भयकथा म्हटली, की त्रस्त समंधाचा प्रवेश होताच किळसवाणे दिसणारे मानव, अजिबात पानं नसलेलं आणि विजा कोसळणारं झाड किंवा अंधारात वळणारा रस्ता... अशाच गोष्टी समोर येतात. पण याशिवाय देखील, फक्त प्रकाश, जागा आणि धक्का तंत्राचा वापर करून भय निर्माण केले जाऊ शकते, याचं उत्तम उदाहरण म्हणजे रामगोपाल वर्मा दिग्दर्शित, "कौन..."
वादळी पावसात घरात एकटी असलेली मुलगी (उर्मिला मातोंडकर), घराच्या मालकाला भेटायला आलेला समीर (मनोज बाजपाई) आणि पळालेल्या खुन्याच्या मागावर असलेला इंस्पेक्टर क़ुरेशी (सुशांत सिंह) या तीन व्यक्तिरेखांमध्ये चित्रपटाचं थरारक कथानक रंगतं. या तीन व्यक्तिरेखांशिवाय अजून एक महत्त्वाची व्यक्तिरेखा चित्रपटात दिसते. ती म्हणजे चित्रपटातला तो बंगला...
बंगल्यातल्या खोल्या, खिडक्या, जिने, या सगळ्या गोष्टींमुळे चित्रपटातलं रहस्य सुरेख पद्धतीने समोर येतं. चित्रपटातला एक सीन्स तर अप्रतीम लिहिला गेला आहे... त्या मुलीला घरात सर्वत्र तिच्याकडे रोखून बघणारी माणसं दिसतात आणि तिने मान वळवताच सगळी माणसं अचानक गायब होतात... संपूर्ण चित्रपटच उर्मिला मातोंडकर यांनी आपल्या अदाकारीने खाऊन टाकला आहे खरंतर, पण हा सीन त्यांनी कमालीचा वठवला आहे...
टेलिफोनच्या दृष्यांबद्दल मात्र मला थोडा संभ्रम आहे. चित्रपटात एकूण पाच दृष्यांमध्ये टेलिफोनचा वापर झाला आहे. पहिलं दृष्य आहे चित्रपटाची सुरुवात, जेव्हा ती मुलगी आपल्या आईशी बोलत असते. दुसऱ्या दृष्यात क़ुरेशी फोन करून पोलीसांना बोलावून घेतो. त्यावेळी रिसीव्हरकडून नजर वळवून तो त्या मुलीकडे बघतो. तिसऱ्या दृष्यात समीर व क़ुरेशीला गनपॉईंटवर ठेऊन ती मुलगी तिच्या आईला फोन करून दोन माणसं घरात घुसल्याचं सांगते. चौथ्या दृष्यात समीर फोनजवळ जातो तेव्हा त्याला समजतं की वायर कापली गेली आहे. पाचवं दृष्य चित्रपटाचं शेवटचं दृष्य, जेव्हा ती मुलगी बंद झालेला फोन हातात घेऊन पुन्हा आपल्या आईशी बोलताना दिसते...
पहिलं आणि शेवटचं दृष्य एकमेकांशी तंतोतंत जुळतात. म्हणजेच, जे काही शेवटच्या दृष्यात असतं तेच सगळं पहिल्या दृष्याच्या वेळीही होतं. याचाच अर्थ, तो फोन कथेच्या सुरुवातीपासूनच बंद केला गेला असतो. दुसऱ्या दृष्यात जेव्हा क़ुरेशी रिसीव्हर उचलतो तेव्हाच त्याला फोन बंद असल्याचं समजतं. त्यानंतरच्या दृष्यात जेव्हा ती मुलगी तिच्या आईला फोन लावते, तेव्हा क़ुरेशीने फोनबद्दल सांगितलं असतं तर कथेला कदाचित वेगळं वळण मिळालं असतं. चित्रपटाचा शेवट आल्यावरच आपल्याला हे सगळं समजतं म्हणा, पण जर टेलिफोनचं तिसरं दृष्य दुसऱ्या दृष्याच्या आधी घेतलं गेलं असतं तर टेलिफोन बंद पडण्याचं गूढ शेवटानंतरही कायम राहिलं असतं...
अर्थात, हे माझं वैयक्तिक मत आहे. त्या दृष्यांखेरीज, कथा, पटकथा, अदाकारी, प्रकाशयोजना आणि छायांकन या सर्वांनी मिळून रामगोपाल वर्मा कृत, "कौन" या चित्रपटाला अप्रतीम भयपट या सदरात वरचे स्थान मिळवून दिले आहे, हे मात्र खरं...
@ अनिकेत परशुराम आपटे.

No comments:
Post a Comment