Tuesday, 18 April 2023

मजेशीर खिचडी...

जी प्रेयसी, तीच खरी स्वयंपाकिण. जी स्वयंपाकिण, तीच खरी मैत्रिण. जो मित्र, तो खरा कारकून. जो डॉक्टर, तोच खरा उपवर. अशी धमाल दिसते १९८९ साली प्रदर्शित झालेल्या, "धरलं तर चावतंय" या चित्रपटात...


राजा (अशोक सराफ) आपल्या आई-वडिलांना वचन देतो, की त्याच्या बहिणीचं, नयनचं (अल्का कुबल) लग्न लावल्याशिवाय तो स्वत: लग्न करणार नाही. राजा नयनच्या लग्नाच्या खटपटीत असताना नयनचं राजाच्याच ऑफिसमध्ये काम करणाऱ्या मोहनवर (लक्ष्मीकांत बेर्डे) प्रेम असतं. इकडे राजाही अश्विनीच्या (रेखा राव) प्रेमात पडलेला असतो. अश्विनी सारखं लग्नासाठी विचारत असताना राजापुढे नयनच्या लग्नाचा पेच असतो. अशातच डॉ. प्रह्लाद टोणगे (दिलीप प्रभावळकर) या अमेरिकेत स्थाईक भारतीय डॉक्टरचं स्थळ नयनसाठी सांगून येतं...

डॉ. प्रह्लादच्या विनंतीला मान देऊन राजा त्याला घरी रहायला बोलावतो. तिथे राजाला भेटायला मुंबईला आलेली अश्विनी पावसामुळे मुंबईतच अडकते आणि राजाच्याच घरी राहण्याचा हट्ट धरते. प्रेयसीचा हट्ट म्हणून राजा अश्विनीला होकार देतो. नयनपुढे अश्विनीचं सत्य उघड होऊ नये म्हणून मोहनशी हातमिळवणी करून त्याला घरी बोलवून राजा एक प्लॅन बनवतो. दुसरीकडे नयनने मागवलेली एक स्वयंपाकिणही (प्रिया अरूण) घरी येते. त्या स्वयंपाकिणीचं नावही अश्विनीच असतं. एकेक करून त्या घरात सहा जण जमा होतात आणि समज-गैरसमजाचा गमतीशीर खेळ सुरू होतो...

चित्रपटाचं संगीत श्रवणीय आहे, पण लक्षात राहतील असे शब्द क्वचितच आहेत. त्यातल्या त्यात, "हळू बोल राजा तुझा वाजवीन बाजा..." हे गाणं छान रंगलं आहे. चित्रपटात असलेलं पार्श्वसंगीत कथेप्रमाणेच मजेशीर आहे. कथेच्या प्रवाहाला ते पार्श्वसंगीत चांगली साथ देतं. चित्रपटाची दुसरी जमेची बाजू म्हणजे कलावंत आणि अदाकारी. अशोक-लक्ष्या-दिलीप हे त्रिकूट पहिल्यांदाच एकत्र दिसलं. त्या तिघांची दृष्यांमधली देवाण-घेवाण अप्रतीम होती. अशोक-लक्ष्या ही अर्थातच धमाल जोडी आहे, पण दिलीप प्रभावळकरांची जोड मिळाल्यामुळे विनोदी दृष्यांना अजून बहर येतो...

दिलीप सरांची डॉ. प्रह्लाद टोणगे ही व्यक्तिरेखा छान रंगली आहे. त्या व्यक्तिरेखेत, "तो मी नव्हेच" या नाटकातल्या दिवाकर दातार आणि "हसवा फसवी" या नाटकातल्या प्रिन्स वाणटुंग पिंगपिंग या दोन व्यक्तिरेखांची झलक दिसून येते. अल्का कुबल यांना गंभीर भूमिकेत पाहण्याची सवय असल्याने विनोदी भूमिकेत पाहताना थोडं वेगळं वाटतं. पण ही भूमिकाही त्यांनी तितकीच छान साकारली आहे. प्रिया अरूण यांनी त्यांच्या वाट्याला आलेली भूमिका चोख वठवली आहे. एका बिन्धास्त मुलीचं व्यक्तिमत्व त्यांनी चांगलं सादर केलं आहे...

चित्रपटात दिलीप प्रभावळकर आणि प्रिया अरूण यांचं दुसरं एकत्रित दृष्य समोर येतं तेव्हा कथेत असलेल्या एका रहस्याची लगेच उकल होते. मुख्य पात्रांखेरीज, एका रिसेप्शनिस्टची व्यक्तिरेखा चित्रपटात आहे. चित्रपटात दोन वेळा अगदी मिनिटभरासाठी दिसलेल्या या व्यक्तिरेखेला दुहेरी व्यक्तिरेखेची जोड नसती दिली तरी चाललं असतं. उलट एकच व्यक्तिरेखा समोर ठेऊन त्यातच विनोदनिर्मिती अधिक खुलवता आली असती...

आपल्या आई-वडिलांना दिलेलं नयनच्या लग्नाचं वचन राजा पूर्ण करतो का... अश्विनी या नावामुळे झालेला गोंधळ निस्तरतो का... नयनचं लग्न मोहनशी होतं की डॉ. प्रह्लादशी... या प्रश्नांची उत्तरं जाऊन घेण्यासाठी आणि समज-गैरसमजातून निर्माण झालेल्या मजेशीर विनोदी खिचडीचा आस्वाद घेण्यासाठी श्रीनिवास भणंगे लिखीत व दिग्दर्शित, "धरलं तर चावतंय" हा चित्रपट पहाच...

@ अनिकेत परशुराम आपटे.

No comments:

Post a Comment