Friday, 13 August 2021

चोर-पोलिसचा भन्नाट खेळ...

चोर आणि पोलीस यांच्यावर बेतलेले प्रसंग आपण अनेक चित्रपटांत पाहतो. बऱ्याच वेळेला हे प्रसंग, चित्रपटच्या मुख्य कथानकाचा एक भाग असतात. पण काही चित्रपट असे असतात, ज्यांत चोर आणि पोलीस यांच्यावर जास्त फोकस दिला जातो. असेच तीन चित्रपट म्हणजे यश राज फिल्म्स या नावाखाली बनलेले "धूम", "धूम २" आणि "धूम ३..."

धूम (२००४)...

शिताफीने चोऱ्या करून सुसाट बाईक्सवर पळून जाणारी कबीर (जॉन एब्राहम) व त्याची गँग, आणि अली (उदय चोपड़ा) या उडाणटप्पू बाइकरच्या मदतीने त्यांचा पिच्छा पुरवणारा ए.सी.पी. जय दिक्षीत (अभिषेक बच्चन), असं कथानक. त्या काळी इतर कथांमध्ये हे कथानक नाविन्यपूर्ण असल्याने चित्रपटाचं अप्रूप होतं. जबरदस्त वेगाच्या बाइक्स या चित्रपटाचा यू.एस.पी. होता. बाईकसोबतची थ्रिलिंग पाठलागाची दृश्य तर अप्रतीम वठली होती...

चित्रपटातली ईशा देवलची भूमिका कथेला छान वळणं देत होती. थोड्याशा ग्रे शेडने नटलेली शीना शेवटी पैसा सोडून प्रेम स्वीकारते हा भागही छान जमून आला. शिवाय, चित्रपटात थोडे वेगळे रंग भरणारी आणि गाणी-घेणी करणारी स्वीटीची (रिमी सेन) व्यक्तिरेखाही छान रंगतदार झाली होती. अर्थात बंगाली भाषेचा वापर, एखादं प्रणय दृश्य आणि गाणी, याखेरीज स्वीटीला कथानकात काहीच वाव नव्हता...

धूम २ (२००६)...

वेगवेगळं वेषांतर व हावभाव करून अशक्यप्राय चोऱ्या करणारा आर्यन (हृतिक रोशन), आणि त्याच्या मागे लागलेले, या वेळी पोलिसात भरती झालेला अली व ए.सी.पी. जय दिक्षीत असं कथानक. हृतिक रोशनचा "धूम २" असा हा चित्रपट ओळखला गेला. याचं मुख्य कारण होतं हृतिक रोशन यांची अदाकारी आणि त्यांनी केलेल्या वेगवेगळ्या वेशभूषा, ज्या चित्रपटासाठी सर्वात मोठ्या यू.एस.पी. ठरल्या...

कथेत, शोनाली व मोनाली या दुहेरी व्यक्तिरेखा बिपाशा बासूने छान रंगवल्या, पण या दोघींनीही आर्यनला पकडण्यात काही हातभार लावला असं जाणवलं नाही. फक्त उदय चोपड़ा फुकट जाऊ नये म्हणून केलेली ही तरतूद होती असं वाटलं. त्याउलट ऐश्वर्या राय-बच्चन यांनी साकारलेली सुनहरी ही व्यक्तिरेखा कमाल रंगली. मुख्य कथानकाला शेवटपर्यंत वेगवेगळी वळणं देण्यात या व्यक्तिरेखेचा सिंहाचा वाटा होता. रिमी सेनची स्वीटी यावेळी थोडी आऊट फोकस वाटली. चित्रपटाच्या प्रमुख नायकाला नायिका आहे, हे दाखवण्यासाठी फक्त सुरुवातीच्या काही प्रसंगांमध्ये स्वीटीचा वापर केला गेला असं वाटलं...

धूम ३ (२०१३)...

वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी बँकेवर सराईत दरोडा घालणारा साहिर (आमिर ख़ान) आणि त्याला रोखण्यासाठी विशेष नेमणूक झालेल्या ए.सी.पी. जय दिक्षीत व अलीने केलेले शर्थीचे प्रयत्न, हे कथानक. तांत्रिकदृष्ट्या हा चित्रपट त्याच्या आधीच्या दोन भावंडांपेक्षा सरस असला, तरी "धूम ३" विशेष लक्षात राहिला आमिर ख़ान यांच्या जबरदस्त अदाकारीमुळे आणि त्यांनी वापरलेल्या हायटेक बाईकमुळे. हीच बाईक चित्रपटाचा सर्वात मोठा यू.एस.पी. ठरली...

चित्रपटात थरारासोबतच भावनिक गुंतागुंतही बऱ्यापैकी दाखवली गेली होती. भावंडांचं नातं, मैत्रीचं नातं आणि प्रेम, या तीनही आघाड्यांवर आमिर ख़ान यांनी चांगलीच बाजी मारली. एकाच दृश्यात, एकाच व्यक्तीमधून दोन वेगळ्या छटा दाखवताना त्यांनी कमाल केली. शिवाय कतरीना कैफने साकारलेली आलिया ही व्यक्तिरेखादेखील कथेतली भावूकता जपण्यात मोलाची मदत करते. चित्रपटातल्या दोन्हीही नायकांना प्रणय प्रसंग दाखवण्यासाठी काहीच वाव नसल्याने त्यांच्या नायिकांना पूर्ण हद्दपारच केलेलं दिसतं...

संगीत व पार्श्वसंगीत...

प्रीतम, सलीम-सुलेमान आणि द्वारक वॉरियर या मंडळींनी तीनही चित्रपटांची सांगितिक बाजू छान सांभाळली आहे. अप्रतीम नृत्याविष्कार असलेली उडत्या चालींवरची गाणी असो किंवा तीनही चित्रपटांची signature tune असो, या त्रिकुटाने भन्नाट काम केलं आहे. सर्व गाणी, चित्रपटांच्या वेगाला साजेशी असल्याने, गाण्यांमुळे चित्रपट भरकटले असं कुठेही वाटत नाही...

हाणामारी व साहसदृश्य...

तीनही चित्रपटांमधली साहसदृश्य अत्यंत उत्कंठावर्धक आहेत. द्वंद्वयुद्ध असो किंवा पाठलागाची दृश्य असो, प्रत्येक दृश्य खुर्चीला खिळवून ठेवणारं आहे. तीनही चित्रपटांमधली स्टाईलबाज हाणामारी चर्चेचा विषय बनली. ऍलन अमीन या इसमाने चित्रपटांमधली ही बाजू बखूबी सांभाळली आहे. धिम्या गतीने येणारे पंचेस, किक्स आणि हवेत गटांगळ्या खात जमिनीवर स्थिरावणारे नायक किंवा खलनायक, हे पडद्यावर पाहताना कमाल अनुभव येतो...

लोकेशन्स...

तीनही चित्रपटांसाठी सर्वात मोठी हायलाईट ठरली ती चित्रपटांत वापरलेली सुंदर लोकेशन्स. "धूम"मध्ये मुंबईचे रस्ते व गोव्याचे काही भाग दाखवण्यात आले. "धूम २"मधल्या चोराला जगावर अधिराज्य गाजवायचं असतं. त्यामुळे जगभरातली वेगवेगळी लोकेशन्स दिसली. "धूम ३"ला सुरुवातीला थोडा दाक्षिणात्य टच असल्याने तशा प्रकारची घरं दाखवली गेली पण पुढे पुढे शिकागो व त्याच्या आस-पासची सुंदर लोकेशन्स पडद्यावर येत राहिली...

सिनेमॅटोग्राफी...

प्रत्येक चित्रपटात छायांकन म्हणजेच सिनेमॅटोग्राफीला खूप महत्व असतं. नीरव शाह, विकास शिवरामन आणि सुदीप चॅटर्जी या त्रिकुटाने ही जबाबदारी उत्तम सांभाळली आहे. कॅमेरा एँगल्स म्हणू नका, लाँग शॉट्स म्हणू नका, क्लोज शॉट्स म्हणू नका, एयर शॉट्स म्हणू नका, सगळ्याच बाबतीत तीनही चित्रपटांचं छायांकन उत्तम झालं आहे...

नायक...

कुठल्याही नायकप्रधान चित्रपटात, नायक किंवा हिरो महत्वाचा असतो. त्याच्यावर जास्त फोकस दिला जातो. त्याला जास्त फुटेज दिलं जातं. पण "धूम ट्रिलॉजी"मध्ये चित्र वेगळं दिसलं. तीनही चित्रपटांत प्रमुख नायकाला हळू हळू कमी लेखल्याचं जाणवतं. ए.सी.पी. जय दिक्षीतने "धूम"मध्ये ज्या हुशारीने चोरांना अडकवलं आणि पकडलं, सुरुवातीचा काही वेळ सोडल्यास तसं काही "धूम २"मध्ये जास्त दिसलं नाही. चित्रपटाच्या एकदम शेवटी जय सत्य उघड करतो तेव्हा ते कुठेतरी पुन्हा जाणवलं. "धूम ३"मध्ये तर जयला जवळ जवळ बाजूलाच सारलं गेलं आहे. चोर स्वत: शरण येतो तेव्हा कुठे तो जयच्या हाती लागतो...

खलनायक...

तीनही चित्रपटांत सर्वात दमदार व्यक्तिरेखा जर कोणाच्या असतील तर ते होते चित्रपटातले प्रमुख खलनायक अर्थात चोर. "धूम"मधला कबीर, "धूम २"मधला आर्यन आणि "धूम ३"मधला साहिर, असा चढता ग्राफ आपल्याला दिसतो. कबीर आणि आर्यनला अदाकारीसाठी तितकीशी संधी नव्हती. पण साहिरला मात्र भरपूर वाव होता. तीनही चोरांचे तीनही चित्रपटातले प्रवेश अर्थात एंट्री वेगळ्या होत्या. तिघांचाही अंत मात्र एकाच पद्धतीने, ऊंचावरून खाली पडून झाला. पण जबरदस्त व्यक्तिरेखा लाभलेल्या खलनायकांनी तीनही चित्रपट खाऊन टाकले हे नक्की...

एकंदरीत, यश राज फिल्म्सच्या पोतडीतून निघालेल्या "धूम", "धूम २" व "धूम ३" या तीनही चित्रपटांनी लोकप्रियता मिळवत, प्रचंड गल्ला जमवत चोर-पोलिसचा भन्नाट खेळ रंगवला...

@ अनिकेत परशुराम आपटे.

Wednesday, 4 August 2021

भारदस्त नावाची चुकलेली वाट...

'मज़लूमों का देवता...', किंवा 'चोरों के घर चोरी कर, गरीबों को इंसाफ दिलानेवाला...' अशा पठडीतले अनेक चित्रपट आहेत. पण दोन चित्रपट असे आहेत, जे सुरू झाले एका वेगळ्या उंचीवर, पण नायक-नायिकेमधल्या प्रेमाच्या गल्लीत घुसून थांबले. या चित्रपटांचं नाव एक होतंच, पण कहाणीही थोड्याफार फरकाने एकच होती. हे चित्रपट होते १९५५ आणि १९७८ साली प्रदर्शित झालेले, "आज़ाद..."


१९५५ साली आलेल्या "आज़ाद"मध्ये दिलीप कुमार व मीना कुमारी, नायक व नायिकेच्या भूमिकेत होते तर प्राण साहेबांनी मुख्य खलनायक रंगवला होता. १९७८ साली प्रदर्शित झालेल्या "आज़ाद"मध्ये याच भूमिका अनुक्रमे धर्मेंद्र, हेमा मालिनी आणि अजित यांच्या वाट्याला आल्या. प्रेम चोपड़ा यांनी १९७८च्या "आज़ाद"मध्ये जी सहखलनायकाची भूमिका केली होती, ती १९५५ सालच्या "आज़ाद" मधल्या मुराद यांच्या सहखलनायकी व्यक्तिरेखेपेक्षा जराशी वेगळी होती. शिवाय दोन्हीही चित्रपटांमध्ये खलनायक व सहखलनायक यांचं नातंही वेगळं होतं...

दोन्हीही चित्रपटांमध्ये मुख्य व्यक्तिरेखेला, म्हणजेच 'आज़ाद'ला समोर आणताना एक थ्रिलिंग दृश्य दाखवलं गेलं. पहिल्या वेळेस नायिकेला पळवून नेणाऱ्या माणसांना थोपवण्यासाठी कायदा हातात घेतलेली 'आज़ाद' व त्याची माणसं दिसली, तर दुसऱ्यावेळी तरूण मुलीचं एका म्हाताऱ्याशी होत असलेलं जबरदस्तीचं लग्न थांबवताना नक़ाबपोश 'आज़ाद' दिसला. या दृष्यांनंतर चित्रपटात काहीतरी वेगळं पहायला मिळेल असं वाटलं होतं, पण जशी कथा पुढे सरकते तसा अपेक्षाभंग होतो. कुमारने म्हातारा किंवा नवाबसाहब असे बदल करत 'आज़ाद'ला छान लपवलं होतं. अशोकने समोर आणलेला नक़ाबपोश 'आज़ाद' मात्र पाचंच मिनिटे टिकला आणि पुढच्या काही मिनिटातच त्याचा परदाफाशही झाला होता...


दोन्हीही चित्रपटांमधले अड्डे कमाल होते मात्र. डोंगरा डोंगरात असलेली गुहा, तिथे जाणारा रोप वे, तो रोप वे चालवण्यासाठी मानवचालित चक्की, गुहेच्या आसपास असणारे हिंस्त्र प्राणी, हे सगळं दाखवणारा १९५५च्या "आज़ाद" मधला कुमारचा अड्डा असो किंवा, जुनाट बंगल्यातल्या एका चोर दरवाजापलिकडे असलेला विचित्र आणि खतरनाक सापळ्यांनी सजलेला व गरम लाव्हा रसाच्या विहिरीचा १९७८च्या "आज़ाद"मधल्या अजितसिंहचा अड्डा असो, दोन्हीही अड्डे भन्नाट होते. अर्थात अजितसिंहचा खरा अड्डा म्हणजे तो जुनाट वाडाच होतं खरंतर, पण मुख्य फोकस त्या सापळ्यांच्या जागेवर होता. या दोन्हीही अड्ड्यांवर चित्रित झालेली दृश्य मात्र अतिशय उत्कंठावर्धक होती...




आता त्या मुद्द्याकडे येऊन जिथे हे दोन्ही चित्रपट आपापल्या नावापासून दुरावत गेले असं मला वाटलं. तो मुद्दा म्हणजे प्रेम. दोन्हीही चित्रपटात नायकानं नायिकेला पळवून नेत दूर नेल्याचं दाखवलं गेलं आहे. तिथे काही दिवस राहिल्यावर नायिकेला नायकामधला जोडीदार सापडतो आणि प्रेमाला पालवी फुटते. चित्रपटांतला हा कथाभाग बराच लांबल्याने आणि त्यात गाण्यांचा भरणा असल्याने चित्रपटातला पंच कमी होत जातो असं काही अंशी मला जाणवलं. कुठेतरी असं वाटलं की 'आज़ाद' आपल्या नायिकेभोवतीच घुटमळत राहतो आणि तिच्यावर व तिच्या वडिलांवर येणाऱ्या संकटांचाच सामना करत राहतो. १९५५ सालचा 'आज़ाद' तरी ठिक, की शेवटी शेवटी सर्व गुन्हेगारांना पकडून देऊन काही सामाजिक कार्य तरी करताना दिसतो. पण १९७८चा 'आज़ाद' बहुतेक अर्ध्या-पाऊण तासातच लुप्त होतो...


१९५५चा 'आज़ाद' हा आजाद पंछी या पठडीतला सामाजिक बांधिलकी जपणारा तरूण वाटतो, तर १९७८चा 'आज़ाद' हा कायदा हाती घेणारा स्वच्छंदी बंडखोर तरूण वाटतो. थोडक्यात, भारदस्त नाव असूनही त्या नावाला पुरेसा न्याय न देता फक्त नायिकेवरचं प्रेम आणि तिच्या वडिलांवरचं संकट दूर करणारा नायक, याच गल्लीत घुटमळत राहणारे एकाच नावाचे व आशयाचे दोन चित्रपट म्हणजे १९५५ व १९७८ साली प्रदर्शित झालेले, "आज़ाद..."

@ अनिकेत परशुराम आपटे.