Saturday, 24 September 2022

तुझ्यावाचून काम होई ना...

"तुझं माझं जमेना... तुझ्यावाचून करमेना..." याच आशयाचं कथानक आहे १९९५ साली प्रदर्शित झालेल्या दिनेश गांधी प्रस्तुत "हम दोनों" या चित्रपटाचं...


मुंबईच्या श्रीमंत व्यावसायिक विक्रम सैगल (अलोक नाथ) यांची दोन मुलं असतात. मोठा मुलगा विशाल (नाना पाटेकर) रुक्ष, कोरडा आणि गंभीर असतो तर धाकटा राजेश ऊर्फ राजू प्रेमळ, आनंदी आणि विनोदी वृत्तीचा असतो. विशाल अवरस असतो तर राजू अनवरस. हे दोघंही एकमेकांना अपरिचित असतात. विक्रम सैगलचा अपघाती मृत्यू होतो आणि विशालवर आर्थिक संकट ओढवतं. संपत्तीतला काही हिस्सा राजूला मिळणार असेल तरच उरलेली संपत्ती विशालकडे जाईल अशी अट विक्रमच्या मृत्यूपत्रात असते...

तिथे प्रियंका (पूजा भट) नावाच्या श्रीमंत मुलीवर राजूचं प्रेम असतं. गरीब-श्रीमंत हा वाद समोर येतो आणि प्रियंकाला राजूपासून दूर करून मुंबईला नेलं जातं. आर्थिक विवंचनेतून वाचण्यासाठी विशालला राजूची गरज असते तर प्रियंकाला परत मिळवण्यासाठी राजूला विशालची मदत हवी असते. असे हे दोघे भाऊ एकत्रित मुंबई प्रवासाला सुरुवात करतात. हा प्रवासच या चित्रपटाचा मुख्य गाभा आहे...

चित्रपटाला आनंद-मिलिंद यांचं संगीत लाभलं आहे. गाणी तशी चांगलीच आहेत, पण त्यातल्या त्यात उदित नारायण आणि रविंद्र साठे यांनी गायलेली "कभी दुश्मन हैं कभी यार हैं हम दोनों...", "अंबर की चाँदनी... इसके चक्कर में आना नहीं..." ही दोन गाणी जास्त लक्षात राहतात. विशेषत: "अंबर की चाँदनी..." या गाण्याचं दुसरं कडवं. बदललेल्या चालीमुळे आणि टेंपोमुळे, शिवाय नाना पाटेकरांनी सादर केलेल्या नृत्यामुळे, रविंद्र साठे यांनी गायलेलं हे दुसरं कवडं अधिक भाव खाऊन जातं...

नाना पाटेकर आणि ऋषी कपूर यांच्याखेरीज अनेक कलावंतांनी चित्रपटात हजेरी लावली आहे. पण नाना पाटेकर आणि ऋषी कपूर यांच्या अदाकारीने चित्रपटाला खाऊन टाकलं आहे. चित्रपटाची गंभीर आणि हाणामारीची बहुतांश बाजू नाना पाटेकरांनी सांभाळली आहे तर रोमँटिक आणि हलकी-फुलकी बाजू ऋषी कपूरच्या वाट्याला गेली आहे. पण चित्रपटाची विनोदी बाजूत मात्र दोघांनीही बाजी मारली आहे. राजूचा मस्कऱ्या व खादाड स्वभाव आणि विशालचा रुक्ष स्वभाव व नीटनेटकेपणा, यांमुळे विनोदी भट्टी अप्रतीम जमली आहे. देहबोली आणि चित्रविचित्र हावभावांतून ऋषी कपूरने तर संवाद आणि गंभीर चेहेरा ठेवत नाना पाटेकरांनी अफाट विनोदनिर्मिती केली आहे...

१९८० ते १९९० या दशकात नाना पाटेकर-शफी इनामदारने "आवाम", "आज की आवाज" या चित्रपटांमध्ये, तर ऋषी कपूर-शफी इनामदारने "सागर", "दोस्ती दुश्मनी" या चित्रपटांमध्ये सह-कलावंत म्हणून काम केलं होतं. "हम दोनों"च्या निमित्ताने या जोड्या पुन्हा एकत्र आल्या. नाना पाटेकर आणि ऋषी कपूर कलावंत म्हणून पडद्यावर झळकले, पण शफी इनामदार मात्र लेखक-दिग्दर्शकाच्या दुहेरी भूमिकेत पडद्यामागे राहिले. "हम दोनों" शफी इनामदार यांच्या लेखणीतून साकारला आणि त्यांच्याच दिग्दर्शनाने सजला. बहुतेक दिग्दर्शक म्हणून हा त्यांचा पहिला आणि शेवटचा चित्रपट होता...

एकंदरीत, विशालला राजूची सही मिळेल का...?, राजू आणि प्रियंकाचं मिलन होईल का...? विशाल आणि राजू हे परस्पर विरोधी भाऊ एकमेकांना समजून घेतील का...? या सर्व प्रश्नांच्या उत्तरांसाठी आणि नाना पाटेकर व ऋषी कपूर यांच्या अभिनय जुगलबंदीसाठी, १९९५ सालचा "हम दोनों" हा चित्रपट पहाच...

चित्रपटाची Youtubeची लिंक: https://youtube.com/watch?v=txUcoSLZWsw&feature=share

@ अनिकेत परशुराम आपटे.

No comments:

Post a Comment