बऱ्याच भयपटांमध्ये आपण पाहतो, कुठेतरी एक अतृप्त आत्मा अडकलेला असतो. आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी तो आत्मा अनेकांना त्रास देतो, काहींचा जीवही घेतो. मग नायक किंवा नायिकेकडून असं काहीतरी घडवलं जातं, ज्यामुळे तो आत्मा मुक्त होतो. आत्म्याच्या मुक्तीचा प्रसंग, कधी गंभीर तर कधी विनोदीपद्धतीने प्रेक्षकांसमोर येतो. हाच मुक्तीचा प्रसंग जर भावस्पर्शी असला तर... अशाच निरागस मुक्तीचा प्रसंग हळुवार पद्धतीने रेखाटलेला दिसतो, २००८ साली प्रदर्शित झालेल्या "भूतनाथ" या चित्रपटातील एका गाण्यात...
"भूतनाथ, घरमें एक पूजा होनेवाली है जिससे तुम एंजल से स्टार एंजल बन जाओगे..." गच्चीवर उभ्या असलेल्या कैलाशनाथला बंकू हे सांगतो आणि सुखविंदर सिंह यांच्या आवाजात, वरच्या पट्टीत हे बोल ऐकू येतात...
क्षमा जो शत्रू को भी कर दे, वही मुक्त है वही है ज्ञानी..."
कैलाशनाथला समजतं, की ते त्यांचं श्राद्ध आहे आणि मुलावरचा राग विसरून त्यांना अनंताची वाट धरायची आहे. त्याचवेळी हरिहरन यांच्या स्वरातले हळुवार बोल सुरू होतात...
रात में एक छोटासा, एक नन्हासा दिपक जलता है...
उसकी जरासी ज्योत सही, पर दूर से उसको देखकर...
कोई बरसों का मुसाफिर, गिरते गिरते सँभलता है..."
बायकोच्या विरहाने आणि मुलाच्या दुराव्याने व्यथित झालेल्या कैलाशनाथच्या शरीराची रात्र होते म्हणजेच अंत होतो. पण मुलावरच्या व तिथे येणाऱ्या इतरांवरच्या क्रोधामुळे, देवलोक आणि मृत्यूलोक यांच्या मध्ये अडकलेल्या कैलाशनाथचा आत्मा एक बिभत्स रूप धारण करत असतो...
क्रोधाच्या त्याच अंधारात बंकू नावाचा एक छोटासा कवडसा येतो. बंकूच्या त्या गोड वागण्याने भूतनाथ विरघळतो आणि स्वत:ला बदलतो. घरात एक पूजा आहे आणि पूजेला सगळे असायला हवेत ही भाबडी कल्पना मनात ठेऊन बंकू कैलाशनाथला त्यांच्याच श्राद्धासाठी बोलावतो आणि गाण्याच्या पुढच्या ओळी सुरू होतात...
बस तू ही मेरा अपना है, बस तूने प्यार निभाया..."
तिथे बसल्या बसल्या बंकूकडे पाहत कैलाशनाथ विचार करतात, "माझा स्वत:चा मुलगा मला मरणाच्या दारात सोडून निघून गेला, पण हा लहानगा पोर, कुठलंही नातं नसताना माझ्या मुक्तीसाठी प्रयत्न करतो आहे. किती प्रेमळ आहे हा बंकू..." आणि बंकूलाच कैलाशनाथ विचारतात...
तुझको चाहूँ भी तो, मैं कैसे भुला सकता हूँ...
तू ही बता, क्या मैं मुक्ती पा सकता हूँ..??
तू नहीं जानता तू मेरा अब है क्या...
तुझको ही देखा, तो दिल कैसे पिघलता है..."
बंकू, तू माझ्या मुक्तीसाठी हे श्राद्ध करतो आहेस. लोभ, क्रोध, अशा दुर्गुणांपासून मी अलिप्त राहू शकतो, हा मृत्यूलोक मागे ठेऊन मी पुढेही जाऊ शकतो. पण बाळा, मला तुझा लळा लागला आहे रे... तुला सोडून मी कसा जाऊ..." बंकूला उद्देशून कैलाशनाथचा आत्मा मनातल्या मनात हे बोलत असतानाच त्याला विजयच्या येण्याची चाहूल लागते. कैलाशनाथ दाराकडे पाहतात आणि विजय घरात प्रेवश करतो...
अब क्या सूरज ढूँढ़े पगले, डूब गया सूरज कब का...
बरसों पहसे जो एक नदी प्यार की...
बह गई वह नदी, हाथ अब तू क्या मलता है..."
आपल्या आई-वडिलांच्या आठवणीत घरभर फिरत असलेल्या विजयला पाहताना कैलाशनाथ म्हणतात, "इतका काळ तू आमच्यापासून दूर राहिलास. आम्हाला एकदाही भेटायला आला नाहीस. प्रेमाची ऊब देणारा तुझा बाप गेला, मायेचा शीतल ओलावा देणारी तुझी आई गेली. आता इथे येऊन तू काय मिळवलंस...!!!"
उशीरा का होईना पण विजयला पश्चात्ताप झालेला असतो आणि आपल्या वडिलांच्या म्हणजेच कैलाशनाथच्या मुक्तीसाठी तो प्रार्थना करतो. कैलाशनाथ भरून पावतात आणि मुक्तीच्या मार्गाला लागतात. पूजेत बसलेल्या बंकूला काहीतरी वाटतं. तो मागे पाहतो आणि साश्रू नयनांनी कैलाशनाथ बंकूचा निरोप घेतात...
देखो मुझे सिखाकर जीना, ऐसे मुझको छोड़ न जाना..."
आपल्या डोळ्यांदेखत आपल्या भूतनाथला निघून गेलेलं पाहून बंकूला दु:ख होतं. त्याचे आई-बाबा सांगतात की भूतनाथ मुक्त झाला. पण लहानगा बंकू म्हणतो, "मुक्त होणं म्हणजे काय ते मला कुठे माहित... ज्याने मला जगायला शिकवलं, नातं जोडायला शिकवलं, तो भूतनाथ मला का सोडून गेला..." हा विचार मनात आणत बंकू गच्चीवर जातो...
बंकू सर्व ताऱ्यांमध्ये भूतनाथला शोधतो, त्या हाका मारतो. आसमानात कुठेतरी भूतनाथ बंकूसमोर येतो आणि लगेचच अंतर्धान पावतो. गाणं संपतं, पण आपल्या डोळ्यातलं पाणी संपत नाही...
जावेद अख़्तर यांनी अतिशय सुंदर शब्दरचना केली आहे. गाण्याचं संगीत अतिशय हृदयस्पर्शी आहे. विशेषत: बासरीचा अप्रतीम वापर संपूर्ण गाण्यात आपल्याला आढळतो. गाण्याच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत बासरीवर एक धुन आपल्याला ऐकू येत राहते. पण गाण्यातील एका प्रसंगात, जेव्हा आपल्या मुलाच्या प्रार्थनेमुळे कैलाशनाथच्या मनावरचं ओझं नाहीसं होतं आणि ते मुक्तीच्या मार्गाला लागतात, तेव्हा बासरीवर ऐकू येणारी सरगम आपल्या मनाला भिडते आणि डोळ्यांतून पाणी आल्यावाचून राहत नाही...
गाण्यात पाहण्यासारखी दुसरी गोष्ट म्हणजे अमिताभ बच्चन यांची अप्रतीम अदाकारी. कैलाशनाथचं आपल्या मुलावरचं प्रेम, भूतनाथची बंकूमधली भावनिक गुंतागुंत, मुलाकडून आपल्या मुक्तीचा मार्ग सुकर झाल्याचा आनंद आणि त्यासोबतच बंकूपासून दूर जाण्याचं दु:ख, या सगळ्या भावना, अमिताभ बच्चन यांनी सुरेख रेखाटल्या आहेत. एखाद्या अतृप्त आत्म्याला मुक्ती मिळते तेव्हा तो सुखांत समजला जातो. पण भूतनाथच्या मुक्तीला एक दु:खाची किनार आहे...
भूतनाथ आणि बंकू एकमेकांपासून दुरावलेले पाहताना आपल्याला सतत वाटत राहतं, की बंकूसाठी तरी, कैलाशनाथला मुक्तीच मिळू नये. चित्रपटाच्या शेवटी येणाऱ्या या गाण्याचा शेवट दु:खाने भरलेला असला, तरी चित्रपटाचा शेवट मात्र बंकूच्या बाजूने केलेला सुखांतच आहे...
@ अनिकेत परशुराम आपटे.
No comments:
Post a Comment