Saturday, 31 October 2020

वेगळा पण हवाहवासा राजा...

"एक झोका एक झोका... चुके काळजाचा ठोका एक झोका..." आशाताईंच्या सुमधूर स्वरांनी सजलेलं हे अजरामर गीत आहे अस्मिता चित्र निर्मित, "चौकट राजा" या चित्रपटातलं...


मराठी चित्रपटसृष्टीत एक काळ असा होता जेव्हा डॅशिंग हिरो अजिंक्य देव किंवा रमेश भाटकर, विनोदवीर अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर किंवा प्रशांत दामले, या मंडळींचे चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत होते. अशा वेळी निर्माती स्मिता तळवलकर यांनी "चौकट राजा" हा संवेदनशील चित्रपट प्रेक्षकांसमोर आणत एक धाडसी पण यशस्वी पाऊल उचलंलं...

शरीराने वाढूनही बुद्धीने खुंटलेला मतिमंद नंदू (दिलीप प्रभावळकर) त्याच्या आईसोबत म्हणजे दुर्गामावशीसोबत (सुलभा देशपांडे) राहतो. नंदूची बालमैत्रिण मुन्नी, मीनल (स्मिता तळवलकर) म्हणून त्याच्या आयुष्यात येते. दोघांना एकमेकांची ओळख पटते आणि भेटी वाढू लागतात. मीनलच्या नवऱ्याला म्हणजे राजनला (दिलीप कुलकर्णी) हे मान्य नसतं. त्याच्या इच्छेखातर मीनल नंदूला मानसोपचार केंद्रात दाखल करते. या धक्क्याने दुर्गामावशी प्राण सोडते. मीनलसाठी केंद्रातून पळालेला नंदू घरी येतो तेव्हा त्याला आईची बातमी समजते. पोरका झालेला नंदू मीनलकडे आसऱ्यासाठी जातो पण राजन त्याला झिडकारून हाकलून देतात. अखेर राजनला त्याची चूक समजते आणि तो नंदूला दत्तक घेतो...

काळजाला चटका लावणाऱ्या या कथेच्या जोडीला होती स्मिता तळवलकर, दिलीप कुलकर्णी, सुलभा दशपांडे आणि अशोक सराफ यांची सहज सुंदर अदाकारी. पण कथेवर सुवर्णकळस चढवला तो दिलीप प्रभावळकरांच्या सशक्त आणि दमदार अभिनयाने...
१. आपल्या मुलीची बाहुली परत मिळवण्यासाठी मीनल नंदूला चपराक देते तेव्हाचा नंदू...
२. मुन्नी आणि नंदू बोलत असताना त्याच्या मनातल्या पुरुषी भावना उचंबळून तो मीनलला मीठी मारतो तेव्हाचा नंदू...
३. आई देवाघरी गेल्याचं समजल्यावर बिछान्यात पांघरूणाच्या आत रडत बसलेला नंदू...
एकही संवाद न वापरता निव्वळ डोळे आणि चेहेऱ्यावरचे भाव, यांचा वापर करून दिलीपभैय्यांनी ही दृष्य अप्रतीम वठवली...

स्मिताताईंनी उचललेलं हे शिवधनुष्य दिलीपभैय्यांनी त्यांच्या अभिनयसामर्थ्यावर लिलया पेलून धरलं. चित्रपट पाहताना, तो जरा मोठा झाला किंवा लवकर का नाही संपला, हे आपल्याला कुठेही जाणवत नाही. उलट दिलीप प्रभावळकरांच्या अदाकारीचा हा दिवा तेवतच रहावा हेच वाटतं. चित्रपटात मोजकी तीन गाणी आहेत पण ती सादर होत असताना, एखादं गाणं चित्रपटात का आहे... असा साधा विचारही मनात येत नाही. प्रत्येक गाणं काही ना काहीतरी सांगत कथेला पुढेच नेत राहतं...

एकंदरीत, संवेदनशील पण सशक्त कथा असलेल्या या वेगळ्या पण हव्याहव्याशा वाटणाऱ्या "चौकट राजा"ने पत्त्यातील चौकट राजाप्रमाणेच चित्रपटसृष्टीवर आपला वेगळा ठसा उमटवला...

@ अनिकेत परशुराम आपटे.

Monday, 26 October 2020

गोंधळलेला "फॉक्स"...

एखादा गुन्हा घडल्यावर काळा कोट परिधान करून खटला चालवणारा एखादा वकीलच जेव्हा स्वत:च एखाद्या गुन्ह्यात अडकतो तेव्हा... हाच गाभा आहे २००९ साली प्रदर्शित झालेल्या दिपक तिजोरी दिग्दर्शित, "फॉक्स" या चित्रपटाचा...

अर्जून कपूर (अर्जून रामपाल) एक नामांकित वकील असतो. रग्गड पैसा घेऊन गुन्हेगारांना कायद्याच्या कचाट्यातून सहीसलामत बाहेर काढणे, यात त्याचा हातखंडा असतो. अशाच एका खटल्याच्या वेळी अर्जूनला आपल्या कृत्यांचा पश्चात्ताप होतो आणि विकीलीपासून सन्यास घेऊन, आपल्या प्रेयसीचा ऊर्वशी माथूरचा (सागरिका गाटगे) निरोप घेत तो गोव्याला निघून जातो...

गोव्याला अर्जून एका लेखकाला भेटतो ज्याला एक पुस्तक प्रकाशित करायचं असतं. त्या माणसाच्या मृत्यूनंतर त्याची इच्छा म्हणून सोफिया (उदिता गोस्वामी) नावाच्या एका प्रकाशकाकरवी अर्जून ते पुस्तक प्रकाशित करतो. पुस्तकाला त्या माणसाऐवजी आपलं नाव मिळालं हे अर्जूनला आवडत नाही पण पुस्तकाला मिळणारी प्रसिद्धी पाहून तो गप्प बसतो. पुस्तकाची एक प्रत गोव्याच्या ए.सी.पी. यशवंत देशमुख (सन्नी देवल) याच्या हाती लागते आणि कथेला वेगळीच कलाटणी मिळते...

पुस्तकाच्या आधारे, बंद झालेल्या पाच खुनाच्या अनुत्तरीत खटल्यांच्या फाइली यशवंत पुन्हा उघडतो आणि पुस्तकाच्या लेखकाला म्हणजेच अर्जूनला पाच खुनांच्या आरोपात अटक करतो. तिथून स्वत:ला वाचवण्यासाठी अर्जून जिवाचा आटापिटा करतो आणि यशवंत हर तर्हेने त्याची मदत करतो. अखेर खरा खुनी समोर येतो आणि अर्जून निर्दोष सुटतो...

मर्डर मिस्ट्री असूनही कथानक उत्कंठा वाढवते आहे, खुर्चीला खिळवून ठेवत आहे असं कुठेही वाटलं नाही. उलट काही बाबतीत कथानक थोडंसं कमकुवतच जाणवतं. प्रकाशन संस्थेची मालकीण एक तरूण मुलगी दाखवली गेली तेव्हा कथेत काही वळणं अपेक्षित होती. पण तसं काहीच दाखवलं गेलं नाही. नफ्यामागे धावणारा प्रकाशकच जर दाखवायचा होता तर कोणताही कलावंत चालून गेला असता. कथानक गंभीर होतं खरं पण तरीही सर्व मुख्य कलावंतांच्या चेहेऱ्यावर प्रत्येक वेळी एकच भाव दिसतो...

चित्रपटातलं एकमेव हाणामारीचं दृष्य आणि चित्रपटातली गाणी यथातथाच आहेत म्हणा पण चित्रपटातलं पाठलागाचं साहसदृष्य बऱ्यापैकी रंगलं आहे. चित्रपटातली एक चांगली गोष्ट म्हणजे अभिनेते सन्नी देवल यांना मिळालेली त्यांच्या आजवरच्या भूमिकांपेक्षा वेगळी आणि जरा हटके असलेली भूमिका. बाकी चित्रपटाला वेग नाही पण चित्रपटाची शेवटची दहा मिनिटं बऱ्यापैकी गती राखतात...

पाच खुनांच्या आरोपात अटक झालेल्या अर्जूनला सहजासहजी पाच दिवसांच्या जामिनावर सोडलं जातं आणि त्याची जबाबदारी एकट्या यशवंतवर सोपवली जाते. एका ए.सी.पी.च्या घराबाहेर कोणीच पहारेकरी नसतो आणि हातून वाळू निसटावी तसा अर्जून तिथून निसटून जातो. आरोपी पळाल्याचा गवगवाही होत नाही आणि यशवंतच्या चेहेऱ्यावर तसा लवलेशही दिसत नाही, कथानकाचे हे कच्चे दुवे कथेला अगदीच मागे खेचतात...

एकंदरीत, जराशी गोंधळलेली आणि सन्नी देवलच्या भूमिकेचा वेगळा टच दाखवणारी गूढकथा असलेला दिपक तिजोरी लिखित-दिग्दर्शित, "फॉक्स" हा चित्रपट वन टाईम वॉच याच पठडीत मोडणारा आहे...

@ अनिकेत परशुराम आपटे.

Thursday, 15 October 2020

तेच दृष्य वेगळा परिणाम...

नसीरुद्दीन शाह, दीप्ती नवल, फ़ारुख़ शेख़ अभिनीत "कथा" हा चित्रपट सर्वांनाच माहित असेल. कुठलाही भपकारा न वापरता सहज सुंदर अदाकारी आणि चपखल कथानक या जोरावर "कथा" हा चित्रपट यशस्वी झाला. या चित्रपटातली तीन दृष्य अशी होती, जी चित्रपटात एकाहून अधिक वेळा आली आणि प्रत्येक वेळी त्या दृष्यांचा शेवट व परिणाम वेगळे होते. शिवाय ती दृष्य साकारणाऱ्या कलावंतांपैकी काहींच्या भूमिकाही वेगळ्या होत्या...

नवविवाहित दांपत्याचे दाराआडचे संवाद...


हे दृष्य चित्रपटात तीन वेळा येतं. पहिल्यांदा, राजाराम घराकडे जाताना एका खोलीच्या आडून नवविवाहित बिऱ्हाडकरूंचे संवाद त्याच्या कानी पडतात. तिथे अविवाहित राजारामच्या चेहेऱ्यावर कुतुहलाचे भाव दिसतात. दुसऱ्यांदा, राजाराम दूध मागायला बाहेर पडतो तेव्हा त्याला त्याच खोलीतून तेच संवाद ऐकू येतात. यात, त्या बिऱ्हाडकरूमधल्या नवऱ्याकडे संवादांमधलं वर्चस्व दिलं गेलं आहे...

हे दुसरं दृष्य recreate होऊन चित्रपटाच्या अगदी शेवटी शेवटी येतं. इथे तो पुरूष बिऱ्हाडकरू दूध मागायला येतो तर राजाराम आणि संध्या खोलीत असतात. तिथे त्या विवाहित बिऱ्हाडकरूच्या चेहेऱ्यावर, "काही काळापूर्वी आपणही असेच होतो..." हे भाव असतात. शिवाय संवादातील वर्चस्व संध्याकडे असल्याचंही ऐकवलं गेलं आहे...

राजारामचं वाईचं दिवास्वप्न...

चित्रपटाच्या पहिल्या १५-२० मिनिटात येणारं हे दृष्य, राजाराम पाहत असलेलं दिवास्वप्न दाखवतं. यात वाईला राहत असलेल्या राजारामच्या आई-वडिलांना राजारामची तार मिळते. तारेत आनंददायी मजकूर असतो. शिवाय तीनशे रुपयांची मनीऑर्डरही सोबत असते. त्या पैशात नवं वासरू विकत घेण्याच्या गोष्टी करत असलेल्या आई-वडिलांना स्वप्नात पाहून राजारामच्या चेहेऱ्यावर समाधानी भाव असतात...

हेच दृष्य recreate होऊन चित्रपटाच्या उत्तरार्धात प्रत्यक्षात उतरतं. त्यावेळी खरोखरच राजारामची तार वाईला पोहोचते आणि त्यात राजारामने तीनशे रुपये मागवलेले असतात. राजारामची मागणी पूर्ण करण्यासाठी त्याच्या आई-वडिलांना त्यांच्याकडे असलेलं वासरू विकावं लागतं. मनीऑर्डर स्वीकारताना आपल्याच आई-वडिलांना त्रास दिल्याचे अपराधी भाव राजारामच्या चेहेऱ्यावर स्पष्ट दिसतात...

राजारामचं संध्याबद्दलचं दिवास्वप्न...

हे दृष्यदेखील चित्रपटात तीन वेळा येतं. पहिल्यांदा राजाराम दिवास्वप्न पाहत असतो तेव्हा तो स्वत:ला वेगळ्याच आत्मविश्वासपूर्ण रूपात बघतो. हा वेगळा राजाराम, समोशांची स्तूती करणाऱ्या संध्यालाच चहा बनवायला सांगतो. हे दिवास्वप्न अर्धवट राहतं आणि हे दृष्य लगेचंच खरं होतं. संध्या पुन्हा तशीच समोशांची स्तूती करते आणि चहाची मागणी करते. त्यावेळी राजाराम तडक उठतो आणि चहा करायला धावतो. दोन्ही दृष्यात आपली आवडती व्यक्ती आपल्या जवळ असल्याचा आनंद राजारामच्या चेहेऱ्यावर दिसतो...

ते दिवास्वप्न recreate होऊन खरोखरचं समोर येतं ते चित्रपटाच्या शेवटच्या २०-२५ मिनिटात. त्यावेळी समोशाच्या जागी चकली असते आणि राजारामची जागा बाशू घेतो. त्या दृष्यात राजाराम बघ्याची भूमिका निभावत असतो आणि काहीतरी गमावल्याचा भाव त्याच्या चेहेऱ्यावर दिसतो...

कथेत वेगवेगळ्या वेळी येणारी चित्रपटातली ही दृष्य, राजारामची सहनशीलता आणि काही ठिकाणी त्याचा कमी पडणारा आत्मविश्वास, यांचं दर्शन घडवतात. राजाराम पाहत असलेली दिवास्वप्न जेव्हा प्रत्यक्षात उतरतात तेव्हा ती त्याच्या मनावर आघात करणारी त्याच्या दृष्टीने नकारात्मक अशी दृष्य होऊन बसतात. पण दाराआडच्या संवादांचं recreated दृष्य, राजारामच्या सुखाची नांदी दर्शवतं आणि त्याच सकारात्मकतेत राजारामच्या या कथेचा शेवटही होतो आणि सुरुवातही होते...

@ अनिकेत परशुराम आपटे.

Monday, 12 October 2020

उमा ते रमा...

"चांदणं चाहूल होती...... झुले ऊंच माझा झोका..." जान्हवी प्रभू अरोरा यांच्या सुरेल स्वरातलं, "ऊंच माझा झोका" या मालिकेचं हे शीर्षक गीत ऐकलं की एकच चेहेरा समोर येतो. तो चेहेरा आहे प्रसिद्ध अभिनेत्री स्पृहा जोशी यांचा...


झी मराठीवर प्रसारित झालेल्या, "दे धमाल" या मालिकेतून आणि २००४ साली प्रदर्शित झालेल्या, "माय-बाप" या चित्रपटामधून एक बालकलावंत म्हणून स्पृहा जोशी यांनी पदार्पण केलं. त्यानंतर आपलं शिक्षण पूर्ण करण्यासाठी अभिनय क्षेत्रापासून काही काळ त्या दुरावल्या खऱ्या पण, रुह्या कॉलेजमध्ये असताना, "गमभन", "एक और मय्यत", "एक अशी व्यक्ती", "अनन्या" अशा महाविद्यालयीन नाटकांमधून काम करताना त्यांचा अभिनय बहरत गेला...

२००८-०९ दरम्यान प्रसारित झालेल्या, "अग्निहोत्र" या मालिकेत, 'ऍड. उमा बंड' ही व्यक्तिरेखा साकारत स्पृहा जोशी यांनी दणक्यात पुनरागमन केलं. पुढे, "एका लग्नाची दुसरी गोष्ट", "एका लग्नाची तिसरी गोष्ट", "प्रेम हे" आणि अलिकडच्या, "रंगबाज़ फिरसे" या मालिकांमधून झळकत त्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या. या सर्व मालिकांच्या पलिकडे, स्पृहा जोशी यांच्यासाठी मैलाचा खडक ठरली, ती "ऊंच माझा झोका" या मालिकेत त्यांनी साकारलेली 'रमाबाई रानडे' ही मध्यवर्ती भूमिका. त्या व्यक्तिरेखेने स्पृहा जोशींना जणू पंखच मिळाले आणि त्यांच्या प्रसिद्धीचा झोका अधिकच ऊंच गेला...

मालिकांसोबतच, "मोरया", "लॉस्ट अँड फाऊंड", "विकी वेलिंगकर", "होम स्वीट होम", "अ पेईंग गोस्ट" अशा काही चित्रपटांमधून विविध भूमिका साकारत त्या रुपेरी पडद्यावरही झळकल्या. रुपेरी पडद्यासोबतच, "लहानपण देगा देवा", "नांदी", "डोंट वरी बी हॅपी", "नेटक" अशा नाटकांमधल्या आपल्या भूमिकांनी स्पृहा जोशी यांनी नाट्यवेड्या रसिकप्रेक्षकांनाही आपलंसं केलं. "सूर नवा ध्यास नवा" या कार्यक्रमाद्वारे स्पृहा जोशी छोट्या पडद्यावर एका वेगळ्याच भूमिकेत दिसल्या. ती भूमिका होती सूत्रसंचालकाची...

एक उत्तम अभिनेत्री म्हणून प्रसिद्धी मिळवत असताना, एक लेखिका, कवयित्री आणि गीतकार म्हणून स्पृहा जोशी यांनी आपला एक वेगळा चाहतावर्ग निर्माण केला. आज स्पृहा जोशी यांचा वाढदिवस. 'उमा ते रमा' या प्रवासातून आणि त्यानंतरही मिळालेली प्रसिद्धी, शिवाय 'लोपामुद्रा'द्वारे मिळालेली लोकप्रियता, इतकं सगळं असतानाही जमिनीवर असणाऱ्या स्पृहा जोशींना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा...

@ अनिकेत परशुराम आपटे.

Friday, 9 October 2020

शो मस्ट गो ऑन...

लाईट्सचा झगमगाट, कॅमेऱ्यांचा लखलखाट, रॅम्प वॉक करणाऱ्या मॉडेल्स, रॅम्पच्या मागे पडद्याआड घडत असलेलं नाट्य आणि मॉडेल्सच्या आयुष्यांमधले चढ-उतार, मधुर भंडारकर यांनी हे सगळं दाखवण्याचा सुरेख प्रयत्न केला, २००८ साली प्रदर्शित झालेल्या "फॅशन" या चित्रपटामधून...


मेघना माथुर (प्रियंका चोप्रा) या मॉडेलची कहाणी, तिच्याच शब्दात मांडणारा हा चित्रपट मॉडेलिंग जगताचं एक वेगळं दर्शन घडवतो. मॉडेल्सची आपापसातली भांडणं, हेवेदावे किंवा वेगवेगळ्या फॅशन डिझाइनर्समध्ये असलेली स्पर्धा यावर जास्त भाष्य न करता, मेघना माथुर आणि शोनाली गुजराल (कंगना रणावत) या दोन मॉडेल्सच्या वैयक्तिक जीवनावर आणि झपाट्याने बदलत असलेल्या फॅशन जगताचा या दोघींवर होणाऱ्या परिणामांवर भर दिलेला दिसतो...

चित्रपटातली गाणी प्रासंगिक असली तरी ती गुणगुणत रहावी अशी वाटत नाही. त्यातल्या त्यात, "फॅशन का है यह जलवा..." प्रेक्षकांना बऱ्यापैकी आकर्षित करतं. अरबाज़ ख़ान, सुचित्रा पिल्लई, किट्टू गिड़वानी, समीर सोनी, मुग्धा गोडसे, हर्ष छाया, राज बब्बर, किरण जुनेजा, या सर्व कलाकारांनी त्यांच्या वाट्याला आलेल्या भूमिका उत्तम साकारल्या आहेत. पण या सर्व भूमिका झाकोळल्या गेल्या त्या प्रियंका चोप्रा आणि कंगना रणावत या दोघींच्याही, जीव ओतून आणि एकमेकींच्या तोडीस तोड केलेल्या अदाकारीने...

प्रियंका चोप्रा आणि कंगना रणावत या दोघींच्या भूमिका जवळ-जवळ सारख्याच आहेत, कंगना रणावत यांच्या भूमिकेपेक्षा प्रियंका चोप्रा यांची भूमिका जरा लांब आहे इतकंच. अभिनयाचा कस लावणाऱ्या या दोन्हीही भूमिकांना अनेक वेगवेगळ्या छटा आहेत. मॉडेलिंग जगतात यशाच्या परमोच्च स्थानावर विराजमान असताना आपल्या उद्धट व बेदरकार वागणुकीने सर्वांना हैराण करणारी शोनाली आणि शोमध्ये घडलेल्या wardrobe malfunctionच्या प्रसंगानंतर आपली अधोगती पाहत असताना घायाळ आणि चिडचिडी झाली शोनाली, अदाकारीमधला हा बदल कंगना रणावत यांनी छान दर्शवला आहे...

फॅशन जगतात जम बसवण्यासाठी संघर्ष करणारी, जराशी अबोल व निरागस मेघना माथुर ते फार कमी वेळेत यशाच्या शिखरावर पोहोचलेली बेलगाम आणि हेकेखोर मेघना माथुर, हा प्रवास आणि यातल्या मेघनाच्या विविध छटा प्रियंका चोप्रा यांनी उत्तम वठवल्या आहेत. प्रियंका चोप्रा यांची तीन दृष्य तर अतिशय सुरेख वठली आहेत. प्रसिद्धीच्या हवेत असताना जॅनेटला (मुग्धा गोडसे) तिच्या वैयक्तिक व वैवाहिक आयुष्यावरून टोमणा मारणारी, रेव्ह पार्टीनंतर मद्यधुंद अवस्थेत सर्वस्व हरवल्यावर मनाने उध्वस्त झालेली आणि ऐन वेळी मैत्रिणीच्या मृत्यूची बातमी समजल्यावरही प्रकाशझोत पडताच भावनांना दाबून रॅम्पवर चालणारी, या तीनही दृष्यात प्रियंका चोप्रा यांनी त्यांच्या अभिनयात कमालीची ऊंची गाठलेली दिसते...

चित्रपटातल्या अनेक घटकांपैकी, एक महत्वाचा घटक म्हणजे चित्रपटाचं पार्श्वसंगीत. सलीम-सुलेमान यांनी दिलेलं पार्श्वसंगीत चित्रपटात वेगळेच रंग भरतं. चित्रपटभर वेगवेगळ्या तऱ्हेने ऐकू येणारी एक विशेष धुन, काही दृष्यांची तीव्रता स्पष्ट करते. चित्रपटातला सर्वात मोलाचा क्षण म्हणजे चित्रपटाचं अंतिम दृष्य. Against all odds, मेघना आपला आत्मविश्वास परत मिळवते आणि रॅम्पवर चालताना, कितीही संकटं आली तरी, "Show must go on..." हा कानमंत्र देऊन जाते...

@ अनिकेत परशुराम आपटे.

Tuesday, 6 October 2020

रंगीत पण बेगडी दुनिया...

"कितने अजीब रिश्ते हैं यहाँ के... दो पल मिलते हैं साथ साथ चलते हैं..." लतादीदींच्या स्वरांनी सजलेलं आणि संदीप नाथ यांच्या शब्दांमधून चित्रपटाची कथा आणि व्यक्तिरेखांची व्यथा मांडणारं हे गाणं आहे २००५ साली प्रदर्शित झालेल्या मधुर भंडारकर दिग्दर्शित, "पेज ३" या चित्रपटातलं...


पत्रकार माधवी शर्मा (कोंकणा सेन शर्मा), हिच्या नजरेतून उलगडत जाणारा हा चित्रपट, एका रंगीबेरंगी, छानछोकी अशा एका खोट्या दुनियेचं दर्श घडवतो. एखादी गोष्ट प्रसार माध्यमांपर्यंत पोहोचली की ती वाऱ्यासारखी जनमानसात पसरवली जाते. काही ठिकाणी सत्याची उकल होते तर काही बाबतीत दडपशाहीचा वापर करून खऱ्या गोष्टीला भलतीच वळणं दिली जातात. मनोज त्यागी आणि नीना अरोरा या लेखक जोडीने वेगवेगळे धक्कादायक मुद्दे हाताळून चित्रपटात नेमकं हेच दाखवण्याचा प्रयत्न केला...

चित्रपटातली गाणी, गुणगुणत रहावी अशी नाहीत. पण त्यातल्या त्यात, "कितने अजीब रिश्ते हैं..." आणि "यहाँ ज़िंदगी..." ही गाणी लक्षात राहतात. कोंकणा सेन शर्मा यांच्या सोबत बोमन इराणी, अतुल कुलकर्णी, उपेंद्र लिमये, तारा शर्मा, संध्या मृदूल, अंजू महेंद्रू, मदन जैन, बिक्रम सलूजा, सुहासिनी मुळ्ये अशी, कलावंतांची बरीच लांब लचक फौज आहे. सर्वांनी त्यांच्या त्यांच्या वाट्याला आलेल्या व्यक्तिरेखा छान साकारल्या आहेत. पण त्यातल्या त्यात कोंकणा सेन शर्मा यांनी साकारलेली पत्रकार माधवी शर्मा आणि उपेंद्र लिमये यांनी वठवलेला इंस्पेक्टर अरुण भोसले जास्त लक्षात राहिले...

अर्थपूर्ण पत्रकारिता करण्याचा अट्टाहास, पण वरिष्ठांनी घातलेला दबाव यामुळे आतल्या आत कुढत राहणारी माधवी असो किंवा पोलीसाची खरी ताकद दाखवायला निघालेला, पण यंत्रणा आणि भ्रष्टाचार यांमुळे तसं न करू शकल्याने आतल्या आत घुसमटणारा भोसले असो, कोंकणा सेन शर्मा व उपेंद्र लिमये या दोघांनीही त्यांच्या अदाकारीने दोन्हीही व्यक्तिरेखा जिवंत केल्या...

मनोरंजनाच्या सहाय्याने एका विषयाला हात घालताना, समाजातील त्या त्या घटकांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची पुरेपूर काळजी लेखकांनी घेतलेली दिसते. थोडक्यात, कॅमेऱ्याच्या लखलखाटात दिखाऊपणा करणारी एक बेगडी दुनिया, मधुर भंडारकर यांनी "पेज ३" या चित्रपटाद्वारे खूप छान पद्धतीने समोर आणली...

@ अनिकेत परशुराम आपटे.

Friday, 2 October 2020

अंधारी आणि हिंसक दुनिया...


इंस्पेक्टर खांडिलकर (आदित्य श्रीवास्तव) यांच्या संयमी शब्दांनी, सत्या (जे. डी. चक्रवर्थी) या माणसाचा, एक सामान्य तापट डोक्याचा माणूस ते एक थंड डोक्याचा कुविख्यात गुंड, हा प्रवास ज्या कथेच्या आधारे मांडला, ती कथा होती १९९८ साली प्रदर्शित झालेल्या रामगोपाल वर्मा दिग्दर्शित, "सत्या" या चित्रपटाची...

मुंबई अंडरवर्ल्ड... एक अशी दुनिया जिथे हिंसाचार, खून, मारामाऱ्या, तस्करी, बेकायदेशीर कामं, यांचा ससेमिरा सुरूच असतो. याच गोष्टींमुळे मुंबई अंडरवर्ल्ड आणि मुंबई पोलीस यांच्यात उंदरा-मांजराचा खेळ सतत सुरू होतो. मुंबई अंडरवर्ल्डच्या आतल्या गोटातले बारकावे, त्यांचे राजकीय संबंध, गुंडांमधील गटबाजी आणि या सर्वांना जेरीस आणण्यासाठी मुंबई पोलीसांनी केलेले शर्थीचे प्रयत्न, हा सगळा प्रवास दाखवण्याचा लेखक अनुराग कश्यप आणि सौरभ शुक्ला यांनी छान प्रयत्न केला आहे...

चित्रपटातली जी धिम्या चालीची गाणी आहेत, ती जरी नसती तरी चाललं असतं. अर्थात, गल्ज़ार साहेबांनी लिहिलेल्या शब्दात कमालीची ताकद आहे यात वादच नाही, तरी बहुतेक गाणी कथेला थोडी मागे खेचतात. पण, "कल्लू मामा..." आणि "सपने में मिलती है..." ही उडत्या चालीवरची गाणी तर अफलातून आहेत. या दोन्ही गाण्यात, अनुक्रमे सौरभ शुक्ला आणि मनोज बाजपाई भन्नाट नाचले आहेत. चक्रवर्थीसोबतच सौरभ शुक्ला, गोविंद नामदेव, परेश रावल, आदित्य श्रीवास्तव, मकरंद देशपांडे अशा अनेक कलाकारांनी त्यांच्या वाट्याला आलेल्या भूमिकांना योग्य न्याय दिला आहे. पण सर्वात लक्षात राहतात  उर्मीला मातोंडकर यांनी साकारलेली विद्या आणि मनोज बाजपाई यांचा भीकू म्हात्रे...

चित्रपटभर भिंधास्त वावरणाऱ्या दिलखुलास भीकू म्हात्रेची भूमिका इतकी रंगली याला कारण म्हणजे त्या व्यक्तिरेखेचं लेखन आणि मनोज बाजपाईची जबरदस्त अदाकारी. याशिवाय 'ग्लॅमरस नायिका' या आपल्या ओळखीला बगल देत, चित्रपटात साध्या साड्या नेसणाऱ्या, हळुवार बोलणाऱ्या, नगण्य किंवा एकदमच कमी मेकपचा वापर करूनही छान दिसणाऱ्या विद्याची भूमिकाही उर्मीला मातोंडकर यांनी उत्तम वठवली आहे...

एकंदरीत, जितकं अंधारलेलं तितकंच हिंसेेेेेच्या आहारी गेलेलं गुन्हेगारी जग आणि त्यातूनही दिसणारा प्रेम व भावनांचा हलकासा कवडसा रामगोपाल वर्मा यांनी "सत्या" या चित्रपटात सुरेख दाखवला...

@ अनिकेत परशुराम आपटे.