"खुशी के गाने बिलकुल फुलझड़ियों की तरह होते हैं, जलतेही बुझ जाते हैं | लेकिन उदासी, उदासी तो अगरबत्ती की तरह देर तक जलती है, और बुझने के बाद भी महकती रहती है |" बावर्ची चित्रपटातला राजेश खन्ना यांनी म्हटलेला हा संवाद ऐकला आणि sad songsबद्दलचा माझा दृष्टीकोन बदलला. आजवर अनेक हिंदी चित्रपटांमध्ये अनेक sad songs माझ्या ऐकण्यात आली पण त्यातही, 'दिल को छू जाए...' असं एक सुंदर गाणं आहे...
"नाराज़ सवेरा है..." - संघर्ष...
रीत ओबेरॉय जेव्हा अमन वर्मा नावाच्या कैद्याला भेटायला जेलमध्ये जाते, तेव्हा भेट होण्याआधी अमनच्या तोंडी हे गाणं दिलं गेलं आहे. पोलीस स्टेशनच्या कार्यालयापासून कोठड्यांपर्यंतच्या अंधाराला घाबरणाऱ्या रीतच्या प्रवासात हे गाणं सुरू राहतं. गाण्याचे बोलही किती अर्थपूर्ण आहेत बघा...
नाराज़ सवेरा है... हर ओर अंधेरा है...
कोई किरन तो आए कहींसे... आए... आए...
अमनच्या रूपात गीतकार म्हणतो, "आज कुठे आहे मी... सकाळ मला दुरावलेली आहे. प्रकाश कुठे दिसत नाही. कधीतरी आशेची एक किरण तरी येऊ देत जवळ... एखादा कवडसा तरी दिसू देत मला..." मुखड़ा ऐकत ऐकत आपण पहिल्या कडवाजवळ येतो...
ज़िंदगी तनहाइयों का... दर्द है नाम है...
हर खुशी ढलती हुई... दुखभरी शाम है...
साँसों के खजानों का... यह वक्त लुटेरा है...
म्हणजे, "मी इथे एकटाच माझं आयुष्य वेचतो आहे. माझ्यासाठी आयुष्याचं दुसरं नावच एकटेपणा झालं आहे. माझ्याकडे अमाप श्वास आहेत, पण ही वेळ हळुहळू ते घेऊन जात आहे आणि मी मात्र ते पाहत बसण्याखेरीज काहीच करू शकत नाही..." पहिलं कडवं संपता संपता रीत कोठड्यांपर्यंत पोहोचते. कुठल्या कोठडीत अमनला ठेवलं आहे हा विचार करतानाच कोपऱ्यातल्या कोठडीची सळी पकडायला एक हात येतो आणि दुसरं कडवं सुरू होतं...
रात की ख़ामोशियों में... अनसुना शोर है...
खींचती बाँधे बिना ही... कौनसी यह डोर है...
बेजान सलाखों ने... मेरी रूह को घेरा है...
ख़ामोशी म्हणजे शांतता आणि शोर म्हणजे आवाज. गीतकार म्हणतो, "या शांततेत आवाज तर येत आहे, पण तो इतर कोणालाच नाही, तर फक्त मलाच ऐकू येत आहे आणि त्या आवाजाकडे मी ओढला जात आहे. मला यातून बाहेर पडायचं आहे, पण या शरीराच्या तुरुंगात मी कैद झालो आहे..." कोठडीभर अमनची सावली वावरत राहते आणि तिसऱ्या व शेवटच्या कडव्याला सुरुवात होते...
वह मेरे बचपन का मौसम... वह ज़माना खो गया...
मौत के साये में रहकर... बेज़ुबान मैं हो गया...
ज़ख्मों की ज़मीनोंपर... ज़ुल्मों का बसेरा है...
काय म्हणतो पहा गीतकार, "लहानपाणीचे ते दिवस कुठल्याकुठे विरून गेलेत. सतत अवती-भोवती घोंघावणारा मृत्यू पाहता पाहता माझे शब्दही गोठलेत. इतके अत्याचार झाले या मनावर की तिथे आघातांचं एक नवं जगच तयार झालं आहे..." चित्रपट जेव्हाही दाखवला गेला, तेव्हा हे तिसरं कडवं मला ऐकता आलं नाही पण बालमनावर किती जुलूम झाले असावेत याची ग्वाही हे शब्द नक्कीच देतात...
समीर साहेबांच्या या सुंदर शब्दांना जतीन-ललित या जोडगोळीने संगीतबद्ध केलं आणि कुमार सानू यांनी त्यांच्या सुरेल स्वरांनी तर या गीताला चार चाँदच लावले. धीम्या गतीने सादर होणाऱ्या या गीताचं चित्रिकरणही तितकंच सुरेख झालं आहे. Dim lights व सावल्यांचा सुंदर वापर यात दिसतो. काहीतरी मागणारा तो अमनचा हात आणि गाणं संपेपर्यंत जागोजागी दिसणारी त्याची सावली, यांमुळे गाण्याला वेगळाच रंग चढला...
उदासवाणं असतानाही कितीही वेळा ऐकून कमीच असं, "संघर्ष" या चित्रपटातलं, "नाराज़ सवेरा है..." हे, ऐकल्यानंतरही उदबत्तीसारखं दरवळणारं गाणं, अत्यंत सुंदर आहे...
@ अनिकेत परशुराम आपटे.
https://www.youtube.com/watch?v=KMOM9mGbc_w&feature=share
No comments:
Post a Comment