Sunday, 29 May 2022

चतुरस्त्र बाबूराव रावल...

"मी बाबूराव गणपत राव आपटे... म्येरेको बिलकुल रिक्स नई ल्येनेका है..." आपल्या विशिष्ठ संवादफेकीने, "हेराफेरी" या चित्रपटातला हा संवाद अजरामर करणारे कलावंत म्हणजेच आपल्या सर्वांच्या परिचयाचे, अभिनेते परेश रावल...


१९८५ साली प्रदर्शित झालेल्या "अर्जून" या चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर पहिलं पाऊल ठेवणाऱ्या परेशजींनी "नाम", "कब्ज़ा", "फतेह", "बाज़ी", "राम लखन", "किंग अंकल" अशा अनेक चित्रपटातून भूमिका केल्या. त्यांच्या जवळ जवळ सर्वच भूमिका या नकारात्मक स्वरुपाच्या होत्या. गंभीर भूमिकेत परेशजी क्वचितच दिसले. "सर", "सरदार", "वह छोकरी", "गोलमाल - फन अनलिमिटेड" या चित्रपटातल्या परेशजींच्या गंभीर स्वरूपाच्या भूमिका विशेष लक्षात राहिल्या...


पेरशजींच्या अदाकारीचा एक वेगळा पैलू पहायला मिळाला तो १९९० साली प्रदर्शित झालेल्या "अंदाज़ अपना अपना" या चित्रपटातल्या दुहेरी भूमिकेमुळे. दोन्हीही व्यक्तिरेखा साकारताना परेशजींनी वापरलेली संवादफेक आणि विनोदाचं अप्रतीम टायमिंग यांमुळे आमिर ख़ान सलमान ख़ानसारखे कलावंत समोर असूनही परेशजींच्या अदाकारीला दाद मिळाली. परेशजींच्या याच संवाद फेकीचा आणि विनोदाच्या अप्रतीम टायमिंगचा फायदा इतर अनेक चित्रपटांना मिळाला...

'विनोदी खलनायक' ही संकल्पना बहुदा परेशजींच्या अदाकारीमुळे प्रकाशझोतात आली. "ख़ुबसूरत", "बड़े मियाँ छोटे मियाँ", "दौड़, "रावण राज" अशा चित्रपटात परेशजींनी विनोदी खलनायक छान साकारले. मग आला २००० साली प्रदर्शित झालेला "हेरा-फेरी". परेशजींच्या बाबूराव गणपतराव आपटे या व्यक्तिरेखेने अक्षश: धुमाकूळ घातला. बाबूराव आपटेच्या बोलण्याचा लेहेजा, चालण्याची पद्धत, त्याचा तो चष्मा प्रेक्षकांना प्रचंड आवडले. पुढे परेशजींच्या विनोदी भूमिकांनी सजलेल्या "फिर हेरा फेरी", "आवारा पागल दिवाना", "हंगामा", "हलचल", "भूलभुलैय्या", "आँखें", "मालामाल वीकली" अशा अनेक चित्रपटांची रांग लागली...


परेशजींकडून होणारी विनोदनिर्मिती आचरटपणाची किंवा ओढून-ताणून केलेली कधीच नव्हती. निव्वळ टायमिंग आणि संवादफेक यांची चोख सांगड घालत परेशजींनी त्या त्या भूमिका निभावल्या. परेश रावल म्हणजे विनोदी भूमिका असंच समीकरण तयार झालं होतं. याच समीकरणाला बगल देणाऱ्या काही गंभीर स्वरूपाच्या व्यक्तिरेखाही परेशजींनी, "बाग़बान", "आक्रोश", "ऐतराज़", "महारथी", "संजू" "तूफान" अशा चित्रपटांमध्ये साकारल्या. अर्थात, "तूफान" मधल्या त्यांच्या भूमिकेला प्रेक्षकांनी दादही दिली, पण तरीही, विनोदी भूमिका साकारणारे कलावंत म्हणूनच परेशजी जास्त लक्षात राहिले...

चित्रपटसृष्टीसोबतच, राजकारणातही परेशजींनी हात आजमावला. भा.ज.प. संसद सदस्य म्हणून परेशजींनी अहमदाबादहून निवडणूक लढवून ती जिंकलीही होती. पण निखळ मनोरंजन करणेच बरे हे लक्षात घेऊन, त्या मार्गाला जास्त न जाता परेशजी चित्रपटांत अधिक रमले. जितक्या तन्मयतेने परेशजी चित्रपटातील त्यांच्या भूमिका निभवायचे; प्रसिद्ध अभिनेत्री स्वरूप संपत यांच्याशी विवाहबद्ध झाल्यावर, सांसारिक जबाबदाऱ्याही परेशजींनी तितक्याच प्रामाणिकपणे पार पाडल्या...


आज ३० में. प्रसिद्ध अभिनेते, पद्मश्री परेश रावल यांचा आज वाढदिवस. या हरहुन्नरी चतुरस्त्र बाबूराव गणपतराव आपटेला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा...

ये द्येवा गणपती बाप्पा...
उठा ले रे बाबा उठा ले...
म्येरे को नई उठानेका रे...
परेशजी के दुश्मनों को उठा ले...

@ अनिकेत परशुराम आपटे.

Sunday, 22 May 2022

संभ्रमात टाकणारा भूल भुलैया...

बरसों पहले कैद केलेला एक आत्मा, म्हणजे भूत अचानक बाहेर येतं. मग एकामागून एक अनहोनी घटनाएँ होऊ लागतात आणि सरते शेवटी भूत नष्ट होतं, म्हणजे आत्म्याला मुक्ती मिळते. याच कथानकावर बेतलेला चित्रपट म्हणजे अनीस बज़्मी दिग्दर्शित "भूल भुलैयाँ २..."

कॅमेरा एँगल्स आणि प्रकाश योजना नेहमीसारख्याच आहेत. म्हणजे हवेलीचं पालटलेलं रूप, धक्कातंत्राचा वापर, कमी-जास्त होणारा प्रकाश, एखाद्या सायाचं दिसणं आणि गायब होणं, हे सगळं पाहताना भिती वाटावी असं काहीच होत नाही. उलट त्यामध्ये किंवा त्यानंतर येणारा विनोदी संवाद किंवा दृष्य, मुख्य दृष्याची मजाच घालवून टाकतात. पटकथा बऱ्याच ठिकाणी मार खाते. नुकतीच तोंड ओळख झालेल्या रुहानसोबत (कार्तिक आर्यन) रीतचं (कियारा अडवाणी) बस सोडून भलतीकडेच जाणं, लपण्यासाठी ओस पडलेल्या हवेलीत येणं, मंजूलिकासोबतची घटना रीतसमोरच घडली असूनही तिचं मंजूलिकावर विश्वास न ठेवणं, भरल्या घरात रीतचं इतके दिवस लपून बसणं आणि कोणालाही त्याचा सुगावा न लागणं, अचानकपणे रीतच्या वहिनीला (तब्बू) रीतचं सत्य समजणं, या सर्व घटनांची मांडणी वेगळ्या पद्धतीने करता आली असती...

चित्रपटातल्या सर्व गाण्यांपैकी विशेष लक्षात राहतील अशी दोनच गाणी आहेत. एक म्हणजे "हरे राम हरे राम हरे कृष्णा हरे राम..." आणि दुसरं म्हणजे "आमी जे तोमार..." चाल बदलून अरजीत सिंहच्या स्वरात मेल व्हर्जनमध्ये चित्रित झालेलं "आमी जे तोमार..." सुद्धा ऐकायला आणि पहायला छान वाटलं. चित्रपटाचं संगीत मस्त जमलं आहे. प्रत्येक गाण्यातल्या बीट्स आणि ऱ्हिदम आपल्याला ठेका धरायला लावतात. कार्तिक आर्यन, कियारा अडवाणी आणि तब्बू यांनी त्यांच्या त्यांच्या वाट्याला आलेली नृत्य छान सादर केली आहेत, विशेषत: कार्तिक आर्यन. त्यांचं नृत्यकौशल्य तर अप्रतीम आहेच, पण त्यांनी अदाकारीही भन्नाट केली आहे. तब्बू, मिलिंद गुणाजी, संजय मिश्रासारखी मंडळी समोर असतानाही कार्तिक आर्यनने छाप सोडली आहे...

राजेश शर्माने सतत घाबरणारा पण प्रेमळ काका छान साकारला आहे. मुख्य म्हणजे त्यांनी ती व्यक्तिरेखा, परेश रावल यांची झाक न दाखवता साकारली आहे. तब्बूने त्यांना  मिळालेली भूमिका छान वठवली आहे. प्रेमळ वहिनी साकारताना, कहानी में ट्विस्ट आणणारी अदाकारीही त्यांनी सुरेख दर्शवली आहे. मिलिंद गुणाजी यांच्या व्यक्तिरेखेत मनोज जोशी यांची झलक दिसते, ज्यांनी "भूल भुलैया"मध्ये कठोर बापाची भूमिका सादर केली होती. अश्विनी कळसेकर यांना एकसूरी भूमिका मिळाल्यासारखं वाटतं. "लक्ष्मी" चित्रपटातली त्यांची व्यक्तिरेखा याही चित्रपटात थोड्या ग्रे शेड देऊन पुन्हा प्रस्तुत केल्यासारखी जाणवते...

चित्रपटाची सुरुवात जबरदस्त होती. त्या मानाने उर्वरीत कथा थोडी रटाळ वाटली. मंजूलिकाचं अस्तित्व दर्शवणाऱ्या, "आमी जे तोमार..." या गाण्याचे बोल जितक्या प्रभावीपणे "भूल भुलैया"मध्ये वापरले गेले होते, तितका चांगला वापर या चित्रपटात जाणवला नाही. या चित्रपटात कावळ्यांचा वापर केला गेला ज्याचा इतका परिणाम नाही जाणवला. "राज़" चित्रपटात नायिकेला जसं विशिष्ठ आवाज ऐकवून त्या अशुभ ठिकाणी बोलावलं जातं, तसं काहीसं "भूल भुलैया २"मध्ये "आमी जे तोमार..." या गाण्याचे बोल वापरून, रीतबाबत करताना दाखवता आलं असतं. पण तसं न करता, मंजूलिकाच्या मुख्य कथानकापेक्षा, रुहान-रीतच्या केमिस्ट्रीवर आणि रुहानच्या बुवाबाजीवर जास्त भर दिलेला दिसतो. 

डरावनी हवेली, तंत्र-मंत्राने बंद केलेला दरवाजा, विनोदी छोटा पंडित, मंजूलिका की आत्मा, "आमी जे तोमार...", "हरे राम हरे राम हरे कृष्णा हरे राम..." हे सर्वच पुन्हा एकदा मौजूद असल्यामुळे हा चित्रपट, अक्षय कुमार आणि विद्या बालन यांच्या "भूल भुलैया" या चित्रपटाचा पुढचा भाग आहे असं म्हटलं जात होतं. पण ते तसं नाही. चित्रपटाची मांडणी, कथानकातली वळणं पूर्ण वेगळी आहेत. चित्रपटातली सर्वात चांगली गोष्ट म्हणजे चित्रपटाच्या एकदम शेवटी येणारा ट्विस्ट. त्या ट्विस्टमुळे काही संवाद, काही दृष्य तशी का होती, हे लक्षात येतं. मुख्य म्हणजे मंजूलिकाला वेगळ्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न चांगला होता...

एकंदरीत, कथानकामुळे स्वत:च संभ्रमात अडकलेला चित्रपट म्हणजे आकाश कौशिक लिखीत, "भूल भुलैया २". पहावा, तर कार्तिक आर्यनसाठीच...

@ अनिकेत परशुराम आपटे.

Sunday, 15 May 2022

'रागिणी'मय मुक्ता...

"नमस्कार मी रागिणी देसाई... तुम्ही बघताय फर्स्ट न्यूज... नेहमीच खरी बातमी..." तुम्ही ओळखलं असेलंच... प्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वे...


२००४मध्ये प्रदर्शित झालेल्या "चकवा" या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पहिलं पाऊल ठेवणाऱ्या मुक्ताने "थांग", "शेवरी", "माती-माय" अशा बऱ्याच चित्रपटांमधून स्वत:ला सिद्ध केलं. "मुंबई पुणे मुंबई" सिरीज, "ऐका दाजीबा", "एक डाव धोबीपछाड", "बदाम राणी गुलाम चोर" अशा हलक्या-फुलक्या आणि विनोदी चित्रपटांमधून झळकत असताना, "डबल सीट", "हायवे", "आम्ही दोघी", "बंदीशाळा", "जोगवा", अशा वेगळ्या विषयांवरच्या गंभीर भूमिकाही मुक्ताने छान वठवल्या...

चित्रपटांसोबतच रंगमंच आणि छोटा पडदा, या दोन्हीही ठिकाणी मुक्ताने तिची छाप सोडली. १९९९ साली प्रसारित झालेल्या "घडलंय बिघडलंय" या मालिकेद्वारे मुक्ताने अभिनयक्षेत्रात पहिलं पाऊल ठेवलं. पुढे "बंधन", "पिंपळपान", "अग्निहोत्र", "एका लग्नाची दुसरी गोष्ट", "अजूनही बरसात आहे", "रुद्रम" अशा मालिकांमधून काम करत मुक्ताने छोटा पडदा गाजवला. छोट्या पडद्यासोबतच, रंगमंचावरही मुक्ताचा मुक्त वावर होता...


"घर तिघांचं हवं" हे मुक्ताचं पहिलं नाटक. पुढे, "आम्हाला वेगळं व्हायचंय", "फायनल ड्राफ्ट", "कबड्डी कबड्डी", "छापा काटा", "कोडमंत्र", "लव्हबर्ड्स" अशा नाटकांमधून काम करत मुक्ताने आपला चाहता वर्ग वाढवत नेला. विनोदी भूमिकांपेक्षा, गंभीर स्वरूपाच्या भूमिकांमध्ये मुक्ता जास्त रंगली. माझ्या दृष्टीने मुक्ताच्या अभिनयाला दाद मिळवून देणाऱ्या तीन भूमिका म्हणजे "फायनल ड्राफ्ट" या नाटकातली विद्यार्थिनी, "जोगवा" या चित्रपटातली सुली आणि "रुद्रम" या मालिकेतली रागिणी देसाई...

"फायनल ड्राफ्टमध्ये मुक्ताची भूमिका एका अशा विद्यार्थिनीची होती, जिला आपले प्रोफेसर काय शिकवत आहेत ते समजत नाही. आधीची संभ्रमित मुलगी आणि ड्राफ्ट म्हणजे कथा पूर्ण झाल्यावर आत्मविश्वास वाढलेली मुलगी, हा बदल मुक्ताने सुंदर दर्शवला आहे. "जोगवा" या चित्रपटात मुक्ताने एका जोगतीणीची व्यक्तिरेखा साकारली होती. रूढी आणि परंपरांच्या विळख्यात अडकलेली सुली, तय्यप्पाच्या मदतीने पूर्ण समाजाच्या विरोधात उभी राहते, अशी ती भूमिका होती. अल्लड निरागस सुली ते परिपक्व गंभीर सुली हा बदल मुक्ताने छान साकारला होता...


मुक्ताची सर्वात दमदार भूमिका होती "रुद्रम" मालिकेमधली रागिणी देसाई. काही असामाजिक तत्वांमुळे एक सामान्य मुलगी आपलं सर्वस्व गमावून बसते. त्या तत्वांचा थांग लागताच त्या सर्वांना संपण्याच्या इराद्याने पेटून उठलेली ती मुलगी काही असामान्य कामगिऱ्या पार पाडते, अशी ती भूमिका होती. रागिणी देसाईच्या व्यक्तिरेखेत, कुटुंबवत्सल रागिणी, नैराश्याच्या गर्तेत अडकलेली उदासवाणी रागिणी, सत्य कळल्यावर पूर्ण सत्य जाणून घेण्यासाठी अधीर झालेली अस्वस्थ रागिणी आणि सगळ्या कटाचा पडदाफाश करण्यासाठी थंड डोक्याने प्लॅन करणारी रागिणी, अशा अनेक छटा होत्या. माझ्या मते, रागिणी देसाई ही व्यक्तिरेखा, मुक्ताच्या सर्वच भूमिकांमध्ये वरचढ ठरली होती...


आज १७ में. या चित्ररागिणीचा म्हणजेच मुक्ता बर्वेचा आज वाढदिवस. रागिणीमय मुक्ता बर्वेला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा...

@ अनिकेत परशुराम आपटे.