Monday, 27 April 2020

वॉर...

"मौका मिलेगा तो गोली चला देना... सोचना मत... मैं नहीं सोचूँगा...", "आप किसी और तक पहुँचें उससे पहले मैं आप तक पहुचूँगा..." हे संवाद आहेत 'Super Action Thriller' समजल्या जाणाऱ्या सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित "वॉर" या बहुचर्चित चित्रपटातले...

चित्रपट सुरू होतो intelligence chief व्ही.के. नायडू यांच्या खुनाने. हा खून कबीर सिंह (हृतिक रोशन) या एकेकाळच्या RAW एजंट आणि आत्ताच्या गद्दाराने केला आहे हे सर्वांनाच माहित असतं. कबीरला पकडून, दोन वर्षांपूर्वी कट्टर देशभक्त असताना तो अचानक देशद्रोही कसा व का झाला हे जाणण्याची कामगिरी कबीरच्याच सावलीत तयार झालेल्या ख़ालीद (टायगर श्रॉफ) या एजंटवर सोपवली जाते...

दरम्यान, भारतात मोठ्या हुद्द्यावर असलेल्या अजून दोन व्यक्तींचा खून होतो आणि कबीर व ख़ालीदमधल्या जीवघेण्या संघर्षाला सुरुवात होते. अधिक तपासात ख़ालीदसमोर एक मोठं रहस्य उलगडतं, पण कबीरला पकडण्यात दोनवेळा अपयश आल्याने ख़ालीदला निलंबीत केलं जातं. ख़ालीद व कबीरमधील संघर्षाद्वारे रिज़्वान इल्याज़ी या कुख्यात अतिरेक्याचं नाव समोर येतं आणि भारताविरुद्ध त्याने रचलेलं मोठं षडयंत्र उघडकीस येतं. इल्याज़ी व त्याच्या हस्तकांना मारलं जातं आणि या कामगिरीबद्दल ख़ालीदचा सत्कार केला जातो...

चित्रपटातली हाणामारीची दृश्य ही चित्रपटाची जमेची बाजू आहे. "Fast & Furious" series, "Mission Impossible" series या चित्रपटांच्या तोडीसतोड "वॉर" या चित्रपटातली हाणामारीची दृश्य रंगली आहेत. थरारक आणि खुर्चीला खिळवून ठेवणाऱ्या या दृश्यांचं चित्रिकरणही तितकंच सुरेख झालं आहे. या दृश्यांवर कळस चढवला तो संचित व अंकित बलहारा यांच्या सुंदर पार्श्वसंगीताने. विशाल-शेखर या द्वयींनी दिलेलं संगीत काही अंशी तरी चित्रपटात गतिरोधकाचं काम करतं...

हृतिक रोशन व टायगर श्रॉफ यांची जुगलबंदीमात्र चित्रपटभर छान रंगली आहे. हाणामारीच्या दृश्यांत दोघांनीही बाजी मारली आहे. त्यांची पाठलागाची दृश्य तर कमाल आहेत. "धूम", "धूम २", "धूम ३" हे चित्रपट पाणी भरतील इतकी रोमहर्षक ती वठली आहेत. "जय जय शिवशंकर..." या गाण्यादरम्यान नृत्यात टायगरने हृतिकवर मात केल्याचं दिसतं पण अदाकारीमध्ये मात्र हृतिकने टायगरला मागे टाकल्याचं जाणवतं...

चित्रपटातली काही दृश्य खटकल्याशिवाय राहत नाहीत. उदाहरणार्थ, भारतातल्या बड्या अधिकाऱ्यांची सुरक्षा व्यवस्था सहज भेदून कबीरचं त्यांचा खून करणं, कबीरला पकडू न शकल्यामुळे निलंबित होऊनही ख़ालीदचं सराईतपणे RAWच्या ऑफीसात वावरणं, भर तलावात दिवसाढवळ्या एका इसमावर पाळत ठेवताना कबीरकडे कोणाचंही लक्ष न जाणं...

एकंदरीत, 'one time watch' या पठडीत मोडणारा आणि हृतिक विरुद्ध टायगर असं बिरूद मिरवणारा सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित "वॉर" मोठ्या पडद्यावरच पहावा असाच आहे...

@ अनिकेत परशुराम आपटे.

खोसला का घोसला...

"कशासाठी जागेसाठी... जागेवरच्या ताब्यासाठी..." याच एका ओळीवर बेतला आहे, २००६ साली प्रदर्शित झालेला दिबाकर बॅनर्जी दिग्दर्शित, "खोसला का घोसला" हा चित्रपट...

कमलकिशोर खोसला (अनुपम खेर) दिल्लीमधील एक मध्यमवर्गीय निवृत्त व्यक्ती. पत्नी सुधा (किरण जुनेजा), दोन मुलं, बलवंत ऊर्फ बंटी (रणवीर शौरी), चिरोंजीलाल ऊर्फ चेरी (प्रवीण डब्बास) आणि मुलगी निक्की (रुपम बाजवा), इतकाच काय तो परिवार. आपल्या मालकीचं घर असावं, सर्वांसाठी स्वतंत्र खोल्या असाव्यात, हे सर्वसामान्य स्वप्न उराशी बाळगून, विजेंदर (राजेंद्र सेठी) या दलालामार्फत कमलकिशोर जागेचा व्यवहार करतात. आता आपलं मोठं घर होणार याच विचारात असतानाच किशन खुराना (बोमन इराणी) नावाचा एक माणूस जागेवर त्याचा मालकी हक्क सांगतो आणि कमलकिशोरांच्या पायाखालची जमीन सरकते...

जागा परत मिळवण्याच्या धडपडीला सुरुवात होते. पोलीस, मानवाधिकार संघटना, राजकारणी, कोणाचीच मदत होत नाही हे पाहून कमलकिशोर हवालदिल होतात. तेव्हा बंटी काही पहिलवानांना हाताशी धरून जागा मिळवण्याचा प्रयत्न करतो खरा, पण त्यात कमलकिशोर स्वत: अडकून खोट्या आरोपाखाली तुरूंगात जातात. अखेर, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते हे दाखवत मेघना (तारा शर्मा), आसीफ़ इक़्बाल (विनय पाठक), बापू (नवीन निश्चल) आणि मणी (नितेश पांडे), या साथिदारांसह चेरी सापळा रचतो आणि खुरानाला त्यात अडकवून आपली जमीन परत मिळवतो...

कथानक साधंच असलं तरी त्यात येणाऱ्या छोट्या छोट्या उपकथानकांमुळे आणि रंजक वळणांमुळे चित्रपट अधिक पकड घेत जातो. चित्रपटात फारशी गाणी नसून जी आहेत ती कथेला पुढे नेण्याचं काम करतात. हाणामारीची दृश्य, आयटम साँग्स, दमदार नायक, ग्लॅमरस नायिका, असं काही नसतानाही चित्रपट उत्कंठावर्धक वाटतो. सर्वच कलावंतांच्या साध्या सरळ अभिनयामुळे चित्रपट वेगळ्याच ऊंचीवर पोहोचतो. विशेषत: शांत स्वभावाचे कमलकिशोर खोसला साकारणारे अनुपम खेर आणि लबाड व कावेबाज किशन खुराना आपल्या समोर आणणारे बोमन इराणी यांच्या अभिनयाची जुगलबंदी तर कमाल आहे. जयदीप सहानी यांच्या साचेबद्ध लेखनामुळे विषयाची चोख मांडणीही झालेली दिसते....

एकंदरीत, वेगळा विषय हाताळणारा, हलका-फुलका चित्रपट, "खोसला का घोसला", आवर्जून पहावा असाच आहे...

@ अनिकेत परशुराम आपटे.

विकी वेलिंगकर...

"वेळेचं महत्व, वेळ गेल्यावरच समजतं..." हीच tagline आहे सौरभ वर्मा दिग्दर्शित 'विकी वेलिंगकर' या थरारपटाची...

सृष्टी नावाच्या मुलीचा, तिच्या राहत्या घरात, गोळी लागून मृत्यू होतो. सृष्टीने आत्महत्या केली आहे असं इंस्पेक्टर साळुंखे (केतन सिंह) सांगतात. पण सृष्टीच्या दोन मैत्रिणींना, विकी वेलिंगकर (सोनाली कुलकर्णी) आणि विद्याला (स्पृहा जोशी) वाटत असतं, की सृष्टीचा खून झाला आहे. शिवाय तपासात असं समजतं की सृष्टीचा लॅपटॉप गायब आहे. त्याच वेळी विकीच्या मित्राचा, लकीचा (संग्राम समेळ) फोन येतो. त्याच्याकडे एक महत्वाची माहिती असते...

विकी आणि लकी, एका अर्धवट बांधकाम झालेल्या इमारतीत भेटतात. ते बोलतच असतात की एक अज्ञात मास्कधारी माणूस, गोळ्या झाडून दोघांची हत्या करतो. बरोब्बर त्याच क्षणी स्वत:च्या घरात बसल्या बसल्या झोपलेली विकी खडबडून जागी होते. हा भास होता, की खरंच आपल्याला गोळी मारली गेली... या गोंधळात सापडलेली विकी, हीच घटना परत परत अनुभवते. वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या माणसांच्या सानिध्यात विकीला गोळी लागत राहते आणि दुसऱ्याच क्षणी ती आपल्या घरात जागी होत राहते...

या सर्व घटनाक्रमात दोन गोष्टी कायम असतात. एक म्हणजे विकीचा खून आणि दुसरी गोष्ट म्हणजे मास्क लावलेला तिचा मारेकरी. संपूर्ण चित्रपटभर हाच घटनाक्रम वेगाने घडत राहतो. Twist in the taleसारखा येणारा चित्रपटाच्या शेवटच्या दहा मिनिटांचा कथाभागमात्र कथानक वेगळ्याच वळणावर नेऊन संपवतो. विकी वेलिंगकर या मध्यवर्ती भूमिकेला सोनाली कुलकर्णी यांनी बऱ्यापैकी न्याय दिला आहे. त्यासोबतच संग्राम समेळ, स्पृहा जोशी, केतन सिंह, गौरव मोरे व रमा जोशी या कलावंतानीही त्यांच्या त्यांच्या व्यक्तिरेखा छान वठवल्या आहेत. एकही गाणं नसल्याने चित्रपटाचा वेग कुठेही कमी होत नाही...

सृष्टीचा खून झाला, की तिने खरंच आत्महत्या केली... कोण आहे तो मास्क घातलेला बंदूकधारी...? तो विकीला का मारतो...? जर विकीचा खून होतो, तर ती जिवंत कशी...? सृष्टीच्या मृत्यूचा विकीशी काही संबंध आहे का...? वेळेच्या सापळ्यात अडकलेल्या या गूढ प्रश्नांची उत्तरं हवी असतील, तर नक्कीच पहावा, सौरभ वर्मा दिग्दर्शित "विकी वेलिंगकर..."

@ अनिकेत परशुराम आपटे.

मुग़ल-ए-आज़म...

"बाख़ुदा, हम मुहब्बत के दुश्मन नहीं... बल्की अपने उसूलों के ग़ुलाम हैं...|" पृथ्वीराज कपूर यांच्या बुलंद आवाजातला हा संवाद कानावर पडला, की आठवतो, हिंदी चित्रपटसृष्टीसाठी मैलाचा दगड ठरलेला के. आसीफ़ दिग्दर्शित 'मुग़ल-ए-आज़म...'

शहनशाह जलालूद्दीन मुहम्मद अक़बर (पृथ्वीराज कपूर) यांच्या ऐतिहासिक कारकीर्दीच्या पार्श्वभूमीवर साहेब-ए-आलम शहज़ादा सलीम (दिलीप कुमार) आणि त्याची प्रेयसी नादिरा म्हणजेच क़नीस अनारकली (मधुबाला) यांची प्रेम कहाणी अतिशय सुंदर पद्धतीने बहरत जाते. दिग्गज संगीतकार नौशाद यांनी संगीतबद्ध केलेल्या, "तेरी महफ़िल में क़िस्मत आज़माकर हम भी देखेंगे...", "मोरे पनघट पे नंदलाल छेड़ गयो रे...", "प्यार किया तो ड़रना क्या..." अशा एकाहून एक सरस गाण्यांनी कथेवर सुवर्णकळस चढवला...

शहनशाह अक़बर पुत्रप्राप्तीसाठी दुवा मागायला जातात, तिथून कथेला सुरुवात होते. बोला-फुलाला गाठ पडते आणि महाराणी जोधाच्या (दुर्गा खोटे) पोटी सलीमचा जन्म होतो. त्याच्या जन्माची खबर घेऊन येणाऱ्या दासीला, "तुझी कोणतीही इच्छा मी पूर्ण करेन..." असं वचन अक़बर देतात. दारू, बायका यांच्या सानिध्यात सलीम वाया जातोय हे लक्षात येताच अक़बर त्याला दूरदेशी पाठवतात. विद्या ग्रहण करत, लढाया जिंकत मोठा झालेला सलीम घरी परततो. त्याच्या स्वागतासाठी एक मूर्तीकार एका मुलीचं शिल्प घडवत असतो पण ते वेळेत पूर्ण होत नाही म्हणून नादिरा नावाची एक दासी स्वत: तिथे उभी राहते. याबद्दल अक़बर तिला अनारकली ही पदवी बहाल करतात...

सलीम हळुहळू अनारकलीकडे आकर्षित होत जातो आणि त्यांच्यातलं प्रेम फुलत जातं. सलीम आणि अनारकली यांच्यात जन्माला आलेलं प्रेम अक़बर यांना मंजूर नसतं. ते अनारकलीला कैद करवतात. सलीम बंड करतो. अनारकलीसाठी आपल्याच वडिलांशी युद्ध करतो. त्यात सलीमचा पराजय होतो. सलीमच्या जन्माच्यावेळी दिलेल्या वचनाचं पालन करत दासीची एक इच्छा पूर्ण करण्यासाठी अक़बर अनारकलीला जीवनदान देतात पण एक कामगिरी तिच्यावर सोपवतात. अक़बरच्या आज्ञेनुसार सलीमला बेशुद्ध करून अनारकली त्याच्या आयुष्यातून कायमची निघून जाते...

भव्य-दिव्य सेट्स, अप्रतीम संगीत व पार्श्वसंगीत, नेत्रदीपक नृत्याविष्कार आणि सर्व कलावंतांची सहज सुंदर अदाकारी या सर्वांमुळे "मुग़ल-ए-आज़म" उजवा ठरतो. आर्थिक-तांत्रिक गरजा, कलावंतांची जमवा-जमव, अशा अनेक अडचणींवर मात करून निर्माण झालेल्या या चित्रपटाने पुढे अनेक विक्रम मोडीत काढले...

एकंदरीत के. आसीफ़ दिग्दर्शित मुग़ल-ए-आज़म, हिंदी चित्रपट इतिहासातली एक अजरामर कलाकृती आहे असे म्हणायला हवे...

@ अनिकेत परशुराम आपटे.