Tuesday, 15 November 2022

जिद्दीचा प्रवास...

मनात जिद्द असेल, समोर ध्येय असेल तर आपण कुठलीही उंची गाठू शकतो... हाच संदेश देणारा चित्रपट आहे सूरज बरजातिया दिग्दर्शित "ऊँचाई..."

फारा दिवसांनी, नव्हे अनेक महिन्यांनी राजश्री प्रोडक्शन्स आणि सूरज बरजातिया ही नावं पुन्हा रुपेरी पडद्यावर दिसली. लौकिकाला साजेशी खेळी करत याही वेळी सूरज बरजातिया कौटुंबिक चित्रपट घेऊन आले. पण कथा मात्र वेगळ्या धाटणीची. आपल्या मित्राची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी तीन मित्र एव्हरेट बेस कँप ट्रेकला जाण्याचा निर्णय घेतात. स्वत:ची दु:ख, प्रतिकूल परिस्थिती, शारीरिक क्षमता या सगळ्यांवर मात करून हे तीन मित्र हा ट्रेक कसा पूर्ण करतात याची ही कथा...

सूरज बरजातियाच्या कुठल्याही चित्रपटाप्रमाणेच याही चित्रपटाचं संगीत छान जमलंय. "केटी को...", "वह लड़की पहाडी़...", "ज़िंदगी को हां कर दे...", "अरे ओ अंकल...", "देखो सवेरा पूछे जाना हे कहां...", सर्वच गाणी चांगली आहेत. पण मला सर्वात जास्त आवडलेलं गाणं म्हणजे "ज़िंदगी को हां कर दे..." या गाण्यात एक सकारात्मक विचार दिसून येतो. अमित त्रिवेदी यांनी कथेला साजेसं संगीत दिलं आहे. विशेष म्हणजे, उगाच गाणं आलं असं कुठेही वाटत नाही. या शिवाय, चित्रपटात किशोर कुमार यांनी गायलेल्या, "यह जीवन है... इस जीवन का... " या गाण्याच्या काही ओळी पुन्हा पुन्हा येत राहतात. वेगवेगळ्या प्रसंगी येणाऱ्या त्या ओळी वेगवेगळ्या भावना दर्शवतात...

कथानक म्हणजे खरंतर एक प्रवास आहे. सर्व व्यक्तिरेखांसोबत घडत जाणाऱ्या छोट्या उपकथानकांमधून हा प्रवास उलगडत जातो. एखाद-दुसरं उपकथानक सोडलं, तर बाकी उपकथानकांमुळे कथा मुख्य विषयापासून बऱ्याच ठिकाणी भरकत जाते. कथेचा मुख्य गाभा आहे चित्रपटातली शेवटची पन्नास मिनिटं. तो ट्रेक, तिथलं ते वातावरण, बदलत जाणारा प्रदेश, हेलिकॉप्टरने घेतलेले जबरदस्त लाँग शॉट्स, डोंगराळ प्रदेशात चढणीवर घ्याव्या लागणाऱ्या काळजीबद्दलची दृष्यांगणिक मिळत जाणारी माहिती, बर्फाच्छादित पर्वत शिखरं, हे सगळंच खूप मनोरम आहे. कलावंतांचा मेकपही प्रसंगानुरूप छान जमून गेला आहे...

सूरज बरजातियाच्या चित्रपटातली अजून एक विशेष गोष्ट म्हणजे चित्रपटातले कलावंत. या वेळी अमिताभ बच्चन, अनुपम खेर, बोमन इराणी, नीना गुप्ता, सारिका अशा मातब्बर आणि तगड्या कलावंतांची फौज आहे. अनुपमजी आणि बोमनजी, हे दोघंही त्या त्या व्यक्तिरेखांना न्याय देताना दिसत नाहीत असं माझं तरी मत आहे. बोमनजींची आत्ताची भूमिका, त्यांच्या "शिरीन-फरहाद की तो निकल पड़ी" या चित्रपटातल्या त्यांच्या भूमिकेशी मिळती-जुळती वाटली. अनुपमजी "द कश्मीर फाइल्स" मधल्या त्यांच्या भूमिकेतच अडकल्यासारखे वाटतात. अमितजींना जरा जास्त फुटेज मिळाल्यासारखं वाटतं. चित्रपटात एक नायक आहे असं नाही, पण अमितजींना मिळालेल्या सीन्समुळे सरते शेवटी तेच चित्रपटाचे नायक आहेत असं वाटतं...

चित्रपटातले तीन कलावंत विशेष भाव खाऊन जातात. सारिका, ज्या अनेक वर्षांनी पडद्यावर दिसल्या. परिणीती चोपड़ा, ज्यांनी कसलेल्या कलावंतांसोबत काम केलं आणि डॅनी डेंझाँग्पा, ज्यांची भूमिका एकदम छोटी होती. चित्रपटातल्या तीन मुख्य व्यक्तिरेखांना जरा मागे सारत, डॅनी, सारिका आणि परिणीती या तिघांनी त्यांच्या त्यांच्या भूमिका चोख वठवल्या आहेत. चित्रपटात बऱ्याच वर्षांनी अमिताभ-सारिका आणि अमिताभ-डॅनी या जोड्या दिसल्या. त्यांच्यामधली केमिस्ट्रीही छान जमली आली...

एकंदरीत, थोड्याशा धीम्या गतीने चालणारा हा कौटुंबिक चित्रपट म्हणजे, जिद्द आणि ध्येयाचा मैत्रीपूर्ण प्रवासच आहे असं म्हणायला हरकत नाही. डॅनी आणि परिणीतीसाठी अभिषेक दिक्षीत लिखीत "ऊँचाई" हा चित्रपट एकदा तरी पहावाच...

@ अनिकेत परशुराम आपटे.

Saturday, 12 November 2022

गोंडस हसणारी अप्सरा...

"आय लव यू क...क...क...किरन..." "डर" चित्रपटातला शाहरुख़ ख़ानच्या कापऱ्या आवाजातला हा संवाद ऐकला की एकच व्यक्ती डोळ्यांसमोर येते. ती म्हणजे प्रसिद्ध अभिनेत्री जुही चावला...

मुंबईत आपलं शिक्षण पूर्ण करताना जुहीने १९८४ सालची 'मिस इंडिया' स्पर्धा जिंकली. त्यानंतर थोड्याच काळात जुहीला बी.आर.चोपड़ा यांच्या "महाभारत" या मालिकेत द्रौपदीच्या भूमिकेसाठी विचारणा झाली. पण ती संधी जुहीच्या हातून गेली. १९८६ साली प्रदर्शित झालेल्या "सलतनत" या मल्टी स्टारर चित्रपटातल्या छोट्या भूमिकेद्वारे जुही चावलाने रुपेरी पडद्यावर पहिलं पाऊल ठेवलं. तो चित्रपट यथातथाच चालला आणि इतर कलावंतांच्या भाऊगर्दीत जुहीचा अभिनय थोडा झाकोळला गेला. १९८८ साली प्रदर्शित झालेल्या "क़यामत से क़यामत तक" या चित्रपटात मुख्य नायिका म्हणून जुहीला संधी मिळाली. त्या भूमिकेसाठी जुहीला प्रशंसा तर मिळालीच, पण सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्म फेयरचा पुरस्कारही मिळाला...

अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमधून झळकत जुहीने आपला जम बसवला. हिंदी चित्रपटातही "लव्ह लव्ह लव्ह", "स्वर्ग", अशा चित्रपटांमध्ये दुय्यम भूमिकांमध्ये दिसणाऱ्या जुहीला १९९० साली प्रदर्शित झालेल्या "प्रतिबंध" चित्रपटातल्या तिच्या भूमिकेने प्रसिद्धी मिळवून दिली. ते दशक जुही चावलासाठी सोन्याचा काळ ठरलं. "राजू बन गया जंटलमॅन", "हम हैं राही प्यार के", "डर", "नाजायज़", "येस बॉस" अशा अनेक हिट चित्रपटांमध्ये जुहीचा अभिनय खुलला. "हम हैं राही प्यार के" या चित्रपटातल्या 'वैजयंती'च्या व्यक्तिरेखेसाठी जुहीने घेतलेली मेहनत फळाला आली. प्रेक्षकांनी ती भूमिका उचलून धरलीच, पण त्या वर्षाचा फिल्म फेयरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही जुहीला याच भूमिकेसाठी मिळाला...

जुहीचं विनोदाचं टायमिंगही छान होतं. जुहीचा बोलका चेहेरा, विनोदी हावभाव यांमुळे "बोल राधा बोल", "इश्क़", "लोफ़र", "मि. एँड मिसेस खिलाड़ी" अशा चित्रपटांमध्ये जुहीवर चित्रित झालेल्या विनोदी दृष्यांना अधिक बहार आली. विनोदासोबतच "आइना", "दरार", "लुटेरे", "अर्जून पंडित", "साजन का घर" अशा काही चित्रपटांमधून जुहीने गंभीर स्वरूपाच्या भूमिकाही साकारल्या. काही चित्रपट चालले तर काही अपयशी ठरले. पण जुहीच्या कामाचं कौतुक झालं. "वन टू का फोर", "गुलाब गँग", "तीन दिवारें", "ख़ामोश - ख़ौफ़ की रात" अशा चित्रपटांत जुहीच्या अभिनयाचे वेगळे पैलूही पहायला मिळाले. "गुलाब गँग" दोन गोष्टींसाठी लक्षात राहिला. याच चित्रपटात जुहीने पहिल्यांदाच माधुरी दिक्षीत-नेने यांच्यासोबत काम केलं. नकारात्मक छटा असलेल्या व्यक्तिरेखेतही जुही पहिल्यांदाच दिसली...

जुहीने रुपेरी पडद्यावर अनेक पुरूष कलावंतांसह जोड्या जमवल्या. त्यातही आमिर ख़ान, सन्नी देवल आणि शाह रुख़ ख़ान यांच्या समवेत जुहीची जोडी अधिक छान बहरली. शाह रुख़ ख़ानसोबत जुहीने पडद्यावरच नाही, तर पडद्याबाहेरही दोन वेगळ्या प्रकारच्या जोड्या जमवल्या. एक होती 'ड्रीम्ज अनलिमिटेड' ही निर्मिती संस्था. या संस्थेकडून निर्मितीक्षेत्रातही हात आजमावत जुहीने काही चित्रपटांची निर्मितीही केली. शाह रुख़ खान यांच्यासोबत जुहीची अजून एक जोडी म्हणजे 'कोलकाता नाईट रायडर्स' हा क्रिकेट संघ. 'आय.पी.एल.' या क्रिकेटच्या महास्पर्धेत जुहीने शाह रुख़ ख़ानसमवेत 'कोलकाता नाईट रायडर्स' या संघाचे मालकी हक्क मिळवून क्रिडाक्षेत्रातही नाव मिळवलं...

जुहीसोबतच्या सर्व जोड्यांमध्ये सर्वात यशस्वी जोडी म्हणजे उद्योगपती जय मेहताबरोबर तयार झालेली जुहीची आयुष्यभराची जोडी. कारकिर्दीच्या शिखरावर असताना १९९५साली उद्योगपती जय मेहताशी जुही चावलाचा विवाह झाला. आणि जुही नावाची ही अप्सरा, मेहतापरिवारात प्रविष्ट झाली. लग्नानंतर जुहीने चित्रपटक्षेत्र सोडलं नाही. काही काळ ब्रेक घेऊन जुही परतली आणि पुन्हा त्यांच्या मधाळ वाणीने व मृदू हास्याने रुपेरी पडदा चमकला...

आज १३ नोव्हेंबर. आज जुही चावलाचा वाढदिवस. बोलक्या चेहेऱ्याच्या या अप्सरेला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...

Happy Birthday Ka...ka...ka...Kiran...

@ अनिकेत परशुराम आपटे.

Saturday, 5 November 2022

एक प्रवास अस्तित्वाचा...

'रामसेतू' किंवा 'ऍडम्स ब्रिज' खरंच मानवनिर्मित आहे की निसर्गाची किमया आहे, यावर आजही वाद-विवाद सुरू आहेत. याच वादांवर आधारलेला चित्रपट म्हणजे, अभिषेक शर्मा दिग्दर्शित "राम सेतू..."


डॉ. आर्यन कुलश्रेष्ठ एक पुरातत्वशास्त्रज्ञ म्हणजेच archeologist तर असतोच, शिवाय नास्तिकही असतो. त्याचा अशा कोणत्याही गोष्टीवर विश्वास नसतो, जी सिद्ध करता येत नाही. अशातच, रामसेतूचं संशोधन करून हा सेतू मानवनिर्मित नाही, हे पुराव्यानिशी सिद्ध करण्याच्या कामगिरीवर आर्यनला पाठवलं जातं. अनेक रहस्यांनी भरलेल्या या प्रवासात आर्यनला पुढे नेणारे मदतनीसही भेटतात आणि अडथळा आणणारे शत्रूही समोर येतात. भारतातून सुरू झालेला रामसेतूच्या अस्तित्वाचा डॉ. आर्यनचा हा प्रवास अखेर श्रीलंकेत समाप्त होतो...

चित्रपटाची भव्यता लक्षात घेता, सेट्सवर सुरेख काम झालं आहे. विशेषता सेतू आणि पाण्याखालचं वातावरण दाखवताना व्यवस्थित काळजी घेतलेली दिसते. पाण्याची खोली जशी वाढत जाते तशी तिथे आढळणाऱ्या जलरांचरांची, पाणवनस्पतींची विविधताही बदलत जाते. ही बाब लक्षात ठेऊनच सेट्स आणि लोकेशन्स दाखवले गेले हे विशेष. चित्रपटात वेगळी अशी गाणी नाहीत. शिव तांडव स्तोत्राच्या काही ओळी किंवा हनुमान चालीसामधल्या काही ओळी वेगळ्या चालींवर ऐकायला मिळतात. अर्थात कथेचा प्रवाहच असा आहे, की गाण्यांना त्यात वावच नाही. चित्रपटात जबरदस्तीने आयटम साँग घुसवण्याचा प्रयत्न झाला नाही, ही मला आवडलेली सर्वात चांगली गोष्ट...

चित्रपटाचं पार्श्वसंगीत दमदार आहे. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं पार्श्वसंगीत वापरल्याने, ते ते दृष्य अधिक उठाव घेतं. शिवाय हनुमान चालीसा आणि शिव तांडव स्तोत्रातल्या काही ओळी, चालू दृष्यात पार्शवसंगितासारख्या वापरल्याने दृष्याची भव्यता अधोरेखित होते. कलावंतांचं म्हणावं, तर हिरोला हिरोईन असावी आणि ट्विस्ट इन द टेल यावा यासाठी नुसरत भरुचा यांनी साकारलेलं गायत्रीचं पात्र टाकलं गेलं असावं असं मला वाटतं. जॅक्विलीन फर्नँडीस यांनी साकारलेलं डॉ. सँड्रा या पात्राला चित्रपटात इतकी लांबी का दिली गेली, हे समजत नाही. सत्यदेव यांनी साकारलेलं ए.पी. हे पात्र मात्र चित्रपटातलं सर्प्राईझ पॅकेज ठरतं...

चित्रपटातल्या दोन मुख्य व्यक्तिरेखांचं काम सुंदर झालं आहे. एक म्हणजे डॉ. आर्यन कुलश्रेष्ठ. आपल्या विषयाला, ध्येयाला धरून जिद्दीने काम करणाऱ्या डॉ. आर्यनची भूमिका अक्षय कुमारने छान साकारली आहे. डॉ. आर्यनच्या तोडीस तोड असलेली दुसरी व्यक्तिरेखा म्हणजे इंद्रकांत. इंद्रकांत समोर येताच, तो किती पाषाणहृदयी असू शकेल आणि आपली अभिलाषा पूर्ण करण्यासाठी तो कुठल्याही थराला जाऊ शकेल याची पुरेपूर कल्पना येते. अभिनेते नासर यांनी ही भूमिका सुरेख वठवली आहे. "बाहुबली" आणि "रावडी राठोड" या दोन्हीही चित्रपटांतल्या त्यांच्या नकारात्मक भूमिकांपेक्षा वेगळी असलेली इंद्रकांत ही व्यक्तिरेखा अधिक प्रभावशाली आहे...

इतकं असूनही चित्रपटातल्या काही गोष्टी लेखकाला नीट समजावता आल्या नाहीत. डॉ. आर्यन जेव्हा श्री रामाचं अस्तित्वच नाकारतो तेव्हा वातावरण शांत कसं राहतं..., आर्यन कट्टर नास्तिक असूनही रामसेतू पाहून त्याच्या तोंडून "ओ माय गॉड..." हे उद्गार कसे निघतात..., ट्विस्ट आणण्यासाठी गायत्रीला आर्यनसमोर आणलं जातं, पण आर्यनचे शत्रू गायत्रीपर्यंत पोहोचतातच कसे... शोधकार्य पूर्ण करायला आर्यनकडे दोन पूर्ण दिवस आणि तिसरा अर्धा दिवस असतो. पण आर्यनच्या प्रवासात येणाऱ्या टप्प्यांची अंतरं अधिक असतात. हे गणित कसं काय जुळलं..., प्रवास संपवून आर्यन पुराव्यांसह भारतात येतो. पण इतक्या लवकर कसा येतो... हे प्रश्न अधांतरितच ठेवले गेले...

एकंदरीत, डॉ. आर्यनला त्याच्या प्रवासादर्म्यान काय गवसतं... त्याचा शोध पूर्ण होतो का... नास्तिक असलेला डॉ. आर्यन बदलतो की तसाच राहतो... या सर्व प्रश्नांची उत्तरं चित्रपट पाहूनच मिळतील. "नॅशनल ट्रेजर", "जंगल क्रूज", "इंडियाना जोन्स" अशा शोधकथांच्या धाटणीचा अभिषेक शर्मा लिखीत, "रामसेतू" हा चित्रपट, मोठ्या पडद्यावर एकदा तरी पहावा असाच आहे...

@ अनिकेत परशुराम आपटे.