अग्नीअस्त्र, वायूअस्त्र, पर्जन्यास्त्र अशा अनेक अस्त्रांबद्दल आपण ऐकतो. या सर्व अस्त्रांमध्ये सर्वश्रेष्ठ अस्त्र म्हणजेच ब्रह्मास्त्र. याच ब्रह्मास्त्रासंदर्भात एक काल्पनिक कथानक समोर आलं आहे. ते काल्पनिक कथानक म्हणजेच अयान मुखर्जी दिग्दर्शित "ब्रह्मास्त्र", ज्याचा पहिला भाग आहे "शिवा..."
एका ठिकाणी शिवा नावाच्या एका डी.जे.ला काही स्वप्न पडतात. त्यात त्याला काही आकृत्या, काही दुष्ट ताकदी, एक अस्त्र आणि एका घटनेची झलक दिसते. त्याचवेळी दुसरीकडे त्याच दुष्ट ताकदी समोर येतात आणि शिवाने पाहिलेली घटना सत्यात उतरताना दिसते. शिवाला असाच दृष्टांत पुन्हा होतो, ज्यात दोन व्यक्तींचा जीव धोक्यात असल्याचं त्याला समजतं. शिवाकडे स्वत:कडे एक शक्ती सूप्त स्वरूपात आहे हेही त्याला समजतं. शिवा आणि त्याची मैत्रीण ईशा, त्या दोन व्यक्तींना वाचवण्यासाठी आणि त्या दुष्ट ताकदींचा सामना करण्यासाठी सज्ज होतात. हा आहे या चित्रपटाचा पूर्वार्ध. उत्तरार्ध मात्र, शिवामधली शक्ती जागृत होते का... त्या दोन व्यक्ती वाचतात का... त्या दुष्ट ताकदींचं काय होतं... या प्रश्नांची उत्तरं देत शेवटापर्यंत जातो...
चित्रपटाचं कथानक बऱ्याच अंशी "टर्मिनेटर सीरीज", "स्टार वॉर्स सीरीज", "अवेंजर्स सीरीज", "हॅरी पॉटर सीरीज" या हॉलिवूडपटांची आणि "बाहुबली सीरीज" या दाक्षिणात्य भारतीय पटाची आठवण करून देतं. कथानक पूर्ण काल्पनिक आहे. कुठल्याही पौराणिक कथेशी अगर घटनेशी याचा संबंध निदान मला तरी जाणवला नाही. कथानकात अनेक कच्चे दुवे आहेत. जी घटना शिवाला दिसली, त्या घटनेचा उगम का झाला... ती घटना आत्ताच का घडली... ज्या माध्यमातून त्या दोन व्यक्ती समोर येतात, त्या माध्यमापर्यंत त्या दुष्ट ताकदी कशा पोहोचल्या... या प्रश्नांची उत्तरं संपूर्ण चित्रपटात कुठेच आढळली नाहीत. चित्रपटांच्या काही दृष्यांमध्येही कमकुवतपणा जाणवतो. उदाहरणार्थ एखादी व्यक्ती उंचावरून पडल्यावर एकतर ती मरेल किंवा त्या व्यक्तीचे हात-पाय तरी मोडतील. पण ईशावर चित्रित झालेल्या अशाच दृष्यात तसं काही होत नाही...
चित्रपटाचं संगीत प्रीतम यांनी दिलं आहे. मोजकी तीनच गाणी आहेत चित्रपटात. गाणी चांगलीच आहेत. "केसरिया तेरा इश्क़ है पिया..." हे गाणं तर चित्रपट प्रदर्शित व्हायच्या आधीच जबरदस्त लोकप्रिय झालं. चित्रपटात वेळोवेळी येणारी ही गाणी वेळ खाऊ तर आहेतच, पण उगाच लांबी वाढते चित्रपटाची. शिवाय ही गाणी धावत्या कथेला लगाम घालण्याचंही काम करतात. त्यामुळे प्रेक्षक कथेपासून थोडे विचलीत होऊ शकतात. गाणं संपता संपता पुन्हा एखादा प्रसंग येतो आणि प्रेक्षक कथेशी समरस होईपर्यंत तो प्रसंग निघून जातो. त्याउलट जर गाणी नसती चित्रपट आधिक प्रवाहशील वाटला असता. संगीताप्रमाणेच पार्श्वसंगीत आणि ध्वनी संयोजन यांचा चित्रपटात मोलाचा वाटा आहे. वेगवेगळी अस्त्र वापरली जात असताना येणारे आवाज, होणारे स्फोट, गोष्टींची होणारी तोडफोड, यांसाठी वापरलेले ध्वनी असो किंवा प्रसंगानुरूप येणारं पार्श्वसंगीत असो, प्रत्येक वेळी सायमन फ्रँग्लेन यांनी कमाल केली आहे...
ध्वनी, संगीत आणि पार्श्वसंगीताप्रमाणेच, चित्रपटात वापरलेले VFX तंत्रज्ञान आणि थरार व हाणामारीची दृष्य कमालीची परिणामकारक आहेत. अनेकांचं म्हणणं पडलं, की प्रकाश योजनेचा अती वापर केलेला दिसतो. पण ती कथेची गरज होती. वेगवेगळ्या अस्त्रांना वेगवेगळी प्रकाश किरणं देऊन समोर आणल्याने कुठलं अस्त्र कसं काम करत आहे हे चटकन लक्षात येतं. चित्रपटात काही अस्त्र अशी आहेत जी दोन्ही बाजूंनी, म्हणजे सकारात्मक आणि नकारात्मक बाजूंनी वापरलेली दाखवली आहेत. अस्त्रांचा सकारात्मक वापर दाखवताना प्रकाश किरणं निळी किंवा शेंदरी असतात, तर अस्त्रांचा नकारात्मक वापर दर्शवताना तीच प्रकाश किरणं लाल रंगात समोर येतात. हा फरक बघण्यासारखा आहे. चित्रपटातली हाणामारीची दृष्य तर कमाल रंगली आहेत. शिवाय एकेक थरारक दृष्य तर 'edge of the seat' पठडीत मोडणारं आहे...
अशा प्रकारच्या चित्रपटात अदाकारीकडे फारसं लक्ष दिलं जात नाही. किंबहुना अभिनय दाखवावा अशी काहीच दृष्य असतात. या चित्रपटातही तसंच झालं आहे. तरीही कलावंतांनी त्यांच्या त्यांच्या व्यक्तिरेखांना न्याय दिलेला दिसतो. अमिताभ बच्चन नेहमीप्रमाणे सहज अभिनय करताना दिसतात. संवादात काही दम नाही, पण अमिताभ बच्चन यांचे उच्चार त्याच संवादांना उभारी देतात. अनेक वर्षांनी अमिताभ बच्चन आणि डिंपल कपाडिया एकत्र आलेत, पण डिंपल कपाडिया यांची व्यक्तिरेखा चित्रपटात का होती याचं कारण समजलं नाही. मनमौजी शिवा ते गोंधळलेला शिवा आणि प्रेमात पडलेला शिवा ते दुष्ट ताकदींविरुद्ध लढायला सज्ज झालेला शिवा, हे फरक रणबीर कपूर यांनी खूपच सहज आणि सुरेख दर्शवले आहेत. आलिया भटनेही ईशा छान साकारली आहे. मुख्य म्हणजे बटबटीत मेकप न करता त्या चित्रपटभर छान दिसल्यात आहेत. हटके आणि अप्रतीम अदाकारी दिसते ती मौली रॉय यांची. चित्रपटात मातब्बर आणि लोकप्रिय कलावंतांची फौज असताना मौली रॉय यांनी त्यांच्या वाट्याला आलेली नकारात्मक भूमिका जबरदस्त वठवली आहे...
एकंदरीत, बिग बिजेटचा, अप्रतीम VFXने सजलेला अयान मुखर्जी कृत "ब्रह्मास्त्र" ज्याचा पहिला भाग "शिवा", बॉलीवूडला तारेल की बुडवेल ते नाही माहीत. पण सर्वांनी केलेल्या प्रयत्नांसाठी हा चित्रपट एकदा तरी थियेटरमध्येच पहावा आणि तोही चष्मे लावूनच...
@ अनिकेत परशुराम आपटे.
No comments:
Post a Comment