"क्यौं जनाब, ईंट का जवाब पत्थर से देने आए हो..." "नहीं, धोखे का जवाब, बदले से..." हे संवाद आहेत, २०२४ साली प्रदर्शित झालेल्या, "फायटर" या चित्रपटातले...
फुलवामामध्ये आपल्या जवानांवर झालेला हल्ला आणि त्याचं प्रतिउत्तर म्हणून आपल्या वायूसेनेने बालाकोट येथे केलेला एयर स्ट्राईक, यावर बेतलेलं कथानक म्हणून "फायटर" या चित्रपटाची चांगलीच हवा होती. पण फुलवामा आणि बालाकोट या घटना चित्रपटाचा एक छोटा भाग होता हेच चित्रपट पाहताना जाणवतं...
कथानक सुरू होतं श्रीनगर एयर बेसवर होणाऱ्या हल्ल्याच्या खबरेने. तो हल्ला मोडीत काढण्यासाठी 'एयर ड्रॅगन्स' या घातक समुहाची स्थापना केली जाते. त्यांच्या ट्रेनिंग दरम्यानच फुलवामाचा हल्ला होतो आणि प्रतिउत्तरादाखल बालाकोटचा एयर स्ट्राईक केला जातो. त्या एयर स्ट्राईकचा बदला घेण्यासाठी अझ़र अख़्तर (ऋषभ शेणॉय) नावाचा एक अतिरेकी श्रीनगर एयर बेसलर अचानक हल्ला करतो. प्रतिउत्तरादाखल शमशेर 'पॅटी' पठानिया (ऋतिक रोशन), बशीर 'बॅश' ख़ान (अक्षय ओबेरॉय) आणि सरताज 'ताज' गिल (करण सिंह ग्रोव्हर) हे तीन एयर ड्रेगन्स दिलेले हुकूम मोडत बॉर्डर ओलांडून पाकिस्तानात घुसतात...
पॅटी वाचतो पण ताज आणि बॅश शत्रूच्या जाळ्यात अडकतात. पॅटीवर या गोष्टीचा ठपका ठेऊन त्याला एयर ड्रॅगन्स समुहातून निलंबित करून त्याची बदली केली जाते. तिथे पाकिस्तान सरकार ताज आणि बॅशला सोडायला तयार होतं. पण अझ़र मात्र बॅशला मारून त्याचं शव परत पाठवतो. या गोष्टीचा बदला घेण्यासाठी एक मिशन ठरवलं जातं. ताज आणि बॅश आपल्यामुळे पकडले गेले हा सल मनात ठेवलला पॅटी पुन्हा एकदा दिलेले हुकूम झुगारून मिशनमध्ये शिरकाव करतो आणि मिनल 'मिनी' राठोड़ (दीपिका पदुकोण) व एयर ड्रॅगन्सचा हेड राकेश 'रॉकी' जयसिंह (अनिल कपूर) यांच्या मदतीने अझ़र अख़्तरसह सर्व अतिरेक्यांना कंठस्नान घालतो आणि ताजलाही वाचवतो...
फक्त फुलवामा आणि बालाकोट या घटनांना धरून चित्रपटाचं कथानक तयार झालं आसतं तर "उरी" सारखा परिणाम साधता आला असता. पण बदल्यांची मालिका आणि काही काल्पनिक व्यक्तिरेखांचा भरणा, यांमुळे कथानक मुख्य रस्त्यापासून थोडं भरटकल्यासारखं जाणवलं. चित्रपटात गाणी जर नसती तर चित्रपट वेग राखण्यात यशस्वी झाला असता. त्यातल्या त्यात, "हीर आसमानी..." आणि "शेर खुल गए..." ही दोन गाणी तितकीच वेगवान असल्याने जास्त फरक पडत नाही. शिवाय, "सुजलाम् सुफलाम् मलयजं शितसाम्..." ही ओळ ज्या पद्धतीने वापरली गेली आहे, चित्रपटातलं जोशपूर्ण वातावरण राखण्यात ती प्रभावी ठरते...
चित्रपटाच्या तीन जमेच्या बाजू आहेत. चित्रपटाचं पार्श्वसंगीत, चित्रपटात दाखवलेली साहसदृष्य आणि कलावंतांची अदाकारी. वेगवान कथानकाला शोभेल असं जबरदस्त पार्श्वसंगीत चित्रपटाला लाभलं आहे. चित्रपटाची साहसदृष्य तर भन्नाट रंगली आहेत. विशेषत: पॅटीची एंट्री आणि पॅटी व रॉकीची हवाई जुगलबंदी. साहसदृष्यांसाठी वापरलेले कॅमेरा एँगल्स निव्वळ अप्रतीम आहेत. अधाकारी म्हटली, तर ऋतिक रोशन आणि दीपिका पदुकोण जरी चित्रपटाचे नायक-नायिका असले, तर अनिल कपूर यांनी अदाकारीमध्ये बाजी मारली आहे. चित्रपटातले संवादही दमदार आहेत. काही संवाद तर टाळ्या घेणारे ठरलेत...
एकंदरीत, सुडांची मालिका दर्शवणारं कथानक, हा उल्लेख होईल, असा चित्रपट म्हणजे, सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित, "फायटर..."
@ अनिकेत परशुराम आपटे.
No comments:
Post a Comment