Thursday, 28 December 2023

एक सीन दोन पैलू...

फरहान अख़्तर यांचा "दिल चाहता है", कल्ट क्लासिक चित्रपटांमध्ये गणला जातो. चित्रपटाची कथा, गाणी, चित्रिकरण, सर्वच वेगळ्या स्तराचं होतं. एक सीन आहे, जो चित्रपटात दोन वेळा येतो. पण दोन्ही वेळेला अर्थ वेगळा असतो...

शालिनी (प्रीती झ़िंटा) एका ठिकाणी असते. आकाश (आमिर ख़ान) तिच्या जवळ जातो आणि घुडघ्यावर बसून एक लांबलचंक संवाद म्हणतो. त्यावेळी समीर (सैफ अली ख़ान) आकाशच्या मागे असतो तर रोहित (अयूब ख़ान) शालिनीच्या आस-पास असतो. हा सीन जेव्हा घडतो तेव्हा तिथे एका पार्टीचं वातावरण असतं. चित्रपटाच्या सुरुवातीच्या अर्ध्या-पाऊण तासात आणि शेवटच्या अर्ध्या-पाऊण तासात, असा दोन वेळा हा सीन चित्रपटात येतो. पण दोन्ही वेळी या सीनच्या अर्थात जमीन-आसमानाचं अंतर असतं...

चित्रपटाच्या सुरुवातीला आलेल्या या सीनमध्ये एक बेफिकीरपणा किंवा टाईमपासची वृत्ती दिसून येते. मोठमोठ्याने संवाद म्हणून मोकळा झालेला आकाश सर्वांची टाळी तर मिळवतो, पण त्यात आपण कसे सर्वांचं लक्ष वेधणारे हा विचार दिसतो. शालिनीसुद्धा एक बाईलवेडा बतफैल मुलगा म्हणूनच आकाशला पाहत असते. हाच सीन दुसऱ्यांदा येतो, तेव्हा जबाबदारपणा किंवा गांभिर्य जाणवतं. आकाशचं संवाद म्हणून झाल्यावर टाळ्यांच्या जागी शांतता पसरते. त्या शांततेत, हा मुलगा कदाचित खरंही बोलत असेल, हा विचार दिसतो...

दोन्ही सीन्स मधले मुख्य फरक आहेत संवादफेक आणि संवादाची पातळी. पहिल्या सीनमध्ये एक मुलगा एका मुलीला पटवण्याचा प्रयत्न करतो आहे, पार्टी संपली नातं संपलं, अशा प्रकारची ती संवादफेक होती. एका श्वासात ते संवाद पूर्ण झाल्याने शब्दांचे अपेक्षित अर्थ पोहोचले नाहीत. दुसऱ्या वेळी आलेल्या सीनमध्ये संवाद उच्चरण्याची गती हळू होते. संवादही खालच्या पट्टीत मिहटले जातात आणि योग्य ठिकाणी आलेल्या ठेहरावांमुळे शब्दांचे अपेक्षित अर्थही व्यवस्थित पोहोचतात. या वेळी पटवापटवीपेक्षा भरवसा जास्त दिसतो...

आमिर ख़ानने दोन्हीही सीन्समध्ये कमाल केली आहे. आकाशचं शालिनीकडे येणं, त्याची देहबोली, त्याच्या हालचालींममधला वेग, त्याचे संवादांमधले ठेहराव, यांमुळे दोन्हीही सीन्स कमालीचा परिणाम साधतात. आमिर ख़ानसोबतच प्रीती झ़िंटाने सुद्धा छान साकारले आहेत ते सीन्स. दोन्हीही सीन्समध्ये शालिनीला एखाद-दुसरा संवाद आहे. पण फक्त डोळ्यांवाटे संवादांच्या अर्थांमधला फरक तिने छान दर्शवला आहे...

संवादात (communication) सर्वात महत्वाचा असतो तो अर्थ. आपण जेव्हा समोरच्याशी संवाद साधतो. तेव्हा त्या संवादाचा अर्थ लावण्याची कामगिरी संवादकर्त्यापेक्षा समोरच्या व्यक्तीवर असते. पण त्या अर्थाची जबाबदारी मात्र संवादकर्त्याची असते. उच्चारलेल्या प्रत्येक शब्दाचा आणि संपूर्ण संवादाचा योग्य अर्थ समोरच्या व्यक्तीने लावावा यासाठी संवादकर्त्यानेच योग्य शब्द, शब्दांवरचं वजन, बोलण्याची पातळी आणि देहबोली या सर्वांचा योग्य वापर केला, तर संवादाचा अर्थ समोरच्यापर्यंत अचूक पोहोचतो...

"दिल चाहता है" मधल्या या दोन्हीही सीन्समधून हाच बोध आपल्याला मिळतो...

@ अनिकेत परशुराम आपटे.

1 comment:

  1. मोजक्या भाषेत..... मस्त.....

    ReplyDelete