Thursday, 11 June 2020

"शोले" - मिस्टर इंडिया पिस्तूल व समजूतदार नाणं...


हिंदी चित्रपटसृष्टीचा milestone ठरलेला, रमेश सिप्पी दिग्दर्शित, "शोले" आजही तितकाच ताजातवाना आहे. काय ते संवाद, काय ती गाणी, इतकंच कशाला, चित्रपटातल्या व्यक्तिरेखा व त्यांच्या विशेष लकबीही आपल्या सर्वांनाच तोंडपाठ आहेत. परवा पुन्हा "शोले" पाहिला आणि त्यातून काही गोष्टी नव्याने समोर आल्या...

जयचं शेवटचं हाणामारीचं दृष्य...

बांधून ठेवलेल्या वीरूचा (धर्मेंद्र) जीव वाचवण्यासाठी बसंती (हेमा मालिनी) नाचून नाचून बेजार झाल्यावर, सांभाला (मॅक मोहन) ठार करत जय (अमिताभ बच्चन) खडकावर प्रकट होतो. इथे एक नमूद करतो, सांभा बिचारा अनलकी होता हो... म्हणजे हेमा मालिनी नाचत असतानाही त्याला धर्मेंद्रकडे टक लावावी लागली. शिवाय मरावं लागलं ते वेगळंच. तर जय प्रकटतो. वीरू व बसंती तिथून निसटल्यावर बंदूक खाली टाकून जयसुद्धा सटकतो. पूल पार केल्यानंतर वीरू व बसंतीला गावाकडे पाठवून, डाकूंशी लढताना जय धारातीर्थी पडतो. आता मला नव्याने कळलेल्या, न कळलेल्या गोष्टी...

पहिला मुद्दा... बसंती-वीरूचा आणि जयचा, असे दोन्ही घोडे पळत असतात त्यावेळी जयच्या हातात एक पिस्तूल असतं. पुलाच्या आधी जयचा घोडा अडखळून पडतो म्हणून जयला धावतच पूल पार करावा लागतो.
धावताना जयला गोळी लागून तो पडतो तेव्हा त्याच्या हातून पिस्तूलही पडतं. जय धडपडत खडक पार करून पाठ टेकून बसतो तेव्हा पुन्हा त्याच्या हातात पिस्तूल येतं.
मला काय म्हणायचं आहे, जयला गोळी लागली म्हणून घाबरून ते पिस्तूल मिस्टर इंडियासारखं पुलावर गायब होऊन पुन्हा जयच्या हातात खडकावर प्रकटलं तर नसेल...

दुसरा मुद्दा... डाकूंशी जबर झुंज देऊन जय जखमी होतो. शेवटी पूल तोडण्यासाठी हातातल्या पिस्तुलाने बॉम्बवर गोळी झाडून, वीरूशी थोडंसं बोलून तो मरतो. वीरू जयला जमीनीवर ठेवतो तेव्हा त्याच्या हातात वीरूला नाणं सापडतं.
पण स्फोट करवताना तर जयच्या हातात पिस्तूल होतं... मग इतक्या धुमशानात ते नाणं हातात कसं काय... हां... वीरूची खणखणीत हाक ऐकून जयने लपवलेल्या जागेवरून उडी मारून ते स्वत:च जयच्या हातात विसावलं असावं... समजूतदार नाणं हो अगदी...

असो. "शोले"सारख्या अभिजात चित्रपटाच्या लेखनाबद्दल असं काही लिहिणं म्हणजे माती खाल्ल्यागतच आहे, पण मी फक्त माझे विचार मांडले बरं का...

@ अनिकेत परशुराम आपटे.

No comments:

Post a Comment