खून होतो, पोलीस तपास सुरू होतो. एकेक पुरावा समोर येतो. आरोप-प्रत्यारोप होतात. खुनाच्या रहस्याची उकल होते आणि खऱ्या खुन्याला शिक्षा होते. अनेक असे हिंदी चित्रपट होऊन गेले, ज्यात अशा पोलिसी शोधकथा होत्या. असेच दोन चित्रपट म्हणजे १९६९ आणि २०१७ साली प्रदर्शित झालेले, "इत्तेफ़ाक..."
इत्तेफ़ाक (१९६९)...
प्रसिद्ध चित्रकार दिलीप रॉयवर (राजेश खन्ना) त्याच्याच पत्नीच्या खुनाचा आळ येतो. या आघातामुळे दिलीप रॉयचं मानसिक संतुलन ढासळतं आणि त्याला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं जातं. दिलीप रॉय तिथून निसटतो आणि एका घरात आसरा घेतो. त्या घरात रेखा (नंदा) त्या वेळी एकटीच असते. तिथे काही विचित्र घडामोडी घडत जातात आणि त्या घरीच्या मालकाच्या म्हणजेच, जगमोहनच्या खुनाचाही आळ दिलीप रॉयवर येतो. अखेर इंस्पेक्टर कर्वेंच्या (इफ़्तिखार) चाणाक्ष तपास कार्यामुळे दोन्हीही खुनांना वाचा फुटते आणि दिलीप रॉय निर्दोष सुटतो...
इत्तेफ़ाक (२०१७)...
विक्रम सेठी (सिद्धार्थ मल्होत्रा) या प्रसिद्ध लेखकावर त्याच्या बायकोच्या खुनाचा आळ येतो. पोलिसांपासून पलायन करत विक्रम एका घरात शिरतो. काही क्षणात त्याच घरात राहणारी माया (सोनाक्षी सिन्हा) तिथून निसटते आणि पोलिसांना घेऊन परत येते, तेव्हा तिच्या नवऱ्याचा म्हणजेच, शेखरचा खून झालेला असतो आणि विक्रम तिथे सापडतो. विक्रम आणि माया दोघांच्याही वेगवेगळ्या जबान्या असतात. तसं असतानाही इंस्पेक्टर देव (अक्षय खन्ना) रहस्याची उकल करतो आणि दोन्हीही आरोपांमधून विक्रमची मुक्तता करतो...
एक आरोपी, एक मुलगी, एक इंस्पेक्टर आणि दोन खून, असं एक समान कथानक असलेल्या या दोन्हीही चित्रपटांत बरेच फरक होते ज्यामुळे दोन्हीही चित्रपट भिन्न ठरले...
१९६९च्या "इत्तेफ़ाक"मध्ये दिलीप रॉयला केंद्रस्थानी ठेऊन इतर व्यक्तिरेखांना त्याच्या सोबत गुंफून कथानक साकारलं गेलं होतं. दिलीप रॉयच्या नजरेतून चित्रपटाची कथा उलगडत गेली आणि कथेला पूर्ण करण्याच्या कामी इंस्पेक्टर कर्वे या व्यक्तिरेखेचा एक सहाय्यक म्हणून वापर केला गेला. कथानकाचा बराचसा भाग त्या बंगल्यात घडत असल्याने, प्रकाश योजना व ध्वनी यांचा वापर करून छान परिणाम साधला गेला, ज्यामुळे कथानकावर लक्ष केंद्रीत राहिलं...
२०१७ सालचा "इत्तेफ़ाक" मात्र इंस्पेक्टर देवला नायक बनवून त्याच्या दृष्टीकोनातून कथा मांडणारा चित्रपट वाटला. नायकाला विशिष्ठ स्टाईल दिली गेली होती, जिचा कथानकाशी म्हणण्यासारखा काही संबंध नव्हता. चित्रपटात अनेक लोकेशन्स वापरली गेल्यामुळे, तिथे घडणारं उपकथानक किंवा छोटे प्रसंग फारसे परिणामकारक झाले नाहीत. नायकासह सर्वच कलावंतांना बऱ्यापैकी glamorize केलं गेलं. त्यामुळे हाय प्रोफाईल मर्डर मिस्ट्री म्हणून चित्रपट पाहिला गेला...
२०१७ सालच्या "इत्तेफ़ाक"चा शेवट, नकारात्मकतेला समोर आणणारा शेवट होता. वास्तविक, 'इत्तेफ़ाक' या शब्दाचा वापर करून तशाच प्रकारचे प्रसंग घडवून चित्रपटाचा शेवट केला असता, तर नक्कीच तो योग्य ठरला असता. तिथेच, १९६९ सालच्या "इत्तेफ़ाक"चा शेवट अपेक्षित होता तसाच झाला. 'रेखा' या पात्राच्या बाजूने पाहिलं, तर तो एक दु:खांत होता. पण कथेच्या दृष्टीने, सकारात्मक विचार रुजवणारा तो एक सुखांतच होता...
१९६९ सालचा यश चोपड़ा दिग्दर्शित "इत्तेफ़ाक" आणि २०१७ साली प्रदर्शित झालेला अभय चोपड़ा दिग्दर्शित "इत्तेफ़ाक", हे एकाच धाटणीच्या कथानकावर बेतलेले दोन वेगळे चित्रपट होते. तांत्रिकदृष्ट्या, २०१७ सालचा "इत्तेफ़ाक" वरचढ असेलही, पण सर्व बाजूंनी विचार केला, तर यश चोपड़ा दिग्दर्शित "इत्तेफ़ाक" नक्कीच उजवा होता...
@ अनिकेत परशुराम आपटे.
No comments:
Post a Comment