Friday, 10 December 2021

फोबिया...

Spine chilling psycho-thriller असं म्हणता ज्या कथेकडे पाहता येईल, तो चित्रपट म्हणजेच "फोबिया..."

महेक देव (राधिका आपटे) या अत्यंत कुशल चित्रकाराभोवती फोबियाचं कथानक फिरतं. एक आघाती क्षण महेकच्या मनाला अंतर्बाह्य बदलतो आणि एका मानसिक आजाराने ती ग्रस्त होते. सर्वांमध्ये मिळूनमिसळून राहणारी महेक अचानक लोकात मिसळेनाशी होते, एकलकोंडी होत जाते. तिचा हा आजार वाढत जातो आणि त्याचा त्रास तिच्या घरच्यांना होऊ लागतो. यातून बाहेर पडण्यासाठी महेकचा मित्र तिला एका रिकाम्या फ्लॅटमध्ये घेऊन येतो आणि तिथून कथानक वेगळेच वळण घेते...

महेक राहत असलेल्या नव्या घरात पूर्वी काहीतरी अघटित घडलं आहे असं तिला जाणवत राहतं. महेकला विचित्र आवाज येऊ लागतात, अनेक गोष्टी दिसू लागतात. हे सर्व भासच आहेत हे महेकचा मित्र सिद्ध करतो खरा पण महेकला हे पटत नाही आणि या घरात घडलेल्या दुर्घटनेला पुराव्यानिशी सर्वांसमोर आणण्याचा ती चंग बांधते. अखेर सत्य समोर येतं ते महेकच्याच प्रयत्नांमुळे. अशी कोणती घटना घडली त्या घरात... ते भास होते की खरंच अशी घटना घडली... या प्रश्नांची उत्तरं चित्रपटाच्या शेवटी मिळतातच...

साचेबद्ध कथेला तितक्याच सक्षम पटकथेची व पार्श्वसंगीताची जोड लाभल्याने चित्रपट कुठेही पकड सोडत नाही. चित्रपटाच्या काही दृष्यांमधून धक्कातंत्राचा सुरेख वापर दिसतो. कथेतलं ते घर भयावह वाटण्यासाठी वापरलेल्या प्रकाशयोजनेने चित्रपटात वेगळेच रंग भरले आहेत. या सर्वांपेक्षाही चित्रपटात जी गोष्ट जास्त लक्षात राहते, ती म्हणजे राधिका आपटे. भास व सत्य या द्वयींमध्ये सापडलेली, त्यांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न करणारी महेक देव ही व्यक्तिरेखा राधिका आपटेने अत्यंत सुंदर साकारली आहे. भय, मनाचा उडालेला गोंधळ, व स्वत:चा बचाव, हे भाव एकाच वेळी दाखवताना राधिका आपटेने दमदार अभिनयाचं दर्शन घडवलं आहे...

एकंदरीत, चित्रपटाच्या शेवटापर्यंत रहस्य टिकवून ठेवत क्षणोक्षणी प्रेक्षकांची उत्कंठा वाढवत जाणारा psycho thriller "फोबिया", आवर्जून पहावा असाच आहे...

@ अनिकेत परशुराम आपटे.

Tuesday, 7 December 2021

गरम धरम ही-मॅन...

"कुत्ते... मैं तेरा खून पी जाऊँगा...!!!", "बसंती, इन कुत्तों के सामने मत नचना...!!!", "आ रहा हूँ मैं...", हे आणि असे अनेक संवाद अजरामर झाले ते धरमसिंह देओल अर्थात लोकप्रिय अभिनेते धर्मेंद्र यांच्यामुळे...

हिंदी चित्रपटांमधला 'ही-मॅन' असंही त्यांना संबोधलं जातं. पण त्यांची सर्वात जास्त प्रसिद्ध उपाधी 'गरम धरम'च होती.  १९६० साली प्रसारित झालेल्या, "दिल भी तेरा हम भी तेरे" या चित्रपटाद्वारे धर्मेंद्र यांनी रुपेरी पडद्यावर पहिलं पाऊल ठेवलं. "सूरत और सीरत", "बंदिनी", "दिल ने फिर याद किया", "काजल", अशा अनेक चित्रपटांमधून धर्मेंद्र हलक्या व रोमँटिक भूमिका करताना दिसले. रोमँटिक चित्रपटांसोबतच, "हकीकत", "बाज़ी", "फूल और पत्थर", "आँखें" अशा चित्रपटांमधून झळकत, धर्मेंद्र यांनी हाणामारी चित्रपटांकडे मोर्चा वळवला...

एक नायक असलेल्या चित्रपटांतून यशस्वी होत असल्यामुळे, "धरमवीर", "राम-बलराम", "यादों की बारात", "कातिलों के कातिल", "राज तिलक", "शोले" अशा, दोन किंवा अधिक नायक असलेल्या चित्रपटांमध्ये धर्मेंद्र यांच्या भूमिकांना अधिक वाव मिळालेला दिसला. "शोले"आधी, अशोक किंवा सुनील ही नावं धर्मेंद्र यांना प्रमुख्याने मिळायची. पण "शोले"नंतर, 'वीरू' हे नाव जणू त्यांना चिकटलंच. जसं, 'प्रेम' हे नाव ऐकल्यावर सलमान खान आठवतो, 'विजय' म्हटल्यावर अमिताभ बच्चन दिसतात, तसंच 'वीरू' हे नाव ऐकताच धर्मेंद्र डोळ्यांसमोर उभे राहतात...

'ऍक्शन हिरो' म्हणून जिथे धर्मेंद्र यांनी जम बसवला होता, तिथेच, "चुपके चुपके", "नौकर बीवी का" अशा चित्रपटांमधून काम करत त्यांनी विनोदी भूमिकांमधेही हात आजमावला. "शोले"मधला तो टाकीवरचा सीन असो किंवा "द बर्निंग ट्रेन"मधला छेडाछेडीचा सीन असो, "सीता और गीता"मधला शेवटचा सीन असो किंवा "ग़ज़ब"मधला भुताला घाबरणारा सीन असो, धर्मेंद्र यांनी ते सीन आणि भूमिका जबरदस्त यशस्वी केल्या. अदाकारीसोबतच धर्मेंद्र अजून एका गोष्टीसाठी प्रसिद्ध होते. ती गोष्ट म्हणजे त्यांची विशेष नृत्यशैली. "मैं जट यमला पगला दिवाना...", "होली के दिन दिल खिल जाते है..." अशा अनेक गाण्यांमधून धर्मेंद्र यांनी सादर केलेली अफाट नृत्य, त्या गाण्यांपेक्षाही जास्त लोकप्रिय झाली...

आज ८ डिसेंबर. धर्मेंद्र यांचा जन्मदिवस. आपल्या सर्वांच्या लाडक्या या गरम धरम ही-मॅन वीरूला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा...

@ अनिकेत परशुराम आपटे.

तीन तिगाड़ा...

"सत्यमेव जयते २ पाहिलास का...???" असा प्रश्न विचारला असता मी उत्तर देईन, "हो पाहिला..." पण याचसोबत माझा मलाच एक प्रश्न असेल. तो म्हणजे, का पाहिला...!!!

तर, मोठ्या डोळ्यांची पांढरी फटक विद्या (दिव्या खोसला कुमार), डोल्ले-शोल्ले दाखवत तोडम् तोड हाणामारी करणारा इनिस्पेक्टर जय (जॉन एब्राहम), आणि चष्मा लाऊन पॉलिटिकल कापडं घालून फिरणारा होम मिनिश्टर सत्या (परत एब्राहमांचा जॉनच), असे तिघं असतात. अजून पण लोक्स आहेत, पण दंगा या तिघांचाच जास्त...

भ्रष्ट अधिकारी, आपलं काम न करता इतरांना त्रास देणारी माणसं, यांचे खून पाडण्याचं काम एक घूँघटधारी समाजसुधारक करत असतो. त्या खुन्याला पकडण्यासाठी सत्या जयची नेमणूक करतो. तरीही खून तर थांबत नाहीतच पण पोलीस तपास करतानाही दिसत नाहीत. मग येतो एक ट्विश्ट. खूनी आणि त्याच्या मदतनीसाच्या रूपात राम-बलराम (प्रतिकात्मक नावं बरं का...) समोर येतात...

एकीकडे खून होत राहतात पण पीडितांना भेटी देणे आणि टेबल तोडणे याखेरीज अजून काही करताना सत्या दिसत नाही तर, खुनाचा तपास चालू आहे असा भासही जय निर्माण करत नाही. मग येतो फ्लॅशबॅक. अजून एक जॉन एब्राहम (बाबो... तीन तीन जॉन... "हद कर दी आपने"... ही तर "महान" "आयडियाची कल्पना" झाली...) त्या फ्लॅशबॅकमधून प्रकटते एक माँ, जी सध्यातरी स्लीपिंग स्लीपिंगच आहे. आणि समोर येतो मेण व्हिलन, जो सध्यातरी साधूसंत येती घरा असा आहे...

चेतेश्वर पुजाराला अचानक सूर गवसावा तशी ती स्लीपिंग मम्मी खडबडून जागी होते. कोणीही न सांगता एका ठिकाणी येऊन मेण व्हिलनला बरोब्बर ओळखते. मग बदला-बदली, ढिशूम-ढिशूम आणि मेण व्हिलन खतम. पहिलं व्हर्जन पाहिल्यावर या भागाकडून वेगळी अपेक्षा होती. पण अपेक्षाभंग काय असतो ते परफेक्ट समजलं. एक शोधकथा म्हणून, "सत्यमेव जयते" जिथे ओळखला गेला, तिथेच हा चित्रपट विध्वंसक हाणामारीच दाखवतो फक्त...

एखादा जोशपूर्ण संवाद म्हणायचा असो किंवा गंभीर दृष्य असो, रोमँटिक सीन (एकच आहे म्हणा...) असो किंवा विनोदी दृष्य (हे सुद्धा एखादंच आहे बरं...) असो, दिव्या खोसला कुमार सतत डोळे फाडून फाडूनच पाहत असते. इतकंच कशाला, एकमेव डान्स साँग तिच्या वाटेला आलं आणि त्यातही डोळे मोठ्ठे करून ती ठुमके लगवते. पूर्ण चित्रपटात तिचे ते मोठ्ठे डोळे पाहताना असं वाटतं, मध्येच डोळे सांडतील आणि या चित्रपटातले तिचे डायलॉग विसरून दिव्या "मशाल" चित्रपटात घुसून म्हणेल, "ए भाय... कोई मेरी आँखें दिला दो भाय... पिक्चर पूरी करनी है..."

जॉन एब्राहमला तीन वेगळ्या भूमिकेत दाखवलं गेलं. चष्मा लाऊन राजनैतिक कपडे घातलेला जॉन अधिक भावतो. तुर्रेबाज फेटा आणि ऐटबाज मिशीवाला जॉनसुद्धा बरा वठलाय. पण खाकी वर्दीतला जॉन बघवत नाही. जॉन एब्राहमला आजवर पोलिसाच्या भूमिकेत पाहिलं नसल्याने कदाचित मला तसं वाटलं असेलही. मंत्री जॉन आणि शेतकरी जॉन आपापली कामं करताना दिसतात तरी. पण पोलिसवाला जॉन, हाणामारी आणि ओढून-ताणून केलेली कॉमेडी याखेरीज काहीच करताना दिसत नाही...

भाग्यश्री लिमये संपूर्ण चित्रपटात अधून-मधून दिसत राहते. पण चित्रपटाच्या शेवटच्या भागात तिला मिळालेला मोठा सीन तिने छान सांभाळला आहे. इतर सीन कधी संपतील असं होतं, पण भाग्यश्री लिमयेने सादर केलेला सीन संपूच नये असं वाटत राहतं इतपत चांगली अदाकारी झाली आहे...

पहिल्या "सत्यमेव जयते"मध्ये हिरोईन असून जॉन एब्राहमला चित्रपटाच्या शेवटी मारून टाकलं गेलं आणि हिरोईनला फुकट घालवलं होतं. पण यावेळी त्याची भरपाई करत दोन्हीही जॉनांना जित्तं सोडल्यानीत. ज्यूनियर जॉन डबल रोलमध्ये,आणि सीनियर जॉनऐवजी कोणीतरी दुसरा असता, शिवाय ज्यूनियर जॉनांमध्ये सस्पेन्सफूल गोंधळ दाखवला असता, तर हसू न येणारा एक विनोदी सीन कमी झाला असता आणि कथेत वेगळी वळणं दाखवता आली असती...

एकंदरीत, नो सक्षम कथानक, नो अप्रतीम अदाकारी, सुंदर कॅमेरा अँगल्स आणि तोडूफोडू हाणामारी असं मिक्चर असल्याने तीन तीन जॉनांच्या या तीन तिगाड़ा "सत्यमेव जयते २"चा काम बिगाड़ा झालाय हे नक्की...

@ अनिकेत परशुराम आपटे.