार्ग शोधतो. पण प्रशांतच्या वागण्या-बोलण्यात ती अधीरता दिसत नाही. वास्तविक प्रशांतच्या पात्राला थोडं खुलवता आलं असतं असं मला वाटतं...

नवरा-बायकोचे अबोल संवाद...

वसंत दारूच्या अमलाखाली काहीतरी बरळत असताना, ते दारू प्यायलेले नाहीत असं नीलाने सांगणं, घरात लुटुपुटूचं विभाजन असूनसुद्धा खोबऱ्याच्या वड्या आणि गजऱ्याची देवाणघेवाण होणं, या दोन प्रसंगातून वसंत आणि नीला एकमेकांना किती छान समजतात, हे दिसतं. शाळिग्राम आणि कलश कसे मिळाले हे सांगत असताना एका क्षणासाठी नीला थांबते आणि सीमाला वसंतच्या हातात असलेला कलश धरायला मदत कर असं सांगते. या प्रसंगातून वसंत आणि नीला यांच्यातले अबोल संवाद प्रकर्षाने जाणवतात. हा प्रसंग संपूर्ण नाटकाचा हाय पॉईंट आहे असं मला वाटतं...

नाटकाच्या विनोदी प्रसंगांचं म्हणाल, तर सुधीर जोशी, अतुल परचुरे आणि शेखर फडके या तगड्या खेळाडूंनी ते प्रसंग सुरेख हाताळले आहेत. माझ्या मते आशा काळे आणि नीलम शिर्के या बाबतीत जरा कमी पडल्या...

थोडक्यात, पैसा आणि भावना दोन्हीही जरी समान असले, तरीही पैशापेक्षा भावना अधिक मौल्यवान, हे दाखवणारं हेमंत ऐदलाबादकर लिखित, "घर श्रीमंताचं" हे नाटक आवर्जून पहावं असंच आहे...

नाटकाची लिंक - https://youtube.com/watch?v=N-VOMqZcqyk&feature=share

@ अनिकेत परशुराम आपटे.

Friday, 19 November 2021

हम साथ साथ हैं - मला गावला तसा...

मंडळी, सूरज बरजातिया भाऊसाहेबांनी HAHKनंतर अजून एक फ्यामिली पिक्टुरे बनवला. तो होता, "हम साथ-साथ हैं..."

तर, रामकिशन (आलोक नाथ) नावाचा येक म्होट्टा मानूस असतोय. तेच्या पैल्या बायकोचा (आक्क्या शिणुमात पैली बायकोच दाखिवली न्हाय. तिचा सादा फोटू बी न्हाय... बहुत नाइंसाफी है...) पोरगा असतोय, येक हात्या विवेक (मोहनीश बहल). रामकिशनच्या दुज्जा बायकोला, ममताला (रीमा लागू... या शिणुमात लड़केवाली माय बनली. HAHKमंदी लड़कीवाली व्हती न्हवं...) तीन पोरं आसतीत, सरल मार्गी लाजरा प्रेम (आपला सल्लू भाय), लाडाकोडाची संगीता (नीलम कोठारी) आनी द्वाड, लेट उठ्या विनोद (क्रीना काकूचा न्हवरा ओ...). घरचा 'जावई माझा भला' आसतो हासतमुख आणंद ("तू तू मैं मैं"वाला म्हयेश टाकूर). येंच्या सोबत हायेत, ममताचा काला कोटवाला भाव आनी शिणुमातला मामा (अजित वाच्छानी, जो HAHKमंदी परोफेसर होता आन तेव्हा पन मामाच होता...) आनी नको तिथे विंग्रजी सांडनारी मामी (हिमानी शिवपुरी जिचे न्हवरा, धरम आनी काम तीनी पन बदलले...)

चला, ही हायेत घरची मंडली. आता भाईरच्या मंडलीमदे, एक आसतू हाटीलवाला पिरतम (साराभाईवाला इंदरवधन), रामकिशनचा धोतर फ्रँड, तेची पोरगी प्रीति (सोनाली बेंद्रे-बहल) जी थोडी डाक्टर पन हाय आनी प्रेमवर लाईन मारत हाय. प्रेम पन तिला लाईन देत आसतो. रामकिशनच्या रामपूर गावचे सक्के शेजारी, मौसीजी (शम्मी आँटी), तिचा पोरगा धरमराज (सदाशिव आमरापुरकर) आनी तेची पोर सपना (लोलो पकूर, आपलं ते क्रीस्मा पकूर). सपना आनी विनोद यांचा कायतरी जांगडगुत्ता आसतो बरं का. मग येक अनवर ("आऊ..." वाला शक्ति पकूर) आसतो जो विवेकचा फास्ट फ्रँड आसतो आनी शीक्रेटली सगल्यांसमोर रेहाना (हुमा खान) या ढोल्या शेक्रेटरीबायवर लाईक टाकत आसतो. आजून पन लोक्स हायेत, पर येक-दोन सीन करुशानी ते यग्झीट मारतात...

सगली कलावंत मंडली संपली येकदाची (किती ती गर्दी... त्यापेक्षा पंधरा डब्बा टरेन ल्हान आसल...) आता वलुया इश्टोरीकडं...

तर, विवेकचं लगीन, रामकिशनच्या बिझिनेस फ्रँड आदर्श बाबूच्या (राजीव वर्मा, आरं द्येवा, ह्यो रायलाच की...) पोरीशी, साधनाशी (तब्बू, म्येण हिरवीनच रायली की राव...) ठरतं. तिथून शिणुमा खरा सुरू होतो बगा. सगली कलाकार मंडली नाच-गानी करतात, उड्या मारतात, पिकनिला पन जातात. जालंच तर प्रेम-प्रीति आनी विनोद-सपना येंचा साकरपुडा म्हन्जी म्हराटीत वेंगेजम्येंट पन उरकतात. इथवर सगलं ठाक-ठिक बरं का. आता येतो कहानी में टविश्ट. त्यो आणंद बाबू असतोय का न्हाय, तेचा डुकधऱ्या थोरला भाव अनुराग (दिलीप धवन, "नुक्कड़"वाला गुरू ओ...) आयडियाची कल्पना करुनशान सगली इश्टेट बलकावतो. तेच्या बायकोला, ज्योतीला (शीला शर्मा) हे आवडत न्हाय. पर करनार काय ना बिचारी...

आणंद आनी संगीता घर सोडतात. हे बगुनशानी आगलाव्या धरमराज आनी ममताच्या घरफोड्या फ्रँड (कुनिकाताई, जयश्री टी ताई आनी कल्पनाताई अय्यर), हे चौगं ममताला घेराव घालून तिला भडकवतात. मग होतो 'ओम फट स्व:..' ममतेमदून चांगले विचार भाईर आन वाईट विचार आत. ममता हाट करून विवेक-साधनाला हाकलून देते. मग लय म्येलोडरामा. समदे रडत्यात, दुकी होत्यात. अनुरागच्या पोरासनी आलेला ताप सगल्यांच्या डोस्क्यातली हवा काडून टाकतो. साधना गाभन हून तीस पोर होतं, एक हात्या विवेकचा मोडका हात आचानक बरा होतो आनी सगलं आलबेल होतं. जे गानं श्टारटला लागलं त्येच गानं शेवटमदी वाजतं आनी स्माईल प्लीजवर शिणुमा सरतो...

मस्त मस्त गानी, छान छान नाचनी, ग्वाड ग्वाड डायलाग, पर तरी सवाल माझा ऐका...

पैला सवाल - संगीता सांगते, की आणंदने शिंप्यासमोर उबं ऱ्हाऊन सूट शिवून घ्येतला हाय. सादं प्यांट-शरट शिवायचं तर यक-दोन दिस लागत्यात, आनी हितं तर आखंड सूट हाय. त्यो शिवाया दोन दिस तरी ग्येलं आसल... मंग आणंद बाबूने दात कुटं घासलं आसंल, हागनदारीमुक्त कुटं जाला आसंल त्यो आनी शिवशंभो कुटं क्येलं आसंल...???

दुज्जा सवाल - साधनाबायला फ्यामिलीची वलक करून देताना पिरतम आनी आणंदबाबू दोगं पन श्टेजवर येतात. पर पिरतम यकलाच बोलत सुटतो. मंग आणंद बाबूला का पिरतमचा बाडीगारड म्हनून बोलावल्यानीत...???

तिज्जा सवाल - रामकिशन कंटुपरवर कायतरी टायपत आसतो. पन जेव्हा स्कीरीन दाखिवतात तेव्हा काय पन नसतं. मग काय आदृश होनाऱ्या फांटाने तेनी टाईपलं...??? बरं, तेचं बोलनं आनी टाईपनं यकाच लयीमदी आसतं. हे कस्स्काय...???

चवथा सवाल - तो मोर आपली पिसं फुलवून 'म्यौ म्यौ...' करतो तेव्हा सगले तेच्या यका हाकेत तेच्याकडं वर बगतात. मग विनोदला यकट्यालाच तो मोर कसा न्हाय दिसत...???

हे सवाल पडले खरे, पर पिक्टुरे आक्शी भारी राव. मोट्टे मोट्टे सेट्स आनी छान छान कापडं यकदम ब्येश...

@ अनिकेत परशुराम आपटे.

Wednesday, 17 November 2021

करन असलेला अजय आणि अर्जून असलेला विजय...

मंडळी पुनर्जनम म्हणजे मराठी re-incarnation, यावर अनेक शिणुमे बनले. त्यातलाच येक म्हन्जी "क"च्या बाराखडीतला, "करन-अर्जून..."

एक आटपाट नगर असतंय. तिथे दुर्जनसिंह (पुरींचा अमरीश) नावाचा राक्षस असतोय. इश्टेटीसाठी दुर्जनसिंह दुर्गाच्या (गुल्ज़ारांची राखी) दोन्ही कार्ट्यांना म्हणजे करनला (खानांचा सलमान) आणि अर्जूनला (खानांचा शाह रुख) मारून टाकतोय. पण करन आणि अर्जूनने रिटर्न तिकीट काढलेलं असतंय. त्यांचं बुकिंग अजय आणि विजय या नावाने झालेलं असतंय...

करन-अर्जून हाणामारीच्या बाबतीत कंडम पण अजय-विजय मात्र लय पावरबाज. वाट्टेल तेव्हा तंगड्या उडवत जाम भारी मारामारी करत असतात. तिथे गावात, ग्रामोफोनची पिन जशी अडकते, तशी दुर्गाबाईची सुई, "मेरे करन-अर्जून आएँगे..." या वाक्यावर अडकलेली असते. एक दिवस अजय-विजयचं कातडं पांघरलेले करन-अर्जून गावात येतात आणि दुर्जनसिंहची हवा टाईट होते. शेवटी लय भन्नाट हाणामारी होते आणि अजय झालेल्या करनकडून व विजय झालेल्या अर्जूनकडून दुर्जनकाका गोळ्या खाऊन टपकून जातात...

चला पिच्चर संपला. आता पिच्चरचे चारेक्टर...

दुर्जनसिंह...

हा प्राणी आक्क्या पिच्चरमध्ये म्हातारा होत नाही. करन-अर्जूनला मारतानाही त्याच्या मिशा आणि केस काळे असतात. आणि अजय-विजयकडून मार खाऊन मरतानाही ते काळेच असतात. बहुतेक दुर्जनकाका गोद्रेज हेयर डाय लावत असावेत...

दुर्गादेवी...

या काकूचं नक्की वय काय असावं... म्हणजे करन-अर्जून मरतात तेव्हा ही काकू शीनियरमंडळीत जमा होण्याच्या मार्गावर असते. जवळ-जवळ २०-२२ वर्षांनी रिटर्नच्या पासावर अजय-विजय परत येतात. तेव्हा या काकू खरंतर सुरकुतलेल्या थोबाडाच्या आजी दिसायला हव्यात. पण त्यांचं वय थोडंसंच वाढलेलं वाटतं. एकतर त्यांचा बालविवाह झाला असावा किंवा त्यांचा सीन नसेल तेव्हा त्या फेयर एँड लव्हली किंवा संतूर वापरत असाव्यात...

विजय किंवा अर्जूनची स्मरणशक्ती दाखवणारा चुड़ीवाला...

आपण एखाद्या दुकानदाराकडून एखादी गोष्ट विकत घेतल्यावर त्या दुकानदाराचा चेहेरा आपल्या लक्षात राहील न राहील. पण इथे अर्जून ज्या चुड़ीवाल्या चाचाकडून चुड़ियाँ विकत घेतो, २०-२२ वर्षांनंतरही त्या चाचाला बरोब्बर ओळखतो. हा विजय बहुदा बदाम खात मोठा झाला असावा...

या तीन चारेक्टरशिवाय मुनीमजी नावाचं येक चारेक्टर आहे जे दोन रुपयांचा हफ्ता मागत असतं आणि करन-अर्जून त्याला शेंडी लावतात. ते चारेक्टर त्या शेंडीमुळे बहुदा इतकं शरमलं, की तलावातल्या त्या चुल्लूभर पाण्यातच लपून राहिलं असावं. कारण नंतर ते परत आलंच नाही...

फिल्लममधल्या हिरवीनपैकी कुलकर्णींच्या ममताला जास्तच फुटेज मिळालं बरं का... म्हणजे, "इक मुंड़ा मेरी उम्र का..." या रोमांचिक गाण्यात हिरूसमोर, "भंगड़ा पा ले..." या फ्यामिली गाण्यात सासूसमोर, "गुपचूप गुपचूप गुपचूप गुपचूप..." या आयटम गाण्यात सावत्र चुलत सासरा व व्हिलनसोबत आणि "जय माँ काली..." या भक्ती गाण्यात दुज्जा हिरवीनसोबत नाचण्याचा चानस मिळाला. हे पाहून देवगणांच्या काजोलला किती वाईट वाटलं असेल ना...

माझ्या काही शंका पण आहेत बरं का...

वीस-बावीस वर्षात एखाद्या जागेत, तिथल्या गल्ल्यांमध्ये थोडेफार फरक होतात. करन-अर्जून जेव्हा बागडतात तेव्हाची घरं, घरांवरची कौलं, फुलबाग, भिंतींमधून दिसणाऱ्या विटा, हे सगळं जसंच्या तसं विजयला कस्स्काय दिसतं बौ...

सोनियाला दुर्जनसिंह काका आणि त्यांचा व्हॉट ए जोकवाला पोरगा, जबरदस्तीने किंड्याप करून हवेलीवर नेतात. तेव्हा सोनिया रस्ते पाहत नाही. हवेलीतून सटकल्यावर ती डायरेक्ट विजयकडे कशी काय येते... शीक्रेटली गूगल म्याप तर नाही ना चालवलं...

"जय माँ... काली..." या भक्तीगीताच्या यंडिंगला दुर्जनकाकांला करन-अर्जून दिसतात आणि त्याचवेळी सक्सेनाला अजय-विजय दिसतात... येकाच वेली दोन मानसं आनी कापडं पन चेंजली... डोस्क्यावरून ग्येलं बौ...

हे दोन्ही खान भाऊ येकत्र येण्याची पण येक मजा आहे बरं का...  आदी ह्यो शिणुमा राहुलवाला खानांचा शाह रुख आणि सिंघमवाला देवगणांचा अजय करणार होता. पण अजयला करायचा होता अर्जून (बायको सोबत रोमांचिक गाणं मिळालं असतं ना...) आणि शाह रुखला करायचा होता करन (का म्हणजे... आहो ममता ताई होती ना करनची हिरवीन... ) पण आपला हृतिकचा पप्पू लय हुशार बगा. त्याने शक्कल लढवली आणि खान भाऊसाहेबांची वर्णी लागली... (कोणाला सांगू नका बरं... नायतर तो सिंघम आणि मैं हूँ ना... दोघं पण धोपटतील मला...)

तर, बाकी काही असो, पण या शिणुमाच्या आशिटण असलेल्या पडद्याबाहेरच्या क्रिशच्या पडद्याबाहेरच्या वडूंनी भारीच पिच्चर बनवल्यानीत... नाही का...

@ अनिकेत परशुराम आपटे.

Monday, 15 November 2021

हम आपके हैं कौन...!! - पात्र ओळख नी काही शंका...

"लग्नाची व्हिडियो काशेट..." अशी ज्या शिणुमाची ओळक होती किंवा आहे, तो पिच्चर म्हन्जे "हम आपके है कौन..!!"

एक मोठ्ठा बंगला. एक कुँवारा काका कैलाशनाथ (अलोक नाथ); दोन पुतणे, ऑफिसिया राजेश (मोहनीश बहल) आणि आगामी ऑफिसिया प्रेम (सलमान खान). थोडे आगाऊ पण घरचे बेटा-बेटी असलेले घरचे नोकर लल्लू प्रसाद (लक्ष्मीकांत बेर्डे) व चमेली (प्रिया बेर्डे). यांसोबत चार पायांचा केसाळ भुबड्या टफी. ही आहेत घरातली मंडळी. नातेवाईकांमध्ये मामाजी (अजित वाच्छानी), मामीजी (बिंदू) आणि मामीजीच्या बहिणीची मुलगी रीटा (साहिला चड्ढा). फ्रँड लिस्टमध्ये दिल का डॉक्टर सिंघल (सतीश शाह) आणि बच्चों की डॉक्टर रज़िया (हिमानी शिवपुरी). ही झाली मुलाकडली मंडळी...

दुसरा मोठा बंगला. प्रोफेसर सिद्धांत चौधरी (अनुपम खेर), त्यांची पत्नी मधुकला (रीमा लागू), साधी सरळ पूजा (रेणुका शहाणे-राणा) आणि नटखट निशा (माधुरी दिक्षीत-नेने). ही आपोझिट पार्टी. त्यांचा नातेवाईक म्हणजे मधुकलाचा भाचा, शकुंतला शोधक भोला प्रसाद (दिलीप जोशी). इथे नो फ्रँड लिश्ट. हा शॉर्ट बट स्वीट परिवार म्हणजे लड़कीवाले. हुश्श... झाली यकदाची ओळख परेड...

ऑफिसिया राजेशचं लग्न साध्या सरळ पूजाशी ठरतं आणि लग्नाच्या काशेटला जी सुरुवात होते ती थेट दि यंडची पाटी येईपर्यंत. या काशेटमंदी कैलाशनाथचे दोन्हीही दिवटे आणि सिद्धांत चौधरीच्या दोन्ही कार्ट्या बोहल्यावर चढून घेतात. झालंच तर आपल्यासोबत लल्लू प्रसाद-चमेली आणि भोला प्रसाद-रीटा या जोडगोळ्यांनाही लगीन सपन दाखवतात...

गानी... जाम भारी...
मूझिक... लई भारी...
याक्टिंग... यकदम भारी...
आता माझ्या शंकांची बारी...

स्थळ - लग्नघर, दुसरा मोठा बंगला. करवली म्हणून नटलेली निशा इकडे-तिकडे बागडताना दिसते. मी आजवर जितकी लग्न अटेंड केली, त्यानुसार करवलीला, म्हणजे मुलाच्या किंवा मुलीच्या बहिणीला मोप कामं असत्यात. आनी हितं ही बया, म्हन्जी निशाबाई हो... कोड्रिक्सचे घोट घेत टेबल खाली आरामात पसरलेली असते... काय म्हनावं या करवली बायला...!!!

स्थळ - पहिला मोठा बंगला. "धिकताना धिकताना..." गाणं सुरू असतं. ऑफिसिया राजेश ब्याग पकडून खोलीत येतो. बच्चों की डॉक्टर रज़िया सांगते, "तुझी बायडी पोटूशी हाय..." मी काय म्हनतो, तो राजेश यवडा सुजान नागरिक, पर तेला आदी कसं कललं न्हाय याबद्दल...!!!

स्थळ - दुसरा बंगला. सिद्धांत चौधरी मधुकलाशी राजेश आणि निशाच्या लग्नाविषयी बोलत असतात. निशाचं लग्न... यवडंच काय ती निशा ऐकते आनी समजातल्या गैरामुळे ती आनंदते. डायरेक्ट लग्नाच्या आदल्या दिवशी हातात आलेल्या पत्रिकेमुळे निशाला समजतं, की प्रेम स्टेशनपर जानेवाली गाड़ी अब राजेश स्टेशपर रुकेगी... नाही म्हणजे जिचं लगीन हाय, तिला म्हाईतच न्हाय तिचा दादला कोन...!!!

स्थळ - हास्पिटल. राजेशची बायडी बाळतीन होऊन तीच पोरगा होतो. आनी हे सांगायला अखंड डाक्टर ओ.टी.भाईर येतो. हे तर काय बी न्हाय... खुश झालेला प्रेम काका त्या डाक्टरला टेबलवर उभी करतो, लिबर्टीवाल्या पुतळ्यासारखी... हे कस्काय...!!!

प्रसंग - "माये नि माये...", "दीदी तेरा देवर दिवाना..." ही गाणी, ज्यात प्रेमचं निशासोबत नाचणं; पासिंग द पार्सल हा खेळ, ज्यात निशाचं प्रेमजवळ बसणं, त्याच्या पायाला गुदगुल्या करणं, प्रेमचं निशाची वेणी ओढणं; हॉस्पिटलमध्ये प्रेमचं निशाला अभिंनदन करणं, या सगळ्यातून प्रेम आणि निशामध्ये कुछ तो गडबड़ है दया हे शेंबडं पोर देखील ओळखेल. पण टफीने चुकीच्या पत्त्यावर कुरियर केलेल्या निशाच्या पत्राला वाचून सर्वांला दे धक्का काहून बसतो...!!!

ते सर्व काय पन असो...

दिल की धड़कन माधुरीचा "हम आपके हैं कौन..!!" सुप्परच भारी होता राव...

@ अनिकेत परशुराम आपटे.

Monday, 8 November 2021

देर से आया फल पर...

सुमारे दीडेक वर्ष ज्या चित्रपटाची आतूरतेने वाट पाहिली, तो शेट्टी पोलीस फॅक्टरीतला "सूर्यवंशी" पाहण्याची अखेर संधी मिळाली...

कथा गुंतागुंतीची, पण तरीही सरळसोट. एका प्रचंड मोठ्या अतिरेकी हल्ल्याचा पडदाफाश करण्यासाठी डी.सी.पी. वीर सूर्यवंशी (अक्षय कुमार) कंबर कसतो. सगळे धागेदोरे खणून काढत सूर्यवंशी अखेर तो हल्ला नाकाम करतो...

शेट्टी पोलीस फॅक्टरीच्या आधीच्या चित्रपटांत, नायिका नायकांना पाठिंबा देताना, त्याची हिम्मत वाढवताना दिसतात. पण या चित्रपटात मात्र नायिका अनेक प्रसंगात नायकाच्या कामात अडथळे आणताना दिसते. चित्रपटातली गाणी फार काही श्रवणीय नाहीत, पण त्यातल्या त्यात 'हम हिंदुस्तानी...' हे गाणं थोडं प्रभावशाली वाटतं. अर्थात, गाणं न वापरताही प्रसंग अधिक खुलवता आला असता असं मला वाटतं...

शेट्टी पोलीस फॅक्टरीच्या दोन नेहमीच्या गोष्टी याही चित्रपटात दिसल्या. पहिली गोष्ट म्हणजे नायकाला दिलेली एखादी विशिष्ठ खूण. "सिंघम"मध्ये, "आता माझी सटकली..." हा संवाद होता, तर "सिम्बा"मध्ये, "जे मला माहित नाही ते सांगा..." हा संवाद होता. या वेळी नायकाला ठेवणीतला संवाद न देता, नावात बदल करून ती नावं उच्चारण्याची लकब दिली गेली होती. यामुळेच चित्रपटाच्या गंभीर स्वरूपाला विनोदी टच मिळत गेला...

या चित्रपटातली शेट्टी स्पेशल दुसरी गोष्ट म्हणजे, पुढे येणाऱ्या चित्रपटाची नांदी. "सिम्बा"मध्ये "सूर्यवंशी" या चित्रपटाची छोटीशी झलक पहायला मिळाली होती. तसंच याही वेळी ओमर हाफिज़ (जॅकी श्रॉफ) आणि सिंघम (अजय देवगण) यांच्यात चित्रपटाच्या अगदी शेवटी होणाऱ्या एका संवादामुळे, शेट्टी पोलीस फक्टरीचा पुढचा चित्रपट काय असू शकेल याचा अंदाज येतो...

चित्रपटातल्या पाहुण्या कलावंतांबद्दल काय बोलणार... कटाचा मुख्य सूत्रधार म्हणून जॅकी श्रॉफला दाखवलं गेलं. त्या ऐवजी चेहेरा न दाखवता फक्त संवाद ऐकवले असते किंवा हालचाली दाखवल्या असत्या, तर एक छान गूढ निर्माण झालं असतं ज्याचा वापर पुढच्या चित्रपटात करता आला असता. रणबीर सिंहची एंट्री कथेच्या दृष्टीने ठिक होती, पण अजय देवगणच्या एंट्रीचं कारण स्पष्ट केलेलं दिसत नाही...

चित्रपटाच्या तीन जमेच्या बाजू आहेत. पहिली म्हणजे तब्बल सोळा वर्षांनी अक्षय कुमार आणि अजय देवगण या दोन ऍक्शन हिरोंना पडद्यावर एकत्र पाहणे. २००५ साली प्रदर्शित झालेल्या "इंसान" या चित्रपटात दोघं शेवटचे दिसले होते. त्यानंतर आज "सूर्यवंशी"च्या निमित्ताने पुन्हा हे दोघं एकत्र पहायला मिळाले. चित्रपटाची दुसरी जमेची बाजू म्हणजे चित्रपटाचं पार्श्व संगीत. वेगवान साहसकथेला न्याय देणारं तितकंच दमदार पार्श्वसंगीत ऐकताना छान वाटतं...

चित्रपटाची तिसरी आणि सर्वात महत्वाची जमेची बाजू म्हणजे चित्रपटातली हाणामारी व साहसदृश्य. वेगवान हाणामारी आणि जबरदस्त साहसदृश्य पाहताना डोळ्यांचं पारणं फिटतं अगदी. चित्रपटाच्या शेवटी येणारी हाणामारी तर कमाल रंगली आहे. या चित्रपटामुळे बऱ्याच काळानंतर जुना अक्षय कुमार पहायला मिळाला. त्या किक्स, ते पंचेस, "सबसे बड़ा खिलाड़ी", "खिलाड़ियों का खिलाड़ी", अशा काही चित्रपटांमधून तुकड्या तुकड्याने घेतलेली ती भन्नाट साहसदृष्ये पडद्यावर पाहताना मजा आली...

एकंदरीत, सब्र का फल हमेशा मीठा होता है असं नाही. कधीकधी ते फळ बाहेरून मस्त आणि आतून नीरसही असू शकतं याचं उदाहरण म्हणजे हा चित्रपट. पण तर्कशास्त्र म्हणजे मराठीत लॉजिक, या गोष्टीला बगल देऊन चित्रपट पहायचा असेल तर शेट्टी पोलीस फॅक्टरीचा रोहित शेट्टी दिग्दर्शित, "सूर्यवंशी" नक्की पहावा...

@ अनिकेत परशुराम आपटे.