Monday, 18 October 2021

ढाई किलो के हाथवाला एँग्री मॅन...

"तारीख पे तारीख...", "हिंदुस्तान ज़िंदाबाद था, ज़िंदाबाद है और ज़िंदाबाद रहेगा...", "नो इफ नो बट, ओनली जट..."  "यह ढाई किलो का हाथ है..." हे सर्व दमदार संवाद कानी पडले की एकच व्यक्ती आठवते. ती व्यक्ती आहे अजयसिंह देवल, अर्थात आपल्या सर्वांच्याच परिचयाचे, 'द एँग्री ऍक्शन हिरो ऑफ बॉलीवूड...' म्हणजेच सन्नी देवल...

१९८३ साली प्रदर्शित झालेल्या, "बेताब" या चित्रपटापासून सन्नी देवल यांनी त्यांची अभिनय कारकिर्द सुरू केली. या कारकिर्दीला बहर आला तो १९८५ साली प्रदर्शित झालेल्या, "अर्जून" या चित्रपटामुळे. अर्जून यशस्वी झाला आणि सन्नी देवल यशाच्या शिखराकडे अग्रेसर झाले. पुढे, "जबरदस्त", "जोशीले", "डक़ैत", "पाप की दुनिया", "सल्तनत" अशा अनेक चित्रपटांमधून नायकाच्या भूमिका निभावत, सन्नी देवल यांनी 'ऍक्शन हिरो' हे बिरूद मिळवलं...

१९९० साली प्रदर्शित झालेला "घायल" हा चित्रपट, सन्नी देवल यांच्यासाठी मैलाचा खडक ठरला. याच चित्रपटाने सन्नी देवल यांना त्यांचा पहिला सर्वोकृष्ट नायकाचा फिल्मफेयर व राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. वरच्या पट्टीतली संवादफेक, पहिलवानी शरीरयष्ठी, यांच्या जोरावर सन्नी देवल यांनी, एक नायक असलेल्या अनेक हाणामारीपटात काम केलं. त्यांच्या याच इमेजमुळे, "वर्दी", "त्रिदेव", "विश्वात्मा", "लुटेरे", "जानी दुश्मन", "बॉर्डर" अशा मल्टीस्टारर चित्रपटांत सन्नी देवल यांना महत्वाच्या भूमिका मिळाल्या...

ऍक्शन चित्रपटांसोबतच, "सोनी-महिवाल", "राम-अवतार", "मंज़िल-मंज़िल", "दामिनी", "अपने", अशा अनेक वेगळ्याप्रकारच्या चित्रपटांमध्ये सन्नी देवल यांनी केलेल्या भूमिका प्रेक्षकांना आवडल्या. अर्थात यातल्या काही चित्रपटांमध्येही सन्नी देवल यांची हाणामारीची दृश्य होतीच, पण ती कमी प्रमाणात होती. कालांतराने पुन्हा एकेरी नायक असलेल्या ऍक्शनपटांकडे वळत सन्नी देवल यांनी "ज़िद्दी", "सलाखें", "ज़ोर", "घातक", "चॅम्पियन" असे एका मागून एक हिट चित्रपट दिले...

सन्नी देवल यांच्या आजवरच्या कारकिर्दीमधले माझ्या दृष्टीने दोन सर्वोत्कृष्ट सीन्स होते, "घायल" आणि "घातक" या चित्रपटांमधले. अजय मेहरा आपल्या भावाचं प्रेत हातात घेऊन रडतो, मग फोन करून भावाला मारल्याचं सांगतो, हे "घायल" चित्रपटातलं दृष्य आणि काशिनाथ कातियाच्या गळ्यात पट्टा अडकवून त्याला भुंकायला सांगतो, हे "घातक" चित्रपटातलं दृष्य, ही दोन्हीही दृष्य कमाल रंगली होती. अजय मेहराचं लहान मुलासारखं दु:खी होणं आणि काशिनाथचा तो त्वेष आणि संताप, सन्नी देवल यांनी अप्रतीम सादर केले होते...

अभिनय आणि हाणामारीची दृष्य यांसोबत, सन्नी देवल अजून एका गोष्टीसाठी प्रसिद्ध होते. ती गोष्ट म्हणजे अनेक चित्रपटांत त्यांच्यावर चित्रीत झालेली नृत्यप्रधान गाणी. "जीत" या चित्रपटातलं 'यारा ओ यारा...', हे गाणं असो किंवा 'मेरा दिल ले गई ओए...' हे "ज़िद्दी" चित्रपटातलं गाणं असो, अशा अनेक गाण्यांमध्ये सन्नी देवल यांच्यावर चित्रीत झालेले नृत्याविष्कार बघण्यासारखे होते. सन्नी देवल यांच्या शरीरयष्टीचा पुरेपूर फायदा घेता येईल अशा प्रकारे ती नृत्य दिग्दर्शित केली गेली होती...

"यमला पगला दिवाना", "बोले सो निहाल", "पोस्टर बॉईज" अशा काही चित्रपटांमध्ये सन्नी देवल यांनी सादर केलेल्या विनोदी भूमिकाही प्रेक्षकांना बऱ्यापैकी आवडल्या होत्या. एका बाबतीत मात्र सन्नी देवल थोडेसे नशीबवान ठरले किंवा मागे राहिले. ती गोष्ट म्हणजे नकारात्मक व्यक्तिरेखा. "चाहनेवाले" आणि "फॉक्स" या दोन चित्रपटात सन्नी देवल यांनी नकारात्मक भूमिका साकारल्या होत्या. पण दोन्हीही चित्रपट सपशेल अयशस्वी ठरले, त्यामुळे नकारात्मक भूमिका त्यांना विशेष फळल्या नाहीत...

याखेरीज, चित्रपटांशी निगडीत अजून एका गोष्टीत सन्नी देवल यांनी हात आजमावला. ती गोष्ट म्हणजे दिग्दर्शन. "दिल्लगी" आणि "घायल वन्स अगेन" हे दोन्ही चित्रपट सन्नी देवल यांनी दिग्दर्शित केले होते. ते फारसे चालले नाहीत, पण सन्नी देवल यांच्या दिग्दर्शनाची चांगली स्तूती झाली होती. चित्रपटसृष्टीत छान जम बसलेला असतानाच, २०१९ साली सन्नी देवल यांनी भा.ज.प.मध्ये प्रेवश केला आणि निवडणूकीत घसघशीत विजयही मिळवला...

आज १९ ऑक्टोबर. आज, ढाई किलो के हाथवाल्या या बॉलीवूडच्या एँग्री मॅनचा वाढदिवस. सन्नी देवल यांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा...

@ अनिकेत परशुराम आपटे.

Sunday, 10 October 2021

चिरतरूण महानायक...

"आज खुश तो बहुत होगे तुम...", "नाम, विजय | विजय दीनानाथ चौहान, पूरा नाम...", "रिश्ते में तो हम सबके बाप लगते हैं, नाम है शहनशाह...", "आय कॅन टाक इंग्लीस, आय कॅन वाक इंग्लीस, आय कॅन लाफ इंग्लीस, बिकॉज इंग्लीस इज अ फन्नी लँग्वेज..." हे संवाद रुपेरी पडद्यावर अजरामर झाले, ते इंक़िलाब हरिवंशराय श्रीवास्तव अर्थात आपल्या सर्वांचे लाडके व प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यामुळे...

स्वातंत्र्यपूर्व काळात, "इंक़िलाब ज़िदाबाद" या प्रचलित घोष वाक्याचा श्रीवास्तव कुटुंबावर इतका प्रभाव होता, की घरात जन्मलेल्या बाळाचं नावच इंक़िलाब ठेवलं गेलं. पुढे हरिवंशराय श्रीवास्तव यांचे मित्र व कवी सुमित्रानंदन पंत यांच्या सांगण्यावरून इंक़िलाब हे नाव बदलून अमिताभ ठेवलं गेलं आणि हरिवंशराय श्रीवास्तव यांनी स्वत: लेखनासाठी 'बच्चे जैसे' अर्थात बच्चन हे नाव धारण केल्यामुळे तो मुलगा अमिताभ हरिवंशराय बच्चन या नावाने ओळखला गेला...

१९६९ साली प्रदर्शित झालेल्या "सात हिंदुस्तानी" या चित्रपटाद्वारे अमिताभ बच्चन यांनी रुपेरी पडद्यावर पहिलं पाऊल ठेवलं. "आनंद", "मिली", "नमक हराम" या चित्रपटांमधून सहनायक म्हणून काम करत असताना, "ज़ंजीर" प्रदर्शित झाला आणि नायक म्हणून अमिताभ बच्चन रातोरात प्रसिद्ध झाले. इतकंच नाही, तर 'एँग्री यंग मॅन' हे टोपणनावही त्यांना मिळालं. पुढे, "कालिया", "दिवार", "कभी कभी", "नमक हलाल", "कूली", "त्रिशूल" अशा अनेक यशस्वी चित्रपटांची लांबच लांब रांग लागली...

एक नायक म्हणून चार दशकांहून अधिक काळ रुपेरी पडदा गाजवणाऱ्या अमिताभ बच्चन यांनी, "डॉन", "परवाना", "आग", "आँखें" या चित्रपटांमध्ये खलनायकी व्यक्तिरेखाही साकारल्या. त्याचसोबत, "हेरा-फेरी", "दो और दो पाँच", "चुपके चुपके", "अमर अक़बर एँथनी" अशा चित्रपटांमध्ये अमिताभ बच्चन यांच्या विनोदी भूमिकांनाही प्रेक्षकांनी उचलून धरलं. याशिवाय, "सोदागर", "शक्ति", "अभिमान", "आलाप", अशा चित्रपटांत त्यांच्या वाट्याला आलेल्या गंभीर स्वरूपाच्या भूमिकाही चांगल्याच लक्षात राहिल्या...

मधल्या काळात नायक म्हणून, "मृत्यूदाता", "इंद्रजीत", "लाल बादशाह" अशा प्रकारचे चित्रपट अमिताभ बच्चन यांनी केले. काही चित्रपट बरे चालले तर काहींकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. अमिताभ बच्चन यांच्या कारकिर्दीला धक्का लागतो की काय असं वाटत असतानाच, "मोहब्बतें" प्रदर्शित झाला आणि नारायण शंकरच्या प्रभावशाली चरित्र व्यक्तिरेखेने अमिताभ बच्चन यांनी मेन स्ट्रीम चित्रपटांत जबरदस्त पुनरागमन केलं. त्यांच्या चरित्र भूमिकांनी नटलेले, "ब्लॅक", "वज़ीर", "अक़्स", "पा", "खाकी" प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आणि अमिताभ बच्चन यांच्या दुसऱ्या इनिंगचे अश्वही चौखूर उधळू लागले...

या दुसऱ्या इंनिंगमध्ये चरित्र नायक, चरित्र सहनायक किंवा चरित्र सहकलावंत या भूमिकांसोबत, "बावर्ची" या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी निभावलेली सूत्रधार किंवा निवेदकाची भूमिकाही, "लगान", "जोधा अक़बर", "परिणीता" या चित्रपटांद्वारे त्यांच्या वाट्याला आली. याखेरीज, "चेहरे", "बदला", "१०२ नॉट आऊट", "भूतनाथ" या चित्रपटांमधल्या अमिताभ बच्चन यांच्या वेगळ्या धाटणीच्या भूमिकांना प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली...

आज ११ ऑक्टोबर. श्री अमिताभ हरिवंशराय बच्चन यांचा जन्मदिवस. बोलके ओठ, धारदार आवाज, सुस्पष्ट उच्चार, कसदार अभिनय आणि मनमिळाऊ स्वभाव, यांमुळे आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या या चिरतरूण महानायकाला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा...

"छूकर सबके मन को...
किया तूने यह इशारा...
बदलेंगे सब सितारे...
तूही सिकंदर रहेगा हमारा..."


@ अनिकेत परशुराम आपटे.

Wednesday, 6 October 2021

निरागस मुक्ती...

बऱ्याच भयपटांमध्ये आपण पाहतो, कुठेतरी एक अतृप्त आत्मा अडकलेला असतो. आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी तो आत्मा अनेकांना त्रास देतो, काहींचा जीवही घेतो. मग नायक किंवा नायिकेकडून असं काहीतरी घडवलं जातं, ज्यामुळे तो आत्मा मुक्त होतो. आत्म्याच्या मुक्तीचा प्रसंग, कधी गंभीर तर कधी विनोदीपद्धतीने प्रेक्षकांसमोर येतो. हाच मुक्तीचा प्रसंग जर भावस्पर्शी असला तर... अशाच निरागस मुक्तीचा प्रसंग हळुवार पद्धतीने रेखाटलेला दिसतो, २००८ साली प्रदर्शित झालेल्या "भूतनाथ" या चित्रपटातील एका गाण्यात...

"भूतनाथ, घरमें एक पूजा होनेवाली है जिससे तुम एंजल से स्टार एंजल बन जाओगे..." गच्चीवर उभ्या असलेल्या कैलाशनाथला बंकू हे सांगतो आणि सुखविंदर सिंह यांच्या आवाजात, वरच्या पट्टीत हे बोल ऐकू येतात...

"क्रोध के बोझ को मनपर उठाए काहे चलता है प्राणी...
क्षमा जो शत्रू को भी कर दे, वही मुक्त है वही है ज्ञानी..."

कैलाशनाथला समजतं, की ते त्यांचं श्राद्ध आहे आणि मुलावरचा राग विसरून त्यांना अनंताची वाट धरायची आहे. त्याचवेळी हरिहरन यांच्या स्वरातले हळुवार बोल सुरू होतात...

"समय का पहिया चलता है, दिन ढ़लता है, रात आती है...
रात में एक छोटासा, एक नन्हासा दिपक जलता है...
उसकी जरासी ज्योत सही, पर दूर से उसको देखकर...
कोई बरसों का मुसाफिर, गिरते गिरते सँभलता है..."

बायकोच्या विरहाने आणि मुलाच्या दुराव्याने व्यथित झालेल्या कैलाशनाथच्या शरीराची रात्र होते म्हणजेच अंत होतो. पण मुलावरच्या व तिथे येणाऱ्या इतरांवरच्या क्रोधामुळे, देवलोक आणि मृत्यूलोक यांच्या मध्ये अडकलेल्या कैलाशनाथचा आत्मा एक बिभत्स रूप धारण करत असतो...

क्रोधाच्या त्याच अंधारात बंकू नावाचा एक छोटासा कवडसा येतो. बंकूच्या त्या गोड वागण्याने भूतनाथ विरघळतो आणि स्वत:ला बदलतो. घरात एक पूजा आहे आणि पूजेला सगळे असायला हवेत ही भाबडी कल्पना मनात ठेऊन बंकू कैलाशनाथला त्यांच्याच श्राद्धासाठी बोलावतो आणि गाण्याच्या पुढच्या ओळी सुरू होतात...

"मैंने जाते जाते जाना कौन है अपना कौन पराया...
बस तू ही मेरा अपना है, बस तूने प्यार निभाया..."

तिथे बसल्या बसल्या बंकूकडे पाहत कैलाशनाथ विचार करतात, "माझा स्वत:चा मुलगा मला मरणाच्या दारात सोडून निघून गेला, पण हा लहानगा पोर, कुठलंही नातं नसताना माझ्या मुक्तीसाठी प्रयत्न करतो आहे. किती प्रेमळ आहे हा बंकू..." आणि बंकूलाच कैलाशनाथ विचारतात...

"काम, क्रोध और लोभ में तजकर जा सकता हूँ...
तुझको चाहूँ भी तो, मैं कैसे भुला सकता हूँ...
तेरा प्यार भी तो एक बंधन है...
तू ही बता, क्या मैं मुक्ती पा सकता हूँ..??
तू नहीं जानता तू मेरा अब है क्या...
तुझको ही देखा, तो दिल कैसे पिघलता है..."

बंकू, तू माझ्या मुक्तीसाठी हे श्राद्ध करतो आहेस. लोभ, क्रोध, अशा दुर्गुणांपासून मी अलिप्त राहू शकतो, हा मृत्यूलोक मागे ठेऊन मी पुढेही जाऊ शकतो. पण बाळा, मला तुझा लळा लागला आहे रे... तुला सोडून मी कसा जाऊ..." बंकूला उद्देशून कैलाशनाथचा आत्मा मनातल्या मनात हे बोलत असतानाच त्याला विजयच्या येण्याची चाहूल लागते. कैलाशनाथ दाराकडे पाहतात आणि विजय घरात प्रेवश करतो...


"दिन में सोया रात आयी तो अब जागा सोया कब था...
अब क्या सूरज ढूँढ़े पगले, डूब गया सूरज कब का...
बरसों पहसे जो एक नदी प्यार की...
बह गई वह नदी, हाथ अब तू क्या मलता है..."

आपल्या आई-वडिलांच्या आठवणीत घरभर फिरत असलेल्या विजयला पाहताना कैलाशनाथ म्हणतात, "इतका काळ तू आमच्यापासून दूर राहिलास. आम्हाला एकदाही भेटायला आला नाहीस. प्रेमाची ऊब देणारा तुझा बाप गेला, मायेचा शीतल ओलावा देणारी तुझी आई गेली. आता इथे येऊन तू काय मिळवलंस...!!!"

उशीरा का होईना पण विजयला पश्चात्ताप झालेला असतो आणि आपल्या वडिलांच्या म्हणजेच कैलाशनाथच्या मुक्तीसाठी तो प्रार्थना करतो. कैलाशनाथ भरून पावतात आणि मुक्तीच्या मार्गाला लागतात. पूजेत बसलेल्या बंकूला काहीतरी वाटतं. तो मागे पाहतो आणि साश्रू नयनांनी कैलाशनाथ बंकूचा निरोप घेतात...


"मैं क्या जानू क्या है मुक्ती, नहीं करो यह बहाना...
देखो मुझे सिखाकर जीना, ऐसे मुझको छोड़ न जाना..."

आपल्या डोळ्यांदेखत आपल्या भूतनाथला निघून गेलेलं पाहून बंकूला दु:ख होतं. त्याचे आई-बाबा सांगतात की भूतनाथ मुक्त झाला. पण लहानगा बंकू म्हणतो, "मुक्त होणं म्हणजे काय ते मला कुठे माहित... ज्याने मला जगायला शिकवलं, नातं जोडायला शिकवलं, तो भूतनाथ मला का सोडून गेला..." हा विचार मनात आणत बंकू गच्चीवर जातो...


"आसमान में जगमग तारे, मेरी आँख में झिलमिल आँसू...
कहाँ छुपा है, कोई इशारा तो दे तू..."

बंकू सर्व ताऱ्यांमध्ये भूतनाथला शोधतो, त्या हाका मारतो. आसमानात कुठेतरी भूतनाथ बंकूसमोर येतो आणि लगेचच अंतर्धान पावतो. गाणं संपतं, पण आपल्या डोळ्यातलं पाणी संपत नाही...

जावेद अख़्तर यांनी अतिशय सुंदर शब्दरचना केली आहे. गाण्याचं संगीत अतिशय हृदयस्पर्शी आहे. विशेषत: बासरीचा अप्रतीम वापर संपूर्ण गाण्यात आपल्याला आढळतो. गाण्याच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत बासरीवर एक धुन आपल्याला ऐकू येत राहते. पण गाण्यातील एका प्रसंगात, जेव्हा आपल्या मुलाच्या प्रार्थनेमुळे कैलाशनाथच्या मनावरचं ओझं नाहीसं होतं आणि ते मुक्तीच्या मार्गाला लागतात, तेव्हा बासरीवर ऐकू येणारी सरगम आपल्या मनाला भिडते आणि डोळ्यांतून पाणी आल्यावाचून राहत नाही...

गाण्यात पाहण्यासारखी दुसरी गोष्ट म्हणजे अमिताभ बच्चन यांची अप्रतीम अदाकारी. कैलाशनाथचं आपल्या मुलावरचं प्रेम, भूतनाथची बंकूमधली भावनिक गुंतागुंत, मुलाकडून आपल्या मुक्तीचा मार्ग सुकर झाल्याचा आनंद आणि त्यासोबतच बंकूपासून दूर जाण्याचं दु:ख, या सगळ्या भावना, अमिताभ बच्चन यांनी सुरेख रेखाटल्या आहेत. एखाद्या अतृप्त आत्म्याला मुक्ती मिळते तेव्हा तो सुखांत समजला जातो. पण भूतनाथच्या मुक्तीला एक दु:खाची किनार आहे...

भूतनाथ आणि बंकू एकमेकांपासून दुरावलेले पाहताना आपल्याला सतत वाटत राहतं, की बंकूसाठी तरी, कैलाशनाथला मुक्तीच मिळू नये. चित्रपटाच्या शेवटी येणाऱ्या या गाण्याचा शेवट दु:खाने भरलेला असला, तरी चित्रपटाचा शेवट मात्र बंकूच्या बाजूने केलेला सुखांतच आहे...

@ अनिकेत परशुराम आपटे.