Monday, 21 December 2020

खतरनाक बालबुद्धी...

खेळात नाणेफेकीचा कौल खूप महत्वाचा असतो. नाणेफेकीमुळे फक्त निर्णय नाही, तर खेळाचा परिणामही बदलू शकतो. हे झालं खेळाचं, पण हीच नाणेफेक जर खऱ्या आयुष्यात वापरली गेली तर... याच प्रश्नाचं उत्तर आहे २००१ साली प्रदर्शित झालेला "अभय..."

आई गेल्यावर आपले वडिल (मिलिंद गुणाजी) व सावत्र आई (किट्टू गिडवानी) यांच्यासोबत अभय आणि विजय हे जुळे भाऊ राहत असतात. मोठा विजय जितका सहनशील, लहान अभय तितकाच बंडखोर असतो. आपल्या खडतर आयुष्यातून बाहेर पडण्याचा आणि वेगळं जीवन जगण्याचा एकमेव उपाय असतो मामासोबत (विक्रम गोखले) जाण्याची संधी. अभय-विजय नाणेफेकीचा कौल घेतात आणि तिथून दोघांची आयुष्य बदलतात...

नाणेफेक जिंकलेल्या विजयला (कमल हसन) एक चांगलं आयुष्य मिळतं. तो सैन्यातला मोठा अधिकारी होतो. पण नाणेफेक हरलेला अभयमात्र (कमल हसन) ठार वेडा होतो. विजयच्या जगात सामाजिक घटक, माणसं, प्रेम, मैत्री हे सर्व असतं. अभयनेही स्वत:भोवती एक वेगळंच जग तयार करून ठेवलं असतं. अभयच्या त्या जगात राग, द्वेष, विद्रूपता यांचा वावर असतो. एका क्षणी अभय त्याच्या आभासिक जगानिशी विजयच्या जगात प्रवेश करतो आणि अभय विरुद्ध विजय ही लढाई सुरू होते ज्यात चित्रपटाचा शेवट होतो...

कथा काही फारशी वेगळी नाही पण ती ज्याप्रकारे उलगडत जाते त्यामुळे चित्रपट पहावासा वाटतो. चित्रपटातले संजय नाईक यांचे स्पेशल इफेक्ट्स, थिर्रू यांचे विविध कॅमेरा एँगल्स आणि विक्रम धर्मा यांची जबरदस्त हाणामारी व साहस दृष्य चित्रपटाला उठाव देतात. गाणी मोजकीच आहेत पण ती कथेला पूरक असावीत किंवा श्रवणीय असावीत अशी नाहीत. खरंतर गाणी नसती तरी काही फारसा फरक पडला नसता. पण अभयच्या तोंडी असलेले जावेद अख़्तर यांचे शब्द कमालीचे सुंदर आहेत. कथेवर आणि चित्रपट पाहणाऱ्या प्रक्षकांवरही त्या शब्दांचा परिणाम जाणवतो...

आईचं आपल्याच मुलाला खून करण्यासाठी किंवा आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करणं, परेडसारख्या कडक सुरक्षा व्यवस्था असलेल्या ठिकाणी अभयचं सुरा घेऊन सर्रास वावरणं, मोठे झालेले अभय व विजय यांच्या दिसण्यात फरक असूनही काहींचा गोंधळ उडणं, चित्रपटातल्या या काही गोष्टी न पटण्यासारख्या आहेत. पण या गोष्टी सोडून जर चित्रपट पाहिला, तर समोर दिसणारा एकमेव घटक म्हणजे कमल हसन एके कमल हसन...

विजय आणि अभय या दोन भिन्न व्यक्तिरेखा रंगवताना कमल हसन यांच्या अभिनयाचाच नाही, तर शारीरिक क्षमतेचाही चांगलाच कस लागला आहे. विजय आणि अभयच्या देहबोली, हालचाली, बोलण्याचा लेहेजा, डोळ्यातले भाव आणि विचार यांतला फरक दर्शवताना कमल हसन यांनी अप्रतीम अभिनय केला आहे. काही वाईट केल्यावर डॉक्टर किंवा आईचा भास होऊन रडणारा, सॉरी म्हणणारा अभय जितका बालबुद्धी वाटतो, वेगळा जोश चढल्यावर हिंसक झालेला अभय तितकाच खतरनाकही होतो. कमल हसन यांनी अभयचे हे दोन्ही भाव उत्तम वठवले आहेत...

कमल हसन यांच्या अदाकारीसोबतच अभयच्या बालबुद्धी आभासिक जगातली चंद्रशेकरन यांनी दिलेले कार्टून्स आणि त्या कार्टून्सवर चित्रित झालेली काही दृष्य चित्रपटाचा महत्वाचा घटक आहेत. कार्टून्स ही बहुतांश हाणामारीच्या दृष्यात वापरली गेल्याने त्या हिंसक दृष्यांची तीव्रता बऱ्यापैकी कमी होते. त्या कार्टून दृष्यांची लांबीही आटोक्यात असल्याने कथेला व साहसदृष्यांना एक वेगळाच टच मिळतो आणि ती दृष्य आपण नीट पाहूही शकतो...

एकंदरीत, कमल हसन यांच्या "धयम" या कादंबरीवर आणि "आलावंधन" या दाक्षिणात्य चित्रपटावर बेतलेला सुरेश कृष्णा दिग्दर्शित "अभय" हा चित्रपट, कमल हसन यांच्या अप्रतीम अदाकारीचा उत्तम नमूना आहे...

@ अनिकेत परशुराम आपटे.

No comments:

Post a Comment