"देख.. यह हिंदू का खून... यह मुसलमान का... अब बता, इसमें से हिंदू का खून कौनसा है और मुसलमान का कौनसा...", "विधात्या, तू इतका कठोर का झालास रे...", "कैसे बताऊ मैं तुम्हें मेरे लिए तुम कौन हो...", "कंट्रोल उदय कंट्रोल..." या संवादांना ज्यांनी एक वेगळी ऊंची दिली, ते आहेत विश्वनाथ पाटेकर. अर्थात प्रख्यात अभिनेते नाना पाटेकर...
Contemprary hero म्हणून नाना कधीच पडद्यावर दिसले नाहीत. "अंकुश" मधला रविंद्र केळकर असो किंवा "हम दोनों" मधला विशाल सैगल असो. "तिरंगा" मधला शिवाजीराव वागळे असो किंवा "पक पक पकाक" मधला 'भुत्या' असो. नाना नेहमी गंभीर स्वरूपाच्या भूमिकेत जास्त दिसले. नानांची संवादफेक आणि त्यांची अदाकारी यांमुळे त्यांनी अभिनय केलेले "क्रांतिवीर", "प्रहार", "यशवंत", "कोहराम", "वजूद", "अब तक छप्पन" हे चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडले...
नानांच्या अभिनय स्वभावाला नं साजेशा, "हुतुतु", "आपलं मानूस", "गुलाम-ए-मुस्तफा", "तरकीब", "वध", "राजनीती", "अंधा युद्ध" अशा काही चित्रपटांमधल्या त्यांच्या वेगळ्या भूमिकाही प्रेक्षकांना रुचल्या. चित्रपट चालले असतील नसतील, पण नानांनी स्वतःचा ठसा मात्र उमटवला. नानांची loud dialog delivery आणि intense acting, त्यांना विनोदी भूमिका कितपत साकारू देतील ही शंका होती. पण "राजू बन जेन्टलमॅन", "वेलकम", "हाऊस फुल ५" या चित्रपटांमधल्या त्यांच्या विनोदी भूमिकांनी या शंकांचं निरसन केलं...
नानांच्या अभिनय कारकिर्दीतले दोन वेगळे पैलू म्हणजे वेडसर झाक असलेल्या भूमिका आणि नकारात्मक भूमिका. "प्रतिघात", "युगपुरुष", "अंगार", "माफीचा साक्षीदार", "अग्निसाक्षी", अशा काही चित्रपटांमधून या वेगळ्या धाटणीच्या भूमिका नानांनी साकारल्या. पण वेडसर झाक असलेल्या त्यांच्या भूमिकांपेक्षा त्यांच्या नकारात्मक भूमिका प्रेक्षकांना जास्त भावल्या. "खामोशी द म्यूझिकल", "नटसम्राट", "डॉ. प्रकाश बाबा आमटे" या चित्रपटातल्या वेगळ्या भूमिका नानांनी उत्तम वठवल्याच. पण प्रेक्षकांनीही त्यांना चांगला प्रतिसाद दिला...
एक अभिनेता, नट, दिग्दर्शक म्हणून मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीत नानांचं एक वेगळं स्थान आहेच. पण एक माणूस म्हणून ते कसे आहेत याचं उत्तम उदाहरण म्हणजे त्यांनी समाजासाठी केलेली कार्य. 'साधी राहणी आणि उच्चं विचारसरणी' याच तत्वावर नाना वागले आणि आजही वागतात. चित्रपटात त्यांची वेषभूषा किंवा रंगभूषा काहीही असो, पण एरवी मात्र नाना अत्यंत साधं राहणंच पसंत करतात. 'अनुभूती' या संस्थेतर्फे नानांनी बिहारमधल्या अनेक पूरबाधित गावांना मोलाची मदत केली. शिवाय महाराष्ट्रातील अनेक गावांमधल्या शेतकऱ्यांना त्यांनी वेळप्रसंगी पैशानेही मदतीचा हात दिला. अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्यासह २०१५ साली नानांनी "Naam Foundation" ही संस्था स्थापन केली. या संस्थेतर्फे शेतकऱ्यांकरिता निधी उभारण्याचं महत्वाचं कार्य त्यांनी केलं...
आपण जे 'Down to earth' म्हणतो. नाना अगदी तसेच आहेत. आज लाखो रुपये कमावणारे नाना, कोणे एकेकाळी अशोक मामांनी केलेले छोटेसे उपकारही विसरले नाहीत. अशोक मामा म्हणजे अभिनेते अशोक सराफ यांनी नानांना केलेली पैशांची मदत असो, किंवा अशोक मामांचे पाय चेपून दिल्यानंतर अशोक मामांनी त्यांना दिलेले पाच रुपये असो. यांबद्दल आजही नाना सर्वांना सांगतात. नानांचे चित्रपट, त्यांची कार्य, अशोक मामांसोबत असलेली त्यांची मैत्री, याशिवाय नाना अजून एका गोष्टीसाठी ओळखले जातात. ती गोष्ट म्हणजे भारतीय थलसेनेला त्यांनी दिलेली सेवा. १९८८ साली नानांनी "Territory Army"मध्ये कॅप्टन म्हणून प्रवेश केला. १९९९ साली कारगिल युद्धादरम्यान 'Maratha Light Infantry'मधून मेजर या हुद्द्यावर असताना नानांनी भारतमातेची सेवा केली...
आज एक जानेवारी. आज नानांचा ७५वा वाढदिवस. उत्तम व्यक्तिमत्वाच्या, चतुरस्त्र अभिनेते आणि दिग्दर्शक विश्वनाथ पाटेकर, अर्थात पद्मश्री नाना पाटेकर यांना ७५व्या वाढदिवसानिमित्त कोटी कोटी शुभेच्छा.
@ अनिकेत परशुराम आपटे.

No comments:
Post a Comment