Thursday, 28 March 2024

कोंदणातला सूर्य...

'कोंदणातला हिरा' असं ज्यांचं वर्णन करता येईल, ते महापुरुष म्हणजेच स्वतंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर...


तात्यारावांना आयुष्यभर कोंदणातच रहावं लागलं. परिस्थितींचं कोंदण, ब्रिटीश राजवटीचं कोंदण. पार भगुरपासून ते फर्ग्यूसन कॉलेजपर्यंत आणि अंदमानच्या सेल्यूलर जेलपासून रत्नागिरीपर्यंत, हा हिरा जरी कोंदणातच राहिला, तरीही तात्यारावांची प्रतिमा झळाळत्या सूर्याप्रमाणे उजळली. अशा अगाध व्यक्तिमत्वाला तीन-सवा तीन तासांच्या कथानकाद्वारे दाखवणं म्हणजे चांगलंच कठिण काम. पण अभिनेते-दिग्दर्शक रणदीप हुडाने ही कामगिरी चोख पार पाडली आहे...

चित्रीकरण, छायांकन, पार्श्वसंगीत, कथानक आणि अदाकारी या सर्वच गोष्टी उत्तम झाल्या आहेत. आणि सोन्यावर कळस म्हणजे चित्रपटातले संवाद. काही वेळा टाळ्या याव्यात आणि काही वेळा 'वाह वाह', असे ते संवाद खुसखुशीत नसतील, पण दर्जेदार नक्कीच होते. चित्रपटात अनेक वेळा वैचारिक द्वद्वांचं दर्शन घडलं. तात्याराव आणि महात्मा गांधी यांचे एकत्रित प्रसंग, लोकमान्य टिळक आणि तात्यारावांची एकत्रित दृष्य, तात्याराव आणि रेगिनाल्ड क्रेडॉक यांच्यातला प्रसंग, ही सर्व नुसत्या संवादांनी भरलेली दृष्य नसून तात्यारावांच्या उच्च आणि प्रगल्भ विचारांचा तो एक समुद्रच होता असं माझं मत आहे...

मध्यंतरानंतरचा अर्ध्याहून अधिक भाग अंदमानच्या सेल्यूलर जेलवर प्रकाशझोत टाकतो. कैद्यांना, विशेषत: भारतीय कैद्यांना दिली जाणारी वागणूक, शारीरिक व मानसिक खच्चीकरण करण्यासाठी दिल्या जाणाऱ्या अमानुष शिक्षा, या सर्वांचं परिणामकारक दर्शन घडतं. एकांतवासातली दृष्य तर इतकी काळीज पिळवटणारी आहेत, की ती पाहताना डोळ्यात पाणी तर येतंच, पण बॅरीला पाहताच चेहेऱ्यावर क्रोधही उमटतो. ते सर्व चित्रीत करताना वापरलेले साऊंड इफेक्ट्स आणि प्रकाशयोजना यांमुळे ती दृष्य कमाल रंगली आहेत. मी सेल्यूलर जेलला भेट दिली तेव्हा तिथे कैद्यांना शिक्षा देण्यासाठी वापरलेली साधनं होती. त्यावेळी खरंतर काहीच वाटलं नाही. पण आज जेव्हा हा चित्रपट पुन्हा पाहिला (आधी मराठी चित्रपट पाहिला होता...) तेव्हा त्या शिक्षांची तीव्रता अधिक जाणवली...

चित्रपटात वापरलेली रंगभूषा आणि वेशभूषा त्या काळाचं तंतोतंतं दर्शन घडवतात. तुरूंगवासात तात्यारावांचे आतोनात हाल होत असताना त्यांची बिघडलेली प्रकृती, तिथल्या निकृष्ट दर्जाच्या जेवणामुळे त्यांचे खराब झालेले दात. त्यांचे मागे सरकलेले केस. तात्यारावांच्या वाढत्या वयासोबत त्यांच्या चेहेऱ्यात होत गेलेले बदल. लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, इतकंच कशाला, तर त्या काळातल्या स्रियांसाठी, पुरुषांसाठी, शिवाय ब्रिटीश व फ्रेंच लोकांसाठींचे कपडेपटही चपखल बसलेत. कुठेही मेकपचा भपका किंवा भारी-भरजरी कपड्यांचा वापर दिसत नाही. संगीतानेही चित्रपटात महत्वाची भूमिका बजावली आहे. मंगेशकर कुटुंबाने गायलेली, "ने मजसि ने..." ही तात्यारावांची कविता सर्वांच्याच लक्षात आहे. तीच कविता चित्रपटात इतक्या परिणामकारकरित्या वापरली गेली आहे, की कविता ऐकताना आणि समोरचं दृष्य पाहताना डोळे ओले झाल्याशिवाय राहत नाहीत...

चित्रपटाचा सर्वात महत्वाचा स्तंभ आहे पात्रांची निवड आणि अदाकारी. रणदीप हुडा आणि अंकिता लोखंडे ही दोन पात्र वगळता कुठलाही मोठा कलावंत चित्रपटात दिसत नाही. सर्व पात्रांची निवड शंभर टक्के साचेबद्ध आहे.  चित्रपटातली अदाकारी हा चित्रपटावरचा सोनेरी कळस आहे असंच मी म्हणेन. रणदीप हुडा आणि अंकिता लोखंडे या दोघांना पाहतानाही तात्याराव आणि यमुनाबाईच समोर दिसतात. चित्रपटातली काही दृष्य फार सुरेख आहेत. तात्यारावांची त्रिखंडात गाजलेली उडी जिथे टाळ्यांचा पाऊस पाडून गेली. तिथेच तात्याराव आणि बाबाराव म्हणजेच गणेश दामोदर सावरकर या दोन भावांची नऊ वर्षांनंतर झालेली भेट डोळ्यात आसवं आणून गेली. "I outlasted you Barry..." या वाक्याच्या वेळी त्याही परिस्थितीत तात्यारावांच्या चेहेऱ्यावरचे करारी भाव आणि बॅरीच्या चेहेऱ्यावर असलेले अपराधीपणाचे भाव त्या दृष्याला अधिक उभारी देतात...

ज्यांनी ज्यांनी हा चित्रपट पाहिला, जवळ जवळ त्या सर्वांनीच चित्रपटाबद्दल आपले विचार मांडले. त्या विचारांच्या महायज्ञात माझं हे छोटंसं अर्पण. फक्त हिंदूंनीच नाही, तर प्रत्येक भारतीयाने थियेटरमध्ये जाऊन आवर्जून पहावी अशीच ही कलाकृती आहे. रणदीप हुडा अभिनीत व दिग्दर्शित, "स्वातंत्र्यवीर सावरकर..."

आसिन्धु सिन्धु-पर्यन्ता...
यस्य भारत-भूमिका ।
पितृभू: पुण्यभूश्चैव स वै...
हिन्दुरिति स्मृत: ॥

@ अनिकेत परशुराम आपटे.

Tuesday, 26 March 2024

सुडांची उत्कंठावर्धक कहाणी...

"क्यौं जनाब, ईंट का जवाब पत्थर से देने आए हो..." "नहीं, धोखे का जवाब, बदले से..." हे संवाद आहेत, २०२४ साली प्रदर्शित झालेल्या, "फायटर" या चित्रपटातले...


फुलवामामध्ये आपल्या जवानांवर झालेला हल्ला आणि त्याचं प्रतिउत्तर म्हणून आपल्या वायूसेनेने बालाकोट येथे केलेला एयर स्ट्राईक, यावर बेतलेलं कथानक म्हणून "फायटर" या चित्रपटाची चांगलीच हवा होती. पण फुलवामा आणि बालाकोट या घटना चित्रपटाचा एक छोटा भाग होता हेच चित्रपट पाहताना जाणवतं...

कथानक सुरू होतं श्रीनगर एयर बेसवर होणाऱ्या हल्ल्याच्या खबरेने. तो हल्ला मोडीत काढण्यासाठी 'एयर ड्रॅगन्स' या घातक समुहाची स्थापना केली जाते. त्यांच्या ट्रेनिंग दरम्यानच फुलवामाचा हल्ला होतो आणि प्रतिउत्तरादाखल बालाकोटचा एयर स्ट्राईक केला जातो. त्या एयर स्ट्राईकचा बदला घेण्यासाठी अझ़र अख़्तर (ऋषभ शेणॉय) नावाचा एक अतिरेकी श्रीनगर एयर बेसलर अचानक हल्ला करतो. प्रतिउत्तरादाखल शमशेर 'पॅटी' पठानिया (ऋतिक रोशन), बशीर 'बॅश' ख़ान (अक्षय ओबेरॉय) आणि सरताज 'ताज' गिल (करण सिंह ग्रोव्हर) हे तीन एयर ड्रेगन्स दिलेले हुकूम मोडत बॉर्डर ओलांडून पाकिस्तानात घुसतात...

पॅटी वाचतो पण ताज आणि बॅश शत्रूच्या जाळ्यात अडकतात. पॅटीवर या गोष्टीचा ठपका ठेऊन त्याला एयर ड्रॅगन्स समुहातून निलंबित करून त्याची बदली केली जाते. तिथे पाकिस्तान सरकार ताज आणि बॅशला सोडायला तयार होतं. पण अझ़र मात्र बॅशला मारून त्याचं शव परत पाठवतो. या गोष्टीचा बदला घेण्यासाठी एक मिशन ठरवलं जातं. ताज आणि बॅश आपल्यामुळे पकडले गेले हा सल मनात ठेवलला पॅटी पुन्हा एकदा दिलेले हुकूम झुगारून मिशनमध्ये शिरकाव करतो आणि मिनल 'मिनी' राठोड़ (दीपिका पदुकोण) व एयर ड्रॅगन्सचा हेड राकेश 'रॉकी' जयसिंह (अनिल कपूर) यांच्या मदतीने अझ़र अख़्तरसह सर्व अतिरेक्यांना कंठस्नान घालतो आणि ताजलाही वाचवतो...

फक्त फुलवामा आणि बालाकोट या घटनांना धरून चित्रपटाचं कथानक तयार झालं आसतं तर "उरी" सारखा परिणाम साधता आला असता. पण बदल्यांची मालिका आणि काही काल्पनिक व्यक्तिरेखांचा भरणा, यांमुळे कथानक मुख्य रस्त्यापासून थोडं भरटकल्यासारखं जाणवलं. चित्रपटात गाणी जर नसती तर चित्रपट वेग राखण्यात यशस्वी झाला असता. त्यातल्या त्यात, "हीर आसमानी..." आणि "शेर खुल गए..." ही दोन गाणी तितकीच वेगवान असल्याने जास्त फरक पडत नाही. शिवाय, "सुजलाम् सुफलाम् मलयजं शितसाम्..." ही ओळ ज्या पद्धतीने वापरली गेली आहे, चित्रपटातलं जोशपूर्ण वातावरण राखण्यात ती प्रभावी ठरते...

चित्रपटाच्या तीन जमेच्या बाजू आहेत. चित्रपटाचं पार्श्वसंगीत, चित्रपटात दाखवलेली साहसदृष्य आणि कलावंतांची अदाकारी. वेगवान कथानकाला शोभेल असं जबरदस्त पार्श्वसंगीत चित्रपटाला लाभलं आहे. चित्रपटाची साहसदृष्य तर भन्नाट रंगली आहेत. विशेषत: पॅटीची एंट्री आणि पॅटी व रॉकीची हवाई जुगलबंदी. साहसदृष्यांसाठी वापरलेले कॅमेरा एँगल्स निव्वळ अप्रतीम आहेत. अधाकारी म्हटली, तर ऋतिक रोशन आणि दीपिका पदुकोण जरी चित्रपटाचे नायक-नायिका असले, तर अनिल कपूर यांनी अदाकारीमध्ये बाजी मारली आहे. चित्रपटातले संवादही दमदार आहेत. काही संवाद तर टाळ्या घेणारे ठरलेत...

एकंदरीत, सुडांची मालिका दर्शवणारं कथानक, हा उल्लेख होईल, असा चित्रपट म्हणजे, सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित, "फायटर..."

@ अनिकेत परशुराम आपटे.