Saturday, 13 June 2020

दे दे प्यार दे...

प्रेम वयाकडे पाहून केलं जातं का...? प्रेमाला वयाची मर्यादा असते का...? नव्याने प्रेमात पडल्यावर जुन्या प्रेमाचा विसर पडू शकतो का...? अशा काही प्रश्नांची उत्तरं देण्याचा एक चांगला प्रयत्न म्हणजे आकीव अली दिग्दर्शित "दे दे प्यार दे" हा चित्रपट...

बायको आणि मुलांपासून वेगळा होऊन लंडनमध्ये राहत असलेल्या आशीषचं (अजय देवगण) आएशावर (रकुल प्रीत सिंह) प्रेम बसतं. आशीषचा स्वभाव आणि वागणं पाहून आएशाही त्याच्या प्रेमात पडते. लंडनच्या गजबजलेल्या गल्ल्यांमधून, ऊंची हॉटेल्समधून गाणी-घेणी करत त्या दोघांचं प्रेम सुरू असतं. सर्वकाही छान चालू असतं पण एक छोटीशी अडचण असते. आशीषचं वय असतं पन्नास वर्ष तर आएशा असते सव्वीस वर्षांची. वयाच्या या अंतराचा भविष्यात होणारा परिणाम आशीषच्या लक्षात येतो शिवाय हे प्रेम नसून आकर्षण आहे, हे ही कळतं. आएशाला तो ही गोष्ट समजावतो आणि दोघं वेगळे होतात. एकमेकांबद्दलची ओढ दोघांनाही लवकरच हे पटवून देते की हे खरं प्रेम आहे. दोघं लग्नाचा निर्णय घेतात आणि आपल्या परिवाराशी ओळख करून देण्यासाठी आशीष आएशाला भारतात घेऊन येतो...

इथून कथानक रंगतदार होत जातं. भारतात आल्यावर आयशाला समाजतं की आशीषची मुलं, इशिका (इनायत सूद) आणि ईशान (भाविन भानुशाली) ही जवळपास तिच्याच वयाची आहेत. शिवाय आशीषचे वडील (आलोकनाथ) आणि आई (मधुमालती कपूर), आशीषच्या पहिल्या पत्नीसोबत म्हणजेच मंजूसोबत (तब्बू) राहत आहेत. पेच अधिक वाढतो जेव्हा इशिकाचं लग्न ठरत असताना नकोसा असलेला आशीष घरात येतो. मंजू आवडत असलेला, त्या घरात पाहुणा म्हणून आलेला व्ही.के. (जिम्मी शेरगिल) आपल्या अचाट कल्पनांनी पेच अजून वाढवून ठेवतो. या पेचांसोबत समांतर सुरू असते आशीषवरून चालू असलेली आएशा आणि मंजूची शाब्दिक जुगलबंदी. अखेर इशिकाचा साखरपुडाही होतो आणि काहीसा वेगळा पण सुखांत म्हणता येईल असा आशीष, मंजू आणि आएशा यांच्या नात्यातला तिढाही सुटतो...

चित्रपटातली गाणी बऱ्यापैकी श्रवणीय आहेत. अजय देवगण आणि तब्बूचा प्रश्नच नाही पण रकुल प्रीत सिंहनेसुद्धा छान अभिनय वठवलाय. काही संवाद कमरेखालचे आहेत खरे पण विनोदाचा बाज सांभाळण्यासाठी त्यांचा छान उपयोग होताना दिसतो. काही गोष्टी तितक्याशा पटत नाहीत. एखाद्या स्त्रीसाठी तिचं शील तिचं सर्वस्व असतं. तिच्या नकळत ते हिरावलं तर ती स्त्री आकांडतांडव करू शकते. पण याच गोष्टीला आएशा खूप साधेपणाने घेते, जणू काही विशेष घडलंच नाही... आशीष आएशाला ज्या घरी आणतो ते घर कुठेही भारतात असल्यासारखं वाटत नाही. बरं, तिथे असणारे नोकर नेपाळी किंवा चीनी वाटतात... घरात कार्य असतानाही मंजू धावत-पळत लंडनला जाऊन रागावलेल्या आएशाला घेऊन येते. बरं चित्रपटात असा कुठेही संदर्भ आढळत नाही की आशीषने मंजूला आएशा काम करत असल्याचा पत्ता सांगितला असेल... मंजूसोबत परतलेली आएशा अशी वाटते जणू नुकतीच जॉगिंगला गेली होती आणि धावता धावता मंजूच्या गाडीत बसली...

पण, एक वेगळा विषय आणि त्याकडे बघण्याचा वेगळा दृष्टीकोन यासाठी केला गेलेला हा प्रयत्न नक्कीच स्तूत्य आहे. एकूण काय, तर हाणामारीचे चित्रपट करून थकलेला अजय देवगण आणि गंभीर भूमिकांना विटलेली तब्बू या दोघांना एकत्र करून रोमँटिक कॉमेडी म्हणून जमवलेल्या या भट्टीचा आस्वाद घेण्यासाठी लव रंजन लिखीत "दे दे प्यार दे" हा चित्रपट एकदातरी पहावाच...

@ अनिकेत परशुराम आपटे.

No comments:

Post a Comment