Sunday, 23 January 2022

रटाळ व बेचव "कॉफी..."

"कॉफी की कहानी है ये... सुन ले तू ज़रा ज़रा...", रोहित राऊतच्या स्वरातलं हे गाणं आहे नितीन कांबळे दिग्दर्शित "कॉफी" या चित्रपटातलं...

तर कहानी कुछ यूँ है...

इंटिरियर डिझाइनर असलेल्या रेणुका राजवाडेला (स्पृहा जोशी) गोव्यात मोठं काम मिळतं. तिथे तिची भेट रोहित सरपोतदारशी (सिद्धार्थ चांदेकर) होते. सतत कामाचा, नवऱ्याचा म्हणजे रणजीत राजवाडेचा (कश्यप परुळेकर) विचार करणाऱ्या रेणुकामध्ये, स्वच्छंदी, कविता करणारी एक रावीही लपलेली असते. ही रावी पहिल्याच भेटीत रोहितकडे आकर्षित होते. काही काळासाठी रेणुकाला विसरून रावी रोहितसोबत जिवाचं गोवा करते...

मनसोक्त गोवा फिरल्यावर आणि रोहितसोबतची मैत्री प्रेमात बदलत असताना, बाजूला गेलेली रेणुका पुन्हा समोर येते. इथून सुरुवात होते रेणुका आणि रावीमधल्या एका प्रकारच्या द्वंद्वाची. रेणुकासाठी जितका रणजीत महत्वाचा असतो, तितकाच रावीसाठी रोहितही असतो. तिच्या या द्वंद्वामुळे तिच्यासोबत रणजीत आणि रोहितही भरडले जातात. अखेर रोहितच्या मागणीमुळे आणि रणजीतने दाखवलेल्या उच्च विचारांमुळे रेणुका आणि रावीमधलं द्वंद्व संपतं आणि एकीकडे ढीग तर दुसऱ्या बाजूला खड्डा अशा स्थितीत चित्रपट संपतो...

चित्रपटात दाखवलेली गोव्यातली लोकेशन्स अप्रतीम आहेत. चित्रपटात वापरलेले कॅमेरा एँगल्स, लाँग शॉट्स छान जमलेत. चित्रपटात अधून मधून डोकावणाऱ्या रावीच्या कविता ऐकत रहाव्याशा वाटतात. कलावंतांच्या अदाकारीबद्दल बोलावं तर ती एकसूरी वाटते. स्पृहा जोशी, "होम स्वीट होम" आणि "पुन:श्च हरिओम"चं बेयरिंग घेऊन वावरताना दिसते, सिद्धार्थ चांदेकर "झिम्मा"मधून अजून बाहेरच पडलेला दिसत नाही. आणि कश्यप परुळेकर, संपूर्ण चित्रपटात त्याच्या चेहेऱ्यावर एकच भाव दिसत राहतात...

भूतकाळ आणि वर्तमानकाळाची सांगड घालत पुढे जाणारं चित्रपटाचं कथानक थोडं तकलादू वाटतं. मध्यंतरापूर्वी एक ट्विस्ट येतो खरा, पण तो ट्विस्ट काही क्षणात फुस होऊन जातो. वास्तविक त्या ट्विस्टचा वापर करून कथानक फुलवता आलं असतं. पण तसं न केल्यामुळे आणि मध्यंतरापूर्वीचं हलकं-फुलकं कथानक गंभीर रूपात पुन्हा दाखवल्याने चित्रपट रटाळ होत जातो. नाही म्हणायला, टिपिकल पोझेसिव्ह नवरा असलेल्या रणजीतने चित्रपटाच्या अगदी शेवटी घेतलेला जगावेगळा निर्णय त्या व्यक्तिरेखेला वेगळीच ऊंची देतो...

एकंदरीत, मध्यंतरापूर्वी बऱ्यापैकी चविष्ट वाटणारी ही "कॉफी" जास्त वेळ ढवळल्यामुळे बेचव होत जाते हे मात्र नक्की...

@ अनिकेत परशुराम आपटे.

No comments:

Post a Comment