Thursday, 18 July 2024

आधुनिक मायाजालात हरवलेला अवतार...

कलियुगाच्या अंताला प्रकट होणाऱ्या श्री विष्णूच्या दहाव्या अवताराबद्दल सर्वांनाच माहित आहे. त्याच कल्की अवताराच्या जन्माच्या आधी होणाऱ्या काही घडामोडींवर आधारित आहे नाग अश्विन दिग्दर्शित, "कल्की २८९८ ए.डी..."


चित्रपटात एकीकडे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अनैसर्गिक पद्धतीने गर्भधारणा करवून त्या गर्भाच्या स्रोताचा वापर करून आपल्या राजाला म्हणजेच यास्कीनला (कमल हसन) अमरत्व प्राप्त करून देण्याच्या प्रयत्नात असलेला राक्षसी ताकदीचा एक घटक दिसतो. तर दुसरीकडे श्री विष्णूच्या दहाव्या अवताराच्या प्रतीक्षेत असणाऱ्या आणि असामान्य राक्षसी ताकदींच्या विरोधात उभ्या काही लढवय्यांचा दुसरा घटक असतो. याशिवाय चित्रपटात अजून तीन व्यक्तिरेखा आहेत...

पहिली आहे, स्वत:च्या गर्भात दुष्टांचा नायनाट करणारी महाशक्ती वाढवणारी, आणि हे बाळ कोण आहे याबद्दल जराही कल्पना नसलेली Sum80 अर्थात सुमती (दीपिका पदुकोण). दुसरा आहे स्वत:ची महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी चांगल्या-वाईटाचा विचार न करता लढणारा भैरव (प्रभास) आणि तिसरे आहेत महाभारत काळातले महायोद्धे, चिरंजीव अश्वथामा (अमिताभ बच्चन) ज्यांना माथ्यावरील भळभळणाऱ्या जखमेसह कलियुगाच्या अंतापर्यंत जिवंत राहण्याचा शापही मिळतो. आणि क्षमा-याचना केल्यावर कलियुगाच्या अंताला जन्म घेणारा श्री विष्णूचा दहावा अवतार जिच्या गर्भात असेल, तिचं रक्षण करून मुक्ती मिळवण्याचा उ:शापही मिळतो...

या चारही घटकांच्या वेगवेगळ्या पण एकमेकात गुंतलेल्या प्रवासातून चित्रपट उलगडत जातो. गाणी उगाच येऊन वेळ घालवतात असं वाटतं. मध्यंतरापर्यंत कथानक थोडं रटाळ झालं आहे. कथेला खऱ्या अर्थाने वेग मिळतो, तो मध्यंतरानंतर. कथेत येणाऱ्या काही टप्प्यांमध्ये, जागांमध्ये, प्रसंगांमध्ये "Terminator", "Matrix Revolutions", "Avatar", "Transformers", "Avengers", "Justice League", "Black Panther" या इंग्रजीपटांचा आणि "बाहुबली द बिगिनिंग" व "ब्रह्मास्त्र" या भारतीयपटांचा प्रभाव दिसतो. चित्रपटात चांगली आणि वाईट प्रवृत्ती दर्शवण्यासाठी वापरलेले रंग चपखल आहेत. म्हणजे दु:ष्ट प्रवृत्तीच्या माणसांसाठी काळा कपडेपट तर त्यांच्या बंदुकींसाठी लाल गोळ्या वापरल्या आहेत. चांगल्या व्यक्तींसाठी पांढरे कपडे आणि त्यांच्या बंदुकींसाठी निळ्या रंगाच्या गोळ्या वापरल्या गेल्या आहेत...

कलावंतांची निवड बरी झाली आहे. एस. एस. राजामोली, राम गोपाल वर्मा, ब्रह्मनंदम् आणि शोभना यांनी त्यांच्या त्यांच्या वाट्याला आलेल्या छोट्या भूमिका चांगल्या साकारल्या आहेत. दिशा पटणीचा चित्रपटात झालेला प्रवेश लक्षात येतो. पण तिची एग्झीट समजली नाही. कारण एका प्रसंगानंतर दिशा पटणी पुन्हा चित्रपटातच दिसत नाही. चांगल्या-वाईटाच्या कचाट्यात सापडलेली आणि स्वत: संभ्रमात अडकलेली सम ८० अर्थात सुमतीची व्यक्तिरेखा दीपिकाने चांगली वठवली आहे. प्रभास मात्र "बाहुबली" आणि "साहो" मधून बाहेर आलेला दिसत नाही. संपूर्ण चित्रपटातली भैरवची वेशभूषा, चित्रपटाच्या शेवटी त्याला मिळालेल्या नव्या ओळखीची ग्वाही देते. चित्रपटभर ती वेशभूषा जरा खटकते. पण चित्रपट शेवटाला आल्यावर मात्र ती सार्थकी वाटते...

अमिताभ बच्चन यांनी साकारलेलं चिरंजीव अश्वथामाचं पात्र छान जमलं आहे. अमितजींची देहबोली, त्यांचे संवाद आणि त्यांची ऊंची महाभारत काळाशी सुसंगत वाटते. पण चित्रपटात सर्वात जास्त प्रभावशाली कोणतं पात्र झालं असेल, तर ते आहे कमल हसन यांनी साकारलेला यास्कीन. कमल हसन यांचे फक्त तीन प्रसंग आहेत संपूर्ण चित्रपटात. पण त्यांनी आपल्या देहबोलीने आणि मोजक्या संवादांनी ती दृष्य जबरदस्त रंगवली आहेत. "गिरफ्तार"नंतर अमिताभ बच्चन आणि कमल हसन पुन्हा इतक्या वर्षांनी एकत्र एकाच पडद्यावर दिसले खरे. पण त्यांचं एकत्रित दृश्य नव्हतं. कदाचित येणाऱ्या भागात या दोन मातब्बर कलावंतांना एकत्र पाहता येईल...

चित्रपटातले दोन संदर्भ लक्षात नाही आले. विजय धनुष्य ज्यांच्या हाती होता ते सूर्यपूत्र कर्ण जर नव्याने परतले, तर गांडीव धनुष्यधारी अर्जूनही पुन्हा परतायला हवेत असं वाटतं. शिवाय यास्कीनच्या दुष्ट शक्तींनी सम ८०च्या गर्भात कृत्रीम पद्धतीने बाळ रुजवलं आहे. मग श्री विष्णूचा दहावा अवतार तो हाच का... आणि जर हे खरं तर यास्कीन वाईट कसा... असो. शंका खूप आहेत पण तुर्तास तरी हे प्रश्न अनुत्तरीतच आहेत. One time watch असणाऱ्या "कल्की"च्या पुढच्या भागात कदाचित सर्व उत्तरं मिळू शकतील...

@ अनिकेत परशुराम आपटे.

No comments:

Post a Comment