Thursday, 27 April 2023

डिजिटल त्रिटक...

त्रिटक... त्रिटक म्हणजे, एकाच रंगमंचावर एकामागून एक येणाऱ्या तीन नाटकांचा समुह. आणि नाटकांना digitalize करून रंगमंचावर साकारण्याचा आगळा-वेगळा प्रकार म्हणजेच डिजिटल नाटक. नाट्यक्षेत्रातील हा वेगळा प्रकार अनुभवायचा, म्हणून तीन धमाल बालनाटकं पाहण्याचा योग आला. ती नाटकं होती, "नाटू नाटू", "जादूचा दिवा", "हिमगौरी आणि सात बुटके..."


नाटू नाटू...

नाटू नाटू नावाचा एक राजा, ज्याच्या डोक्याला त्याचाच मुकूट चिकटून बसतो. तो मुकूट काढण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात ज्यातून विनोद निर्मिती होते. खरंतर राजाच्या डोक्याला चिकटलेला मुकूट आणि तो वेगळा करण्यासाठीचे चाललेले प्रयत्न, यातच कथानक अजून फुलवता आलं असतं. पण या कथाभागाला तुकड्या-तुकड्याने दाखवत, प्रधान-विदुषक-पंडित आणि राणी यांचं कनेक्शन दाखवण्यात जास्त प्रसंग खर्ची पडले...

विदुषकाला दिलेली "राणीसाहेब..." ही ललकारी, "मोरूची मावशी" या नाटकातल्या "राणीसाहेब..." या ललकारीशी मिळती-जुळती होती. नाटकातले विनोदी पंचेस आणि त्यांचं टायमिंग छान जमलं होतं. विदुषकाला काही क्लृपत्या दिल्या असत्या, आणि त्याची एंट्री नाट्यरसिकांमधून झाली असती तर कदाचित त्या पात्राला अजून उठाव आला असता. नाटकाचा शेवट ठिक होता, पण ज्या गोष्टीमुळे ते नाट्य घडलं, त्यावरच शेवट व्हायला हवा होता. चिकटलेला मुकूट निघाल्यानंतर झालेल्या गोष्टीमुळे राजाला बसलेला धक्का, इथेच नाटक फ्रीज़ होऊन संपवलं असतं तर अधिक परिणामकारक वाटलं असतं...

जादूचा दिवा...

लाडोबा नावाचा एक मुलगा, ज्याला अभ्यासाचा कंटाळा येत असतो. मोठी माणसं आपल्याला उगाच रागावतात असंच त्याला वाटत राहतं. त्याला एक जादूचा दिवा सापडतो. त्या दिव्यातल्या जिन्नच्या मदतीने लाडोबा स्वत:ला राजा आणि सर्व मोठ्यांना आपले गुलाम बनवतो. अशातच एक भूत तिथे येतं. नाटकात दोन गोष्टी महत्वाच्या होत्या. एक होती, तो दिवा आणि जिन्नने केलेली जादू, दुसरी गोष्ट होती नाटकाच्या अगदी शेवटी शेवटी येणारं भूत. या दोन्हीही गोष्टी तितक्याशा खुलवता आल्या नाहीत. जिन्नची एकच जादू दाखवली गेली. ती म्हणजे लाडोबाचा राजा होणं. अजून काही जादू, जसं की जिन्नने मंत्र म्हटल्यावर प्रेक्षकांमधून येणारा एखादा बॉल दाखवला असता तर अजून मजा आली असती. तसंच भूत. नाटकात भुताला फक्त एकदाच दाखवलं गेलं आणि ते ही २-३ मिनिटं. त्या भुताची व्यक्तिरेखा अधोरेखित करून मग लाडोबाशी सामना दाखवला गेला असता तर छान रंगतदार शेवट झाला असता...

नाटकात लहानग्यांसाठी दोन छान संदेश आहेत. एक म्हणजे आपण आपल्या मोठ्यांचा आदर करावा. आपले मोठे जर रागवत असतील तर ते आपल्या भल्यासाठीच असतं हे लक्षात ठेवावं. दुसरा संदेश सांगतो, की अभ्यासच आपल्याला मोठं करतो तेव्हा त्याला डावलू नये. लहानांसोबतच मोठ्यांनाही एक मोलाची शिकवण हे नाटक देतं. ती शिकवण म्हणजे, लहानांना मारून-मुटकून गोष्टी घडत नाहीत. थोडा वेळ दिला, लहानांना समजून घेतलं तर गोष्टी आपोआप सुकर होतात...

हिमगौरी आणि सात बुटके...

चेटकीणीपासून वाचत जंगलात हरवलेली एक गोड सुंदर राजकन्या हिमगौरी, तिला भेटलेले सात बुटके, चेटकीणीचा आरसा, राजकुमार आणि सुखांत, हे कथानक सर्वांनाच माहित आहे. एखादं जुनं कथानक नव्याने समोर येत असताना सादरीकरण फार महत्वाचं असतं. या नाटकात वर्तमानकाळ आणि भूतकाळ यांची सांगड घालत कथा पुढे जात असल्याने त्यात नाविन्य जाणवतं...

नाट्यरसिकांना गुंतवून ठेवण्यात या नाटकाने चांगलीच बाजी मारली आहे. रसिकांमधून येणारी चेटकीण आणि टिवल्या-बावल्या करत रसिकांमधूनच धावत येणारे सात बुटके यांनी धमाल आणली. विशेषत: लहान मुलांना त्या बुटक्यांशी खेळणं, हात मिळवणं चांगलंच आवडत होतं. कथेनुरूप वापरल्या गेलेल्या कपड्यांच्या रंगसंगतीमुळे नाटक आधिक खुलत होतं. हिमगौरीचा पांढराशुभ्र पण साधा पोशाख विशेष लक्ष वेधत होता. छान सुरुवात आणि एक गोड सुखांत, यांमुळे जुन्या विषयावर नव्याने आलेलं हे नाटक छान रंगलं...

गाणी...

तीनही नाटकात, मराठी व हिंदी चित्रपटांमधली काही निवडक गाणी घेऊन त्यावर प्रसंग दाखवले गेले आणि नृत्य ही सादर झाली. काही गाण्यांची निवड चपखल होती. पण काही गाणी मात्र तिथे का होती हाच प्रश्न पडला. उदाहरणार्थ "जादूचा दिवा" नाटकात 'लल्लाटी भंडार...' हे गाणं घ्यायची खरंतर गरज नव्हती. पण ते तिथे आल्याने तेव्हा चाललेल्या प्रसंगाचं महत्व कमी झालं. गाण्यांची निवड जरी योग्य असली, तरी ती जरा अवास्तव वाटली. त्यामुळे मुख्य कथानकांत अडथळे येत होते किंवा व्यत्यय येत होता. अर्थात लहानग्यांना संगीत आणि नृत्य पसंत असतात. पण तासाभराच्या नाटकात एखादं गाणं चालून गेलं असतं. शिवाय कथानकांना अजून खुलवता आलं असतं...

तंत्रज्ञान...

तीनही नाटकांसाठी वेगळेपण ठरलं ते म्हणजे नाटकात वापरलेलं डिजिटल तंत्रज्ञान. "नाटू नाटू" मध्ये या तंत्रज्ञानाला तितकासा वाव नव्हता. जे एकमेव डिजिटल दृश्य दाखवलं गेलं, ते कथेशी समरस वाटत नव्हतं. "जादूचा दिवा" मध्ये जादूच्या दिव्यामुळे निर्माण होणारे चमत्कार आणि नाटकाच्या शेवटी येणारं भूत, या दोन्हीही गोष्टी तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक परिणामकारक झाल्या असत्या. पण इथेही तंत्रज्ञानाचा म्हणावा तसा वापर झालेला दिसत नाही. पडद्यावर अवतरलेलं भूत गायब होतं आणि प्रेक्षकांमध्ये कुठेतरी प्रकटतं, असं काही दाखवलं असतं तर अधिक मजा आली असती. डिजिटल तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर दिसला, तो "हिमगौरी आणि सात बुटके या नाटकात. पडद्यावर प्रकटलेली उडणारी चेटकीण गायब होते आणि अचानक रसिकांमधून दिसते, हा कथाभाग बघण्यासारखा होता. अर्थात, चेटकीणीच्या आरशालाही digitalize केलं असतं तर ते बघायला छान वाटलं असतं. "हिमगौरी आणि सात बुटके" या नाटकाचं कथानक परिचित होतं, पण कथेला उभारी मिळाली, ती डिजिटल तंत्रज्ञानाच्या चोख वापरामुळे...

डिजिटल तंत्रज्ञानाच्या वापराचा मुख्य फायदा तीनही नाटकांच्या नेपथ्याला झाला. नेपथ्य म्हणजे नाटकात वापरलेले सेट्स. "नाटू नाटू" मधलं राजाचं शयनगृह, बाग आणि राजवाडा, "जादूचा दिवा" मधलं घर आणि जंगल, "हिमगौरी आणि सात बुटके" मधलं जंगल, राजवाडा, बुटक्यांचं घर, या सर्व सेट्समधले काही भाग डिजिटल पद्धतीने पडद्यावर हलत्या चित्रांच्या रूपात आल्याने तीनही नाटकांना 3D लुक प्राप्त झाला हे मात्र खरं. एकंदरीत, गंधार निर्मित, "नाटू नाटू", "जादूचा दिवा", "हिमगौरी आणि सात बुटके" हे डिजिटल त्रिटक म्हणजे लहानग्यांना मनोरंजनाची धमाल मेजवानीच आहे...

@ अनिकेत परशुराम आपटे.

No comments:

Post a Comment