Saturday, 13 March 2021

भयाचा फूस झालेला बार...

लग्नासंदर्भात अनेक ठिकाणी अनेक प्रथा रूढ असतात. काही प्रथा कायद्याला धरून असतात तर काही कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या असतात. आता, अशाच एका चिवित्र प्रथेवर आधारलेली एक गोष्ट...

एका आटपाट नगरात एक चिवित्र प्रथा असते. मुलाला जी मुलगी आवडते, त्या मुलीला पळवून तिचं लग्न त्या मुलाशी लावलं जातं. नगरातला एक गुंड आणि त्याचे दोन साथिदार हे पळवा-पळवीचं काम करत असतात. हे दोन साथिदार एकमेकांचे घनिष्ट मित्र असतात. एकदा त्या गुंडाच्या सांगण्यावरून हे दोन साथिदार मित्र एका मुलीला पळवतात. इथे येतो कहानी में ट्विस्ट...

पळवलेल्या त्या मुलीला, लग्नासाठी आसूसलेल्या एका चेटकिणीने भारलेलं असतं. एक भयावह आणि मजेशीर अशा खेळाला सुरुवात होते. जिथे एका घाबरट मित्राला त्या चेटकिणीचं बिभत्स रूप दिसतं तिथे दुसऱ्या मित्राला त्याच चेटकिणीच्या प्रेमळ रूपाचा भास होत राहतो. आपल्या मित्राला वाचवण्यासाठी आणि त्या मुलीला चेटकिणीच्या पाशातून सोडवण्यासाठी तो घाबरट मित्र उपाय करणार इतक्यात...

कथा आहे मृघदीपसिंह, लांबा आणि गौतम मेहरा लिखीत, "रुही" या चित्रपटाची. भँवरा पांडे, रुही (जान्हवी कपूर) आणि कट्टानी क़ुरेशी या तीन मुख्य पात्रांभोवती कथा पिंगा घालत राहते. मध्ये मध्ये येणाऱ्या इतर चित्रपटांच्या गाण्यांतील काही ओळी कथेत छान रंग भरतात. ती येणारी गाणी जरी रोम्यांटिक असली, तरी त्या गाण्यांमुळे या चित्रपटात विनोद निर्मिती अधिक होते. याउलट, चित्रपटातील नवी गाणी काही खास करतील असं वाटत नाही...

भय दाखवण्यासाठी केलेली वातावरणनिर्मिती आणि धक्कातंत्राचा वापर उत्कंठा निर्माण करण्यात यशस्वी होतात खरे पण ते तेवढ्यापुरतंच राहतं. रोमँटिक दृष्य मग भितीदायक दृष्य आणि नंतर येणारं हलकं-फुलकं विनोदी दृष्य हे समीकरण काही काळासाठी छान वाटतं, पण पुढे पुढे याचा अतिरेक होत जातो आणि मग हेच समीकरण कंटाळवाणं होत जातं. "रुही"च्या आधी प्रदर्शित झालेल्या "स्त्री" या चित्रपटात भयाचा जो प्रभावी वापर दिसला, तसा या चित्रपटात दिसला नाही...

एका ठिकाणी कथानक कमकुवत वाटतं. भँवरा भलेही रुहीच्या प्रेमात पडतो, पण चेटकिणीच्या प्रेमात आंधळा झालेला कट्टानी तितकासा पटत नाही. एखादी चेटकीण अचानक समोर आल्यावर सर्वसाधारण माणसाचा थरकाप उडतो. पण इथे कट्टानीमात्र त्या चेटकिणीला पाहताच तिच्याकडे ओढला जातो. हे थोडंसं अनाकलनीय वाटतं. अर्थात, कथेला एक वेगळं वळण देण्यासाठी हे केलं गेलं हे मात्र खरं...

एक मुद्दा राहतो अदाकारीचा. चित्रपटात इतर कलावंतांच्या भूमिका बऱ्यापैकी वठल्या आहेत. राजकुमार राव व वरूण शर्मा यांनी त्यांच्या वाट्याला आलेल्या भूमिका चोख बजावल्या आहेत पण जन्हवी कपूरमात्र थोडी कमी पडते. तिला मिळालेल्या व्यक्तिरेखेत जास्त संवाद नाहीत, पण जे आहेत त्यातही भय किंवा विवशता कमी जाणवते. अनेक दृष्यात जान्हवी कपूरला अदाकारीसाठी उत्तम वाव होता पण तिला ती संधी साधता आली नाही. इथे रंगभूषा म्हणजेच मेकपने दोनशे टक्के काम करून योग्य प्रभाव पाडला आहे...

एकंदरीत, हार्दिक मेहता दिग्दर्शित, "रुही" हा चित्रपट म्हणजे विनोदाचं कोंदण लाभलेला भयाचा फुसका बार म्हणावा असाच आहे. तो पहावा की न पहावा, that is the question...

@ अनिकेत परशुराम आपटे.

No comments:

Post a Comment