Sunday, 19 July 2020

मूक स्वप्न...


"अंगी जिद्द असेल तर इरेला पेटून आपली स्वप्न साध्य करण्याचा आपण प्रयत्न करतो..." या आशयाचे अनेक चित्रपट होऊन गेले. पण एक चित्रपट माझ्या मते जरा हटके होता. तो म्हणजे, २००५ साली प्रदर्शित झालेला नागेश कुकनूर दिग्दर्शित, "इक़बाल..."

मूक-बधिर असलेल्या इक़बालला (श्रेयस तळपदे) क्रिकेटचं वेड असतं. जलदगती गोलंदाज होण्याचं आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी इक़बाल प्राणपाणाने लढतो. आपली बहिण खदीजा (श्वेता प्रसाद) व गुरू मोहित (नसीरुद्दीन शाह) यांच्या मदतीने प्रचंड मेहनत घेऊन तो ते स्वप्न पूर्ण करतो...

क्रिकेटविषयी मनातून राग असलेले इक़बालचे वडिल (यतिन कार्येकर), वडिल व मुलगा यांच्या वादाच्या कचाट्यात सापडलेली इक़बालची आई (प्रतीक्षा लोणकर) आणि क्रिकेट म्हणजे शुद्ध व्यवसाय मानणारा थंड डोक्याचा गुरुजी (गिरीश कर्नाड), या भूमिका त्या त्या कलावंतांच्या चोख अभिनयाने छान वठल्या आहेत. पण सर्वात मोठं surprise package ठरला श्रेयस तळपदे. एकही संवाद न म्हणता, फक्त डोळे व हाव-भावांच्या सहाय्याने त्याने सुंदर अभिनय केला आहे...

पूर्ण निराश झालेला असताना मनाचा उद्रेक दाखवतानाचा इक़बाल, पहिली स्वाक्षरी देतानाचा आणि स्वाक्षरी घेणाऱ्या मुलीकडे पाहतानाचा इक़बाल, आपला आदर्श प्रत्यक्षात समोर आल्यावर होणारा आनंद व्यक्त करतानाचा इक़बाल, या छटा श्रेयस तळपदे यांनी छान दर्शवल्या आहेत. हिंदीतला पहिलाच चित्रपट असूनही गिरीश कर्नाड व नसिरुद्दीन शाहसारख्या तगड्या अभिनेत्यांसमोर ठामपणे उभं राहत श्रेयस तळपदे यांनी छान अदाकारी केली आहे...

चित्रपटाची अजून एक जमेची बाजू म्हणजे चित्रपटाचं संगीत. चित्रपटातली सर्व गाणी प्रसंगानुरूप आहेत. शिवाय गाण्यांमधूनही कथा पुढे सरकत जाते. "आशाएँ खिले दिल की..." हे गाणं तर निव्वळ अप्रतीम आहे. 'उराशी बाळगलेलं एखादं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिद्दीने प्रयत्न केले तर काहीच कठिण नाही...' हा सुंदर संदेश या गाण्यातून मिळतो. संगीतासोबतच चित्रपटाच्या पार्श्वसंगीतानेही कथेला छान साथ दिली आहे...

चित्रपटातील दृष्य आणि त्यांचं छायांकन छान जमून आलं आहे. खास करून खदीजा व मोहित यांच्यातल्या खुसखुशीत संवादांची दृष्य तर लाजवाब आहेत. अंतरराष्ट्रीय सामना, हातात चेंडू घेऊन खेळपट्टीकडे धावणारा इक़बाल आणि त्याला डोळे भरून पाहणारे त्याचे आई, वडिल व बहिण... चित्रपटाचं हे शेवटचं दृष्य सुखांत दर्शवणारं असलं ते पाहताना आपल्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही...

नागेश कुकनूर लिखित व दिग्दर्शित, "इक़बाल" हा वेगळ्या विषयावर बेतलेला चित्रपट कितीही वेळा पाहिला तरी कमीच आहे... नाही का...

@ अनिकेत परशुराम आपटे.

No comments:

Post a Comment