'गाव तसं चांगलं... पण बैलामागे लागलं...' हे वाक्य सार्थकी लावणारा चित्रपट म्हणजेच, २००८ साली प्रदर्शित झालेला, उमेश विनायक कुलकर्णी दिग्दर्शित, "वळू - द वाईल्ड बुल..."
कुसवडे नावाचं एक गाव आणि देवाचा आशीर्वाद म्हणून गावात मोकाट फिरणारा डुरक्या म्हणजेच वळू, या दोन गोष्टींभोवती ही मजेशीर कथा फिरते. संपूर्ण गावाची जबाबदारी असलेला हा शांत स्वभावी डुरक्या अचानक हिंसक होतो आणि गावकऱ्यांचं नुकसान करणाऱ्या अनेक गोष्टींना कारणीभूत ठरतो. हाताबाहेर गेलेल्या या डुरक्याला जेरबंद करण्याची जबाबदारी, स्वानंद गड्डमवार (अतुल कुलकर्णी) नावाचा एक माणूस स्वीकारतो. पुढे चित्रपट संपेपर्यंत प्रवास सुरू राहतो, डुरक्याला पकडण्याच्या वेगवेगळ्या क्लृप्त्यांचा...
मुख्य कथानकाला जोडूनच अनेक छोट्या छोट्या उपकथानकांची छान मेजवानी आपल्याला पहायला मिळते. दोन राजकीय नेत्यांमधला संघर्ष, गावात डॉक्यूमेंटरी आल्याने स्वत:ला कॅमेऱ्यात पाहण्याचा गावकऱ्यांचा आटापिटा, कडेकडेने हळुवार फुलत जाणारी प्रमकहाणी आणि डुरक्याच्या निमित्ताने गावात वेगवेगळ्या ठिकाणी झालेलं नुकसान या सगळ्यातून चित्रपट पुढे सरकत राहतो. या चित्रपटात, डॉ. मोहन आगाशे, दिलीप प्रभावळकर, भारती अचरेकर, सतीश तारे, निर्मिती सावंत, नंदू माधव, अमृता सुभाष, ज्योती सुभाष, अशा दिग्गज कलावंतांसोबतच, वृक्षसेन दाभोळकर, वीणा जामकर, गिरीश कुलकर्णी, श्रीकांत यादव, अशा नवा दमाच्या कलाकारांचाही समावेश आहे...
चित्रपटातल्या दोन कलाकारांबद्दल एक मजेशीर गोष्ट सांगावीशी वाटते. २०१८ साली प्रदर्शित झालेल्या "पुष्पक विमान" या चित्रपटात एक संवाद होता, "तू माझा शेवट, आणि मी तुझी सुरुवात..." या संवादाचा, "वळू" या चित्रपटाशी संबंध असा येतो, की जिथे प्रसिद्ध अभिनेते निखील राऊत (म्हणजे चित्रपटातला गण्या) यांचा हा पहिला चित्रपट होता, तिथेच दिग्गज अभिनेते चंद्रकांत गोखले (चित्रपटातील आज्या) यांचा, "वळू" हा चित्रपट, त्यांच्या निधनापूर्वीचा शेवटचा प्रसारित झालेला चित्रपट ठरला. असा हा फार छान योगायोग, या चित्रपटामुळे समोर आला...
मंगेश धाकडे यांचं पार्श्वसंगीत आणि सुधीर पळसणे यांचं छायांकन या दोन्ही गोष्टींनी कथानकाला छान हातभार लावला. शिवाय, गिरीश कुलकर्णी व उमेश कुलकर्णी यांच्या संवाद व लेखनानेही चित्रपटात छान रंग भरले आहेत. ते पार्श्व संगीत इतकं छान होतं, की चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पुढे बराच काळ ते संगीत अनेक मोबाईल्समध्ये रिंगटोन म्हणून ऐकू येऊ लागलं. आजही काही काही मोबाईल्समध्ये "वळू"चे पार्श्वसंगीत रिंगटोन म्हणून ठेवलेलं आढळतं...
खरंच डुरक्या हिंसक होतो का...? तो खरंच गावात झालेल्या नुकसानांना कारणीभूत असतो का...? डुरक्याला पकडण्याचे स्वानंदचे प्रयत्न यशस्वी होतात का...? हे तर प्रत्यक्ष चित्रपट पाहिल्यावरच समजेल, नाही का...
@ अनिकेत परशुराम आपटे.
No comments:
Post a Comment