अंगूर...
'विलियम शेक्सपियर', हे नाव सर्वांनाच ज्ञात आहे. त्यांच्याच अप्रतीम लेखणीतून साकारलं होतं एक सुंदर नाटक, ज्याचं नाव होतं, "Comedy of errors". या नाटकावर बेतली होती ईश्वरचंद्र विद्यासागर यांची, "भ्रांतीबिलास" ही कादंबरी. याच कथेवर आधारित दोन चित्रपट उदयाला आले. एक होता १९६८चा किशोर कुमार अभिनीत, "दो दुनी चार" आणि दुसरा होता संजीव कुमार व देवेन वर्मा अभिनीत, १९८२ सालचा, "अंगूर..."
"अंगूर" या चित्रपटाला कथा अशी नव्हती. तो होता दीड दिवसाचा, दोन समान दिसणाऱ्या जोड्यांच्या एकत्रित आल्याने झालेला गोंधळ. अशोक (संजीव कुमार) आणि बहादुर (देवेन वर्मा) कामानिमित्त शहरात येतात. त्याच शहरात दुसरा अशोक (संजीव कुमार) आणि दुसरा बहादुर (देवेन वर्मा) राहत असतात. हे चौघंही वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळ्या ठिकाणी एकमेकांना व इतर शहर वासियांना भेटत राहतात आणि हलके-फुलके विनोद निर्माण होत राहतात...
चित्रपटाचा गाभा आहे चारही व्यक्तिरेखांच्या आपापसात भेटण्याच्या प्रसंगांमधला विनोदी गोंधळ आणि तो गोंधळ आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली गेलेली एक खास धुन. चित्रपट जसा पुढे सरकत जातो, तसं आपल्याला समजत जातं, की ही धुन वाजली म्हणजे अशोक किंवा बहादुर बदलले. मुख्य कलावंतांखेरीज मौशमी चॅटर्जी, दिप्ती नवल, अरुणा इराणी, पद्मा चौव्हाण, यूसुफ परवेज, त्रिलोक कपूर, सी. एस. दूबे, टी. पी. जान, या कलावंतांनीही कथेला छान साथ दिली आहे...
चित्रपटातल्या दोन गोष्टी मला जरा खटकल्या. पहिली गोष्ट म्हणजे राम मोहन यांनी साकारलेला टॅक्सी चालक. संपूर्ण चित्रपटात, टॅक्सी चालकाच्या या व्यक्तिरेखेचा कथेशी किंवा कथेतील पात्रांशी काहीच संबंध येत नाही. केवळ एक साधन म्हणून त्या टॅक्सीचा वापर झाला आहे. टॅक्सीसोबतसुद्धा जर एखादा प्रसंग दाखवता आला असता तर कदाचित एकाच कलाकाराच्या सतत समोर येण्याला आधार मिळाला असता. अर्थात, परत परत भेटूनही अशोकचं मन आणि बुद्धी त्या टॅक्सी चालकावर विश्वास ठेवत नाही हे दाखवण्याचं प्रयोजन असावं बहुतेक...
मला खटकलेली दुसरी गोष्ट म्हणजे चित्रपटातील गाणी. चित्रपटात तीनच गाणी आहेत. गुल्ज़ार साहेबांच्या शब्दांना पंचमदांनी अप्रतीम संगीत दिलं आहे आणि आशाताईंनी आपल्या स्वरांनी गाण्यांना चार चाँद लावले आहेत. "रोज़ रोज़ डाली डाली..." हे गाणं प्रासंगिक आहे, पण "होठों पे बीती बात..." आणि "प्रीतम आन मिलो..." ही दोन गाणी, मात्र चित्रपटाची फक्त लांबी वाढवतात असं माझं मत आहे. गाण्यांऐवजी एखादा विनोदी प्रसंग छान जमून गेला असता...
चित्रपटातल्या चारही मुख्य व्यक्तिरेखांना वेगवेगळे स्वभाव दिले गेले आहेत. बाहेरून आलेला अशोक चांगलाच संशयी, सिग्रेट पिणारा आणि सावधपणे वागणारा आहे तर शहरातला अशोक दारू पिणारा व थोडा तापट डोक्याचा दाखवला आहे. बाहेरून आलेला बहादुर भांग पिणारा आणि थोडा चलाख आहे तर शहरातला बहादुर थोडासा भोळा आणि भावनिक आहे. संजीव कुमार व देवेन वर्मा या दोघांनीही चारही व्यक्तिरेखांमधील फरक खूपच छान रंगवला आहे...
एकंदरीत, विलियम शेक्सपियर यांच्या, "Comedy of errors" या नाटकाशी साधर्म्य असलेला पण तरीही वेगळा वाटणारा गुल्ज़ार साहेबांचा "अंगूर" हा, डोक्याला शॉट न देणारा, हलका-फुलका विनोदी चित्रपट आहे हे नक्की...
@ अनिकेत परशुराम आपटे.

No comments:
Post a Comment