Monday, 3 May 2021

भय इथले कळतच नाही...

दोन समांतर कथानकं आणि त्यांना जोडणारा एक दुवा, म्हणजे भय. हीच पार्श्वभूमी आहे २०१८ साली प्रदर्शित झालेल्या राहुल भाटणकर दिग्दर्शित, "भय" या चित्रपटाची...

गोकूळ (अभिजीत खांडकेकर) आणि मीरा जोशी (स्मिता गोंदकर) हे एक सुखवस्तू कुटुंब. एका बाजूला जिथे मीरा गरोदर असते तिथे दुसऱ्या बाजूला गोकूळ एका मानसिक आजाराने ग्रस्त असतो. Paranoid Schizophrenia या आजाराच्या विळख्यात अडकलेला गोकूळ सतत कसल्या ना कसल्या भितीच्या सावटाखाली वावरत असतो. याच भितीपोटी गोकूळच्या हातून असं काहीतरी घडतं, की तो पुरता हादरतो आणि त्याचा मानसिक तोल ढासळतो...

दुसरीकडे मंत्री जगतापच्या (उदय टिकेकर) सांगण्यावरून भरत टांगे (विनीत शर्मा) नावाचा एक गुंड एका बिल्डरच्या भावाला भर रस्त्यात गोळ्या घालून ठार करतो. आता आपण यातून वाचत नाही हे समजल्यावर भरत त्या मंत्र्याचीच मदत मागतो. त्याच वेळी ही केस हाताळणाऱ्या इं. विश्वासला (सतीश राजवाडे) भरतची खबर लागते आणि आपल्या साथिदारांसह तिथे अचानक धाड टाकून इं. विश्वास भरतचा एन्काऊंटर करतात...

दोन्ही कथानकं एकसारखीच वेगवान आहेत. पण चित्रपटातला कच्चा दुवा म्हणजे चित्रपटाची पटकथा. दोन्ही कथानकं पहिल्यापासून शेवटपर्यंत समांतर चालत राहतात पण ही कथानकं एकत्र येतील किंवा एकमेकांत गुंततील असं कुठेच दिसत नाही. दोन्हीही कथानकांना एकत्र आणणारा एक प्रसंग चित्रपटात येतो खरा, पण त्या प्रसंगाचा चित्रपटात काहीच उपयोग झालेला नाही...

चित्रपटात जर गोकूळचा आजार आणि त्यामुळे घडत गेलेले प्रसंग यांचा वापर केला असता किंवा भरत टांगे विरुद्ध इं. विश्वास इतकाच कथाभाग दाखवला गेला असता, तर एक साकोलॉजिकल थ्रिलर किंवा कॉप थ्रिलर म्हणून हा चित्रपट नक्कीच उजवा ठरला असता. दोन्हीही कथानकं एकत्र दाखवायच्या नादात, लेखकाला काय म्हणायचं आहे तेच समजलं नाही...

पटकथेप्रमाणेच चित्रपटाचं संगीतही मनोरंजनापेक्षा स्पीडब्रेकरचं काम जास्त करतं. चित्रपटात तीन गाणी आहेत. कथानकांतला वेग आणि उत्कंठा पूर्णच घालवण्याचं काम ही गाणी करतात. चित्रपटात येणारं पहिलंच गाणं, कथेशी काडीचा संबंध नसताना तिथे का आलं, हेच एक न सुटणारं कोडं आहे...

चित्रपटात बघण्यासारख्या दोनच गोष्टी आहेत. पहिली आहे चित्रपटातली साहसदृष्य आणि दुसरी आहे अभिजीत खांडकेकर यांची अदाकारी. गोंधळलेल्या, भेदरलेल्या, कोलमडलेल्या गोकूळची व्यक्तिरेखा अभिजीत खांडकेकरांनी छानच वठवली आहे. एकंदरीत, गोंधळलेल्या पटकथेत गुंतलेला, नितीन सुपेकर लिखीत, "भय" हा चित्रपट, वन टाईम वॉच म्हणून ठिक आहे...

@ अनिकेत परशुराम आपटे.

1 comment: