Sunday, 11 July 2021

सकारात्मकतेचा श्रीगणेशा...

एक मार्ग बंद झाला, की देव दुसरा मार्ग उघड करून देतो. त्या मार्गावर जर आपण हिमतीने चाललो, तर यश हमखासच मिळतं ही मोलाची शिकवण दिली आहे, विविध कोरेगावकर दिग्दर्शित, "पुन:श्च हरिओम" या चित्रपटाने...

ही कथा आहे रवी (विठ्ठल काळे), दीपाली (स्पृहा जोशी), रवीचे बाबा (संजय कुलकर्णी), रवीची आई (नीता शेंडे) आणि रवीची मुलगी (कश्वी सावंत) या पारकर कुटुंबाची. छोटी छोटी स्वप्न उराशी बाळगणाऱ्या पारकर कुटुंबावर अचानकपणे संकटं कोसळतात. आधी कोविडमुळे झालेलं लॉकडाऊन, मग वादळामुळे झालेलं नुकसान आणि दुकानाच्या भाड्यासाठी होणारा धमकीवजा तगादा, यांमुळे पारकर कुटुंबाची मानसिक व आर्थिक स्थिती खालावते आणि पराभवाची छटा सर्वांच्या चेहऱ्यावर दिसू लागते...

याच दरम्यान दीपाली व तिच्या मुलीला या संकटांमधून बाहेर पडण्याचा एक मार्ग सापडतो. घरच्यांकडून, प्रामुख्याने रवीकडून विरोध होईल हे माहित असल्याने दीपाली गुपचूपपणे तो मार्ग स्वीकारते. काही दिवसांनी रवी व इतर कुटुंबियांना दीपालीचं हे गुपित समजतं. समज-गैरसमजाच्या फेऱ्यातून बाहेर पडत पारकर कुटुंबीय एकत्र येऊन आलेल्या संकटांना हरवण्याच्या मार्गावर चालण्याचा श्रीगणेशा करतात...

कथानकाची मांडणी छान आहे. सर्व कलावंतांची अदाकारी तर उत्तम झालीच आहे. पण पार्श्व संगीतानेही चित्रपटात मोलाचा वाटा उचलला आहे. रवीची हतबलता आणि दीपालीची लढवैय्येवृत्ती एकाच वेळी दाखवताना पार्श्वसंगीताने कमाल केली आहे. मुलीने काढलेला आपला व्हिडियो पाहताना, "याचा असाही उपयोग होऊ शकतो..." ही गोंधळलेली पण आनंदी भावना चेहऱ्यावर दाखवणारी दीपाली आणि आपण काहीच करत नाही म्हणून निराश झालेला व त्याच नैराश्याचा उद्रेक बायकोवर काढणारा रवी... चित्रपटातले हे दोन सीन विशेष लक्षात राहतात...

एकंदरीत, एका सामान्य कुटुंबाची असामान्य कथा दाखवणारा मिताली जोशी लिखित, "पुन:श्च हरिओम" हा चित्रपट, सकारात्मक विचार मांडणारा आहे हे नक्की...

@ अनिकेत परशुराम आपटे.

No comments:

Post a Comment