Friday, 3 July 2020

रंग प्रेमाचा, थोडा खट्टा थोडा मीठा...



एका बाजूला आपल्या जोडीदारासाठी असलेलं तरूण प्रेम तर दुसरीकडे आपल्या परिवाराला जोडणारं परिपक्व प्रेम, हाच आशय आहे १९७८ साली प्रदर्शित झालेल्या बासू चॅटर्जी दिग्दर्शित, "खट्टा मीठा" या चित्रपटाचा...

चित्रपटाची हलकी-फुलकी, साधी कथा आहे दोन मध्यवर्गीय पारशी परिवारांची. पहिला परिवार आहे होमी मिस्त्री (अशोक कुमार) यांचा. त्यांची पत्नी निवर्तलेली असते आणि त्यांना, फ़ली (रविराज), जाल (देवेंद्र खंडेलवाल), रूसी (रणजीत चौधरी) आणि पीलू (राजू श्रेष्ठ म्हणजे मास्टर राजू) अशी चार मुलं असतात. दुसरीकडे असते नर्गीस सेथना (पर्ल पदमसी), ज्यांच्या पतीचेही निधन झाले असते आणि त्यांना, फिरोज़ (राकेश रोशन), फ्रेनी (प्रीती गांगुली) आणि फ़रदून (विक्रम साहू) अशी तीन अपत्य असतात...

आयुष्याच्या उतारवयात आपल्याला एक हक्काचा जोडीदार मिळेल आणि घराला आधार मिळेल म्हणून होमी आणि नर्गीस लग्न करतात. आपल्या आयुष्यात नव्याने आलेल्या भावंडांशी जुळवून घेताना होमीच्या चार व नर्गीसच्या तीन मुलांची त्रेधा उडते. हळुहळू सर्वांना एकमेकांबद्दल ओढ निर्माण होते आणि घरावर एकामागून एक आलेल्या संकटांचा सामना करण्यासाठी अखेर पूर्ण कुटुंब एकत्र येतं...

'सिनेमॅटिक लिबर्टी' या शब्दाच्या नावाखाली जशी अतिरंजित दृष्य प्रेक्षकांच्या माथी मारली जातात तसं काहीच या चित्रपटात दिसत नाही. उलट साध्या सोप्या कथेची, साधी पण स्वाभाविक वाटेल व पटेल अशी मांडणी झाली आहे. सर्व कलावंतांची अचूक निवड केलेली दिसते. थोडंसं खट्टं असलेलं तरूण प्रेम आणि थोडं मीठं असलेलं परिपक्व प्रेम दाखवताना अशोक कुमार-पर्ल पदमसी आणि राकेश रोशन बिंदिया गोस्वामी अशा जराशा वेगळ्या आणि फारशा न पाहिलेल्या जोड्या आपल्याला दिसतात...

चित्रपटातल्या मुख्य पात्रांखेरीज, बिंदिया गोस्वामी, प्रदीप कुमार, डेविड इब्राहिम आणि देवेन वर्मा या कलावंतांनीही आपापल्या भूमिकांना छान न्याय दिला आहे. देवेन वर्मा यांनी वापरलेल्या विशेष लकबींनी व त्यांच्या संवादफेकीमुळे विनोदाची बाजू छान हाताळली गेली आहे. साधी पण उत्तम मांडणी, चपखल पात्रनिवड आणि सुंदर अदाकारी या सर्वांना गुल्ज़ार साहेबांनी लिहिलेल्या अप्रतीम गाण्यांची साथ लाभल्यामुळे चित्रपट अधिक उठावदार झाला आहे. "यह जीना है अंगूर का दाना...", "रोल रोल माकोनिसा माकोनिसा दोबारा...", "थोड़ा है थोड़े की ज़रूरत है..." या गाण्यांमुळे चित्रपट वेगळीच ऊंची गाठतो...

त्यातलं, "थोड़ा है थोड़े की ज़रूरत है..." हे गाणं फक्त माझ्याच नाही, तर अनेकांच्या फेव्हरेट साँगलिस्टमध्ये असेल. आपल्याकडे थोडं आहे पण अजून थोडं मिळवण्यासाठी आपण धडपडत राहतो आणि खऱ्या खट्ट्या मीठ्या अनुभवांना दुरावत राहतो, असा सुंदर बोध या गाण्यामुळे होतो. सामान्य कथेला मिळालेल्या सुंदर पटकथेमुळे चित्रपट मनोरंजक झाला आहे पण काही गोष्टी तितक्याशा न पटणाऱ्या आहेत खऱ्या...

आपल्या वडिलांची नोकरी गेली हे समजल्यावर घरातल्या मुलांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव होते, पण होमीच्या फ़ली, जाल व रूसी या तीन मुलांखेरीज, घरखर्चाला कोणी हातभार लावल्याचं दाखवलं गेलं नाही. कथेत सर्व भावंडांचा समान सहभाग न दाखवता, फ्रेनी आणि फ़िरोज यांना जास्त फुटेज दिल्याचं जाणवतं. राकेश रोशन आणि बिंदिया गोस्वामी यांच्यातली दृष्यही अधिक आणि लांब वाटतात. त्याउलट, जर होमी व नर्गीसमुळे एकत्र आलेल्या परिवारावर फोकस दिला असता तर जास्त आवडलं असतं...

अर्थात, ही सर्व माझी वैयक्तिक मतं आहेत. बासू चॅटर्जींसारख्या लेखक व दिग्दर्शकाच्या कामाबद्दल मी बोलणं कितपत योग्य ते माहित नाही. पण टेन्शन फ्री, निखळ मनोरंजन हवं असेल तर बासू चॅटर्जी लिखित व दिग्दर्शित, "खट्टा मीठा" हा चित्रपट पाहण्यासारखा आहे...

@ अनिकेत परशुराम आपटे.

No comments:

Post a Comment